Home Blog Page 128

केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा:महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांसह चौघांना पद्मश्री जाहीर, पहा पूर्ण यादी

मुंबई- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावर्षी ४५ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या मानाच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्याच्या मातीतील कला जिवंत ठेवणारे लोकनाट्य तमाशा महर्षी रघुवीर खेडकर, वैद्यकीय क्षेत्रातील सेवाव्रती डॉ. अर्मिडा फर्नांडिस, कापूस संशोधनात क्रांती घडवणारे परभणीचे शेतकरी श्रीरंग लाड आणि तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये समाविष्ट असलेला पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा 3 श्रेणींमध्ये दिला जातो कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी महाराष्ट्रातील तिघांना आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

लोककलेचा सन्मान: रघुवीर खेडकर (कला)

नगर जिल्ह्यातील तमाशा परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर’ या तमाशा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी लोककलेची सेवा केली. तमाशासारख्या ग्रामीण कलेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लोककला विश्वात आनंदाचे वातावरण आहे.

वैद्यकीय क्षेत्रात क्रांती: डॉ. अर्मिडा फर्नांडिस (औषधोपचार)

मुंबईतील सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि ‘स्नेहा’ (SNEHA) संस्थेच्या संस्थापिका डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. आशियातील पहिली ‘ह्युमन मिल्क बँक’ (मानवी दुग्धपेढी) स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. नवजात बालकांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील माता-बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले कार्य जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे.

कृषी ऋषी: श्रीरंग लाड (कृषी)

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शेतकरी श्रीरंग लाड यांना कापूस संशोधनातील त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोणत्याही मोठ्या पदव्या नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर त्यांनी कापसाच्या अशा वाणांचा शोध लावला, ज्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या या कार्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी उभारी मिळाली असून, एका सामान्य शेतकऱ्याचा हा गौरव कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

पालघरचे ‘तारपा सम्राट’ भिकल्या लाडक्या धिंडा

आदिवासी वारली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पालघरच्या वाळवंडे गावच्या या ९० वर्षीय कलाकाराने गेल्या १५० वर्षांची कौटुंबिक वादन परंपरा जिवंत ठेवली आहे.

पद्म पुरस्काराने सन्मानित नावे

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश)
चरण हेम्ब्रम (ओडिशा)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
रघुपत सिंह (उत्तर प्रदेश)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर)
कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु)
राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडु)
थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड)
अंके गौड़ा (कर्नाटक)
गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान)
खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मंडलेवाला (गुजरात)
आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़)
राम रेड्डी ममिडी (तेलंगाना)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक)
तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश)
युनम जत्रा सिंह (मणिपुर)
बुधरी ताथी (छत्तीसगढ़)
डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना)
डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु)
हैली वॉर (मेघालय)
इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़)
के. पाजनिवेल (पुडुचेरी)
कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (असम)
पोकीला लेकटेपी (असम)
आर. कृष्णन (तमिलनाडु)
एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक)
टागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधु (बिहार)
धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात)
शफी शौक़ (जम्मू-कश्मीर)
देशातील नागरी पुरस्कारांविषयी थोडक्यात माहिती

देशात नागरी पुरस्कार 1954 मध्ये सुरू झाले. या 4 प्रकारच्या पुरस्कारांमध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. आम्ही देशातील चार नागरी सन्मानांबद्दल सांगत आहोत. या पुरस्कारांची घोषणा 26 जानेवारी रोजी केली जाते. पुरस्कार प्रदान समारंभ मार्च-एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात होतो. या पुरस्कारांमध्ये पदक आणि सन्मान प्रमाणपत्र असते.

भारतरत्न पुरस्कार : हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, हा पुरस्कार राष्ट्रीय सेवा, क्रीडा, विज्ञान, साहित्य, कला यासारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जातो. भहा पुरस्कार एका वर्षात फक्त 3 लोकांना देता येतो. आत्तापर्यंत एकूण 48 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 1954 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणार सर्वात तरुण व्यक्ती आहे.

पद्मविभूषण पुरस्कार : हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवांचाही समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार हा भारताकडून दिला जाणारा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो देशासाठी बहुमुल्य योगदानासाठी दिला जातो.

पद्मश्री पुरस्कार : कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, वैद्यकिय, समाजसेवा इत्यादींमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल दिला जातो. एका वर्षात 120 पेक्षा जास्त पुरस्कार दिले जाऊ शकत नाहीत.

भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीने इंडोनेशियामध्ये दृढ केले सागरी संबंध

नवी दिल्ली- हिंदी महासागर नौदल परिसंवाद इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम-आय.ओ.एन.एस) या संघटनेमधील सदस्य देश असलेल्या इंडोनेशियासोबत सागरी सहभाग वाढवण्यासाठी आणि भारतीय नौदलाच्या ‘महासागर’ (MAHASAGAR) संकल्पनेला पुढे नेण्यासाठी, भारतीय नौदलाची ‘पहिली प्रशिक्षण तुकडी’ (1टीएस) 23 जानेवारी 2026 रोजी बेलावान (Belawan) बंदरातून मार्गस्थ झाली.  आपल्या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान, आयएनएस तीर, शार्दुल , सुजाता  आणि आयसीजीएस सारथी हे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज, यां मधील कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवारांनी इंडोनेशियन नौदलासोबत विविध स्तरांवर संवाद साधला. या भेटीत व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, प्रशिक्षण भेटी आणि मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या द्वारे, दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले.

1 टी एस या प्रशिक्षण तुकडीचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन तिजो के. जोसेफ आणि जहाजांच्या कमांडिंग ऑफिसर्सनी ‘नेव्हल एरिया कमांड I’ चे कमांडर रिअर ॲडमिरल लक्ष्मण मुदा डेनी सप्तियाना यांची भेट घेतली. यावेळी भारतीय आणि इंडोनेशियन नौदलातील सामायिक सागरी हितसंबंधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रशिक्षण तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आणि मेदानमधील  भारताचे महावाणिज्य दूत यांच्या संयुक्त विद्यमाने जहाजावर एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंडोनेशियन नौदलाच्या ‘कोडेराल I’ मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर कोलोरनेल विरावन अबी पी. हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे दोन्ही नौदलांमधील व्यावसायिक संबंध आणि सदिच्छा वृद्धिंगत करण्यास मदत झाली. व्यावसायिक उपक्रमां अंतर्गत भारतीय शिकाऊ उमेदवारांना इंडोनेशियन नौदलाच्या प्रादेशिक कमांडमधील विविध सुविधांची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील कमांडच्या भूमिका आणि कार्यांची जवळून ओळख झाली. याशिवाय, इंडोनेशियन नौदलाच्या जवानांसोबत मैत्रीपूर्ण खेळ आणि संयुक्त योगासने आयोजित करण्यात आली होती, ज्यातून उभय पक्षांमधील सौहार्द आणि सदिच्छा वाढली. ही जहाजे शालेय मुलांसाठी खुली करण्यात आली होती, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जहाजांच्या सफरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि कुतूहल दिसून आले. यामुळे ही भेट त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.

या प्रशिक्षण तुकडीची इंडोनेशियातील ही तैनात दोन्ही राष्ट्रांमधील जुने सागरी संबंध दर्शवते. तसेच, सागरी उपस्थिती आणि सहकार्य वाढवून भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ अर्थात पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य या धोरणाला, आग्नेय आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रात अधिक बळकटी देते. भारतीय नौदलाची ही भेट, मैत्री दृढ करण्यासाठी, प्रशिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणि एक स्थिर, सुरक्षित आणि सहयोगी सागरी वातावरण राखण्यासाठी असलेल्या वचनबद्धतेवर भर देते.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ/ आरपीएसएफ) जवानांना राष्ट्रपतींचे ‘विशिष्ट सेवा’ आणि ‘गुणवत्तापूर्ण सेवा’ पदक जाहीर

0


दक्षिण मध्य रेल्वेच्या महानिरीक्षक श्रीमती अरोमा सिंग ठाकूर यांची ‘विशिष्ट सेवेसाठीच्या राष्ट्रपती पदकासाठी निवड

नवीदिल्ली –

2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या (आरपीएसएफ) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पित सेवेबद्दल, व्यावसायिक कौशल्याबद्दल आणि रेल्वे सुरक्षेतील आदर्शवत योगदानाबद्दल ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक’ (पीएसएम) आणि ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (एमएसएम) प्रदान केले आहे.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम)

श्रीमती अरोमा सिंग ठाकूर, महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल-आय जी) दक्षिण मध्य रेल्वे

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)

 1  श्री उत्तम कुमार बंद्योपाध्याय, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, दक्षिण मध्य रेल्वे

 2. श्री कल्याण देओरी, सहाय्यक कमांडंट, रेल्वे सुरक्षा विशेष दल

 3. श्री बलवान सिंग, निरीक्षक, उत्तर रेल्वे

 4. श्री प्रफुल्ल चंद्र पांडा, निरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे

 5. श्री प्रकाश चरण दास, निरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे

 6. श्री मुकेश कुमार सोम, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा विशेष दल

