Home Blog Page 131

पुण्यात वाहतुकीचा कोंडमारा कमी करण्यासाठी डबल डेकर पूल आणि मेट्रो प्रकल्पांना गती!

  • विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल व माण–हिंजवडी मेट्रो प्रकल्पांची महानगर आयुक्तांकडून पाहणी

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील निर्माणाधीन डबल डेकर पूल तसेच माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाच्या कामाची पाहणी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी केली. या पाहणीवेळी पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल शक्य तितक्या लवकर सार्वजनिक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे महानगर आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. डबल डेकर पुलाच्या बाणेर रॅम्पचे काम अतिरिक्त मनुष्यबळ व संसाधनांचा वापर करून वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या अधिकारी व अभियंत्यांना दिले. तसेच, पाषाण बाजूकडील रॅम्पच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या युद्धपातळीवर सोडवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. मेट्रो स्थानकांशी संबंधित तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. विशेषतः शिवाजीनगर स्टेशन, मोदीबाग आणि विद्यापीठ चौक येथील पादचारी पुलांच्या (फूट ओव्हर ब्रिज) कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. मेट्रो मार्गिकेवरील कामाचा दर्जा राखून प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुण्यातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादन सुविधेचे निओलाइट झेडकेडब्ल्यूकडून उद्घाटन

0

§  झेड.के.डब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील उत्पादन सुविधेचे उद्घाटन संपन्न.

पुणे23 जानेवारी2026: पॅसेंजर वाहनेव्यावसायिक वाहनेऑफ-रोड वाहनेदुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह विविध प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक ओईएम्स (“मूळ उपकरण उत्पादक”) ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांचे एक प्रमुख उत्पादक तसेच जागतिक पुरवठादार असलेल्या निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडने महाराष्ट्रातील पुणे येथे आपल्या नवीन उत्पादन सुविधेचे आज उद्घाटन केले.

डिसेंबर 2025 मध्ये कार्यान्वित झालेला हा नवीन प्रकल्प मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबादच्या प्रमुख ऑटोमोटिव्ह क्लस्टरच्या अगदी जवळ आहे. यामुळे कंपनीला अधिक जलद, उत्तम इन्व्हेंटरी व्यवस्थापन करता तर येतेच. पण त्यासोबत जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची एमजी मोटर इंडिया), स्टेलेंटिस ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड, डेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, इसुझू मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड आणि पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष देणे शक्य होते.

उत्पादन सुविधांव्यतिरिक्त, निओलाइट झेडकेडब्ल्यूने एक स्वतंत्र डिझाइन केंद्र स्थापन केले आहे, जे आधुनिक डिझाइन साधने आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर, थ्रीडी मॉडेलिंग, ऑप्टिकल डिझाइन, प्रोटोटाइपिंग अशा सुविधांनी सज्ज आहे. हे डिझाइन केंद्र आमच्या कंपनीच्या अंतर्गत उत्पादन विकास क्षमता वाढविण्यात, उत्पादन प्रत्यक्षात बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात आणि आमची उत्पादने जागतिक कार्यक्षमता तसेच अन्य नियामक मानकांची पूर्तता करतील याची खात्री करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

या प्रसंगी झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग म्हणाले, “जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी भारत एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. निओलाइट झेडकेडब्ल्यूचा पुण्यातील विस्तार म्हणजे भविष्यातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग सोल्यूशन्सना पुढे नेण्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे. तंत्रज्ञान आणि नावीन्य यातील सातत्यपूर्ण सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकश्री. राजेश जैन म्हणाले, “आमचा नवीन पुणे प्रकल्प हा आमच्या ग्राहकांच्या आणि निओलाइट झेडकेडब्ल्यूच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच क्षमतातंत्रज्ञान आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठीऑटोमोटिव्ह लाइटिंगमध्ये नावीन्य आणण्यासाठी आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही अधिक चांगल्या स्थितीत आहोत. यापुढील आमचे पुढील लक्ष्य कांचीपुरम येथील आमचा प्रकल्प सुरू करणेहे असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत.”

