Home Blog Page 130

…म्हणून तीन वर्षे तारीख पे तारीख:एकनाथ शिंदे-सरन्यायाधीश भेटीमुळे.. संजय राऊतांचा तिरकस टोला

मुंबई-एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. मात्र या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिका गेली तीन ते चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. वारंवार सुनावणी पुढे ढकलली जात आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे अलीकडेच एका विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भाजपचे मंत्रीही उपस्थित होते. या भेटीचे छायाचित्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले. याच पोस्टवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ती रिशेअर केली आणि केवळ एका ओळीत आपली नाराजी व्यक्त केली. म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख! असे कॅप्शन देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या विलंबाकडे तिरकसपणे बोट दाखवले. या आठवड्यात अपेक्षित असलेली अंतिम सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांची ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये मोठे स्थित्यंतर घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार फुटून बाहेर पडले आणि त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. या सत्तासंघर्षानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा यांनी एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. मात्र या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिका गेली तीन ते चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.या प्रकरणावरून राजकीय टीका तीव्र होत असून, आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर तिरकस टिप्पणी करत वातावरण आणखी तापवले आहे.

संजय राऊतांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयातील या विलंबावर नाराजी व्यक्त केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना या प्रलंबित प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जानेवारीमध्ये सुनावणी अपेक्षित आहे, मात्र ती कदाचित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ते थेट डिसेंबर 2026, 2027 किंवा 2029 मध्येही होऊ शकते. त्यांच्या या वक्तव्यातून न्यायप्रक्रियेतील विलंबाबाबतचा असंतोष स्पष्टपणे दिसून आला होता. शिवसेना पक्षनाव आणि चिन्हाचा प्रश्न इतकी वर्षे लटकून राहणे हा लोकशाहीसाठी गंभीर मुद्दा असल्याची भावना ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेच्या पक्षनाव व चिन्हासंदर्भातील सुनावणी बुधवारी 21 जानेवारी रोजी होणार होती. मात्र न्यायालयातील अन्य कामकाज आणि इतर याचिकांवरील सुनावण्यांमुळे सत्तासंघर्ष आणि निवडणुकांमधील आरक्षणासंबंधीच्या याचिकांची सुनावणी त्या दिवशी होऊ शकली नाही. नव्याने तारखा दिल्या जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र वारंवार तारीख पुढे ढकलली जात असल्याने ठाकरे गटाचा संयम सुटत असून, राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणावरचा राजकीय ताण आणखी वाढताना दिसत आहे.

पुण्याचे महापौर,उपमहापौर 6 फेब्रुवारीला निवडणार

पुणे:पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर पहिली सभा म्हणजेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता विभागीय आयुक्त यांचेकडे पत्र पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनुसार. महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याकरिता शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ ही तारिख निश्चित करण्यात आलेली असून, ही पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी ११.०० (अकरा) वाजता घेण्यात येईल. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.असे महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

बदलापूर :‘ही केवळ घटना नाही, तर व्यवस्थेचे अपयश’ – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा घटनास्थळी आढावा, बालसुरक्षेसाठी कडक उपाययोजनांचे निर्देश

बदलापूर, दि. २३ जानेवारी २०२६ : बदलापूर (पश्चिम) येथील शाळेच्या बसमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन सविस्तर आढावा घेतला. आरोपीस जामिन मिळता कामा नये व परिवाराच्या पाठीशी ना.एकनाथ शिंदे व शिवसेना ठाम आहेत असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाणे शहर पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांच्याशी सखोल चर्चा करून प्रकरणातील गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या व पुढील कार्यवाही संदर्भात ठोस सूचना केल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे अधोरेखित करत सांगितले की, ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या बालसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शाळा प्रशासन, बस व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी महिला दक्षता समिती संदर्भातही गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. संबंधित भागात महिला दक्षता समिती सक्रिय नसल्याचे निदर्शनास आल्याने, त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

महिला दक्षता समित्या या सर्वपक्षीय स्वरूपाच्या असून त्यात शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असतो. समाजाचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी या समित्यांच्या नियमित बैठका घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांनी यावेळी पोलीस विभागाकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शाळा बस सुरक्षेबाबत विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