 7. श्री पप्पाला श्रीनिवास राव, उपनिरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे

 8. श्री अन्वर हुसेन, उपनिरीक्षक, पश्चिम रेल्वे

 9. श्री श्रीनिवास रावुला, उपनिरीक्षक, दक्षिण मध्य रेल्वे

10. श्री शिव लहरी मीना, उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा विशेष दल

11. श्री दिक्काला वेंकट मुरली कृष्णा, सहाय्यक उपनिरीक्षक, पूर्व तटीय रेल्वे

12. श्री संजीव कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक, उत्तर रेल्वे

13. श्री महेश्वरा रेड्डी कर्नाटी, हेड कॉन्स्टेबल, दक्षिण मध्य रेल्वे

14. श्री सी. इलैया भारती, हेड कॉन्स्टेबल, दक्षिण रेल्वे

15. श्री मोहम्मद रफीक, कॉन्स्टेबल/धोबी, रेल्वे सुरक्षा विशेष दल

पीएसएम हे पदक विशेषतः उल्लेखनीय आणि गौरवशाली सेवेच्या नोंदीसाठी दिले जाते, तर एमएसएम हे पदक  कौशल्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडलेल्या मौल्यवान सेवेबद्दल दिले जाते.

हे पुरस्कार वर्षातून दोनदा, म्हणजेच प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी प्रदान केले जातात. भारतीय रेल्वेच्या संरक्षणाची सर्वोच्च मानके राखण्यासाठी आरपीएफ/ आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे आणि त्यांना प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.

हिरवा साप आपला इतिहास विसरलाय:महाराष्ट्राला ‘हिरवे’ करण्याचे स्वप्न पाहणाऱ्याला इथेच गाडले गेले, नीतेश राणेंचा जलील यांना इशारा

मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर AIMIM च्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या ‘मुंब्रा हरा कर देंगे’ विधानाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला. “येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,” असे विधान जलील यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे. जलील यांच्या या चॅलेंजला भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी अत्यंत तिखट आणि जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्र हिरवा करू’ म्हणणाऱ्या हिरव्या सापाला जमिनीत गाडू, असा इशारा नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना दिला.

मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी निवडणुकीनंतर एक वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा बचाव करताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी, “सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून पक्षाचे अधिकृत मत आहे,” असे सांगत संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता. जलील यांच्या याच ‘हिरव्या’ विधानाचा नीतेश राणे यांनी समाचार घेतला आहे.

मीडियाशी संवाद साधताना नीतेश राणे यांनी इम्तियाज जलील यांचा उल्लेख ‘हिरवा साप’ असा करत जोरदार प्रहार केला. “हा हिरवा साप कदाचित आपला इतिहास विसरला असावा. औरंगजेब आणि टिपू सुलताननेही महाराष्ट्राला ‘हिरवे’ करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांना याच भूमीत गाडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी भगवा फडकवत इतिहास घडवला आहे,” अशा शब्दांत राणेंनी जलील यांची कानउघाडणी केली.

नीतेश राणे यांनी यावेळी हिंदू राष्ट्राचा पुनरुच्चार करत आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, “हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे कायम भगवेच राहणार, हे जितक्या लवकर हे लोक समजून घेतील तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. जो कोणी या हिंदू राष्ट्राला हरवण्याचे स्वप्न पाहील, त्याला महाराष्ट्रातील हिंदू औरंगजेबाच्या कबरमध्ये पुरल्याशिवाय राहणार नाहीत.” राणेंच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम आता यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाचे ‘मिशन 100’: 100 टक्के मतदानासाठी विशेष अभियान

हवेली: हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाने 6 जिलापरिषद गट आणि 12 पंचायत समिती गण या आगामी निवडणुकीसाठी 100 टक्के मतदानाचे लक्ष्य साधण्यासाठी ‘मिशन 100’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. यामध्ये नागरिकांच्या मतदानातील सहभाग वाढावा व सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
खडकवासला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार तृप्ती कोलते, अर्चना निकम,नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाचे प्रमुख हेमंतकुमार खाडे आणि त्यांच्या टीमद्वारे मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
‘मिशन 100’ च्या माध्यमातून विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले जात आहे. सोबतच ‘मिशन डेमोक्रसी ’ हा उपक्रम देखील सुरू आहे, ज्याद्वारे गावांमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आणि जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
हे विशेष अभियान 100 टक्के मतदानाची उद्दिष्टपूर्ती साधण्यासाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाने व्यक्त केली आहे.

कमळाचा हिरवा देठ म्हणजे एमआयएम का?