“पुण्यातील ही सुविधा मोल्डिंग, सरफेस ट्रीटमेंट आणि असेंब्लीसह ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केली आहे. शिवाय, विद्युतीकरण आणि टिकाऊपणाच्या दिशेने होत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणारी काही लाइटिंग उत्पादने देखील सादर करतो. त्याच वेळी, आमचा पोर्टफोलिओ देखील पॉवरट्रेन एगनॉइस्टिक आहे, जो इलेक्ट्रिक वाहनांसह अन्य प्रकारची इंजिन असलेल्या वाहनांसाठी देखील उपयुक्त आहे,” असे निओलाइट झेडकेडब्ल्यूचे सीईओ श्री. राजेश सोनी म्हणाले.

ओटीटीच्या युगात चित्रपट महोत्सव अधिक महत्त्वाचे

0

‘पिफ’मधील दिग्गज ज्यूरी सदस्यांचे मत
पुणे, दि. २३ जानेवारी २०२६ : ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे  महत्त्व अधिक ठळक होत असल्याचे मत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाती(पिफ)ल ज्यूरी सदस्यांनी व्यक्त केले. विविध संस्कृती, वेगळे दृष्टिकोन आणि अस्सल कलात्मकता अनुभवण्यासाठी फिल्म फेस्टिवल्सना पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्यूरी सदस्यांनी आज संवाद साधला. यामध्ये विविध देशांतील
चित्रपटांच्या वेगवेगळ्या प्रवाहांत कार्यरत असलेल्या दिग्गजांचा सहभाग होता. यामध्ये तामिळ लेखक बी. जेयामोहन, स्लोव्हाकियाचे माहितीपट दिग्दर्शक पिटर केरेकेस, तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू, फिनलॅंडच्या लेखिका, चित्रपट दिग्दर्शिका रीट्टा आल्टो, स्पेनचे चित्रपट दिग्दर्शक सेर्गी कासामीतजाना आणि तमिळ चित्रपट दिग्दर्शक सिनू रामासामी यांचा समावेश होता.

युरोपियन सिनेमातील डॉक्युमेंटरी दिग्दर्शक पिटर केरेकेस म्हणाले, “ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षक एका ठराविक प्रकारच्या कंटेंटमध्ये अडकून पडतात. चित्रपट महोत्सव मात्र असे चित्रपट समोर आणतात, जे आपण कधीच शोधले नसते. खऱ्या अर्थाने कला समजून घ्यायची असेल, तर चित्रपट महोत्सवाचा अनुभव घेणं गरजेचं आहे.”

चित्रपट परीक्षणाच्या प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्यूरी सदस्यांची अभिरुची वेगवेगळी असली तरी चर्चेच्या माध्यमातून सर्वांना मान्य होईल अशा सामायिक भूमिकेपर्यंत पोहोचणं ही एक आव्हानात्मक पण आनंददायी प्रक्रिया असते. त्यांनी एआय कंटेंटच्या वाढत्या वापराबाबत सावधगिरी व्यक्त केली. तंत्रज्ञान उपयोगी असले तरी सर्जनशीलतेचा केंद्रबिंदू मानवी जीवन आणि चित्रपटकाराची अभिव्यक्तीच असावी, असे ते म्हणाले. “तुमच्या मातृभाषेतून येणारी अस्सल भावना कोणतंही तंत्रज्ञान निर्माण करू शकत नाही,” असा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

रीट्टा आल्टो यांनी मोठ्या पडद्यावर, अनेक प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहण्याचा अनुभव मोबाईल किंवा वैयक्तिक स्क्रीनवर शक्य नसल्याचे सांगितले. सामूहिक अनुभवातूनच चित्रपटाची खरी ताकद प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, असे  त्यांनी नमूद केले.