माध्यमांशी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलांना ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांनी बस चालक, सहाय्यक, परिचारिका यांची नेमणूक करताना पार्श्वभूमी तपासणी, व्यसनमुक्ती तपासणी व चारित्र्य पडताळणी नियमित करावी . विशेषतः लहान मुलांसाठीच्या बसमध्ये महिला सहाय्यक (आया) अनिवार्य असाव्यात, याबाबत शासनाने आधीच परिपत्रके काढली आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग,महिला व बालविकास विभाग यांनी समन्वयाने पूर्वप्राथमिक शाळा,अंगणवाडी यांना कायद्याच्या कक्षेत आणल्याशिवाय लहान बालिकांवरील अत्याचाराला पायबंद बसणार नाही .यासाठी लवकरच बैठक घेऊन कायदा प्रस्तावित करण्याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू व कायदा आणण्याबाबत पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक पार पडताच भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी

अपक्ष निवडणूक लढलेल्या उज्वला गौड यांची भाजपमधून हकालपट्टी, बंडखोरांविरोधात भाजप ‘ॲक्शन मोड’वर

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडताच भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, प्रभाग क्रमांक २४ (कसबा – कमला नेहरू, के.ई.एम. हॉस्पिटल परिसर) येथे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूक काळात पक्षाच्या अधिकृत निर्णयांना धाब्यावर बसवत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उज्वला गौड यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रभागातील पदाधिकारी यश वालिया यांची देखील भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे मंडल अध्यक्ष विशाल कोंडे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे निलंबन व हकालपट्टीचे पत्र अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. या पत्रामध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत घेतलेली भूमिका ही पक्षाच्या अधिकृत निर्णयांना, निर्देशांना व संघटनात्मक शिस्तीला पूर्णतः अवहेलना करणारी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उचललेले हे पाऊल म्हणजे बंडखोरी, गटबाजी आणि पक्षविरोधी हालचालींना थेट इशारा असल्याचे मानले जात असून, आगामी काळात अशा प्रकारच्या कारवायांवर आणखी कठोर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ रिक्त पद भरतीसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलली

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी जाहिरात क्र. १/१५७९ प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची दिनांक २५/०१/२०२६ रोजी आयोजित केलेली परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे उपायुक्त प्रशासन यांनी कळविले आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की,सदर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुव्यवस्था व उमेदवारांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींचा आढावा घेण्यात येत आहे. सदर परीक्षेची नवीन तारीख, वेळ व परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच निश्चित करून अधिकृत संकेतस्थळ तसेच प्रसारमाध्यमाद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल.

उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा, अपप्रचार किंवा अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. तसेच प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. उमेदवारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, भरती प्रक्रिया अधिक सक्षम, सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने राबविण्याची ग्वाही दिली आहे.

सदर परीक्षेबाबत पुढील कार्यवाही किंवा नव्याने निश्चित होणारा परीक्षेचा दिनांक संदर्भातील माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/mr/b/recruitment व https://www.pmc.gov.in/en/b/recruitment प्रसिद्ध करण्यात येईल.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा शानदार समारोप