मुंबई-देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे कोण कोणासोबत कधी युती करेल किंवा कोणता नेता कधी पक्ष बदलेल, याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. अशाच अनपेक्षित राजकीय समीकरणांचा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पाहायला मिळतो आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपविरोधात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याने राज्यभरात चर्चेला उधाण आलं आहे. कट्टर विरोधक असलेल्या दोन शिवसेनेला एकत्र आणण्याची कसरत बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामुळे अनेक नेते आणि राजकीय निरीक्षक चकित झाले असून, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सुषमा अंधारे यांनी ठामपणे सांगितले की, बार्शीतील हा निर्णय पक्षाचा अधिकृत निर्णय नाही. तो तिथल्या आमदारांनी त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे. शिवसेना युबीटीची अधिकृत भूमिका वेगळी असून, या युतीला पक्षाची मान्यता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः आमदारांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही भाजपला हरवण्यासाठी जे कोणी लढत आहेत, त्यांच्या सोबत आहोत. मात्र बार्शीतील युती ही आमची युती नाही, असे ठाम शब्दांत त्यांनी सांगितले. बार्शीत पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना आपली गरज भासली, तर पक्षप्रमुखांशी चर्चा करून भूमिका ठरवू, असंही अंधारे म्हणाल्या.

भाजपवर टीका करताना सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दांचा वापर केला. भाजप हा काही धुतल्या तांदळाचा पक्ष नाही, असं म्हणत त्यांनी भाजपकडे पैशाची आणि सत्तेची ताकद अधिक असल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर असेल, पण आमच्याकडे मेंटल पॉवर जास्त आहे, असं त्या म्हणाल्या. स्वतःबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, त्या एक साधी चळवळीतील कार्यकर्ती असून, महिला असल्याचं विक्टिम कार्ड कधीच खेळत नाहीत. सहकाऱ्यांनाही त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मला बाई म्हणून हलक्यात घेऊ नका, घेतलंत तर अडचण होईल. मी आई-बहिणीसारखी वागते, पण संघटनेच्या कामात मी कठोर आणि ठाम आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

शिवसेनेत प्रथमच एका महिलेला जिल्हा संपर्कप्रमुखपद देण्यात आलं, याचा उल्लेख करत अंधारे यांनी पक्षाच्या निर्णयाचं समर्थन केलं. संघटना मजबूत करण्यासाठी जबाबदाऱ्या स्पष्टपणे दिल्या जात असल्याचं त्या म्हणाल्या. जे लोक शिवसेना सोडून भाजपमध्ये गेले, त्यांच्यावर कारवाई होणार का, या प्रश्नावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. दिल्या घरी सुखी राहा, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे हे बागेश्वर बाबा नाहीत, असं सांगितलं. ते एकाच वेळी सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमले असून, ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जर कोणी ती जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर आजपासूनच कारवाईची सुरुवात होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपवर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजप हा नेते चोरणारा पक्ष आहे, तर शिवसेना नेते घडवणारा पक्ष आहे. शिवसेना हा 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणारा पक्ष असून, संघर्ष करत पुढे जाणारी संघटना आहे, असं त्या म्हणाल्या. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचा गड होता. मात्र काँग्रेसला मागे टाकत भाजप इथे पुढे आला, आणि यामागे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केला.

जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरही सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला. त्यात काय विशेष आहे? तो भाजपचा संस्कार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. कुलदीप सिंगरची मिरवणूक काढणारी आणि बदलापूर प्रकरणात तुषार आपटेला स्वीकारणारी भाजप असल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गोरे यांनी प्रणिती शिंदेंना भगिनी मानून काहीच बोलणार नाही, असं म्हटलं असतं, तर तीच खरी बातमी ठरली असती, असा टोमणाही त्यांनी लगावला.

इम्तियाज जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करण्याच्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी उपरोधिक सवाल उपस्थित केला. इम्तियाज जलील यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगून त्यांनी स्क्रिप्टेड गेममध्ये आपल्याला रस नसल्याचं स्पष्ट केलं. भाजपच्या झेंड्यात भगवा आणि हिरवा रंग आहे, कमळाच्या देठाचाही रंग हिरवाच आहे, मग हा हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजप आणि एमआयएम यांच्यातील राजकीय रंगसंगतीवर अप्रत्यक्ष टीका केली. एकूणच, बार्शीतील युतीवरून सुरू झालेल्या चर्चेला सुषमा अंधारेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे नवं वळण मिळालं आहे.