बी. जेयामोहन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की कलेतील मौलिकता आणि अस्सलपणा अनुभवायचा असेल, तर चित्रपट महोत्सवांना कोणताही पर्याय नाही. त्यांनी नवोदित चित्रपटकारांना व्यापक वाचनाचा सल्ला दिला. साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय सखोल सिनेमा शक्य नसल्याचे ते म्हणाले. “चित्रपटांवरून चित्रपट बनवण्याऐवजी जगण्यातल्या अनुभूती आणि विचारातून सिनेमा निर्माण करा,” असे आवाहन त्यांनी केले.
तर सेर्गी कासामीतजाना यांच्या मते, अशा महोत्सवांमुळे प्रेक्षकांची वैयक्तिक अभिरुची आणि दृष्टिकोन नव्याने परिभाषित होतो. नवोदित दिग्दर्शकांना स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. “इतरांसारखे चित्रपट बनवण्याऐवजी तुमची स्वतःची दृष्टी प्रामाणिकपणे मांडणारे चित्रपट करा आणि ते चित्रपट महोत्सवांपर्यंत पोहोचवा,” असे त्यांनी सांगितले.

ओटीटीवरील एकसुरी आणि नकारात्मक कंटेंटच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत सिनू रामासामी यांनी ‘पिफ’मधील प्रचंड गर्दीने येणाऱ्या प्रेक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले. भविष्यात प्रादेशिक चित्रपटकारांना अधिक भक्कम पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारांनी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि चित्रपट संग्रह (archives) उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटांमध्ये दिसणारी कथनातील प्रामाणिकता आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी संस्कृतीशी दक्षिण भारतातील संस्कृतीचं साधर्म्य जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितले.
तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू यांनी मराठी चित्रपटांतील विषयांची विविधता आणि स्थानिकतेतून जागतिक स्तरावर जाणाऱ्या दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. ही विविधता शोधणे आणि अनुभवणे आपल्यासाठी समृद्ध करणारा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमआरडीए मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे : थोर स्वातंत्र्यसेनानी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. २३) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास नियोजन विभागाच्या सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षता विभागातील पोलीस हवालदार संभाजी खरात व पोलीस हवालदार अमर पवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांच्या राष्ट्रसेवेला उजाळा देणारे अभिवाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या महापुरुषांच्या विचारांना व कार्याला अभिवादन केले.

साडेआठ लाखाची E सिगारेट आणि हुक्का फ्लेवर पकडले , तिघांना अटक

पुणे -पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०६ वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून ८,३२,९६०/-रु किंमतीचे प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) व तबांखुजन्य हुक्का फ्लेवर पकडले आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरात प्रतिबंधीत ई सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणा-या दुकानदारावर धडक कारवाई सुरु केली आहे . या कारवाई मध्ये लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम ७ च ८ प्रमाणे, एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोथरुड पोलीस स्टेशन आणि लष्कर पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधीत अवैध रित्या तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्या दुकानदारावर एकुण ०३ खटले दाखल करण्यात आले . या मध्ये ८,३२,९६०/-रु किमतीचे २९७ ई- सिगारेट (वेप), तसेच ८९५ तबांखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले असून १) हुसेन अब्दुल रहेमान वय २५ वर्षे रा. लेन नं ६ कोरेगाव पार्क पुणे २) हसन शेख वय ४२ रा एम जी रोड कॅम्प पुणे ३) अब्दुल इस्माईल जाबीर वय २८ रा. मोलोदिना रोड, कॅम्प पुणे यांना पकडण्यात आले आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पकंज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.

