Home Blog Page 129

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक :‘साहित्य संवर्धन आघाडी’ मैदानात

0


पुणे —
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत समविचारी साहित्यप्रेमी एकत्र येत ‘साहित्य संवर्धन आघाडी’ ची स्थापना करण्यात आली असून ही आघाडी आगामी निवडणूक लढवणार आहे. परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ही आघाडी स्थापन करण्यात आल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी उमेदवार असून प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी तर डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाहपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय इतर विभागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. व्याखाने व स्मृतिदिन विभागासाठी सुनील महाजन, ग्रंथनिवड विभागासाठी हेमंत मावळे, पारितोषिके विभागासाठी सुनेत्रा मंकणी, ग्रंथालय विभागासाठी प्रसाद मिरासदार, परीक्षा विभागासाठी कुणाल ओंबासे, वास्तू देखभाल विभागासाठी नितीन संगमनेरकर आणि वर्धापन पारितोषिके विभागासाठी डॉ. गणेश राऊत यांचा समावेश आहे. तर संदीप तापकीर यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी पदासाठी पॅनलच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना योगेश सोमण म्हणाले की, “दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून परिषदेमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा जाहीरनामा आगामी दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. राज्यभरात सुमारे १६ हजार मतदार असून प्रत्येक मतदारापर्यंत मतपत्रिका पोहोचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अधिकाधिक मतदान व्हावे, ही आमची भूमिका आहे. सातारा साहित्य संमेलनाच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांचा हिशेब सर्वांसमोर आणून आवश्यक ती चौकशी केली जाईल.”
कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर म्हणाले, “निवडून आल्यावर आम्ही कोणती कामे करणार आहोत, याची सविस्तर माहिती मतदारांना दिली जाईल. १४० वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेचे कामकाज पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने चालावे, यासाठी आमचा लढा आहे. यापूर्वीच्या कार्यकाळातील अनेक बाबी प्रसारमाध्यमांतून उघडकीस आल्या आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर असून महाराष्ट्र साहित्य परिषद ही त्याची शान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “निवडणूक प्रक्रियेत दबाव, मतपेटी पळवणे, मतपत्रिका गायब होणे, आमिषे दाखवणे असे प्रकार घडले आहेत. ही लढाई धमकी विरुद्ध विनंती, लालुच विरुद्ध प्रतिष्ठा अशी आहे. मतदार यादी सदोष असून ती पारदर्शक करण्याचा आमचा मानस आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार होत नसल्याचा आमचा आरोप आहे.”

सुप्रसिद्ध लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन

0

पुणे- सुप्रसिद्ध मराठी लेखिका सौ. शुभदा गोगटे यांचे शनिवारी, २४ तारखेला, पहाटे २:४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केले होते.त्यांच्या मागे पती, शरद गोगटे, दोन कन्या, जावई, नातू, असा परिवार आहे.

त्यांनी लेखनाची सुरुवात विज्ञान काल्पनिकतेने केली. त्यांची पहिलीच वैद्यानिक कादंबरी, ‘यंत्रायणी’ हिला १९८३ सालाचा महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या बऱ्याच विज्ञान आणि गूढ कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी प्रसिद्ध केलेल्या भारतीय वैद्यानीक कथांच्या प्रातिनिधिक संग्रहांत त्यांच्या विज्ञान कथांचा समावेश आहे.शुभदा गोगटे यांच्या भारतातील रेल्वे इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ आणि ‘सांधा बदलताना’ या दोन कादंबऱ्या बऱ्याच गाजल्या.‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार तसेच गो. नी. दांडेकरांचा मृण्मयी पुरस्कार मिळाला.याशिवाय त्यांचं डॉ. जगदीश हिरेमठांच्या ‘रिव्हरसिंग द हॉर्ट डिसीज’ या कार्यक्रमावर आधारित ‘हृदयविकार निवारण’ हे उपयुक्त पुस्तक अतिशय लोकप्रिय झाले. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.त्यांची प्रतिभा बहुआयामी होती. १९८० च्या दशकात त्यांनी अनेक प्रयोग करून इन्स्टंट फुड्स तयार केली होती.

सहकारात बँकेचे मूल्यांकन केवळ आकडेवारीत नव्हे तर सामाजिक कार्यात देखील व्हावे 

राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे ; पुणे पीपल्स बँकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा  

पुणे : बँकेचे मूल्यांकन करताना ते केवळ आकडेवारीत करणे योग्य नाही. सहकारात बँकेचे मूल्यांकन हे सामाजिक कामात देखील करायला हवे. सुरुवातीला पुणे पीपल्स बँकेची ओळख ही रिक्षावाल्यांची बँक अशी होती. आजही बँकेच्या विविध कार्यातून सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट होत आहे, असे मत राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी व्यक्त केले.

पुणे पीपल्स को-आॅप बँक लि., पुणे अमृतमहोत्सवी वर्षात (७५) पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अमृतमहोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक संजय कुमार, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, सहकारी संस्था पुणे चे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांसह बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे, बबनराव भेगडे, सुभाष नडे, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, मिलिंद वाणी, वैशाली छाजेड, निशा करपे, संजीव असवले, डॉ.विश्वनाथ जाधव, स्वीकृत तज्ञ संचालिका श्वेता ढमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, कौस्तुभ भेगडे, उदय जग्ताप, राजेंद्र गांगर्डे, अरुण डहाके आदी उपस्थित होते.