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा

  • मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी

मुंबई, दि. 25 : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या वतीने आयोजित “व्याख्यानमाला” या कार्यक्रमात त्यांनी मराठीच्या अभिजात दर्जाचे महत्त्व, भाषेचा ऐतिहासिक प्रवास आणि पुढील टप्प्यातील विकास आराखडा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव श्रीमती नंदा राऊत, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर, सल्लागार समितीचे सदस्य डॉ.शिरीष ठाकूर तसेच मराठी भाषा अभ्यासक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीला अभिजात दर्जा मिळणे हे केवळ “शिक्कामोर्तब” नसून केंद्र शासनाच्या विशेष योजनेतून भाषाविकासासाठी संधी निर्माण करणारे असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यांनी महाराष्ट्रीन प्राकृत, अपभ्रंश आणि पुढील अर्वाचीन मराठी असा भाषेचा प्रवास मांडत वररूचीच्या ‘प्राकृतप्रकाश’ ग्रंथाचा संदर्भ देऊन मराठीच्या प्राचीनत्वाचे पुरावे अधोरेखित केले. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, संतसाहित्य आणि 19 व्या शतकातील आधुनिक मराठीच्या वाटचालीचा आढावा घेत त्यांनी मराठीतील प्रतिभा, माधुर्य आणि मौलिकता यावर प्रकाश टाकला. मात्र ज्ञानेश्वरपूर्व दीड हजार वर्षांच्या भाषिक-लिखित परंपरेवर अपेक्षित संशोधन कमी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

अभिजात भाषा योजनेअंतर्गत राज्याला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याची संधी मिळणार असून त्याची अधिसूचना फेब्रुवारी-मार्चपर्यंत अपेक्षित असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. यासाठी विभागाकडून डीपीआर (DPR) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध प्रस्ताव त्यात समाविष्ट केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अमरावती येथे झालेल्या 11 अभिजात भाषांच्या परिषदेचा उल्लेख करत ‘भाषिणी’ ॲपच्या माध्यमातून मराठीत केलेले भाषण तात्काळ इतर भाषांमध्ये दिसण्याचा प्रयोग राबवून महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाषासंवादाचा नवा मार्ग दाखवल्याचे त्यांनी सांगितले.

भाषांमधील “ज्ञानभाषा” आणि “लोकभाषा” या संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी प्राकृत ही सामान्यजनांची भाषा, संस्कृत ही ज्ञानभाषा आणि आजच्या काळात इंग्रजी ही प्रबंधांच्या प्रमाणामुळे ज्ञानभाषा ठरते, तर मराठी ही लोकजीवनातील संवादाची भाषा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमाणभाषा ही विविध बोलीभाषांतील शब्द, व्याकरण आणि वापरातील पद्धती एकत्र येऊन तयार होते, त्यामुळे प्रमाणभाषा ही बोलीभाषांचे “अपत्य” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अभिजात’ या संकल्पनेबाबत त्यांनी विविध पाश्चात्त्य विचारप्रवाह, विश्वकोषातील नोंदी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सांगितलेले “आदर्शानुकरण” व “संकेतपालन” हे निकष समजावून सांगितले.

मराठीच्या संवर्धन, संशोधन, अनुवाद आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विभागाने एका वर्षात मोठे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले. मनुष्यबळ, जागा आणि प्रशिक्षण या तीन मुद्द्यांवर भर देत विविध भाषांचे वाचक, कॉन्झर्व्हेटर्स तयार करण्यासाठी प्रशिक्षणक्रम राबवले जातील, असे त्यांनी नमूद केले. निधी उभारणीसाठी सीएसआरच्या माध्यमातून मराठी उद्योजकांकडून मदत घेण्याचा पर्यायही त्यांनी सूचित केला. मराठी प्रभुत्वाशी संबंधित अनेक उद्योग-संधी उपलब्ध असून काही उद्योजकांचा टर्नओव्हर 500 कोटींच्या पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले.

संशोधनाच्या क्षेत्रात मराठीच्या 1,500 वर्षांच्या दुर्लक्षित कालखंडावर अधिक अभ्यासाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुढील टप्प्यात प्रकाशन व अनुवादासाठी ‘अनुवाद अकॅडमी’ ही स्वायत्त संस्था स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानामुळे मशीन ट्रान्सलेशन सक्षम होत असून मराठीतील स्पेल चेक, शब्दपर्याय, प्रेडिक्टिव्ह टायपिंग यांसारख्या सुविधा विकसित करण्यासाठी लोकांनी मोबाईलवर अधिकाधिक मराठी टाइप करावे, असे आवाहनही त्यांनी केले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी अभिजात दर्जानंतरच्या नियोजनासाठी उपस्थितांच्या सूचना मागवत मराठीच्या भविष्यकालीन विकासासाठी सामूहिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले=
000

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन

नांदेड, : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले.