grindr app समलिंगी डेटिंग अँपवरुन संपर्क करुन लोंकांना लुटणारी टोळी पकडली

पुणे- Girndr या समलिंगी डेटिंग अँपवरुन संपर्क करुन लोंकांना लुटणारी टोळी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी पकडली आहे.
या अॅपवरुन संपर्क करुन डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये संबधितांना बोलावुन लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे असा मुद्देमाल जबरीने चोरी केल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना या टोळीला पोलिसांनी पकडले आहे.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल नंबरवरुन आरोपीची नावे शोधून पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे संबधित WANTED आरोपी राहिल शेख याच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु.पुणे येथुन रोहील अकिल शेख, वय १९ वर्षे, याच्यासह २) नुहान नईम शेख वय १८ वर्षे रा. प्लॅट नं २०२, इसाक टॉवर, गल्ली नं ०२ लक्ष्मीनगर, कोंढवा बु.पुणे ३) शाहिद शाहनुर मोमीन वय२५ वर्षे, रा. बालाजी बिल्डींग, दुसरा मजला, संतोष नगर गल्ली नं.०३ कात्रज पुणे ४) ईशान निसार शेख वय २५ वर्षे रा. मातोश्री बिल्डींग, लेन नं. ०१ अंजलीनगर, कात्रज पुणे ५) वाहीद दस्तगीर शेख, वय १८ वर्षे, धंदा फॅब्रीकेशन, रा बिस्मील्ला मस्जिदचे जवळ, स.नं.४२ कोंढवा खुर्द, पुणे यांना अटक करुन पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे यांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपींकडून जबरदस्तीने चोरी केलेले ०३ मोबाईल फोन, लोखंडी कोयता व आरोपीतांनी वापरलेल्या २ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. .
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग मनोज पाटील. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, सपोआ वानवडी विभाग कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गावडे व पोलीस अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके पुष्पेंद्र चव्हाण, रशिदशेख, सुहास मोर, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार यांनी केली.

‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

0

श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ विश्वासावर आधारित पालखी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पालखी’ हा चित्रपट म्हणजे साईबाबांवरील अढळ श्रद्धा, पालखीची सेवा आणि भक्तांच्या निस्वार्थ भावनेची कलाकृती ठरणार आहे. केएसआर फिल्म्स निर्मित पालखी चित्रपटाचा मुहूर्त आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. निखिल चंद्रकांत पाटील लिखित पालखी चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश राज आंगणे करीत आहेत. प्रभू कापसे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

सिद्धार्थ बोडके, यतिन कार्येकर, प्रवीण तरडे, सुबोध भावे, किशोर कदम, गौरी नलावडे, वीणा जामकर, संदीप गायकवाड, शंतनू रांगणेकर, ओंकार कदम, अथर्व रुके असे मराठीतील अनेक नामवंत कलाकार पालखी या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

‘साईबाबांची लीला अगाध आहे. मी स्वतः साईभक्त  आहे. साईबाबांच्या पालखीवरील हा चित्रपट लाखो साईभक्तांना प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार रवींद्र चव्हाण यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

पालखी म्हणजे श्रद्धेची चालती-बोलती अनुभूती. पालखीसोबत चालताना मन निर्मळ होते,अहंकार गळून पडतो आणि भक्तीची अपार ऊर्जा अनुभवायला मिळते. हीच ऊर्जा आमच्या या चित्रपटातून मिळेल, असा विश्वास  दिग्दर्शक श्रेयश राज आंगणे यांनी व्यक्त केला.

पालखी हा चित्रपट एका सामान्य युवकाच्या जीवनातील संघर्ष, प्रश्न आणि वेदनांच्या काळोखातून आशेच्या प्रकाशाकडे नेणारा प्रवास उलगडतो. चित्रपटाची पटकथा आणि संवाद निखिल चंद्रकांत पाटील, श्रेयश राज आंगणे यांची आहे. छायांकन हरेश सावंत तर  संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शक नितेश नांदगावकर आहेत. संगीत श्रेयश राज आंगणे याचे आहे. रंगभूषा राजेश वाळवे तर वेशभूषा सिद्धी योगेश गोहिल यांची आहे. साहसदृश्ये जबाबदारी रवी दिवाण यांनी सांभाळली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २२ जानेवारी २०२६

राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, अनिस अहमद,माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

बदलापूर स्कूल व्हॅन अत्याचार प्रकरण:तपासादरम्यान समोर आलेली माहिती आणखी गंभीर

मुंबई- बदलापूर पश्चिम परिसरात स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या धक्कादायक घटनेनंतर प्रशासन अखेर खडबडून जागं झालं असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कठोर कारवाई केली आहे. तपासादरम्यान समोर आलेली माहिती आणखी गंभीर असून, ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली ती व्हॅन कोणतीही वैध परवानगी नसताना विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचं उघड झालं आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTO ने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द केला असून 24 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही घटना बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीसोबत घडली. नेहमीप्रमाणे दुपारी शाळा सुटल्यानंतर ती स्कूल व्हॅनमधून घरी निघाली होती. मात्र, ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्यामुळे आई चिंतेत पडली. वारंवार फोन केल्यानंतर सुमारे दीड तास उशिरा चिमुकली घरी परतली. ती अत्यंत घाबरलेली, शांत आणि अस्वस्थ अवस्थेत होती. आईने विचारपूस करताच, व्हॅन चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याची धक्कादायक माहिती चिमुकलीने दिली. हे ऐकताच कुटुंबीयांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित स्कूल व्हॅन चालकाला अटक केली. आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बदलापूरसह कल्याण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. शाळेत पाठवलेली मुलं सुरक्षित हातात आहेत की नाही, असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करत आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण RTO ने संबंधित स्कूल व्हॅनची चौकशी सुरू केली. तपासात समोर आलेल्या निष्कर्षांनी प्रशासनालाही धक्का बसला. ही स्कूल व्हॅन कोणतीही अधिकृत परवानगी न घेता विद्यार्थ्यांची वाहतूक करत होती. नियमांचे सर्रास उल्लंघन करत ही व्हॅन रस्त्यावर धावत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे RTO ने तात्काळ निर्णय घेत व्हॅनचा परवाना रद्द केला आणि 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मुलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी वातावरण प्रचंड तणावपूर्ण झालं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी परिसरात गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन, स्कूल व्हॅन चालक आणि प्रशासन यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी, चालकांची पार्श्वभूमी तपासणी आणि आवश्यक परवानग्या याबाबत प्रशासनाकडून पुरेशी दक्षता घेतली जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनेक स्कूल व्हॅन्समुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे.

बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. प्रशासनाने केवळ एका व्हॅनवर कारवाई करून थांबू नये, तर परिसरातील सर्व बेकायदेशीर आणि नियमबाह्य स्कूल व्हॅन्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पुढील काळात प्रशासन अधिक कडक पावले उचलणार का, शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित केली जाणार का आणि अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार का, याकडे संपूर्ण बदलापूरसह राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

बदलापूरच्या घटनेने राज्याच्या अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली, लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, महागात पडेल: हर्षवर्धन सपकाळ

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री, झेपत नाही तर गृहमंत्रीपद सोडा.