0

ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी

पुण्यातील टप्प्यात ल्यूक विजेता; चौथ्या व अंतिम टप्प्यात ॲलिक्सेईची बाजी

पुणे, २३ जानेवारी २०२६: ‘पुणे प्राइड लूप’ मध्ये उसळलेली गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात शुक्रवारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’चा शानदार समारोप झाला. यात पुण्यातील टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मुडग्वेने बाजी मारली, तर सांघिक विजेतेपद ली निंग स्टार संघाने पटकावले. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात श्नायर्को अॅलिक्सेईने (१ तास ५६ मिनिटे ५४ से.) अव्वल क्रमांक पटकावला. या पाच दिवसाच्या स्पर्धेने जगात भारताचे पर्यायाने पुण्याचे नाव उंचावले आहे.
चौथ्या टप्प्यात सायकलस्वारांनी शहराच्या मध्यभागातून ९५ किलोमीटरचा प्रवास केला. ५७८ मीटरची चढण पार करून ही शर्यत पुण्याच्या अनेक ऐतिहासिक रस्त्यांवरून आणि शनिवारवाड्यासारख्या वास्तूंच्या जवळून गेली. चार टप्प्यात सायकलस्वारांनी एकूण ४३७ किलोमीटर अंतर पार केले. यात ली निंग स्टार संघाने २८ तास ४१ मिनिटे १९ सेकंद अशा एकत्रित वेळेसह संघ क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ल्यूक मुडग्वे याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर चीनच्या या संघाने सर्व चार टप्प्यांवर आपले वर्चस्व राखले. स्पेनचा बर्गोस बर्पेललेट बीएच संघ (२८ तास ४२ मिनिटे ०९ से.) दुसऱ्या, तर मलेशियाचा तेरेंगानू सायकलिंग संघ (२८ तास ४८ मिनिटे १९ से.) तिसऱ्या स्थानावर राहिला. शुक्रवारी चौथ्या टप्प्यात ‘ली निंग स्टार’ संघाच्या अॅलिक्सेईने बाजी मारली. त्याचा सहकारी कॅमेरून निकोलस स्कॉट याने दुसऱ्या क्रमांकावर शर्यत पूर्ण केली, तर ‘रूजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाच्या डायलन हॉपकिन्स याने तिसरे स्थान मिळवले.
या सर्वांच्या केंद्रस्थानी ल्यूक होता. ल्यूकने पहिल्या दोन टप्प्यात बाजी मारली होती. तोच निर्विवाद विजेता म्हणून समोर आला. पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २९ संघांमधील १६४ एलिट (अव्वल) रायडर्सविरुद्ध स्पर्धा करताना, त्याने एकूण ९ तास ३३ मिनिटे ०४ सेकंद अशा एकूण वेळेत ही शर्यत पूर्ण केली. थायलंडच्या ‘रूजाई इन्शुरन्स विनस्पीड’ संघाचा आणि ल्यूकचा सर्वांत जवळचा स्पर्धक एलन कार्टर बेटल्स, केवळ १४ सेकंदांनी मागे राहिला, तर बेल्जियमच्या ‘टार्टेलेटो-आयसोरेक्स’ संघाचा योर्बेन लॉरीसेन ३३ सेकंदांच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर राहिला.
ल्यूकने पहिल्या दिवशी ‘मुळशी-मावळ माईल्स’च्या टप्प्यात ‘यलो जर्सी’ आपल्या नावे केली होती आणि त्यानंतर ती शेवटपर्यंत कोणालाही मिळवू दिली नाही. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू म्हणून ‘ग्रीन जर्सी’देखील पटकावली. अशाप्रकारे, जिद्द आणि धोरणात्मक चातुर्य यांचा मेळ घालून त्याने या आठवड्याचा यशस्वी समारोप केला.

ल्यूक म्हणाला…
सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्यानंतर ल्यूकने वैयक्तिक कौशल्यापेक्षा सामूहिक प्रयत्नांना विजयाचे श्रेय दिले. तो म्हणाला, ‘माझा संघ खरोखरच खूप चांगला आहे. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझी काळजी घेतली. तुम्ही गेल्या दोन दिवसांत पाहिल्याप्रमाणे, आमच्या इतर दोन रायडर्सनी विजय मिळवला. त्यामुळे, आम्ही तीन वेगवेगळ्या रायडर्ससह विजय मिळवले आहेत आणि आजचा हा विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट, उत्तम सांघिक काम, भरपूर सराव आणि तासनतास दिलेला वेळ या सर्वांचे योगदान आहे. त्यामुळे, हा विजय माझ्या संघासाठी आहे.’ ल्यूकला पुण्यात मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे पुण्याच्या गर्दीने तो विशेष प्रभावित झाला होता. तो पुढे म्हणाला, ‘आजचा दिवस खरोखरच अप्रतिम होता. मी याआधी कधीही अशी गर्दी पाहिली नव्हती. तिथे किती लोक होते याचा आकडा सांगणे कठीण आहे; पण संपूर्ण मार्गावर प्रचंड लोक होते. रस्त्याच्या कडेला लोकांच्या रांगा लागल्या होत्या आणि ते दृश्य विलोभनीय होते. सर्वांसमोर शर्यतीत भाग घेणे विलक्षण होते आणि मला आशा आहे की प्रत्येकाने या रेसिंगचा आनंद घेतला असेल. मला पुढच्या वर्षी पुन्हा इथे यायला नक्कीच आवडेल.’

‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’च्या महासंचालक अमिना लानाया म्हणाल्या, ‘भारताचा अभिमान वाटावा असा हा सोहळा होता. पहिल्याच आयोजनात भारताने जागतिक दर्जाची शर्यत यशस्वी करून दाखवली आहे. सायकलिंग हा खेळ भारतीयांच्या मनात क्रिकेटसारखे स्थान मिळवेल, हेच आमचे ध्येय आहे.’ ही स्पर्धा ‘लॉस एंजेलिस २०२८ च्या ऑलिंपिकसाठी रँकिंग पॉइंट्स देणारी असल्याने याला विशेष महत्त्व होते. पुण्याच्या या यशस्वी आयोजनाने भारतात सायकलिंगच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.

विजेत्यांना अभिनेता अमीर खान याच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेच्या (युसीआय) महासंचालक अमिना लानाया, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीतसिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बजाज ऑटोचे कर विभागाचे उपाध्यक्ष चेतन जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिनेता अमीर खान याने विजेत्यांचे कौतुक केले. त्याबरोबर ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्या सर्वांचेही त्याने अभिनंदन केले.

इ्तर विजेते

पोलका डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्या क्लेमेंट अलेनो

ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलस्वार): बर्गोस बर्पेललेट बीएच संघाच्याच जंबलजाम्ट्स सैनबायर

व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलस्वार): नेदरलँड्सच्या तिज्सेन विगो

ब्लू जर्सी (सर्वोत्कृष्ट भारतीय सायकलस्वार): हर्षवीर सिंग सेखॉन

सर्वोत्तम तीन भारतीय – हर्षवीर सिंग सेखॉन, मानव सारडा, दिनेश कुमार

“मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे बाळासाहेब ठाकरे” – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २३ जानेवारी २०२६ :
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवन येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “आज २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शंभरावा जन्मदिवस आहे. या निमित्ताने विधानमंडळाच्या पवित्र परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा आम्हाला मान मिळाला.”

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त #शिवसेना पक्ष कार्यालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, ना. ऊदय सामंत , शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, राहुल शेवाळे तसेच शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पोर्ट्रेटच्या उद्घाटनाचा संदर्भ देत सांगितले की, समाजातील लाखो लोकांना नेतृत्वाची दिशा देणाऱ्या आणि हजारो लोकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा थोर व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्काच्या ठिकाणी ‘विधान भवनात’, आदरांजली वाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

“विधान भवनात अत्यंत निवडक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचीच छायाचित्रे लावली जातात. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश होणे, हे त्यांच्या असामान्य कार्याचेच प्रतीक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

मराठी अस्मिता, सुशासन, दळणवळण, पाणी प्रश्न, रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध विषयांवर बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले विचार आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगत, “देशाची अस्मिता ही व्यक्तीच्या अस्मितेपेक्षा मोठी आहे. मराठी भाषेचा सन्मान जपतानाच प्रत्येकाला रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही विधिमंडळात काम करत आहोत,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. त्या वेळी सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशभरातील कोट्यवधी लोकांनी अश्रूंनी डोळे भरून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्याच भावनांचे प्रतिबिंब विधिमंडळातील श्रद्धांजलीपर भाषणांमधूनही दिसून आले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

“मी शिवसेनेची विधान परिषद सदस्य असले तरी विधान परिषद उपसभापती या नात्याने अत्यंत नम्रतेने आणि आदरयुक्त भावनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करते,” असे भावनिक उद्गार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