मनोरुग्ण महिलांसाठी अजोड कार्य करणा-या माऊली सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरचे संस्थापक डॉ.राजेंद्र धामणे व डॉ.सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये १ लाख १ हजाराचा धनादेश, पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. यंदा बँक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना उपस्थितांसाठी खास मनोरंजनपर संकर्षण व्हाया स्पृहा या विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

डॉ. पराग काळकर म्हणाले, जीवनात जे जे मिळेल ते समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. डॉ. धामणे दांपत्याने हे प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. बँकेने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. सहकार चळवळीने समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साधला पाहिजे, हे देखील पुणे पीपल्स बँकेने करून दाखवले आहे. 

डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, संस्थेचा विश्वस्त असणे म्हणजे ‘ते माझे नाही’ हे समजून काम करणे होय. सहकार क्षेत्रात ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कार्य हे मानवतावादी दृष्टिकोनातून व्हायला हवे. सामाजिक व्रतस्थतेचा आमचा यज्ञ सुरु असून पुरस्कारामुळे याची जबाबदारी अधिक वाढते. 

श्रीधर गायकवाड म्हणाले, वसंतपंचमीच्या दिवशी सन १९५२ साली बँकेची स्थापना झाली. ही केवळ बँक न राहता समाजसेवेचे व्रत व्हावे, जनसामान्यांचा तो एक विश्वस्त न्यास असावा या भूमिकेतून बँक सुरु झाली. तसेच आज अखंड ७४ वर्षे व्रतस्थपणे खातेदारांच्या सेवेत कार्यरत आहे. आज संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली गेल्या १७ वर्षात एकूण व्यवसाय ४०० कोटीवरुन रु.२७५० कोटी इतकी प्रगती केली आहे. ०% एनपीए, सभासदांना १२ ते १५ टक्के दराने लाभांश ही बँकेची वैशिष्टे आहेत. यंदा बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. मार्च २०२६ अखेर किमान ५०० कोटी व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर आगामी २/३ वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु.५००० कोटी करण्याचा संकल्प आहे. छोट्या बँकांना देखील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याकरिता आम्ही लक्ष देत आहोत. 

व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी व ठेवीदार यांना हक्काचे ठिकाण वाटावे, आधार वाटावा, याकरीता ३१ जानेवारी १९५२, वसंत पंचमी च्या दिवशी पुणे पीपल्स बँकेची स्थापना झाली. आजपर्यंत स्वत:च्या मालकीचे बँकेचे मुख्य कार्यालय नव्हते, आता या संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अमृतमहोत्सवी वर्षात स्वत:च्या मालकीच्या वास्तूत मुख्य कार्यालय स्थलांतरीत होणार आहे. हे मुख्य कार्यालय तब्बल २६ हजार चौरस फूटांच्या वास्तूत असणार आहे. लवकरच बँकेला डायरेक्ट मेंबरशीप व शेडयुल्ड दर्जा मिळविण्यात आम्ही यशस्वी होऊ. विश्वस्त भावनेने संचालक मंडळाचे काम सुरू असून तळागाळातील माणसासाठी कामाचा संकल्प आहे. सहकारी बँक विश्वासावर चालते हे जाणून आम्ही याप्रमाणे बंधने घालून काम करीत आहोत. आज बँकेचे २७ हजार २७६ सभासद असून लाखाच्या पुढे खातेदार आहेत. हा विस्तार यापुढेही विश्वासाने होत राहील, असेही त्यांनी सांगितले.

स्त्रीच कुटुंबाला आणि समाजाला योग्य दिशा दाखवू शकते- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

गायक अमोल पटवर्धन आणि विदुषी डॉ. धनश्री लेले यांच्या गायन आणि प्रवचनात सर्वच तल्लीन

मानसी उपक्रमाचा त्रैमासिक सस्नेह मेळावा उत्साहात साजरा

पुणे- स्त्रीच कुटुंबाला आणि समाजाला योग्य दिशा दाखवू शकते, असे गौरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. तसेच, मानसी उपक्रम हा स्त्रीला शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ करण्यासाठी सुरु केल्याचे ना. पाटील यांनी यावेळी नमूद केले.नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मध्ये सुरु असलेल्या मानसी उपक्रमाचा त्रैमासिक सस्नेह मेळावा आज संपन्न झाला. यावेळी मानसी उपक्रमाच्या संचालिका मुग्धा भागवत, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मनिषा बुटाला, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील, प्रा. डॉ. अनुराधा एडके, ॲड. प्राची बगाटे यांच्यासह मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणाला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. कारण, स्त्रीच कुटुंबाला समाजाला दिशा देऊ शकते. मुलांवर योग्य प्रकारचे संस्कार करुन चांगली पीढि घडवू शकते. त्यामुळे तिला तिची वाढ होत असताना अवश्यक सर्व गोष्टी वेळीच पुरवल्या, तर संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी योगदान देण्यासाठी सक्षम होऊ शकते. मानसी उपक्रम त्याच हेतूने सुरु असून, यातून प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा आणि ती प्रवाहित करण्याचा प्रयत्न आहे.