मुंबई, दि. २३ जानेवारी २०२६

बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व कायदा हतबल झाल्याचे दिसत आहेत. राज्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची धमकच राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते. दीड वर्षापूर्वी बदलापुरात लहान शाळकरी मुलींवर अशीच घटना घडली होती पण सरकारने या प्रकरणातील महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. जनतेने रस्तावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली होती पण पुढे या प्रकरणाचे काय झाले, हे राज्याने पाहिले आहे. भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या या घटनेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई केली नाही. या गुन्ह्यात शाळेचा सचिव तुषार आपटेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल असताना भाजपाने त्याला स्विकृत नगरसेवक केले होते. प्रशासन कामच करत नाही त्यामुळे गुन्हेगारांचे मनौधैर्य वाढले आहे. काल बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजावारा उडलेला आहे. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा एका प्रकरणात फरार होतो, तो वडिल मंत्र्यांच्या संपर्कात असतो पण पोलीस मात्र त्याच्यापर्यंत पोहचत नाहीत. असे मंत्री मंत्रीमंडळात आहेत, मुख्यमंत्री एवढे हतबल का आहेत? असा प्रश्न उच्च न्यायालयाला विचारावा लागतो. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांना भाजपाच्या माजी खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करावी लागली पण या प्रकरणातही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर कसलीच चौकशी न करता क्लिन चिट देऊन टाकली. अंकिता भंडारी, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाशी संबंधित लोक असल्याचे स्पष्ट झालेले आहे पण कारवाई मात्र केली जात नाही. भाजपा महायुती सरकारमध्ये आका, खोके, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान आहे. महिला व मुलींची सुरक्षा तर रामभरोसे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रारीकडे दुर्लक्ष करत बस चालकाचीच बाजू घेतल्याचा आरोप

बदलापूर- येथे पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून, एका नामांकित खासगी शाळेतील चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर पश्चिम भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे याआधीही बदलापूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडून शाळा प्रशासनावर टीका झाली होती. यावेळीही सुरुवातीला शाळा प्रशासनाने गंभीरतेने दखल न घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी बस चालकाला अटक करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुकली बदलापूर पश्चिमेतील एका खासगी शाळेत नर्सरीमध्ये शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शाळेच्या व्हॅनमधून दुपारी घरी परतत होती. मात्र, त्या दिवशी दुपारी 12.30 वाजेपर्यंत मुलगी घरी न पोहोचल्याने तिच्या आईला शंका आली. त्यांनी तात्काळ व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर दीड तास उशिराने चिमुकली घरी पोहोचली. ती अत्यंत घाबरलेली आणि मानसिक तणावात असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. आईने विश्वासाने विचारणा केल्यानंतर चिमुकलीने शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याचं सांगितलं.

मुलीच्या पालकांनी तत्काळ तिला घेऊन शाळेत धाव घेतली. मात्र, यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने तक्रारीकडे दुर्लक्ष करत बस चालकाचीच बाजू घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मुख्याध्यापिकेने चालकाला शाळेत बोलावून घेतलं. चालक केबिनमध्ये प्रवेश करताच चिमुकली प्रचंड घाबरली आणि थेट आपल्या आई-वडिलांच्या पाठीमागे लपली. या प्रकारामुळे पालकांचा संशय अधिकच बळावला. शाळेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अखेर पालकांनी पोलिस ठाण्याची वाट धरली.

पालकांच्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला ताब्यात घेतलं आणि अटक केली. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 ते 3 दरम्यान शाळेच्या खासगी व्हॅनमध्ये आरोपीने चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अटकेत असून मुलीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. सदर व्हॅन ही खासगी शाळेची असल्याने शाळा प्रशासनाचीही चौकशी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले असतानाही सदर स्कूल व्हॅनमध्ये महिला अटेंडंट नव्हती. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेले नियम शाळेने धुडकावल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता आरोपी चालकासोबतच संबंधित शाळेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याआधीही बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला कार्यकर्त्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. प्रकरणाच्या निषेधार्थ वातावरण तापलं. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या संगीता चेंदवणकर यांनी संबंधित स्कूल व्हॅनवर दगडफेक करत तीव्र संताप व्यक्त केला. घटनेनंतर पोलिस ठाण्याच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

या प्रकरणाच्या तपासासाठी मध्यरात्री फॉरेन्सिक पथक बदलापुरात दाखल झालं. फॉरेन्सिक टीमने स्कूल व्हॅनची बारकाईने तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, शाळा प्रशासनावर नेमकी काय कारवाई होते आणि पीडित चिमुकलीला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बदलापूर पुन्हा एकदा अशा घृणास्पद घटनेमुळे हादरलं असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा:गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचे अभय, वाढत्या गुन्हेगारीला सरकारच जबाबदार – सतेज पाटील