त्यांच्यासह आंध्रप्रदेश उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंघ आदींनीही दर्शन घेतले.

गुरुद्वारा बोर्डाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी यांची प्रमुख उपस्थिती होती.

तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

नांदेड : तखत सचखंड श्री हजूर अबलचल नगर साहिबजी गुरुद्वाराचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे यांनीही दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव २०२६’ विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते साजरा

मिथिला महोत्सव मैथिली आणि मराठी भाषेच्या आदान-प्रदानासाठी महत्वपूर्ण

पुणे.दि. २५: मिथिला समाज संस्था, पुणे यांच्या वतीने लोहगाव येथील त्रिमूर्ती लॉन्समध्ये ‘आंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सव २०२६’ हा भव्य कार्यक्रम दि. २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर माँ सरस्वती आणि माँ जानकीच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाषणाची सुरुवात मैथिली भाषेत केली. त्या म्हणाल्या, “सभामे उपस्थित महोदय, अतिथि आ सब गोटे मैथिली भाषी बंधु-भगिनी सभ केँ हमर सादर प्रणाम, अंतरराष्ट्रीय मिथिला महोत्सवमे सहभागी होइत बहुत आनन्द होइत अछि.” या मैथिली भाषेतील सुरुवातीने उपस्थित मिथिला समाजबांधवांनी डॉ. गोऱ्हे यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

डॉ. गोऱ्हे यांनी मिथिला संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, मिथिला ही केवळ भूभाग नाही, तर ज्ञानाची जननी, संस्कृतीची खाण आणि मैथिली भाषेची अमर भूमी आहे. विदेह राजा जनकांची राजधानी असलेल्या या भूमीत सीतामाईंचा जन्म झाला आणि विद्या-कला-साहित्याची परंपरा हजारो वर्षांपासून फुलत आली आहे.

बिहार आणि महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक व्यापार, राजकीय आणि सांस्कृतिक संवादाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दोन्ही प्रदेशांमध्ये संस्कृतीचे संगम दिसून येतात. मिथिला ज्ञान, कला आणि संस्कृतीची भूमी आहे, तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. या महोत्सवामुळे या दोन भिन्न संस्कृतींचे मिलन साधले जात आहे.

मराठी संत साहित्य आणि मैथिलीतील विद्यापती यांच्या काव्यात साम्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. मधुबनी पेंटिंग, मैथिली भाषा आणि ‘अतिथी देवो भव’ ही पाहुणचाराची परंपरा यामुळे मिथिलाची ओळख जगभरात आहे. पुणे शहरही कला, संगीत आणि नाटकांसाठी प्रसिद्ध आहे.

सांस्कृतिक देवाणघेवाण राष्ट्राला जोडते आणि या महोत्सवामुळे मिथिला संस्कृतीचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचेल, अशी आशा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. हा महोत्सव मिथिला समाजाच्या पुण्यातील सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, मैथिली आणि मराठी भाषेच्या आदान-प्रदानासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे आनंद गोयल, गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, हेमंत बत्ते, गायत्री भागवत, रिंकू मोरे, हेमलता बनसोडे, बिहार विधिमंडळाचे सदस्य घनश्याम ठाकूर, मुरारी मोहन झा, मिथिला समाज संस्थेचे पवन चौधरी, संगीता चौधरी, जटाशंकर चौधरी, ऋषि झा, सुनीता कर्ण आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवात मिथिला संस्कृतीचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला मिथिला समाजातील मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.

आधुनिक जीवनशैलीत उपयुक्त आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळतेय-बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान

भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण

पुणे: आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नव्हे, तर भारतीय जीवनदृष्टी आहे. आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्व अधिकच वाढले आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी संशोधन, प्रमाणबद्धता आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर भर देणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी केले.