ते पुढे म्हणाले की, आज प्रत्येक घरात मोबाईलचा अतिरेकी वापर सुरु आहे. त्यामुळे संवाद कमी झाला आहे. त्यामुळे दिवसातून किमान २० मिनिटे तरी घरातल्यांनी मोबाईल बाजूला ठेवून, संवाद साधला पाहिजे. लहान मुलांचे गोष्टींच्या माध्यमातून प्रबोधन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

दरम्यान, या त्रैमासिक सस्नेह मेळाव्यानिमित्त सुप्रसिद्ध गायक अमोल पटवर्धन यांच्या भक्तिगीतांच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले, तर विदुषी डॉ. धनश्री लेले यांच्या सुश्राव्य व प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थितांना सकारात्मक विचारांची दिशा दिली.

३०० नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण,

ग्रुप सेंटर, सी.आर.पी.एफ., पुणे येथे रोजगार मेळ्याच्या १८व्या टप्प्याचे आयोजन



सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरण यांच्यावर केंद्र सरकारचे लक्ष – मुरलीधर मोहोळ

पुणे, 24 जानेवारी 2026

ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), पुणे येथे आज (शनिवार, २४ जानेवारी २०२६) १८व्या टप्प्यातील रोजगार मेळा अत्यंत उत्साहपूर्ण व सन्माननीय वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुरलीधर मोहोळ, माननीय खासदार, पुणे तसेच माननीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांतर्गत देशातील ४५ निवडक ठिकाणी ६१,००० पेक्षा अधिक नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल्स, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ईपीएफओ व आयआयजीएम येथील ३०० निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. हे नव्याने नियुक्त झालेले युवक भारत सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये कार्यभार स्वीकारून प्रशासन व सार्वजनिक सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी आपले योगदान देतील.

या प्रसंगी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने नियुक्ती पत्रांच्या वितरणाचा शुभारंभ केला व नव्याने नियुक्त उमेदवारांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की ही नियुक्ती पत्रे केवळ नोकरीची ऑफर नसून, विकसित भारत @2047 या प्रवासात सक्रिय सहभागासाठीचे आमंत्रण आहे. विविध देशांसोबत करण्यात येणारे मुक्त व्यापार करार (एफटीए) युवकांसाठी अधिक संधी निर्माण करतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच जीएसटी 2.0, आयकर सवलती, मेक इन इंडिया उपक्रम आणि जागतिक समुदायाचा भारतावर वाढता विश्वास यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाच्या प्रगती व विकासासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या संबोधनात मुख्य अतिथी श्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की संपूर्ण देश माननीय पंतप्रधानांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहे. कौशल्य विकास, मुद्रा योजना, स्टार्ट-अप इंडिया तसेच इतर युवकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने स्वरोजगाराच्या माध्यमातून कोट्यवधी रोजगार संधी निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच समावेशक विकास व आर्थिक सशक्तीकरणावर सरकारच्या ठोस भरामुळे सध्याच्या काळात रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यापूर्वी वैभव निम्बाळकर, भा.पु.से., उप महानिरीक्षक, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे यांनी मुख्य अतिथींचे औपचारिक स्वागत व सत्कार केला. आपल्या भाषणात त्यांनी रोजगार मेळ्याला पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रियेद्वारे राष्ट्रनिर्मितीकडे नेणारा परिवर्तनकारी उपक्रम असल्याचे सांगितले. ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे हे एक जबाबदार आयोजक म्हणून अशा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे सुसूत्र, शिस्तबद्ध व सन्माननीय आयोजन करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नव्याने नियुक्त उमेदवारांनी राष्ट्रसेवेच्या काळात प्रामाणिकपणा, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचे सर्वोच्च मानदंड जपावेत, असे आवाहन त्यांनी केले.

नव्याने नियुक्त उमेदवारांनी या दूरदर्शी उपक्रमासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सरकारी सेवेत प्रवेशासाठी आपल्याला निष्पक्ष, पारदर्शक व समान संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा व समर्पणभावनेने राष्ट्रसेवा करण्याची आपली कटिबद्धता अधोरेखित केली. तसेच उत्कृष्ट व्यवस्था व सुरळीत आयोजनाबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कौतुक करून, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, पुणे येथे आयोजित रोजगार मेळ्याच्या सुव्यवस्थित संचालनाची प्रशंसा केली.

वाढत्या महिला अत्याचारावर उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी

अखिल भारतीय महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी शिल्पी अरोरा
पुणे –

