Home Blog Page 132

बदलापुरात 4 वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून अत्याचार:आरोपीस अटक

मुंबई-अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, बदलापूर शहर पुन्हा एकदा एका घृणास्पद घटनेने हादरले आहे. पश्चिम भागातील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करत त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड करून पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली.

शाळेतून येताना व्हॅनमध्ये मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाने तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने पालकांना घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. पण शाळा प्रशासनाने चालकाचीच पाठराखण केली, असा आरोप पालकांनी केला आहे.या प्रकरणातील संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून, शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (वय ३ व ४ वर्षे) लैंगिक अत्याचाराची घटना आॅगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली. या दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तो चकमकीत मारला गेला.

वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहे समस्या निवारणासाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने रस्त्यावर

पुणे- वाहतूक कोंडी निवारणासाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने रस्त्यावर उतरले आहेत त्याच बरोबर श्रमिक वसाहत या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे येथे प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत नागरिकांना यावर कार्यवाही करण्याचा शब्द दिला होता.तिथे प्रत्यक्ष उभे राहून त्यांनी तेथील स्वच्छता , सुधारणा ,आदींची कामे सुरु करवून घेतली आहे . निवडून आल्यावर नगरसेवक भेटत नाही हि संकल्पना मोडून काढून त्यांनी कामास प्रारंभ करत पुन्हा जनतेशी आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवल्याचे यातून दिसते आहे . ते म्हणाले,’नुकतीच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपली असून अधिकारी वर्गाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज या अनुषंगाने प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली आणि कामाच्या दर्जाबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या सूचनांचे स्वागत केले आणि सर्व शौचालये अत्याधुनिक व अद्ययावत करण्यासंबंधी शब्द दिला. लवकरच ही सर्व कामे मार्गी लागतील, यात शंकाच नाही.आपल्या प्रभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सतत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सतावत आहे. या अनुषंगाने आज प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता गोजारे , पथ विभागाचे उपअभियंता भूतडा आणि सर्व कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

सदर चौकातून मुख्य एनडीए रोडलगत मेट्रो होणार असून याकरिता वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक आहे. याबाबत मुख्य रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले आणि अधिकारी वर्गाशी उड्डाणपूल करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रकल्प विभागाकडून असे अनेक उपक्रम आकारास आल्याने त्यांच्या अनुभवाचा वापर करत हे कार्य त्यांच्याचतर्फे घडून येवो, अशी विनंती केली.यावेळी प्राथमिकत: विनंती स्वीकारली असून वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचमुळे भविष्यात सदर प्रश्न पूर्णतः मार्गी लागेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास वाटतो.असेही दुधाने यांनी म्हटले आहे.

कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 रिक्त जागा भरण्यासाठी २५ जानेवारीला ४१,२७३ उमेदवार देणार परीक्षा

पुणे- महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या रिक्त असणाऱ्या १६९ जागा भरणेकरिता जाहिरात दिल्यानुसार यापूर्वी दिनांक ०१/१२/२०२५ रोजी परीक्षा आयोजित केलेली होती. तथापि राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे त्यादिवशीची सदरची परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता हीच परीक्षा दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली आहे.
राज्यातील ६ महसुली विभागातील २० जिल्ह्यांमध्ये एकूण ६९ केंद्रांवर सदरची परीक्षा आयोजित केलेली आहे. या परीक्षेकरिता ४१,२७३ परीक्षार्थी बसलेले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आयबीपीएस या संस्थेमार्फत सदरची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांबाबत काही परीक्षार्थीकडून हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. मात्र याबाबत आयबीपीएस संस्थेची संलग्न असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन परीक्षा आयोजित करण्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयबीपीएस संस्थेस सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचे प्रत्येकी ०१ अधिकारी जिल्हा निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे अखत्यारित प्रत्येक परीक्षा केंद्रावर १ उप अभियंता आणि परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन त्यानुसार कनिष्ठ अभियंता असे केंद्र निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. या प्रकारे सदरची परीक्षा ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत पुणे महानगरपालिका आणि आयबीपीएस संस्थेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.
कोणत्याही परीक्षार्थीनी परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेच्या संदर्भात तसेच नोकरी देण्याबाबत कोणतीही परिचित किंवा अपरिचित व्यक्तीकडून पैसे मागणी करणे, खोटे दावे करणे अशा पद्धतीने प्रलोभन दाखविणायांशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक देवाणघेवाण परीक्षार्थीनी करू नये, असे आवाहन देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थीना करण्यात येत आहे.