पुणे दि.२३ : राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणी पुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणार्या धरणांच्या जलाशयांवर मोठ्या प्रमाणावर तरंगते सौर प्रकल्प (‘फ्लोटिंग सोलर’) उभारून महाराष्ट्र हरित ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रस्थानी आणण्याचा विश्वास जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जलसंपदा विभागाच्या वतीने ‘हरित ऊर्जा उपयोजन’ या विषयावर पुणे येथे आयोजित धोरणात्मक परिषदेत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, मित्र संस्थेचे वरिष्ट अधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, वाढत्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सिंचन पायाभूत सुविधांचा धोरणात्मक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतून फ्लोटिंग सोलर प्रकल्पांमुळे जमिनीच्या अधिग्रहणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे शेतीसाठी जमिनीचे संरक्षण होईल. तसेच जलाशयावर सौर पॅनेलचे आच्छादन असल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन पाण्याचे संवर्धन होईल, ज्याचा थेट फायदा आपल्या शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण समुदायाला होईल असा विश्वास श्री. विखे पाटील यांनी परिषदेत व्यक्त केला.

या परिषदेमध्ये सौर उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी आणि अनेक वैयक्तिक विकासकांनी सहभाग नोंदवला. तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमतेसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक निकष या बैठकीत प्रामुख्याने चर्चेला आले. या योजना राबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पारदर्शक पीपीपी मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे मत उपस्थिती प्रतिनिधीनी व्यक्त केले.

उद्योजकांनी केलेल्या सूचना लक्षात घेता, या तरंगते सौर प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग एक ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करण्याबाबत विचार करण्यात येईल. जलसंपदा विभागाच्या जलाशयावर तरंगते सौर ऊर्जा करण्याच्या उपक्रमामुळे महाराष्ट्र केवळ ऊर्जेत स्वयंपूर्ण होणार नाही, तर हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक आदर्श मॉडेल म्हणून समोर येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुण्यातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून पर्यावरणपूरक बनवणार

पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उदघाटन

पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये यंदाही भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, पुण्याच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा हिरवागार परिसर असणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्गसंवर्धन ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे आणि पोलीस विभाग ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. आज हरित सेनेची गरज आहे, त्यामुळे “खाकीसेना आता हरितसेनेच्या रूपात कार्य करणार” असून शहरातील ४४ पोलीस ठाणे ‘ग्रीन पोलीस स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचारी सहकार्य करेल, असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आज एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन २०२६ चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एका संस्थेची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे आणि या दिशेने पुणे पोलीस आपली जबाबदारी अत्यंत गांभीर्याने पार पाडेल.

या प्रसंगी अनुपमा बर्बे (जॉइंट सेक्रेटरी), सुमन किर्लोस्कर (अध्यक्ष, प्रदर्शनी समिती), सुरेश पिंगळे (उपाध्यक्ष, प्रदर्शनी समिती) यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यंदा एम्प्रेस गार्डन हे आपल्या अनोख्या व कलात्मक सादरीकरणामुळे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणांमध्ये जपानी पद्धतीतील इकेबाना पुष्परचना तसेच विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष यांचा समावेश असून, ते प्रेक्षकांना निसर्गाच्या सूक्ष्म सौंदर्याची अनुभूती देत आहेत.

या प्रदर्शनात पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक तसेच इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सादर केलेल्या दुर्मिळ व आकर्षक वनस्पतींनी बागकामप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

तसेच बागकामप्रेमींसाठी विशेष गुलाब फुलांची सजावट स्पर्धा, फळ-भाजी स्पर्धा तसेच आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धा, गुलाब पुष्प स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आहे. आयोजकांनी सांगितले की हे पुष्पप्रदर्शन २३ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २३ : महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली उपस्थित होत्या.

या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली आणि राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली या एकात्मिक वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार असून, यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता तसेच डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मानवी भांडवल, अर्थव्यवस्था व उच्च शिक्षणाधारित ज्ञान अर्थव्यवस्था या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सुकाणू समितीमार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला. तसेच गुणवत्ता व जागतिक मानांकनाच्या अनुषंगाने विद्यापीठांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा सुधारण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांनी मार्गदर्शन केले. राज्य संशोधन निधी, महाज्ञानदीप प्रकल्प तसेच पीएम उषा आणि सीएम उषा या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

पुण्यात वाहतुकीचा कोंडमारा कमी करण्यासाठी डबल डेकर पूल आणि मेट्रो प्रकल्पांना गती!

  • विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल व माण–हिंजवडी मेट्रो प्रकल्पांची महानगर आयुक्तांकडून पाहणी

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील निर्माणाधीन डबल डेकर पूल तसेच माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाच्या कामाची पाहणी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी केली. या पाहणीवेळी पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल शक्य तितक्या लवकर सार्वजनिक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचे महानगर आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. डबल डेकर पुलाच्या बाणेर रॅम्पचे काम अतिरिक्त मनुष्यबळ व संसाधनांचा वापर करून वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या अधिकारी व अभियंत्यांना दिले. तसेच, पाषाण बाजूकडील रॅम्पच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या युद्धपातळीवर सोडवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, माण–हिंजवडी मेट्रो (लाईन–३) प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. मेट्रो स्थानकांशी संबंधित तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. विशेषतः शिवाजीनगर स्टेशन, मोदीबाग आणि विद्यापीठ चौक येथील पादचारी पुलांच्या (फूट ओव्हर ब्रिज) कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. मेट्रो मार्गिकेवरील कामाचा दर्जा राखून प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुण्यातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादन सुविधेचे निओलाइट झेडकेडब्ल्यूकडून उद्घाटन

0

§  झेड.के.डब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील उत्पादन सुविधेचे उद्घाटन संपन्न.

पुणे23 जानेवारी2026: पॅसेंजर वाहनेव्यावसायिक वाहनेऑफ-रोड वाहनेदुचाकी आणि तीनचाकी वाहनांसह विविध प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यक ओईएम्स (“मूळ उपकरण उत्पादक”) ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांचे एक प्रमुख उत्पादक तसेच जागतिक पुरवठादार असलेल्या निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडने महाराष्ट्रातील पुणे येथे आपल्या नवीन उत्पादन सुविधेचे आज उद्घाटन केले.

डिसेंबर 2025 मध्ये कार्यान्वित झालेला हा नवीन प्रकल्प मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबादच्या प्रमुख ऑटोमोटिव्ह क्लस्टरच्या अगदी जवळ आहे. यामुळे कंपनीला अधिक जलद, उत्तम इन्व्हेंटरी व्यवस्थापन करता तर येतेच. पण त्यासोबत जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची एमजी मोटर इंडिया), स्टेलेंटिस ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड, डेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड, इसुझू मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, टाटा मोटर्स लिमिटेड आणि पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष देणे शक्य होते.

उत्पादन सुविधांव्यतिरिक्त, निओलाइट झेडकेडब्ल्यूने एक स्वतंत्र डिझाइन केंद्र स्थापन केले आहे, जे आधुनिक डिझाइन साधने आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर, थ्रीडी मॉडेलिंग, ऑप्टिकल डिझाइन, प्रोटोटाइपिंग अशा सुविधांनी सज्ज आहे. हे डिझाइन केंद्र आमच्या कंपनीच्या अंतर्गत उत्पादन विकास क्षमता वाढविण्यात, उत्पादन प्रत्यक्षात बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यात आणि आमची उत्पादने जागतिक कार्यक्षमता तसेच अन्य नियामक मानकांची पूर्तता करतील याची खात्री करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

या प्रसंगी झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएचचे सीईओ श्री. वॉन योंग ह्वांग म्हणाले, “जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी भारत एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. निओलाइट झेडकेडब्ल्यूचा पुण्यातील विस्तार म्हणजे भविष्यातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग सोल्यूशन्सना पुढे नेण्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे. तंत्रज्ञान आणि नावीन्य यातील सातत्यपूर्ण सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकश्री. राजेश जैन म्हणाले, “आमचा नवीन पुणे प्रकल्प हा आमच्या ग्राहकांच्या आणि निओलाइट झेडकेडब्ल्यूच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच क्षमतातंत्रज्ञान आणि प्रतिभेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठीऑटोमोटिव्ह लाइटिंगमध्ये नावीन्य आणण्यासाठी आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही अधिक चांगल्या स्थितीत आहोत. यापुढील आमचे पुढील लक्ष्य कांचीपुरम येथील आमचा प्रकल्प सुरू करणेहे असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत.”