महाराष्ट्रात मागील काही काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यांनंतरही आरोपींवर कडक कारवाई होत नसल्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी तीव्र टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी शिल्पी अरोरा यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी बैठक पुण्यातील काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, काँग्रेस पक्षाचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला सचिव अर्चना शाह भिवरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटी सरचिटणीस उज्वला साळवे,मोनिका जगताप, शिल्पा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, उपाध्यक्ष अनिता मकवाणी, ग्रामीण अध्यक्षा सायली नढे, विविध ब्लॉक, प्रभाग व वॉर्ड अध्यक्षांसह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिल्पी अरोरा म्हणाल्या की, “राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत बेफिकीर आहे. केवळ घोषणा केल्या जात आहेत, प्रत्यक्षात महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे महिला काँग्रेसने आता महिलांच्या स्वसंरक्षणासाठी विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. सरकारवर अवलंबून न राहता महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याची गरज आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपर्यंत ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण केल्या जातील. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून सक्रिय व काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. ओळख किंवा नातेसंबंधांच्या आधारे नियुक्त्या होणार नाहीत. प्रत्येक जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांनी दर महिन्याला बैठक घेणे बंधनकारक राहील.
या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेविका अश्विनी लांडगे, सायरा शेख आणि दिपाली ढोक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या माजी सातारा महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक यांनी भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, महिलांचा खरा सन्मान काँग्रेस पक्षातच होतो. भाजपमध्ये महिलांना केवळ मतांसाठी वापरले जाते. महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत असताना सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. सुरक्षित महिला वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय आहे.
पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी मनपा निवडणुकीत महिला कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन केलेल्या कामाचा उल्लेख करत, महिलांच्या सहभागातून पक्ष संघटना अधिक मजबूत केली जाईल, असे सांगितले.

किर्लोस्कर न्यूमॅटिकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अमन किर्लोस्कर यांची नियुक्ती

0

पुणे: किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड (KPCL) ने भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून 23 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने अमन किर्लोस्कर यांची 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 (दोन्ही दिवस समाविष्ट) या पाच वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणुकीला मंजुरी दिल्याचे जाहीर केले आहे. KPCL चे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक के. श्रीनिवासन हे 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होईपर्यंत कंपनीचे नेतृत्व करत राहतील.

या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना के. श्रीनिवासन म्हणाले: “समूहामध्ये जवळून काम करत आणि आमच्या सध्याच्या कार्यपद्धतींमध्ये योगदान देत असलेल्या अमन यांना आपल्या व्यवसायाची आणि संस्कृतीची सखोल समज आहे. विविध कार्यक्षेत्रांतील त्यांचा अनुभव सातत्य राखण्यासोबतच भविष्यासाठी नवे दृष्टिकोनही घेऊन येईल. त्यांचा दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानावर अधिक केंद्रित केलेले लक्ष यामुळे KPCL आपला प्रभाव वाढवत राहील, नव्या संधी स्वीकारेल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार म्हणून आपले स्थान कायम राखेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. ही जबाबदारी स्वीकारताना त्यांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

अमन किर्लोस्कर यांनी मे 2018 मध्ये किर्लोस्कर चिलर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे सप्लाय चेन मॅनेजर म्हणून किर्लोस्कर समूहामध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये ते किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. 2020 मध्ये त्यांची महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) म्हणून पदोन्नती झाली आणि त्यानंतर ते एअर कंप्रेसर आणि ट्रान्समिशन विभागांच्या उत्पादन, पुरवठा साखळी, फाउंड्री, प्रकल्प अभियांत्रिकी आणि गुणवत्तापूर्ण काम या कार्यांचे सक्रियपणे व्यवस्थापन करत आहेत. कोव्हिड 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशाला ऑक्सिजन आणि त्याच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीची अत्यंत गरज असताना, स्क्रू कंप्रेसरच्या उत्पादनाचा विस्तार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन व्यवसाय युनिटचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. या भूमिकेत त्यांनी नवी उत्पादने सुरू करणे आणि त्यांची विक्री करण्यात मदत केली तसेच विभागाच्या एकूण विक्री आणि नफ्यात लक्षणीय वाढ केली.

अमन यांनी 2017 मध्ये ब्रायंट युनिव्हर्सिटी येथून ग्लोबल सप्लाय चेन मॅनेजमेंट हा प्रमुख विषय आणि राज्यशास्त्र या उप विषयासह पदवी संपादन केली. त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांना प्रतिष्ठेच्या युनिव्हर्सिटी-वाइड जेरेमियाह क्लार्क बार्बर कमेन्समेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महापालिका निवडणूक अधिकारी काळें वर पोलिस उपायुक्तांनी गुन्हा दाखल करावा: रुपाली पाटील ठोंबरे

पुणे- EVM मशीन फ्रॉड, आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे कायदेशीर हक्क डावलणे, विशिष्ट उमेदवार निवडून आणण्यासाठी षडयंत्र राबविणे अशी कारस्थाने निवडणूक अधिकाऱ्याने केली आणि त्यास प्रतिबंध केला म्हणून आपल्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असा आरोप रुपाली पाटील यांनी केला. आहे.

रुपाली पाटील यांनी म्हटले आहे की, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय निवडणूक अधिकारी श्री निलेश काळे यांनी पोलिसांना हाताशी धरून बोगस व खोटा गुन्हा दाखल केला आहे.मी उमदेवार असल्याने मी व उमेदवार जाळीच्या आत मध्ये हवे होते,काळे यांनी स्वतः परस्पर evm मशीन बदल ल्या उलट पोलिसांनी तातडीने त्यांच्या गुन्हा दाखल करायचा होता. षडयंत्र कोणाचे तरी ऐकून evm मशीन विरोधातील आवाज दाबण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला. माझा न्यायालयावर विश्वास आहे ह्या खोट्या गुन्ह्याचा ,निवडणूक अधिकारीचा त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांचा बुरखा मी संविधान कायद्याने फाडेल.