३० ते ३१ जानेवारी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडणार

पुणे- ३० ते ३१ जानेवारी २०२६ रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्याच्या सूचना महापालिकांना करण्यात आल्या असल्याच्या वृताने राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. पहा कसा असेल कार्यक्रम…
बृहन्मुंबई महानगरपालिका सह सर्व महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण २२ तारखेला सोडत काढून निश्चित करण्यात आले. आज दिनांक २३ रोजी आरक्षण जाहिर झाल्यानंतर नगर सचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणुक घेण्याकरीता निर्वाचित सदस्यांची प्रथम बैठक बोलावण्यासाठी तारीख व वेळ निश्चितीसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडे प्रस्ताव सादर कारायचा आहे.
२४.०१.२०२६ ते २५.०१.२०२६
विभागीय आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या प्रथम सभेची तारीख व पिठासिन अधिकारी निश्चित करावेत व सभेची सुचना स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायाची आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका
२७.०१.२०२६ ते २८.०१.२०२६
महापौर/उपमहापौर पदासाठी ईच्छुक सदस्य नाम निर्देशपत्र महानगरपालिका सचिवांना सादर करतील.
सर्व महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)
२७.०१.२०२६ ते२ ८.०१.२०२६
महापौर/उपमहापौर पदासाठी ईच्छुक सदस्य नाम निर्देशपत्र महानगरपालिका सचिवांना सादर करतील.


बृहन्मुंबई महानगरपालिका
३०.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६
महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात यावेत.
सर्व महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)
३०.०१.२०२६ ते ३१.०१.२०२६
महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात यावेत.

गोव्यासाठी १६,५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

नाबार्ड राज्य पतपुरवठा परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘राज्य फोकस पेपर २०२६-२७’ चे अनावरण

पणजी,:नाबार्ड (NABARD) द्वारे आयोजित राज्य पतपुरवठा परिषद २०२६-२७, हॉटेल नोवोटेल येथे पार पडली. यामध्ये धोरणकर्ते, बँकिंग संस्था आणि विकास क्षेत्रातील भागधारक एकत्र आले होते, ज्यांनी गोव्याच्या सर्वसमावेशक, शाश्वत आणि लोककेंद्रित विकासाचा आराखडा तयार केला.

राज्य फोकस पेपर २०२६-२७ चे अनावरण
या परिषदेत राज्याच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांना संस्थात्मक पतपुरवठा बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान, माननीय मुख्यमंत्र्यांनी गोव्यासाठी राज्य फोकस पेपर २०२६-२७ चे अनावरण केले, ज्यामध्ये प्राधान्य क्षेत्रासाठी १६,५१२ कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याच्या संभाव्यतेची रूपरेषा मांडण्यात आली आहे. या आराखड्याचा उद्देश कृषी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs), मत्स्यव्यवसाय, संलग्न क्षेत्रे, सहकारी संस्था आणि हरित उपक्रमांना पतपुरवठा वाढवणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान ग्रामीण महिला शेतकऱ्यांचा सत्कार
‘सहकार से समृद्धी – गोव्याच्या सहकारी संस्थांच्या प्रेरणादायी कथा’ नावाचे एक माहितीपत्रक आणि गोव्यातील नाबार्डच्या विकास कार्यक्रमांचे प्रदर्शन करणारा एक व्हिडिओ देखील यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रसंगी, कृषी आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘सर्वसमावेशक विकासाच्या पुढील टप्प्यासाठी गोवा सज्ज’:- मुख्यमंत्री
उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “आजच्या गोव्यात महिला केवळ शेतात काम करत नाहीत, तर त्या कृषी-उद्योजक, सेवा प्रदात्या आणि ग्रामीण परिवर्तनाच्या नेत्या बनत आहेत.” ते पुढे म्हणाले, “कृषी, ग्रामीण उद्योग, सहकारी संस्था, महिला आणि तरुणाईच्या बळावर सर्वसमावेशक विकासाच्या पुढील टप्प्यासाठी गोवा सज्ज आहे.” राज्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना ते पुढे म्हणाले, “गोव्याचे भविष्य केवळ पर्यटन नाही; तर ते कृषी, मत्स्यव्यवसाय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, हरित ऊर्जा आणि ग्रामीण तरुणाई आहे. हा दृष्टिकोन ‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि ‘विकसित गोवा २०३७’ च्या ध्येयाशी सुसंगत आहे.”

या कार्यक्रमाला डॉ. व्ही. कांडावेलू, मुख्य सचिव, श्रीमती सँड्रा रॉड्रिग्स, उपमहाव्यवस्थापक, आरबीआय, श्री. कार्लोस रॉड्रिग्स, सहाय्यक महाव्यवस्थापक, एसएलबीसी, श्री. शकील रहमान, सचिव, महामंडळ उपस्थित होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

पुणे, ता. २२ – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश याग, अथर्वशीर्ष पठण, भजन, नगर प्रदक्षिणा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी गणेश जयंती निमित्त करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला तसेच रंगारी भवनाला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत बाप्पाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कोहलर इंडिया कॉर्पोरेशन प्रा. लि या कंपनीचे विक्री प्रमुख सुहास कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. सकाळी नऊ ते दुपारी बारा या कालावधीत गणेश याग कार्यक्रम पार पडला, त्यानंतर सरस्वती भजनी मंडळाच्यावतीने भजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत ‘बीव्हीआय ग्रुप’च्यावतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. सायंकाळी बाप्पाची पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती, यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. ही नगर प्रदक्षिणा लक्षवेधक ठरली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून निघालेली बाप्पाची पालखी फरासखाना- तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक मार्गे दक्षिणमुखी मारुती मंदिरावरून पुन्हा मंदिरात आली.

यावेळी नगर प्रदक्षिणा मार्गावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री साडेआठ वाजता हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती झाली. आरती नंतर भाऊरंगारी भजनी मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले, याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याच्या महापौर पदासाठी तापकीर,खर्डेकर,नागपुरे, देशपांडे यांच्या नावांची चर्चा

पुणे-भाजपात कौशल्य,अभ्यासू वृत्ती, सयंमी,वेळेला आक्रमक, सुस्थितील पण यशस्वी राजकीय खेळी करणारांना आणि पक्ष नेतृत्वाच्या सूचना तंतोतंत पाळणाऱ्यांना पुणे महापालिकेत गेल्या सत्रात पदे दिली गेलीत . आता प्रशासकीय राजवटी नंतर या निवडणुकीत महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. 165 जागांपैकी 119 जागेवर भाजपने विजय मिळवत महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे संपूर्ण बहुमत असणाऱ्या पुणे महापालिकेत महापौर कोण असणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. महापौर पदासाठी आज मुंबईत आरक्षण सोडत जाहीर झाली. यात पुणे महानगर पालिकेसाठी खुल्या महिला गटासाठी महापौर पद आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याची नगरसेवक ही महिला असणार हे आता स्पष्ट झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची स्थानिक नेते म्हणून आता महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकारी निवडण्यात आणि त्यासाठी फडणवीस यांची अनुमती मिळविण्यात कसोटी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी कुठे असतील हे आज तरी सांगता येणार नाही असे दिसते आहे.

ज्या पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्याच पुण्याचा कारभार आता सावित्रीच्या लेकीच्या हाती असणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने 92 महिलांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पालिकेत लाडक्या बहिणीची चलती असणार हे निकालापूर्वीच स्पष्ट झालं होतं. निकालानंतर भाजपच्या जवळपास 50 पेक्षा जास्त महिला निवडून आल्या आहेत. त्यापैकीच एक महिला आता महापौर असणार आहे.
यात प्रामुख्याने मंजुश्री खर्डेकर,वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे यांची नावं चर्चेत आहेत. मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या वर्षा तापकीर यांनी देखील विजयाची हॅट्रिक केलेली आहे.आमदार भीमराव तापकीरांनी यावेळी दक्षिण पुण्याला महापौर पद मिळेल असे निवडणुकी दरम्यान वक्तव्य केल्याचे अनेकांना आठवत असेलच. सिंहगड रस्त्यावरील मंजुषा नागपुरे गेल्या टर्म मध्ये महापौर पदासाठी इच्छुक होत्या.त्यांनी या महापालिका निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे .

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हाथ असतो असे म्हणतात ,पण मंजुश्री खर्डेकर यांच्या मागे त्यांचे पती संदीप खर्डेकर यांची दीर्घ तपस्या आहे आणि या दाम्पत्याने पक्षासाठी केलेल्या कामाची प्रत्यक्षात माहिती देवाभाऊ यांच्या पासून नितीन गडकरी अनेक राज्य स्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनाही आहे. निष्ठेला महत्व , तळमळीचे कार्य अशा जमेच्या बाजू असलेल्या मंजुश्री खर्डेकर २ वेळा निवडून आल्यात ,तत्पूर्वी त्यांनी शिक्षण मंडळावर काम केले आहे. या दोघांनी कधीही स्वतःसाठी पक्षाकडे काही मागितले नाही आणि पदासाठी आक्रस्ताळेपणाही केला नाही . त्यामुळे यंदा मंजुश्री खर्डेकर आणि वर्षा तापकीर यांच्यात एक नाव निवडले जाईल असे अनेकांना वाटते आहे.
ही नावं जरी चर्चेत असली तरी भाजप ऐनवेळेला धक्कादायी राजकारणात अग्रेसर राहिलेले आहे. त्यामुळे ऐनवेळेस इतर दुसरे नाव सुद्धा समोर येऊ शकते.पण महापालिकेचा कारभार स्वयंभू पद्धतीने चालविता येईल काय ? असा ज्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित होतो अशा महिला नगरसेवकांची नावे चर्चेत काही न काही कारणाने पुढे येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने यंग ब्रिगेड कार्ड खेळेले होते त्याचा फायदा देखील भाजपला मोठ्या प्रमाणात झाला होता. हाच ट्रेंड जर भाजपने पुढे चालवला तर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचं देखील नावं पुढे येऊ शकते असे काहींना वाटते पण अनुभव नसताना त्यांना लगेचच महापौरपद मिळेल का अशीही शंका व्यक्त होते तर आहेच .. इतकंच नाही तर पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात उच्चशिक्षित तरुण महिला म्हणून प्रथमच नगरसेविका झालेल्या निवेदिता एकबोटे या देखील शर्यतीत येऊ शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पाठबळ आणि प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नावं केलं आहे. त्यामुळे पुण्याचो महापौर कोण असणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी जागविल्या आठवणी; “राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व” अशी त्यांची व्याख्या आजही मार्गदर्शक

पुणे.दि.२२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या (शंभराव्या जयंतीच्या) पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी.बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामाबद्दलच्या अनेक आठवणी जागवल्या आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९५० ते १९६० या काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडले. नंतर १९६० मध्ये ‘मार्मिक’ सुरू केले आणि १९६६ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. ‘मार्मिक’मधील ‘वाचा’ आणि ‘थंड बसा’ या सदरांतून मराठी माणसांशी इतर कसे वागतात, याची दखल घेतली जायची. शालेय जीवनातच मी हे अनुभवले, त्यामुळे बाळासाहेबांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला.”

त्यांनी पुढे सांगितले, “१९९०-९२ च्या मुंबई दंगलीदरम्यान द्विध्रुवीकरण झाले. एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजप-एनडीए. जॉर्ज फर्नांडिसांसारखे विविध विचारसरणीचे नेतेही एनडीएबरोबर गेले. त्यामुळे माझ्या मनात महाराष्ट्र आणि देशाचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या बाजूने जावे का, असा विचार आला होता.”

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, तरी राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदू आहात, अशी बाळासाहेबांची व्याख्या होती. त्यांनी कधीच जात-धर्म बघून उमेदवारी दिली नाही.”

महिला धोरणावर काम करण्याबाबत बाळासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “महिला धोरणावर काम करताना काही अडचण येणार नाही, बिनधास्त करा, असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे १९९८ मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची भेट घालून दिली आणि मी शिवसेनेत प्रवेश केला.”

त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले, “पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, २००२ मध्ये विधान परिषद आमदार, २००५ मध्ये उपनेता, २००७ मध्ये प्रवक्ता, २००८ ते १०१२ पुणे जिल्हा संपर्क प्रमुख , २०१४ मध्ये विशेष हक्क समिती प्रमुख, लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक यात स्टार प्रचारक म्हणुन १५ वेळा संधी, २०१९ मध्ये चौथ्यांदा आमदारकी आणि विधानपरिषद उपसभापतीपदी नियुक्ती झाली” अशा प्रकारे शिवसेनेची दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१२ मध्ये बाळासाहेबांच्या निधनाबाबत त्या भावुक झाल्या, “तो दिवस अतिशय दुःखद आणि कडेलोट व्हावा असा होता. बाळासाहेब आजारी असतानाही बातम्यांवर लक्ष ठेवून असत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत. बाळासाहेबांच्या राज्यभरातील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली, प्रत्यक्ष स्टेजवर उपस्थित राहून त्यांना ऐकणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता.”

बाळासाहेबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याची प्रेरणा दिल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “टीका झाली तरी भीती वाटली नाही, कारण शिवसेना आणि तिचे विचार हे आमचे कवचकुंडल आहेत.” त्यामुळे कायमच निर्भीड राहत आलो आहे.

१९९५-९९ मधील युती सरकारवर बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे, चुका झाल्या तर फटकारे यायचे. २०१४ नंतर भाजप-सेनायुती तुटली, त्यानंतरन काही काळाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा यशाचा आलेख कायमच चढता राहिला आहे. विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची सदस्यसंख्या वाढली आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शन होत असल्याचे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जोरदार कामगिरी सुरू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला जगभरातील उद्योजकांचे दुबईत भव्य संमेलन!

0

मुंबई / दुबई | : जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि उद्योजकतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाबिझ 2026’ या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेचे अधिकृत कार्यक्रम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय संमेलन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

संमेलनाचा पहिला दिवस ३१ जानेवारी २०२६ रोजी Al Habtoor Polo Resort, Dubai येथे होणार असून, यामध्ये संरचित नेटवर्किंग, नेतृत्वपर भाषणे, विविध उद्योग क्षेत्रांवरील सत्रे तसेच भारत, यूएई व आफ्रिकेतील उदयोन्मुख व्यावसायिक संधींवर चर्चा होणार आहे.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी Atlantis, The Palm, Dubai येथे होणाऱ्या दुसऱ्या दिवशी ‘महाबिझ २०२६’चे औपचारिक उद्घाटन, मान्यवरांची कीनोट भाषणे, जागतिक ब्रँड सादरीकरणे आणि ‘महाराष्ट्र इन दुबई’ हा भव्य समारोप कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

याबाबत बोलताना डॉ. सुनील व्ही. मांजरेकर, अध्यक्ष – GMBF ग्लोबल म्हणाले, “महाबिझ २०२६ चे वेळापत्रक अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आखण्यात आले असून, यातून उद्योग, उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष व्यावसायिक लाभ मिळेल, हा आमचा ठाम विश्वास आहे. जगभरातून २६ देशांतील मान्यवर उद्योगपतींची या उपस्थिती उद्योग संमेलनाला लाभणार असून, महाराष्ट्रासाठी / महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी हे विश्वसंमेलन विशेष ठरणार आहे.”

याबाबत बोलताना श्रीपाद कुलकर्णी, संस्थापक व अध्यक्ष – BBNG (महा बिझ २०२६ आयोजक) म्हणाले, “महा बिझ २०२६ म्हणजे केवळ परिषद नाही, तर संपर्कांचे रूपांतर प्रत्यक्ष करार, गुंतवणूक आणि दीर्घकालीन भागीदारीत करणारा जागतिक मंच आहे.”

‘Contacts to Contracts’ या संकल्पनेवर आधारित महाबिझ २०२६ हे महाराष्ट्र व भारतासाठी जागतिक व्यापाराच्या नव्या दालानांची दारे उघडणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

‘नाफा स्ट्रीम’ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

0

सॅन होजे : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते, अभिजित घोलप, यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेने नववर्षात अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणताही आर्थिक लाभ न घेता, स्वयंसेवकांच्या निष्ठा, समर्पण आणि कलाप्रेमावर उभी राहिलेली ही नो-प्रॉफिट संस्था आता आपल्या खास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून नॉर्थ अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला आली आहे.

नुकताच लाँच झालेला ‘नाफा स्ट्रीम’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म उत्तर अमेरिका व कॅनडामधील प्रेक्षकांसाठी वेब, रोकु, आयओएस आणि अँड्रॉइड या सर्व माध्यमांवर उपलब्ध झाला आहे. मराठी चित्रपट, लघुपट, डॉक्युमेंट्री, वेबसीरिज आणि मास्टरक्लासेसचा दर्जेदार खजिना एकाच छताखाली आणण्याचे ध्येय या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य ठरते. उत्तर अमेरिका व कॅनडामधील मराठी प्रेक्षकांसाठी ‘नाफा स्ट्रीम’ हे मराठी मनोरंजनाचे हक्काचे OTT platform ठरणार आहे !

‘नाफा स्ट्रीम’वर NAFA मास्टरक्लास, कल्ट क्लासिक, तसेच नव्या दमदार चित्रपटांचा समावेश असणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना एक्स्क्लुझिव्ह ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ पाहण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’, ‘कासव’, ‘दिठी’, तसेच ‘धूसर’, ‘अनाहत’, ‘परतु’, ‘एक निर्णय’,’छबीला’,यांसारखे दर्जेदार चित्रपट, वादग्रस्त ठरलेला ‘मनाचे श्लोक (तू बोल ना)’ आणि नुकताच सुपरहिट ठरलेला ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ यांचा वर्ल्ड प्रीमियर हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

विशेष म्हणेज ‘नाफा स्ट्रीम’वर दर्जेदार मराठी माहितीपटांचा समावेश करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय ‘नाफा’ने घेतला आहे.‘त्यामध्ये राष्टीय पुरस्कार प्राप्त ‘बोलपटाचा मूकनायक’, ही प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले ह्यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी गावाने अवलंबलेली ‘participatory democracy ‘ ह्या बद्दलचा ‘दिशा स्वराज्याची’, इत्यादींचा समावेश आहे. हायाशिवाय ‘नाफा क्रिएटर्स’ म्हणजेच अमेरिकेत स्थायिक मराठी कलावंतांनी साकारलेल्या ‘डिअर प्रा’, पायरव,, ‘निर्माल्य’, ‘योगायोग’, या विविध फेस्टिवल्स मध्ये गौरवलेल्या शॉर्टफिल्म्स सुद्धा ओटीटीवर पहायला मिळणार आहे. ‘नाफा स्ट्रीम’च्या वार्षिक सदस्यत्वासाठी विविध पर्याय उपलब्ध असून, ‘नाफा’ संस्थेच्या सर्व सभासदांना २० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे.

‘नाफा स्ट्रीम’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “मराठी सिनेमा हा केवळ मनोरंजन नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, विचारांचा आणि संवेदनशीलतेचा आवाज आहे. ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून हा आवाज जागतिक पातळीवर पोहोचावा, निर्मात्यांना सन्मानजनक व्यासपीठ मिळावे आणि प्रेक्षकांना दर्जेदार आशय एका क्लिकवर उपलब्ध व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे मत घोलप यांनी व्यक्त केले.

‘नाफा स्ट्रीम’ बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रोजेक्ट लीड अर्चना सराफ यांनी सांगितले, “ नॉर्थ अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी  सहज सोप्या पद्धतीने, एका अँपच्या माध्यमातून, जुन्या- नवीन, नॉस्टॅल्जिक-कॉन्टेम्पररी ,मनाला वाटेल तश्या  मराठी मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा म्हणून टेक्नॉलॉजी, कंटेंट आणि कलावंत यांचा सुंदर मेळ साधून ,आम्ही एक उत्तम प्लॅटफॉर्म उभा केल्याचा आम्हाला आनंद आहे,”.

‘नाफा स्ट्रीम’ दर्जेदार आशय, कलावंतांना मिळणारा सन्मान आणि प्रेक्षकांचा विश्वास या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा प्लॅटफॉर्म मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवी दिशा, नवे बळ आणि नवे आंतरराष्ट्रीय क्षितिज उघडणारा ठरणार असून, ‘नाफा स्ट्रीम’च्या माध्यमातून मराठी सिनेमा आता खऱ्या अर्थाने जगाच्या पडद्यावर झळकणार आहे.

सांस्कृतिक कार्य खात्याचा भोंगळ कारभार,मंत्र्यांच्या सूचनांनाही हरताळ; लोककलावंतांत तीव्र असंतोष