“पुण्यातील ही सुविधा मोल्डिंग, सरफेस ट्रीटमेंट आणि असेंब्लीसह ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि अन्य घटकांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केली आहे. शिवाय, विद्युतीकरण आणि टिकाऊपणाच्या दिशेने होत असलेल्या बदलाच्या अनुषंगाने, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणारी काही लाइटिंग उत्पादने देखील सादर करतो. त्याच वेळी, आमचा पोर्टफोलिओ देखील पॉवरट्रेन एगनॉइस्टिक आहे, जो इलेक्ट्रिक वाहनांसह अन्य प्रकारची इंजिन असलेल्या वाहनांसाठी देखील उपयुक्त आहे,” असे निओलाइट झेडकेडब्ल्यूचे सीईओ श्री. राजेश सोनी म्हणाले.

ओटीटीच्या युगात चित्रपट महोत्सव अधिक महत्त्वाचे

0

‘पिफ’मधील दिग्गज ज्यूरी सदस्यांचे मत
पुणे, दि. २३ जानेवारी २०२६ : ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे  महत्त्व अधिक ठळक होत असल्याचे मत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाती(पिफ)ल ज्यूरी सदस्यांनी व्यक्त केले. विविध संस्कृती, वेगळे दृष्टिकोन आणि अस्सल कलात्मकता अनुभवण्यासाठी फिल्म फेस्टिवल्सना पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्यूरी सदस्यांनी आज संवाद साधला. यामध्ये विविध देशांतील
चित्रपटांच्या वेगवेगळ्या प्रवाहांत कार्यरत असलेल्या दिग्गजांचा सहभाग होता. यामध्ये तामिळ लेखक बी. जेयामोहन, स्लोव्हाकियाचे माहितीपट दिग्दर्शक पिटर केरेकेस, तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू, फिनलॅंडच्या लेखिका, चित्रपट दिग्दर्शिका रीट्टा आल्टो, स्पेनचे चित्रपट दिग्दर्शक सेर्गी कासामीतजाना आणि तमिळ चित्रपट दिग्दर्शक सिनू रामासामी यांचा समावेश होता.

युरोपियन सिनेमातील डॉक्युमेंटरी दिग्दर्शक पिटर केरेकेस म्हणाले, “ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षक एका ठराविक प्रकारच्या कंटेंटमध्ये अडकून पडतात. चित्रपट महोत्सव मात्र असे चित्रपट समोर आणतात, जे आपण कधीच शोधले नसते. खऱ्या अर्थाने कला समजून घ्यायची असेल, तर चित्रपट महोत्सवाचा अनुभव घेणं गरजेचं आहे.”

चित्रपट परीक्षणाच्या प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्यूरी सदस्यांची अभिरुची वेगवेगळी असली तरी चर्चेच्या माध्यमातून सर्वांना मान्य होईल अशा सामायिक भूमिकेपर्यंत पोहोचणं ही एक आव्हानात्मक पण आनंददायी प्रक्रिया असते. त्यांनी एआय कंटेंटच्या वाढत्या वापराबाबत सावधगिरी व्यक्त केली. तंत्रज्ञान उपयोगी असले तरी सर्जनशीलतेचा केंद्रबिंदू मानवी जीवन आणि चित्रपटकाराची अभिव्यक्तीच असावी, असे ते म्हणाले. “तुमच्या मातृभाषेतून येणारी अस्सल भावना कोणतंही तंत्रज्ञान निर्माण करू शकत नाही,” असा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

रीट्टा आल्टो यांनी मोठ्या पडद्यावर, अनेक प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहण्याचा अनुभव मोबाईल किंवा वैयक्तिक स्क्रीनवर शक्य नसल्याचे सांगितले. सामूहिक अनुभवातूनच चित्रपटाची खरी ताकद प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, असे  त्यांनी नमूद केले.

बी. जेयामोहन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की कलेतील मौलिकता आणि अस्सलपणा अनुभवायचा असेल, तर चित्रपट महोत्सवांना कोणताही पर्याय नाही. त्यांनी नवोदित चित्रपटकारांना व्यापक वाचनाचा सल्ला दिला. साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय सखोल सिनेमा शक्य नसल्याचे ते म्हणाले. “चित्रपटांवरून चित्रपट बनवण्याऐवजी जगण्यातल्या अनुभूती आणि विचारातून सिनेमा निर्माण करा,” असे आवाहन त्यांनी केले.
तर सेर्गी कासामीतजाना यांच्या मते, अशा महोत्सवांमुळे प्रेक्षकांची वैयक्तिक अभिरुची आणि दृष्टिकोन नव्याने परिभाषित होतो. नवोदित दिग्दर्शकांना स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. “इतरांसारखे चित्रपट बनवण्याऐवजी तुमची स्वतःची दृष्टी प्रामाणिकपणे मांडणारे चित्रपट करा आणि ते चित्रपट महोत्सवांपर्यंत पोहोचवा,” असे त्यांनी सांगितले.

ओटीटीवरील एकसुरी आणि नकारात्मक कंटेंटच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत सिनू रामासामी यांनी ‘पिफ’मधील प्रचंड गर्दीने येणाऱ्या प्रेक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले. भविष्यात प्रादेशिक चित्रपटकारांना अधिक भक्कम पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारांनी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि चित्रपट संग्रह (archives) उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटांमध्ये दिसणारी कथनातील प्रामाणिकता आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी संस्कृतीशी दक्षिण भारतातील संस्कृतीचं साधर्म्य जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितले.
तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू यांनी मराठी चित्रपटांतील विषयांची विविधता आणि स्थानिकतेतून जागतिक स्तरावर जाणाऱ्या दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. ही विविधता शोधणे आणि अनुभवणे आपल्यासाठी समृद्ध करणारा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमआरडीए मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे : थोर स्वातंत्र्यसेनानी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. २३) अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास नियोजन विभागाच्या सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षता विभागातील पोलीस हवालदार संभाजी खरात व पोलीस हवालदार अमर पवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांच्या राष्ट्रसेवेला उजाळा देणारे अभिवाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही या महापुरुषांच्या विचारांना व कार्याला अभिवादन केले.

साडेआठ लाखाची E सिगारेट आणि हुक्का फ्लेवर पकडले , तिघांना अटक

पुणे -पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ०६ वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून ८,३२,९६०/-रु किंमतीचे प्रतिबंधीत ई- सिगारेट (वेप) व तबांखुजन्य हुक्का फ्लेवर पकडले आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरात प्रतिबंधीत ई सिगारेट (वेप) आणि तबांखुजन्य हुक्का फ्लेवर याचा साठा करून अवैध विक्री करणा-या दुकानदारावर धडक कारवाई सुरु केली आहे . या कारवाई मध्ये लष्कर पोलीस स्टेशन व कोरेगांवपार्क पोलीस स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन आयात निर्यात वाहतुक विक्री साठवणुक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ चे कलम ७ च ८ प्रमाणे, एकुण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोथरुड पोलीस स्टेशन आणि लष्कर पोलीस स्टेशन येथे प्रतिबंधीत अवैध रित्या तबांखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करणाऱ्या दुकानदारावर एकुण ०३ खटले दाखल करण्यात आले . या मध्ये ८,३२,९६०/-रु किमतीचे २९७ ई- सिगारेट (वेप), तसेच ८९५ तबांखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले असून १) हुसेन अब्दुल रहेमान वय २५ वर्षे रा. लेन नं ६ कोरेगाव पार्क पुणे २) हसन शेख वय ४२ रा एम जी रोड कॅम्प पुणे ३) अब्दुल इस्माईल जाबीर वय २८ रा. मोलोदिना रोड, कॅम्प पुणे यांना पकडण्यात आले आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा पकंज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक अस्मिता लाड, व पोलीस अंमलदार, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.