एक तर मतदारांचेही काही हक्क आहेत , मतदारांनी EVM वर मतदान करायचे कि मतपत्रिकेवर करायचे याचे स्वातंत्र्य मतदारांना देणे गरजेचे आहे. पण सरकार सांगेल तेच साधन आणि मत प्रक्रिया मतदारांवर लादणे कितपत योग्य आहे. मतपत्रिकेवर कोणाला मत पडलेय हे स्पष्ट दिसत होते .प्रत्येक मतपत्रिका पाहायला मिळत होती . इथे मशीन थेट एकूण आकडे दाखवते , तेही दूरवरून मध्ये जाळ्या लावून . पारदर्शक कारभाराची अपेक्षा मतदारांना आणि उमेदव्रांना असतेच . मग अधिकाऱ्यांनी त्याचे कडे दुर्लक्ष करून सरार्स मनमानी का करावी , पारदर्शक कारभार का करू नये असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

उमेदवार रुपाली पाटलांंवर मतमोजणीदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

पुणे -पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 12 वाजता टिळक रस्त्यावरील डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली.

याप्रकरणी कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर (वय 52, रा. पिंपळे गुरव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रूपाली ठोंबरे यांच्यासह इतर काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी सुरू असताना ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून जोरदार घोषणाबाजी व आरडाओरड केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालत निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. सुरक्षेसाठी उभारलेल्या व्यवस्थेचा भंग करून मतमोजणी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उपासना, आचरण, समाज आणि राष्ट्र या चारही पातळीवर चा धर्म शिकवण्याची आवश्यकता -सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी

-श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे : जसा समाज धर्म आहे तसा राष्ट्रधर्म देखील आहे. समाजधर्म एकतेचा संदेश देत असेल तर राष्ट्रधर्म हा कर्तव्याचा संदेश देतो. उपासना धर्म पालन करणारे राष्ट्रधर्मापर्यंत गेले नाहीत तर ते उपचारात्मक आहे. ‘राष्ट्र हित सर्वो परी’ असे म्हणून जो जीवन आचरणात आणि तो खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म पालन करेल. आज धर्म शिकवायचा असेल तर उपासना, आचरण, समाज आणि राष्ट्र या चारही पातळीवर चा धर्म शिकवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार चेन्नईचे महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री आणि तिरुपतीचे डॉ. कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पुरस्कार सोहळा झाला. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. श्रींची प्रतिमा, सन्मानपत्र, मानवस्त्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे ४२ वे वर्ष आहे. वेदमूर्ती देवव्रत रेखे आणि महेश रेखे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

भैय्याजी जोशी म्हणाले, भारत हा धार्मिक देश आहे. भारतात जन्म घेणे हे भाग्याचे आहे. धर्माचे जाणकार असतील परंतु ते आचरणात आणून राहणारे कमी आहेत. आदर्श जीवन प्रस्तुत करणे आणि लोकांना धर्माधिष्ठित करणे हे आदर्श आहे. जे मंदिरात जातात, व्रत – उपवास करतात त्यांना लोक धार्मिक समजतात परंतु हा उपासना धर्म आहे आणि धर्माच्या वाटेवर जाणारी ही पहिली पायरी आहे परंतु तिथे थांबून चालत नाही त्याचे पुढचे पाऊल म्हणजे आचरण.  बाह्य शुद्धता ही साधनांनी होते. पण आंतरिक शुद्धता ही आतून करावी लागते.

महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री म्हणाले, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संस्थेकडून मला पुरस्कार मिळात आहे याचा मला अभिमान वाटतो. पेशव्यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवणे हीच खरी त्यांच्या सन्मानाची गोष्ट आहे. मी देखील माझ्या गुरुजींकडून मिळालेली वेदशास्त्राची विद्या पुढे चालू ठेवण्याचे कार्य करीत आहे. आज नवयुवक वेदविद्या शिकण्यासाठी येत आहेत, ही देखील अभिमानाची बाब आहे. यात नवचेतना दिसत आहे. ज्या विद्येचा समाजासाठी उपयोग नाही, ती विद्या प्रकाशमान राहू शकत नाही. परंतु विद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती करणेही आवश्यक आहे.

डॉ. कुटुंब शास्त्री म्हणाले, माझ्यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहन देणारा आहेच, पण तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. समाजासाठी नेहमी चांगले कार्य करण्याचा विचार मनात ठेवा, तर समाज देखील तुमचा सन्मान करेल. जे कार्य तुम्ही करत राहाल, ते तुम्हाला पुढे जाण्याचे बळ देत राहील. तुमच्यातील सत्वबळ ओळखण्याचा प्रयत्न करा. त्या सत्वगुणामुळे तुम्हाला तुमचे कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळते , असे ही त्यांनी सांगितले

रमेश भागवत म्हणाले, पूर्वापार चालत आलेल्या अनेक परंपरा जपण्याचे काम श्री देवदेवेश्वर संस्था करत आहे. वेदपठण करणाऱ्या गुरुजींना दक्षिणा करणे. धर्माची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे तीच परंपरा लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्याचा उद्देश आहे. नानासाहेब पेशवे हे स्मार्ट पुण्याचे जनक आहे. त्यांनी वाढत्या पुण्याचे स्वरूप पाहता पाण्याची उत्तम सोय केली जी आजही सुरू आहे. 