मुंबई
सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोककलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अद्याप सहा-सात जिल्ह्यांत मानधन निवड समित्याच गठीत झालेल्या नाहीत, तर अनेक जिल्ह्यांतील सन २०२३ पासूनचे ऑफलाईन (प्रत्यक्ष) अर्ज धूळखात पडून असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तांत्रिक अडचणी दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या सूचनांकडे विभागातील अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कलावंतांकडून करण्यात येत असून त्यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड असंतोष पसरला आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत एप्रिल २०२४ मध्ये सरसकट दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यातील सुमारे ३८ हजार वयोवृद्ध साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ घेत असून यासाठी शासनाला सुमारे २०० कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करावी लागत आहे.
मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत सांस्कृतिक कार्य खात्याच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना लोककलावंतांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मानधन निवड समिती गठीत करण्याची तरतूद असली तरी अनेक जिल्ह्यांत या समित्यांच्या बैठकींकडे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष लक्ष नसते. बहुतांश वेळा ते आपले प्रतिनिधी पाठवित असल्याने निर्णय प्रक्रियेत दिरंगाई होत आहे.
याशिवाय, निवड समितीचे सदस्य सचिव म्हणून प्रशासकीय काम पाहणारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनेकदा समितीच्या बैठकीत एकमताने घेतलेले निर्णय ऐनवेळी बदलून वेगळेच निर्णय घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अशासकीय सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वारंवार वाद निर्माण होत असून समितीचे काम अधिकच रखडत आहे.
ऑफलाईन व ऑनलाईन अशा दुहेरी प्रक्रियेमुळेही अनेक कलावंत त्रस्त झाले आहेत. सध्या बहुतांश कलावंतांनी ऑनलाईन अर्ज केले असले तरी त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही. योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने उपेक्षित कलावंत संभ्रमात सापडला आहे.
सन २०२३ पासूनचे प्रत्यक्ष (ऑफलाईन) केलेले अनेक अर्ज काही जिल्ह्यांत कार्यालयांत सापडेनासे झाले असून समित्यांचे काम कासवगतीने सुरू असल्याने लोककलावंतांवर अन्याय होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही कलावंतांच्या बँक खात्यांत वेळेवर मानधन जमा होत नसल्याने त्यांना दोन-दोन महिने दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र मंत्रालयात बसलेल्या सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांना या गंभीर समस्यांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याची भावना कलावंतांतून व्यक्त होत आहे.
या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील निवड समितीबाबत बोलताना लोकशाहीर सुभाष गोरे यांनी सांगितले की, “आमच्या जिल्ह्यात बराच काळ मानधन निवड समितीच गठीत झाली नव्हती. त्यामुळे सन २०२२ पासूनची प्रकरणे प्रलंबित राहिली. यापूर्वी ऑफलाईन केलेले अर्ज आता संबंधित कार्यालयांत सापडत नाहीत, हे अत्यंत विदारक चित्र आहे.”
खान्देशातील ज्येष्ठ तमाशा कलावंत शेषराव गोपाळ यांनी सांगितले की, “जिल्हाधिकारी स्तरावर समिती गठीत झाली असली तरी तिचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. अनेक वर्षांची प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रशासकीय गोंधळामुळे एका लाभार्थी कलावंताचे दरवर्षी पाच हजार रुपये प्रति महिना या हिशोबाने साठ हजार रुपयांचे नुकसान होते. हे नुकसान केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे सहन करावे लागत आहे.”
नागपूरचे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी निवड समित्यांमध्ये अनुभवी आणि कलेची जाण असलेल्या कलाकारांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. “अनेक ठिकाणी अनुभवी कलाकारांऐवजी हौशी व कलेची जाण नसलेल्या लोकांचा भरणा केला जात आहे. त्यामुळे योग्य कलावंतांना न्याय मिळत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक महत्त्वाची कामे असल्याने त्यांना मानधन निवड समितीच्या कामाकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत असून सरकारने पूर्वीचीच अधिक सोपी आणि प्रभावी व्यवस्था पुन्हा लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनंतरही विभागातील अधिकाऱ्यांकडून सुरू असलेले दुर्लक्ष थांबवून, लोककलावंतांच्या मानधन प्रश्नावर तातडीने ठोस पावले उचलली जातात का, याकडे आता संपूर्ण कलाविश्वाचे लक्ष लागले आहे.

एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘मराठी भाषा आणि बोली’ विषयावर परिसंवाद २४ जानेवारी रोजी

पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) च्या स्कूल ऑफ एज्युकेशन यांच्या तर्फे ‘मराठी भाषा आणि बोली’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. २४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ज्ञानेश्वर सभागृह संपन्न होणार आहे. अशी माहिती डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ एज्युकेशन विभागातर्फे देण्यात आली आहे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात परिसंवादाचे आयोजन होत आहे.
परिसंवादात ‘भाषा, बोली आणि आपण’ या विषयावर सुशील धसकटे, ‘भाषा, बोली आणि वृत्तपत्र’ या वर उद्धव धुमाळे आणि धनंजय भावलेकर हे ‘भाषा, बोली आणि चित्रपट’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे व डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. शालिनी टोणपे असतील. तसेच स्कूल ऑफ लिबरल आर्टसचे अधिष्ठाता डॉ. विशाल घुले हे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक सागर शंकर आणि स्कूल ऑफ एज्युकेशनचे सहायक प्राध्यापक प्रा. प्रिया काळे आहेत.

पर्यावरण संवर्धन व पाणी बचतीसाठी पुणे ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल रॅली

पुणे-

पुणे शहराला सायकलींचे शहर ही जुनी ओळख पुन्हा निर्माण करून देण्यासाठी पुण्यामध्ये एकीकडे ‘पुणे ग्रँड टूर’ सारखी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा चालू असताना सायकल क्लब, पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत आणखी एक पराक्रमी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सायकल क्लब पुणे महानगरपालिका आज दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सायकल वरून गुजरात राज्यामधील लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगप्रसिद्ध स्थळाला भेट देण्यासाठी आज पहाटे ४.३० वाजता निघाले आहेत.
या धाडसी मोहिमेत १२ सायकल स्वार सहभागी झाले आहेत.
सुनील अहिरे
उमाकांत डिग्गीकर
विशाल पाटील
अभिमन्यू गाडे
संदीप आमले
महेश करांडे
नितीन देडगे
प्रशांत गवळी
संतोष असवले
अनिल चाटे
अजय नाईक
जयसिंग गायकवाड
श्री मारटकर

अशी सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी सायकल स्वारांची नावे आहेत.
रॅलीचे एकूण अंतर सुमारे ५४० किलोमीटर आहे. दररोज साधारणपणे १५० किलोमीटर सायकलिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रॅलीचा मार्ग पुणे – संगमनेर – सापुतरा – झंखवाव – स्टॅच्यू ऑफ युनिटी असा असून, मार्गातील विविध ठिकाणी थांबून नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षण, पाणी बचत, प्रदूषणमुक्त जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वाढते प्रदूषण, पाण्याची कमतरता व हवामान बदल याच्या पार्श्वभूमीवर सायकलचा वापर वाढावा व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली जावी, हाच या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
ही धाडसी मोहीम स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोहचेल आणि तेथेच या मोहिमेची सांगता होईल.

या सायकल रॅलीचे घोषवाक्य आहे —
“सायकल चालवा – पर्यावरण वाचवा”

जम्मूत सैन्याची गाडी 400 फूट खोल दरीत कोसळली:10 जवानांचा मृत्यू, 21 जण प्रवास करत होते; 11 जखमींना एअरलिफ्ट केले

श्रीनगर -जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी लष्कराचे वाहन 400 फूट खोल दरीत कोसळले. यात 10 जवान शहीद झाले, तर 11 जणांना एअरलिफ्ट करून उधमपूर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनात 21 जवान होते. सर्वजण डोडा येथून वरच्या चौकीकडे जात होते. भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय रस्त्यावर खन्नी टॉपजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, या अपघातामुळे मी दुःखी आहे. या कठीण प्रसंगी, संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी एकजुटीने आणि समर्थनाने उभा आहे.

जखमी सैनिकांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना हार्दिक संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची कामना केली. अब्दुल्ला यांनी त्वरित बचाव आणि स्थलांतर प्रयत्नांचेही कौतुक केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दुःखी कुटुंबांप्रती माझ्या सखोल संवेदना आहेत. जखमी सैनिकांना वैद्यकीय सेवा मिळत आहे आणि सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की, डोडा येथून आलेल्या दुःखद बातमीने खूप दुःख झाले. माझ्या सखोल संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करते.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी अपघातावर बोलताना सांगितले की, आर्मीच्या गाडीच्या अपघाताबद्दल जाणून खूप दुःख झाले. सर्वतोपरी वैद्यकीय मदत दिली जात आहे. आमच्या शूर जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत.
तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या शोधादरम्यान 18 जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी 8 जवान जखमी झाले होते. त्यापैकी एका जवानाचा 19 जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहीद जवानाची ओळख हवालदार गजेंद्र सिंह अशी झाली होती.

सारसबाग सिद्धिविनायकाला मानाची पेशवाई पगडी

श्री देवदेवेश्वर संस्थानअंतर्गत सारसबाग सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा
पुणे : माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत असलेल्या सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. माघी गणेश जयंती निमित्त श्री सिद्धिविनायक गणपतीला मानाची पेशवाई पगडी परिधान करण्यात आली यासोबतच श्री गणेशाला भरजरी वस्त्र, सोन्याचे दागिने देखील  परिधान करण्यात आले होते. मंदिरात करण्यात आलेली रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. सकाळपासूनच सिद्धिविनायक देवतेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, तसेच विश्वस्त सुधीर पंडित, पुष्करसिंह पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

माघी गणेश जयंतीनिमित्त संस्थान अंतर्गत असलेल्या लक्ष्मीनगर येथील श्री रमणा गणपती मंदिर तसेच पौड फाटा येथील श्री दशभूजा गणपती मंदिर येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांच्या हस्ते सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महापूजा व याग संपन्न झाला. तर श्री दशभूजा गणपती मंदिरात विश्वस्त जगन्नाथ लडकत यांच्या हस्ते आणि श्री रमणा गणपती मंदिरात पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते महापूजा व याग विधी पार पडले.