मुंबई-राज्यामध्ये राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, हे वाढलेल्या गुन्हेगारीवरुन दिसून येत आहे. याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे, कारण गुन्हेगारांना स्वीकृत नगरसेवकपद देणं गुन्हेगारांना मनपामध्ये तिकीट देणं यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे, की काहीही केले तरी सरकार अभय देते यामुळे धाडस वाढत चालले आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शक्ती कायदा केंद्र सरकारकडे पडून आहे. कायद्यातील त्रुटीचा उपयोग करत आम्हाला काहीही करता येते असे आता लोकांना वाटू लागले आहे. राज्यामध्ये अशा घटनामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे याला सर्वस्वी गृहखाते जबाबदार आहे. कायद्यानुसार शिक्षा होते हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. अक्षय शिंदेंचा प्रकरणानंतर लोकांनी काहीही बोध घेतलेला दिसून येत नाही. म्हणून कायदा सक्षम करणे आणि गुन्ह्यात आपल्याला कुणीही पाठिशी घालणार नाही हा मेसेज जाणं गरजेचे आहे.

सतेज पाटील म्हणाले की, बदलापूर प्रकरणातील आरोपीला जर भाजप स्वीकृत नगरसेवक करत असेल तर सत्ताधारी पक्षच प्रोत्सहित करत असेल तर अशा लोकांचे धाडस वाढते. गृहमंत्रालयासाठी वेगळा मंत्री असायला हवा. मुख्यमंत्र्यांना या बद्दल सर्व माहिती मिळतच असते गृहमंत्री कोणीही असो. मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून त्यांना सर्व माहिती जातेच. गृहखाते कोण चालवते हे कळत नाही, चार अधिकारी हे खाते चालवतात हे वास्तव आहे. कायदा-सुव्यवस्था जर टिकवायची असेल तर गृहखात्याला वेगळा मंत्री देणं गरजेचे आहे.

सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च अधिकार आहेत. ते कुठल्याही अधिकाऱ्याला बोलावून घेऊ शकतात. फडणवीस जर गृहमंत्रालयाला न्याय देत असते वेळ देऊ शकत असते तर आमची काही हरकत नव्हती पण तसे होतांना दिसून येत नाही. राज्याचा विकास व्हावा असे वाटत असेत तर कोणताही उद्योग हा राज्यात कायदा-सुव्यवस्था कशी आहे हे बघणारच.

सतेज पाटील म्हणाले की, लाडक्या बहीणीच्या केवायसीच्या नावाखाली लाखो बहीणींचे अनुदान थांबवण्यात आले आहे. मग गेले वर्षभर हे अनुदान त्यांना कसे मिळत होते. अचानक ते अनुदान कसे बंद करण्यात आले. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी हे पैसे देणं बंद केले आहे. केवळ निवडणुकीपुरत्या लाडक्या बहीणी आहेत. लाडकी बहीण योजना बंद करू नये. ज्यांचे अनुदान बंद करण्यात आले आहे ते पुन्हा देण्यात यावे अशी आमची भूमिका आहे.

बदलापुरात 4 वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालकाकडून अत्याचार:आरोपीस अटक

मुंबई-अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, बदलापूर शहर पुन्हा एकदा एका घृणास्पद घटनेने हादरले आहे. पश्चिम भागातील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करत त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड करून पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली.

शाळेतून येताना व्हॅनमध्ये मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाने तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने पालकांना घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. पण शाळा प्रशासनाने चालकाचीच पाठराखण केली, असा आरोप पालकांनी केला आहे.या प्रकरणातील संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चिमुकल्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष असून, शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (वय ३ व ४ वर्षे) लैंगिक अत्याचाराची घटना आॅगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली. या दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तो चकमकीत मारला गेला.