स्वतःच्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल-ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’ला प्रारंभ

पुणे : जीवनात अनेकदा गोष्टी आपल्याला हव्या तशा, मनाप्रमाणे होत नाहीत. कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात यश-अपयश ही न टाळता येणारी गोष्ट आहे. यशाने हरखून न जाणे आणि अपयशाने न खचणे हीच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट खेळ आपल्याला शिकवतो. त्यामुळे कुठलाही खेळ निवडा, तो सातत्य, चिकाटी आणि स्वतःतील सर्वोत्तम देऊन खेळा. अपयशासाठी कोणालाही दोष न देता जबाबदारी घेऊन स्वतःच्या चुकांवर काम केल्यास, खेळ कुठलाही असो, यश निश्चित मिळतेच, असे मत ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एव्हरेस्टवीर डॉ. सारा सफारी, अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे, प्र-कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, स्पर्धेच्या सह-समन्वयक डॉ. प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते.

विजेंदर सिंह पुढे बोलताना म्हणाले की, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे दडपण आणून सांगायचे; मात्र आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास प्रोत्साहित केले जाते. अशा परिस्थितीत एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

प्रा. डॉ. सुनीता कराड यावेळी म्हणाल्या की, भारतातील क्रीडा संस्कृतीत वेगाने प्रगती होत आहे. सध्या आयोजित ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वातावरण क्रीडामय झाले आहे. भारतासह महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजवून ऑलिंपिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा टक्का आणखी वाढला पाहिजे; यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी विद्यापीठ स्तरावरच एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून केला जात आहे. त्याच उद्देशाने एमआयटी एडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी केले, तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.


यशासाठी सातत्य आवश्यक – विनित कुमार
विनित कुमार यावेळी म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर अनेक खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य राखायला हवे. खेळातील सातत्य कायम ठेवण्यासाठी आणि खेळाडूंनी महाविद्यालयीन जीवनातच चांगले व्यासपीठ मिळवण्यासाठी व्हीएसएमसारख्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) प्रतिभावान खेळाडूंना व व्हीएसएमसारख्या स्पर्धांना कायमच प्रोत्साहन देत राहील, असेही ते म्हणाले.

खेळाचा आनंद घ्यायला शिका – तृप्ती मुरगुंडे
एकविसाव्या शतकात खेळाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. भारतातही उत्तम क्रीडा संस्कृती रुजली आहे. भारत सरकारच्या फिट इंडिया, खेलो इंडिया यांसारख्या कार्यक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक खेळाडूंनी जागतिक पातळीवर पदके जिंकून भारताचा सन्मान वाढविला आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊ नका. स्वतःला ओळखा, आत्मपरीक्षण करा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खेळाचा आनंद घ्यायला शिका, असे बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे यांनी नमूद केले.

‘पुणे ग्रँड टूर’ने जिल्ह्याचा पर्यटन नकाशा जागतिक…!!

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष

दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा जपणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करणे, हा यामागचा मूलभूत उद्देश आहे. पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे; तो संस्कृतीचा संवाद आहे, इतिहासाची ओळख आहे, निसर्गाशी नातं आहे आणि माणसांमधील संवेदनशील संबंधांचा सेतू आहे.

यावर्षी पुण्याच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत खास, अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण २३ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या अभूतपूर्व नियोजनाने यशस्वीरीत्या पार पडलेल्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेने पुणे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला केवळ नवी दिशा दिली नाही, तर त्याला थेट जागतिक व्यासपीठावर नेण्याची ठोस पायाभरणी केली आहे. ही स्पर्धा क्रीडापुरती मर्यादित न राहता पुण्याच्या इतिहास, संस्कृती, निसर्ग, शेती, ग्रामीण जीवनशैली आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा एक भव्य जागतिक ‘शोकेस’ ठरणार आहे.

आजवर पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब, सांस्कृतिक राजधानी आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. मात्र ‘पुणे ग्रँड टूर’नंतर पुण्याची ओळख एका ‘ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून ठामपणे आकार घेणार आहे. ही केवळ प्रतिमाबदलाची प्रक्रिया नसून, संपूर्ण पर्यटन अर्थव्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.

पुणे जिल्ह्याचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगाच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. स्वराज्य उभारणीची गाथा, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय दूरदृष्टीत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान, मावळ्यांचे पराक्रम, किल्ल्यांवरील संघर्ष आणि गनिमी काव्याची रणनिती…हे सारे इतिहासाचे अध्याय जागतिक पातळीवर अभ्यासले जातात. ‘ग्रँड टूर’च्या निमित्ताने हा इतिहास पुस्तकांपुरता न राहता प्रत्यक्ष भूप्रदेशावर अनुभवता येईल, अशा स्वरूपात जागतिक प्रेक्षकांसमोर पोहोचणार आहे.

पुरंदरचा वारसा हे याचे प्रभावी उदाहरण ठरणार आहे. पुरंदर म्हणजे केवळ एक किल्ला नव्हे, तर स्वराज्याच्या इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक निर्णायक घटनांचा साक्षीदार आहे. ‘पुणे ग्रँड टूर’च्या मार्गामुळे हा भाग आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये, थेट प्रक्षेपणात आणि जागतिक पर्यटकांच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होणार आहे. परिणामी, पुरंदर हे केवळ इतिहासप्रेमींचेच नव्हे, तर जागतिक पर्यटकांचेही महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनेल.