भारतीय आयुर्वेद संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद संभाषा परिषद व राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या डॉ. शिरामाने सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य शिक्षण विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी आयुर्वेद क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वैद्य रणजीत पुराणिक, वैद्य जीवन बच्छाव (आयआरएस), वैद्य संतोष नेवपूरकर, वैद्य प्रशांत बागेवाडीकर, वैद्य वंदना सिरोहा, वैद्य अनिल बनसोडे, वैद्य प्रियदर्शिनी कडूस, वैद्य किरण पंडित यांना ‘आयुर्वेद गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी आयुर्वेद शिक्षण व्यवस्थेसाठी दृष्टीकोन व व्याप्ती, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसबाबत वैद्य किरण पंडित यांनी माहिती दिली. विश्वानंद आयुर्वेद चिकित्सालय व गुरुकुलचे संचालक वैद्य अनिल बनसोडे यांनी ‘आयुर्वेद प्रॅक्टिस कशी उभारावी व वाढवावी?’ याबाबत प्रात्यक्षिकांसह विश्लेषण केले. श्री आयुर्वेद अँड हॉस्पिटलचे संचालक वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील यांनी ‘आयुर्वेद ओपीडी, हॉस्पिटल नोंदणी, ओपीडी व आयपीडी पंचकर्मासाठी कॅशलेस मेडिक्लेम एम्पॅनेलमेंट’ याविषयी मार्गदर्शन केले.

श्री धूतपापेश्वरचे सीईओ वैद्य रणजीत पुराणिक, आयुर्वेद व्यासपीठाचे माजी अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, बागेवाडीकर आयुर्वेद रसशाळेचे संचालक वैद्य प्रशांत बागेवाडीकर, आयुष मंत्र्यांचे खासगी सचिव वैद्य जीवन बच्छाव यांनी आयुर्वेद क्षेत्राचा आजवरचा प्रवास, आधुनिक वैद्यक शास्त्रात आयुर्वेदाची भूमिका, वैद्यांसमोरील आव्हाने व अडचणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या जागतिक पातळीवरील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. वैद्य हरीश पाटणकर व वैद्य प्रेरणा बेरी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

भारतीय आयुर्वेद संस्थेचे कार्याध्यक्ष वैद्य प्रशांत दौंडकर-पाटील, सचिव संकेत खरपुडे, वैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य राहुल शेलार, वैद्य प्रिया दौंडकर-पाटील, वैद्य सोनल सोमानी यांनी यशस्वी संयोजन केले. श्री आयुर्वेद अँड पंचकर्म हॉस्पिटल व वर्मा फाउंडेशनचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

“शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी आयुर्वेदाची संकल्पना आजच्या तणावपूर्ण काळात अत्यंत उपयुक्त ठरत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत आयुर्वेदाची भूमिका भविष्यात निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधत आयुर्वेदातील मूलतत्त्वे जपण्याची गरज असून, तरुण वैद्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत संशोधनाकडे वळावे.”

– आरिफ मोहंमद खान, बिहारचे राज्यपाल

ज्ञानमंदिर कळंबोली शाळेने पटकवले’मएसो क्रीडा करंडक २०२६’चे विजेतेपद

-बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम कोथरूड येथे आयोजित स्पर्धेची सांगता

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण

पुणे: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकवले. यासह ही फिरता करंडकाचीही मानकरी ठरली. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. प्रसंगी ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डाॅ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.

तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.”

प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महाविद्यालय येथे आयोजिला जाणार असल्याचे विजय भालेराव यांनी घोषित केले.

बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. डाॅ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या शाळा ठरल्या विजेत्या

यामध्ये मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी स्पर्धा झाल्या. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, दामोदर शंकर रेणावीकर विद्यामंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, पब्लिक स्कुल कळंबोली, बालविकास मंदिर सासवड, लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, ह. ग. देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, विद्यामंदिर बेलापूर, डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये विद्यामंदिर बेलापूर, ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये बालविकास मंदिर सासवड, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, ज्ञानमंदिर कळंबोली, इंग्लिश मिडीयम स्कुल शिरवळ, तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली, निर्मला देशपांडे विद्यालय बारामती, बालविकास मंदिर सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.

डोंगरगाव येथे SVEEP कार्यक्रमातून मतदार जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0


हवेली :जिल्हा परिषद व पंचायत समिती हवेली सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरगाव येथे SVEEP कार्यक्रम कक्षांतर्गत कक्ष अधिकारी हेमंतकुमार खाडे यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास डोंगरगावच्या विद्यमान सरपंच सौ. रजनीताई कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगावच्या शाळा व्यवस्थापन समितीतील महिला सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच शालेय पोषण आहारच्या स्वयंपाकी जायभाई वाघमारे व मदतनीस पारूबाई कांबळे यांची उपस्थिती होती. याशिवाय मुख्याध्यापिका अलका साकोरे, स्वीप कक्षातील सदस्य व शिक्षिका तृप्ती तोडकर यांचाही सक्रिय सहभाग लाभला.
SVEEP कार्यक्रम कक्षांतर्गत सकाळी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. “लोकशाही बळकट करूया, मतदानाचा हक्क बजावूया” व “मतदान हेच लोकशाहीचे बळ” अशा घोषणांद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीनंतर उपस्थित मतदार, शिक्षक व ग्रामस्थांनी मतदार शपथ घेत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने तसेच मा. तहसीलदार मा. अर्चना निकम व मा. तृप्ती कोलते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. SVEEP कार्यक्रमामुळे डोंगरगावमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदार सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रगीतांच्या सन्मानात उदासीनता नको : लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस

‘वंदे मातरम्‌’चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांचा स्वानंद फाऊंडेशन, संवाद पुणेतर्फे विशेष सन्मान

पुणे : ‘वंदे मातरम्‌’चा नारा देत अनेक क्रांतिकारक, जवानांनी आपले आयुष्य पणाला लावत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशप्रेम जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्‌’ आणि ‘जन गण मन’ या गीतांना योग्य तो सन्मान देताना उदासीनता न दाखविता मनात राष्ट्रभावना जागृत ठेवावी. आपण या देशाचे नागरिकच नव्हे तर एक सैनिक आहोत ही भावना मनात ठेवून प्रत्येक कृतीतून ती दिसावी अशी अपेक्षा लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांनी व्यक्त केली.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि ‘वन्दे मातरम्‌’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वानंद फाऊंडेशन आणि संवाद, पुणे यांच्या वतीने ‘वन्दे मातरम्‌’चे अभ्यास मिलिंद प्रभाकर सबनीस यांचा आज (दि. २४) लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी हसबनीस बोलत होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वानंद फाऊंडेशनचे संजीव शहा, साधना शहा, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर मंचावर होते. शाल, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी ‘वन्दे मातरम्‌’ या मराठी पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. ही पुस्तिका महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वितरित केली जाणार आहे.

एस. एस. हसबनीस पुढे म्हणाले, ‘वन्दे मातरम्‌’ या गीतातील भावना, प्रेरणा सैनिकांच्या मनात रुजल्याने आजही आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यामुळेच देशातील सामान्य नागरिकही निर्भयपणे वावरत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने ‘वन्दे मातरम्‌’ या शब्दाविषयी कृतज्ञ राहून देशाचा शिपाई आहोत या भावनेने कार्य केल्यास देश समृद्ध आणि शक्तीशाली होईल.

‘वन्दे मातरम्‌’ अगणित वर्षे गायले जाईल : मिलिंद सबनीस
सत्काराला उत्तर देताना मिलिंद सबनीस म्हणाले, ‘वन्दे मातरम्‌’ हा मंत्र पुन्हा एकदा जनमानसापर्यंत पोहोचावा या हेतूने सातत्याने कार्यरत आहे. दि. २४ जानेवारी १९५० रोजी ‘वन्दे मातरम्‌’ या गीताला समान राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. ‘वन्दे मातरम’ या दोन शब्दांनी देशाचा संपूर्ण इतिहास बदलला गेला. एखाद्या साहित्यकृतीची जयंती साजरी व्हावी हे भाग्य आहे. हे गीत जनसामान्यांना जागे करण्यासाठी निर्माण झाले आहे हा विश्वास बंकीमचंद्र यांना होता. या ऋषितुल्य व्यक्तीची साधना आणि तपस्या महनीय होती. हे गीत अगणित वर्षे स्वाभिमानाने गायले जाईल, असा विश्वास आहे.

स्वागतपर प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संजीव शहा यांनी स्वानंद फाऊंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. मान्यवरांचा सन्मान संजीव शहा, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर यांनी केला. सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केले तर आभार श्रुती साठे यांनी मानले. मानपत्राचे लेखन वलय मुळगुंद यांचे होते.

‘माँ तुझे सलाम’…
या निमित्ताने ‘माँ तुझे सलाम’ हा देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जितेंद्र भुरुक, अश्र्विनी कुरपे, कविता जावळेकर, आकाश सोलंकी, बबलू खेडकर यांनी ‘मा तुझे सलाम’, ‘कर चले हम फिदा’, ‘नन्हा मुन्ना राही हू’, ‘मेरे देश की धरती’, ‘संदेसे आते है’, ‘जयोस्तुते’, ‘वन्दे मारतम्‌’ आदी देशभक्तीपर गीते सादर केली. सोमनाथ फोटके, रोहित साने, रशिद शेख, अमन सय्यद यांनी साथसंगत केली.

मंडई उजळली; नव्या विद्युत दिव्यांची सोय: बाप्पु मानकर यांच्याकडून तीन दिवसात नव्या प्रकाश व्यवस्थेची सोय

पुणे: पुण्याच्या मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे झालेली अडचण अवघ्या तीन दिवसात दूर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी येथील पाहणी केल्यानंतर, आता नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.

‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.

यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.