वाहतूक कोंडी, स्वच्छतागृहे समस्या निवारणासाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने रस्त्यावर

पुणे- वाहतूक कोंडी निवारणासाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने रस्त्यावर उतरले आहेत त्याच बरोबर श्रमिक वसाहत या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे येथे प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत नागरिकांना यावर कार्यवाही करण्याचा शब्द दिला होता.तिथे प्रत्यक्ष उभे राहून त्यांनी तेथील स्वच्छता , सुधारणा ,आदींची कामे सुरु करवून घेतली आहे . निवडून आल्यावर नगरसेवक भेटत नाही हि संकल्पना मोडून काढून त्यांनी कामास प्रारंभ करत पुन्हा जनतेशी आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवल्याचे यातून दिसते आहे . ते म्हणाले,’नुकतीच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपली असून अधिकारी वर्गाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज या अनुषंगाने प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली आणि कामाच्या दर्जाबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या सूचनांचे स्वागत केले आणि सर्व शौचालये अत्याधुनिक व अद्ययावत करण्यासंबंधी शब्द दिला. लवकरच ही सर्व कामे मार्गी लागतील, यात शंकाच नाही.आपल्या प्रभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सतत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सतावत आहे. या अनुषंगाने आज प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता गोजारे , पथ विभागाचे उपअभियंता भूतडा आणि सर्व कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

सदर चौकातून मुख्य एनडीए रोडलगत मेट्रो होणार असून याकरिता वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक आहे. याबाबत मुख्य रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले आणि अधिकारी वर्गाशी उड्डाणपूल करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रकल्प विभागाकडून असे अनेक उपक्रम आकारास आल्याने त्यांच्या अनुभवाचा वापर करत हे कार्य त्यांच्याचतर्फे घडून येवो, अशी विनंती केली.यावेळी प्राथमिकत: विनंती स्वीकारली असून वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचमुळे भविष्यात सदर प्रश्न पूर्णतः मार्गी लागेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास वाटतो.असेही दुधाने यांनी म्हटले आहे.

कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 रिक्त जागा भरण्यासाठी २५ जानेवारीला ४१,२७३ उमेदवार देणार परीक्षा

पुणे- महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या रिक्त असणाऱ्या १६९ जागा भरणेकरिता जाहिरात दिल्यानुसार यापूर्वी दिनांक ०१/१२/२०२५ रोजी परीक्षा आयोजित केलेली होती. तथापि राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे त्यादिवशीची सदरची परीक्षा रद्द करण्यात आलेली होती. आता हीच परीक्षा दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली आहे.
राज्यातील ६ महसुली विभागातील २० जिल्ह्यांमध्ये एकूण ६९ केंद्रांवर सदरची परीक्षा आयोजित केलेली आहे. या परीक्षेकरिता ४१,२७३ परीक्षार्थी बसलेले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आयबीपीएस या संस्थेमार्फत सदरची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांबाबत काही परीक्षार्थीकडून हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत. मात्र याबाबत आयबीपीएस संस्थेची संलग्न असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन परीक्षा आयोजित करण्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयबीपीएस संस्थेस सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचे प्रत्येकी ०१ अधिकारी जिल्हा निरीक्षक म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे अखत्यारित प्रत्येक परीक्षा केंद्रावर १ उप अभियंता आणि परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन त्यानुसार कनिष्ठ अभियंता असे केंद्र निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. या प्रकारे सदरची परीक्षा ही अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत पुणे महानगरपालिका आणि आयबीपीएस संस्थेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे.
कोणत्याही परीक्षार्थीनी परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी पडू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेच्या संदर्भात तसेच नोकरी देण्याबाबत कोणतीही परिचित किंवा अपरिचित व्यक्तीकडून पैसे मागणी करणे, खोटे दावे करणे अशा पद्धतीने प्रलोभन दाखविणायांशी कोणत्याही प्रकारचे आर्थिक देवाणघेवाण परीक्षार्थीनी करू नये, असे आवाहन देखील पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रशिक्षणार्थीना करण्यात येत आहे.