भोर–वेल्हे परिसरातील राजगड…स्वराज्याची पहिली राजधानी…इतिहासात अढळ स्थान असलेला किल्ला आहे. जिथून स्वराज्याचे स्वप्न विस्तारले, जिथून प्रशासन, राजकारण आणि लष्करी धोरणांची सूत्रे हलली, तो राजगड आता जागतिक पर्यटनाच्या केंद्रस्थानी येणार आहे. राजगडाभोवतीचा सह्याद्रीचा निसर्ग, धुक्याची दुलई, घाटवाटा, धबधबे, डोंगररांगा आणि ऐतिहासिक पायवाटा…या साऱ्यांचा अनुभव ‘ग्रँड टूर’च्या निमित्ताने जगासमोर एकसंध स्वरूपात उभा राहणार आहे.

पुणे जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांग, हिरव्या दऱ्या, घनदाट जंगलं, नद्या, धरणांचे जलाशय आणि शेतीप्रधान परिसर—या सगळ्यामुळे पुण्याला अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्य लाभले आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर, नीरा-देवघर, खडकवासला यांसारख्या धरणांचे विस्तीर्ण जलसाठे आणि त्यांच्या काठाने गेलेले सायकलिंग मार्ग पर्यटकांसाठी केवळ प्रवास न राहता एक दृश्यात्मक व भावनिक अनुभव घडवणार आहेत. निळ्या पाण्यावर उमटणारी सह्याद्रीची सावली, धरणकाठचा शांत परिसर आणि ग्रामीण जीवनशैलीचा साधेपणा पर्यटनाला नवा अर्थ देणार आहे.

याचबरोबर कृषी पर्यटन हा एक महत्त्वाचा आयाम पुढे येणार आहे. पुरंदरमधील जगप्रसिद्ध अंजीर आणि सीताफळे आता केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता पर्यटनाची ओळख बनणार आहेत. विदेशी पर्यटक थेट शेतावर जाऊन फळांची तोड, स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद, ग्रामीण जेवणाचा अनुभव आणि मातीचा गंध अनुभवू शकतील, अशी पोषक परिसंस्था उभी राहणार आहे. पर्यटन आता शहरकेंद्रित न राहता थेट शेतापर्यंत पोहोचणार आहे…हीच या बदलाची खरी ताकद आहे.

पर्यटनाचा कणा म्हणजे पायाभूत सुविधा
‘पुणे ग्रँड टूर’मुळे ही बाब केवळ चर्चेपुरती न राहता प्रत्यक्षात साकार होणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारेल, कनेक्टिव्हिटी वाढेल. ऐतिहासिक किल्ले, धरणे, घाटवाटा, कृषी पर्यटन केंद्रे आणि निसर्गस्थळे अधिक सुलभपणे पोहोचण्याजोगी बनतील. ही भौतिक पायाभूत सुविधा म्हणजेच पर्यटन विकासाचा मजबूत पाया ठरेल. याचा सर्वाधिक सामाजिक-आर्थिक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. होमस्टे संस्कृती, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला, स्थानिक खाद्यसंस्कृती, शेतीपूरक व्यवसाय, महिलांचे स्वयंसहायता गट आणि युवकांचे स्टार्टअप्स…या सगळ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. एअर बीएनबीसारख्या प्लॅटफॉर्ममुळे अनेक नागरिकांना नवा व्यवसाय उभारण्याचे पाठबळ मिळेल. पर्यटन म्हणजे केवळ बाहेरून येणारा पैसा नाही, तर स्थानिक समाजरचनेला आत्मनिर्भर करणारे विकास मॉडेल ठरेल.

आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनी हे स्पष्टपणे जाणवते की पुणे जिल्हा आता केवळ शिक्षण, उद्योग किंवा आयटीपुरता मर्यादित राहणार नाही. इतिहास, निसर्ग, शेती, संस्कृती, आधुनिकता आणि जागतिक पर्यटन यांचा संगम असलेले एक समग्र केंद्र म्हणून पुणे उभे राहणार आहे. ‘पुणे ग्रँड टूर’ ही केवळ एक स्पर्धा नव्हती; ती पुण्याच्या पर्यटन विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

या स्पर्धेने रोवलेली मुहूर्तमेढ आगामी काळात पुण्याच्या पर्यटनाला नव्या सुवर्णकाळात घेऊन जाणार आहे. पुणे जिल्हा आता केवळ भारताचा पर्यटन नकाशा बदलणार नाही, तर जागतिक पर्यटन नकाशावर स्वतःची स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण करणार आहे. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. पुणेकरांनी ही संधी मनावर घेतली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यामुळे विकेंड पर्यटनाची मर्यादा दूर होऊन वर्षभर चालणारे पर्यटन सिझन निर्माण होणार आहे. आपण या पर्यटन उत्क्रांतीचे साक्षीदार आहोत…ही भावना मनाला प्रचंड आनंद देणारी आहे. भविष्यात ही गोष्ट आपण अत्यंत अभिमानाने मिरवत राहू, हे निश्चित…!!

  • युवराज पाटील
    जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

…म्हणून तीन वर्षे तारीख पे तारीख:एकनाथ शिंदे-सरन्यायाधीश भेटीमुळे.. संजय राऊतांचा तिरकस टोला

मुंबई-एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. मात्र या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिका गेली तीन ते चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. वारंवार सुनावणी पुढे ढकलली जात आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे अलीकडेच एका विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भाजपचे मंत्रीही उपस्थित होते. या भेटीचे छायाचित्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले. याच पोस्टवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ती रिशेअर केली आणि केवळ एका ओळीत आपली नाराजी व्यक्त केली. म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख! असे कॅप्शन देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या विलंबाकडे तिरकसपणे बोट दाखवले. या आठवड्यात अपेक्षित असलेली अंतिम सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांची ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये मोठे स्थित्यंतर घडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार फुटून बाहेर पडले आणि त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. या सत्तासंघर्षानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा यांनी एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. मात्र या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिका गेली तीन ते चार वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.या प्रकरणावरून राजकीय टीका तीव्र होत असून, आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावर तिरकस टिप्पणी करत वातावरण आणखी तापवले आहे.

संजय राऊतांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयातील या विलंबावर नाराजी व्यक्त केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना या प्रलंबित प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जानेवारीमध्ये सुनावणी अपेक्षित आहे, मात्र ती कदाचित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ते थेट डिसेंबर 2026, 2027 किंवा 2029 मध्येही होऊ शकते. त्यांच्या या वक्तव्यातून न्यायप्रक्रियेतील विलंबाबाबतचा असंतोष स्पष्टपणे दिसून आला होता. शिवसेना पक्षनाव आणि चिन्हाचा प्रश्न इतकी वर्षे लटकून राहणे हा लोकशाहीसाठी गंभीर मुद्दा असल्याची भावना ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे शिवसेनेच्या पक्षनाव व चिन्हासंदर्भातील सुनावणी बुधवारी 21 जानेवारी रोजी होणार होती. मात्र न्यायालयातील अन्य कामकाज आणि इतर याचिकांवरील सुनावण्यांमुळे सत्तासंघर्ष आणि निवडणुकांमधील आरक्षणासंबंधीच्या याचिकांची सुनावणी त्या दिवशी होऊ शकली नाही. नव्याने तारखा दिल्या जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र वारंवार तारीख पुढे ढकलली जात असल्याने ठाकरे गटाचा संयम सुटत असून, राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणावरचा राजकीय ताण आणखी वाढताना दिसत आहे.

पुण्याचे महापौर,उपमहापौर 6 फेब्रुवारीला निवडणार

पुणे:पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकी नंतर पहिली सभा म्हणजेच महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याबाबत तारिख, वेळ आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांच्या निश्चिती करिता विभागीय आयुक्त यांचेकडे पत्र पाठविण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चेनुसार. महापौर, उपमहापौर यांची निवडणूक घेणे याकरिता शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ ही तारिख निश्चित करण्यात आलेली असून, ही पहिली विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी, सकाळी ११.०० (अकरा) वाजता घेण्यात येईल. याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल.असे महापलिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

बदलापूर :‘ही केवळ घटना नाही, तर व्यवस्थेचे अपयश’ – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा घटनास्थळी आढावा, बालसुरक्षेसाठी कडक उपाययोजनांचे निर्देश

बदलापूर, दि. २३ जानेवारी २०२६ : बदलापूर (पश्चिम) येथील शाळेच्या बसमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन सविस्तर आढावा घेतला. आरोपीस जामिन मिळता कामा नये व परिवाराच्या पाठीशी ना.एकनाथ शिंदे व शिवसेना ठाम आहेत असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाणे शहर पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांच्याशी सखोल चर्चा करून प्रकरणातील गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या व पुढील कार्यवाही संदर्भात ठोस सूचना केल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी पोलिसांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे अधोरेखित करत सांगितले की, ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या बालसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. शाळा प्रशासन, बस व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी महिला दक्षता समिती संदर्भातही गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. संबंधित भागात महिला दक्षता समिती सक्रिय नसल्याचे निदर्शनास आल्याने, त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

महिला दक्षता समित्या या सर्वपक्षीय स्वरूपाच्या असून त्यात शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असतो. समाजाचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी या समित्यांच्या नियमित बैठका घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उप आयुक्त सचिन गोरे यांनी यावेळी पोलीस विभागाकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच शाळा बस सुरक्षेबाबत विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

माध्यमांशी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, लहान मुलांना ‘गुड टच – बॅड टच’चे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांनी बस चालक, सहाय्यक, परिचारिका यांची नेमणूक करताना पार्श्वभूमी तपासणी, व्यसनमुक्ती तपासणी व चारित्र्य पडताळणी नियमित करावी . विशेषतः लहान मुलांसाठीच्या बसमध्ये महिला सहाय्यक (आया) अनिवार्य असाव्यात, याबाबत शासनाने आधीच परिपत्रके काढली आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग,महिला व बालविकास विभाग यांनी समन्वयाने पूर्वप्राथमिक शाळा,अंगणवाडी यांना कायद्याच्या कक्षेत आणल्याशिवाय लहान बालिकांवरील अत्याचाराला पायबंद बसणार नाही .यासाठी लवकरच बैठक घेऊन कायदा प्रस्तावित करण्याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू व कायदा आणण्याबाबत पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले.