Home Blog Page 127

दीड किमी लांबीचा सुशोभित नदीकाठ १५ फेब्रुवारीला नागरिकांसाठी खुला करणार

संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचे सुमारे ९० % काम पूर्ण,

पुणे महानगरपालिके मार्फत नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे नियोजन केले आहे. पुणे शहरातून मुळा – मुठा नदी एकूण 44 की. मी. लांबीची वाहत असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या ३.७. की. मी. लांबीच्या नदी काठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच बंडगार्डन ते मुंढवाच्या ५.५ की. मी. व औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ की. मी लांबीचे काम सुरू करणेत आले आहे. तसेच नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे लागून उपलब्ध जागेमध्ये विविध नागरी सुविधा ( थीम पार्क ) उपलब्ध करून देणेत येणार आहेत.
सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचे सुमारे ९० % काम पूर्ण झाले आहे. त्यामधील संगमवाडी येथील सुमारे १.५० की. मी लांबीचे काम सर्वार्थानं पूर्ण झाले असून , आज आयुक्त नवल किशोर राम महापालिका यांचे समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त(इस्टेट) पृथ्वीराज बि.पी .अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवणीत कौर , अतिरिक्त महापालिका आयुक्त ( विशेष) ओमप्रकाश दिवटे व शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचे समवेत आज दि. २६.०१.२६ रोजी कामाची पाहणी करणेत आली व वृक्षारोपण करण्यात आले. सध्या पूर्ण झालेल्या १.५० की मी लांबीचा ट्रॅक चे लोकार्पण पुणे महानगरपालिका वर्धापन दिनाचे अवचित साधून १५.०२.२६ रोजी रीतसर लोकार्पण करून नागरिकांना सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान वापरासाठी उपलब्ध करून देणेचे नियोजन आहे. मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यानचे सुमारे ५ की. मी. लांबीचे नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी या सह उच्चपदस्थ मंत्री यांचे हस्ते नजिकच्या कालावधीत लोकार्पण करणेत येणार आहे जेणेकरून पुणे शहरातील नागरिकांना नैसर्गिक पद्धतीने निर्माण केलेल्या प्रकल्पाचा नागरिक चालणे, सायकलिंग, विरंगुळा व इतर नागरिक यांना सर्व सोईनियुक्त वातावरण मिळू शकेल.

८४४ कोटी खर्च :११ पैकी १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे प्रत्यक्ष जागेवर सुरू

पुणे -राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करणे (PARMM प्रकल्प) या प्रकल्पांतर्गत पुणे शहरामध्ये विविध ११ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रं उभारणेचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत प्रकल्पाकडे जाणाऱ्या मुख्य मलवाहिन्या (Missing Links) विकसित करणेचे काम करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाकरीता ठेकेदार Enviro Control and Toshiba Water Solutions JV यांना दि. ०३/०३/२०२२ रोजी कार्यादेश देणेत आलेला आहे. सदर प्रकल्पाचे भूमी पुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दि. ०६/०३/२०२२ रोजी करण्यात आले आहे. मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामधून प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अद्ययावत मानकानुसार असणार आहे. एकूण ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी १० एमएलडी बोटॅनिकल गार्डन, औंध वगळता उर्वरित १० मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे प्रत्यक्ष जागेवर सुरू आहेत.

सध्या उपरोक्त ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी २० एमएलडी मुंढवा, २८ एम.एल.डी. वारजे व २६ एमएलडी वडगाव मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची कामे पूर्णत्वास येत असून इलेक्ट्रोमेकॅनिकल सामग्रीची ड्राय रन टेस्ट घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यांची एकत्रित क्षमता ७४ एमएलडी आहे. यानंतर सदर मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे वेट टेस्ट घेण्यात येणार आहे. यामध्ये उपरोक्त तीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये मैलापाणी घेऊन आवश्यक त्या चाचण्या पूर्ण करणेत येणार आहेत. तदनंतर प्रत्यक्ष मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

मुंढवा २० एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये हांडेवाडी, मोहम्मद वाडी, काळेपडळ, ससाणे नगर, माळवाडी, मगरपट्टा, साडेसतरा नळी, इंडस्ट्रियल इस्टेट हडपसर, ताडी गुत्ता चौक परिसरातील मैलापाण्यावर प्रक्रिया करणेत येणार आहे, या ठिकाणी अस्तित्वातील ४५ एम.एल.डी. क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र असून नव्याने २० एम.एल.डी. क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधणेत आलेले आहे. वारजे येथील २८ एम एलडी क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला वारजे परिसर, रामनगर परिसरातील, मैलापाणी येणार आहे. तसेच वडगाव येथील २६ एमएलडी मैलापाणी शुद्धीकरण केंद्राला रायकर मळा, धायरी गाव, जांभुळवाडी, नन्हे, आंबेगाव परिसरातील मैलापाणी येणार असून त्यावर प्रक्रिया करणेत येणार आहे.

यानंतर मत्स्यबीज केंद्र हडपसर येथील ०७ एमएलडी क्षमतेचे व ३० एमएलडी खराडी या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे कार्यान्वयन होणेकामी ड्राय रन, ट्रायल टेस्ट पुढील दोन महिन्यात सुरू करणेचे नियोजन आहे. उर्वरित ०५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांचे काम सन २०२६ अखेर पूर्ण करणेचे नियोजन आहे.

केंद्र शासनाचे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत ९९०.२६ कोटी रकमेचा प्रकल्प १४ जानेवारी २०१६ रोजी मंजूर करणेत आलेला असून त्यापैकी केंद्र शासनाकडून एकूण अनुदान ८४१.७२ कोटी (८५ टक्के) व पुणे महानगरपालिकेचा वाटा र.रू. १४८.५४ कोटी (१५ टक्के) इतका आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ११७३ कोटी असून केंद्र शासनाकडून अद्यापपर्यंत रक्कम ६२१.४५ कोटी इतके अनुदान प्राप्त झाले आहे. PARMM प्रकल्पाचा आतापर्यंत एकूण खर्च ८४४.४५१ कोटी झाला आहे. सदरचे काम पूर्ण झालेनंतर पुढील १५ वर्षे प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती ठेकेदारामार्फत करणेत येणार आहे. त्यासाठी र.रू. ३००.२१ कोटी इतका खर्च येणार आहे.

PARMM प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेची एकूण मैलापाणी प्रक्रिया क्षमता (अस्तित्वातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र ४७७ एम.एल.डी. ३९६ एम.एल. डी. (PARMM प्रकल्प) + २२ एम.एल.डी. (पुणे मनपा)) ८९५ एम.एल.डी. इतकी होणार आहे.

सदरचे प्रकल्पीय काम प्रगतीपथावर असून प्रकल्प योजना कार्यान्वीत झाल्यानंतर संपूर्ण योजनेचा लोकार्पण कार्यक्रम लोकप्रतिनिधींच्या हस्ते करणेत येणार आहे.

लग्नात 50 तोळे सोनं, 35 लाख कॅश देऊनही छळ; महिला सरपंचच्या सुनेनं संपवलं जीवन

पुणे- : सरपंच सासूसह सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने सोरतापवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यामध्ये पती, सासू, सासरे, दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहेरच्या लोकांनी लग्नात ५० तोळे सोने दिले, शाही लग्न लावून दिले, लग्नानंतर मुलीचा संसार टिकावा म्हणून ३५ लाख रोख रक्कमही दिली. तरीसुद्धा सासरच्या मंडळीकडून छळ सुरूच होता.
दीप्ती रोहन चौधरी असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती रोहन कारभारी चौधरी, सरपंच सासू सुनीता कारभारी चौधरी, शिक्षक सासरे कारभारी चौधरी, दीर रोहित कारभारी चौधरी (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहितेची आई हेमलता बाळासाहेब मगर (वय ५०, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.
उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती मगर आणि रोहन यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नात माहेरच्या मंडळींनी सासरच्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला. याविषयी दीप्तीने माहेरी तक्रार केली. मात्र, लेकीचा संसार नेटाने व्हावा, यासाठी कायम तिची समजूत घालून माहेरच्यांनी एकदा १० लाख रुपये रोख, गाडी घेण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. यानंतरही चारचाकी गाडी घेण्यासाठी सासरच्यांनी अजून पैसे मागणे सुरूच ठेवले होते. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने शनिवारी रात्री आत्महत्या केली.

चाटे पब्लिक स्कूल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : संविधान हि निती आणि धर्म या मार्गावरील जीवन जगण्या साठीची आदर्श पध्दती व संस्कार आहे. लोकशाहीच्या रथाची ही दोन्ही चाकं योग्य पध्दतीनेपुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे यांनी केले.

धनकवडी येथील चाटे पब्लिक स्कूल येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा प्रसंगी चाटे स्कूल चे माजी विद्यार्थी जे सध्या दिव दमण व दादरा नगर हवेली चे प्रशासकिय सचिव म्हणून कार्यरत असलेले
आयएएस अधिकारी डॉ सागर डोईफोडे, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, शिवव्याख्याते राहूल नलावडे, चाटे शिक्षण समुहाचे संस्थापक फुलचंद चाटे आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगतं, योगासने व कलागुणं सादर केली. यानिमित्ताने डॉ डोईफोडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील धेय प्राप्तीसाठी आवश्यक असलेला मूलमंत्र दिला. तत्पुर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आले. फुलचंद चाटे सरांनी आपल्या प्रास्ताविकात चाटे शिक्षण समुहाच्या चौफेर प्रगतीचा आढावा मांडला. तृप्ती देसाई यांनी चाटे शिक्षण समुह हा देशाचे जबाबदार नागरिक घडवणारी एक नामांकित शिक्षण संस्था आहे असे गौरवोद्गार काढले. आभार संस्थेच्या प्राचार्यांनी मानले.

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स स्पर्धेत पीएमआरडीए अव्वल; राज्यात तृतीय, विभागात प्रथम!

    पुणे: राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची कामगिरी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्यावतीने अंतिम मूल्यमापनात तपासली गेली. या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २६) प्रजासत्ताक दिनी केली. यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वोत्तम शासकीय संस्था, मंडळे व कंपन्या या गटातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा खोवला आहे.

    महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांचा शासकीय कामकाजातील प्रभावी वापर करून ही निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यापूर्वी १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा व धोरणात्मक निर्णयांवर आधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्या स्पर्धेतही पीएमआरडीएने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत आपली कामगिरी अधोरेखित केली होती. या यशानंतर जून २०२५ मध्ये १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती आराखडा घोषित केला गेला. या आराखड्याअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे दहा विविध स्तरांवर मूल्यमापन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेकडून सखोल तपासणी केली गेली. या कार्यक्रमात पीएमआरडीएने प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि डिजिटल सेवा वितरणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुधारणा प्रक्रियेमुळे कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले असून, नागरिकांना सुलभ व वेळेत सेवा मिळण्यास मोठी मदत झाली आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा गौरव राज्य शासनाच्यावतीने लवकरच करण्यात येणार आहे.


    “ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख प्रशासन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीएमआरडीएच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या संघभावनेतून आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून हे यश मिळाले आहे.”

    डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

    पीएमआरडीए मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

    पुणे : भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताच्या ध्वनीत परिसर दुमदुमला. पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली.

    या कार्यक्रमास अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, सहआयुक्त (अनधिकृत बांधकाम निर्मूलन) दीप्ती सूर्यवंशी-पाटील, मुख्य अभियंता शिवकुमार बागडी, वित्तीय नियंत्रक सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी यांच्यासह पीएमआरडीएचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दक्षता विभागाचे पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्या पथकाने ध्वजाला सलामी दिली. यावेळी अग्निशमन अधिकारी विजय महाजन तसेच पीएमआरडीए आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. योगेश म्हसे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाच्या मूल्यांचे जतन करणे तसेच जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला..

    “वंदे मातरम” या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात शनिवारवाडा येथे लष्कराच्या वाद्यवृंदाचे सादरीकरण

    पुणे, 26 जानेवारी 2026

    पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी देशभक्तीची पताका फडकावत पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात लष्कराच्या वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “वंदे मातरम”या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंदाने बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि केंद्राच्या (बीईजी सेंटर) पाईप बँड तसेच जॅझ बँडसह एकत्र येत सादर केलेल्या कार्यक्रमामुळे हा ऐतिहासिक किल्ला अभिमानाने दुमदुमून गेला. खडकी येथील बीईजी केंद्रातील दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाच्या अधिपत्याखाली सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम सामान्य जनतेसाठी खुला होता.

    या कार्यक्रमाने देशाच्या स्वातंत्र्यचळवळीला प्रेरणा देणाऱ्या तसेच देशाची एकता आणि राष्ट्रीय ओळख यांचे आजही प्रतीक ठरणाऱ्या “वंदे मातरम्” या गीताचा सन्मान केला. शनिवारवाड्याच्या सुप्रतिष्ठित वास्तूच्या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या या कार्यक्रमाने मनाला भिडणाऱ्या   धून आणि काळाचा सन्मान करणारी समर गीते  यांच्या माध्यमातून प्रजासत्ताकाच्या चिरस्थायी भावनेचा उत्सव साजरा केला. अचूकता, शिस्त आणि सांगितिक उत्कृष्टतेसाठी प्रसिध्द असलेल्या या सामुहिक वाद्यवृदांनी उपस्थित नागरिक तसेच पर्यटक अशा दोन्ही वर्गांसाठी दृश्य आणि भावनिकदृष्ट्या अधिक उंचीवर घेऊन जाणारा अनुभव देत, देशभक्तीपर रचना आणि लष्कराची उत्सवी धून यांचा मिलाफ असलेला कार्यक्रम सादर केला.

    दिनांक 10 एप्रिल 1948 मध्ये स्थापन करण्यात आलेला आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंद प्रजासत्ताक दिन, सेना दिवस, राष्ट्रपती भवनाशी संबंधित कर्तव्ये, अमर जवान ज्योती, ओळखपत्रे/मार्गदर्शन सादरीकरणे यांसह राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विविध प्रमुख प्रसंगी सादरीकरणाचा विशिष्ट विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या बँडने आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन (1990), भूतान (2003), स्वीडन (2006) आणि एडिनबर्ग (2008) इत्यादी ठिकाणी देखील भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या कार्यक्रमात भारताची प्रेरणा आणि त्याग यांना आदरांजली वाहत, “वंदे मातरम्” गीतावरून प्रेरित अनेक आकर्षक रचनांसह, विविध देशभक्तीपर सुरांच्या ओळी आणि राष्ट्रीय गाणी सादर करण्यात आली.

    देशभरात “वंदे मातरम्” गीताची दीडशे वर्षे तसेच हे गीत ज्या ऐक्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिनिधित्व करते त्या कालातीत आदर्शांना साजरे करण्यात येत  असताना, भारतीय सैन्याचे देशाच्या वारशाशी असलेले गहन नाते आणि देशभक्तीपर परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यात सैन्याची असलेली भूमिका अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग बघायला मिळाला.

    77 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात आयुष चित्ररथाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

    0

    नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2026

    दिल्लीत कर्तव्य पथावर आयोजित 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आयुष मंत्रालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून, भारताच्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालींची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड  घालत सर्वसमावेशक चित्र सादर करण्यात आले.  आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम) योजनेच्या अंतर्गत, चित्ररथाची संकल्पना, आत्मनिर्भर भारत आणि लोककेंद्रित विकासाच्या व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या ‘आयुष का तंत्र, स्वास्थ का मंत्र’ यावर आधारित होती.

    आरोग्य आणि कल्याण यांच्या प्रती देशाच्या  सांस्कृतिक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब दर्शवत या चित्ररथामधन, आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिगपा आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक ज्ञान प्रणाली प्रतिबंधात्मक, प्रोत्साहन देणारी आणि समुदाय आधारित आरोग्य सेवेला बळकटी देण्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे हे  अधोरेखित करण्यात आले.

    चित्ररथाच्या दर्शनी भागात, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भारताच्या पारंपरिक आरोग्य ज्ञानाच्या  प्रतीकात्मक सादरीकरणातून आयुषचा मूलभूत उगम दर्शवण्यात आला होता. शिल्पकला आणि औषधी वनस्पतींच्या प्रतीकांतून मानवी आरोग्य आणि नैसर्गिक परिसंस्था यांच्यातले  घनिष्ट नाते दर्शविण्यात आले तसेच शाश्वतता आणि सर्वांगीण जीवनशैली  या आय़ुषच्या मूळ तत्वांवर भर देण्यात आला होता.

    या रथावर  राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम)द्वारे राष्ट्रीय आरोग्य आराखड्यातील आयुष मंत्रालयाची एकात्मिक संरचना दर्शवण्यात आली होती. तळाच्या स्तरावर  आयुषमान आरोग्य मंदिर (आयुष) संस्थात्मक क्षमता बांधणी, शिक्षण आणि संशोधन उपक्रम  ज्यामुळे देशभरात सुलभता आणि प्रमाणीकरण वृद्धिंगत करणाऱ्या आयुष सेवांच्या विस्तारावर दृकश्राव्य माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

    या चित्ररथामधून, आरोग्य क्षेत्रातील अग्रणी डिजीटल सक्षम नेतृत्व म्हणून भारताचा उदय झाल्याचे दाखवण्यात आले.

    सार्वजनिक सहभाग आणि लोक सहभाग  हा या चित्ररथाच अविभाज्य भाग होता, त्यामध्ये योग अभ्यास, सर्वसाधारण वापरली जाणारी आयुष औषधे आणि शरीर, मन आणि आत्मा यांच्या सुसंवादाचे प्रतीक असलेल्या ध्यानमुद्रा दर्शवणारे देखावेही सादर करण्यात आले होते.

    या चित्ररथामध्ये राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत, आरोग्य सेवा वितरण बळकट करण्यासाठी भारताच्या डिजीटल साधनांच्या वाढत्या वापराचेही प्रतिबिंब पहायला मिळाले. मर्मा, शिरोधारा आणि कपिंग यांसारख्या उपचार पद्धतीच्या त्रिमितीय सादरीकरणाद्वारे भारतीय उपचार पद्धतींमधील विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पारंपरिक औषध ज्ञानाचा जागतिक स्तरावर प्रसार करणाऱ्या प्रमुख आयुष प्रणालींच्या प्रवर्तकांचाही उल्लेख करण्यात आला होता.

    चित्ररथावर शेवटी, संस्थात्मक सातत्य, शिक्षण आणि उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या आयुर्वेद महाविद्यालयाची प्रतिकृती उभारण्यात आली  होती  आणि भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा एक गतिमान आणि विकसित आधारस्तंभ आणि जागतिक आरोग्य नेतृत्वाचा घटक म्हणून आयुष मंत्रालयाला अधोरेखित करण्यात आले होते.

    चित्ररथावर भारताची कथाकथन परंपरा आणि वेव्हज् संकल्पनेचे दर्शन

    प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात …

    नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2026

    कर्तव्य पथावर आज झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्ररथाची ही झलक. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या “भारत गाथा: श्रुती, कृती, दृष्टी” या शीर्षकाच्या चित्ररथावर भारताची समृद्ध कथाकथन परंपरा सादर करण्यात आली. प्राचीन मौखिक परंपरांपासून ते समकालीन माध्यमे आणि चित्रपटसृष्टीपर्यंतचा हा प्रवास दर्शवित, राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे तसेच जागतिक दर्जाचे सामग्री-सामर्थ्य असलेला देश म्हणून उदयाचे प्रतिबिंब यात दिसून आले.

    या चित्ररथावर भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील नेतृत्व, नवोन्मेष आणि सांस्कृतिक राजशिष्टाचाराला पुढे नेणाऱ्या वेव्हज् या जागतिक मंचाचे महत्त्व ठळकपणे मांडण्यात आले. नागरी वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा  सुंदर मेळ साधत, 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परंपरा आणि भविष्याभिमुख कथनांची सजीव स्वरूपात मांडणी करण्यात आली.

    आता भारतच करणार जगाचे नेतृत्व: डॉ.भीमराया मेत्री

    आयआयएम नागपूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

    नागपूर, २६ जानेवारी:

    “भारताने आता संपूर्ण जगाला नेतृत्व प्रदान करण्याची वेळ आलेली आहे. पुढील
    शतक आपले आहे, आणि या प्रवासात आपण सर्वांनी जबाबदारीने व
    आत्मविश्वासाने आपली भूमिका बजावली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय
    प्रबंध संस्थान नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सोमवारी केले.
    प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत
    होते.
    “भारताच्या सतातीपूर्ण प्रगतीमागे संविधानाचे मजबूत सुरक्षा कवच असल्याचे
    डॉ. मेत्री यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “एक लोकतांत्रिक प्रजासत्ताक
    म्हणून आपली ओळख संविधानाच्या संरक्षणामुळे अधिक मजबूत झाली आहे.
    संविधानामुळे देशातील लोकशाही मूल्ये, एकता आणि विकासाला दिशा
    मिळाली आहे. आज भारत एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर उभा असून,
    विविध क्षेत्रांमध्ये देश जागतिक पातळीवर नेतृत्व देण्याच्या दिशेने पुढे जात
    आहे,” असे त्यांनी सांगितले.
    यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण आणि सुरक्षा
    मार्च-पास्ट यांसह झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. पुढे आयोजित
    सांस्कृतिक कार्यक्रमात आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर
    विषयांवर स्वलिखित कविता सादर केल्या, तर ड्रामा क्लबने हैदराबाद आणि

    गोवा भारतात समाविष्ट होण्याच्या ऐतिहासिक प्रवासावर आधारित प्रभावी
    नाटक सादर केले.
    संस्थानच्या डान्स क्लबने नृत्य सादर केले. म्युझिक क्लबने देशभक्ती गीतांचा
    छोटेखानी संगीत कार्यक्रम सादर केला. प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अभ्युदय
    या आयआयएम नागपूरच्या सांस्कृतिक क्लबच्या वतीने आयोजित करण्यात
    आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने
    उपस्थित होते.

    भारतीय संविधानामुळेच देशाची लोकशाही अधिक बळकट – उपमुख्यमंत्री अजित पवार

    ▪️ पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख

    पुणे, दि. २६ जानेवारी -भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.

    ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, सैन्यदल, निमलष्करी व पोलीस दलांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करत श्री.पवार यांनी त्यांना भावपूर्ण वंदन केले. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही त्यांनी अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख

    केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुण्याची भूमिका ऐतिहासिक व निर्णायक राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

    शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचे श्री. पवार म्हणाले.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, अभिव्यक्ती व धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची हमी दिल्यामुळे भारताची लोकशाही अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.

    ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवरच महाराष्ट्राची प्रगती उभी असून हेच विचार राज्याच्या व देशाच्या शाश्वत विकासाचा मंत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हे विचार सर्वांनी जपावेत, असे आवाहन त्यांनी केले.

    भारतीय सैन्यदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या अतुलनीय सेवेचा त्यांनी गौरव केला. सीमेवरील त्याग, देशांतर्गत सुरक्षेसाठी केलेले बलिदान व आपत्तीच्या प्रसंगी दाखवलेली तत्परता प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

    लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून संविधानाचे पालन, कायद्याचा आदर, सामाजिक सलोखा व विविधतेत एकता जोपासणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

    पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव
    विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटचे उपअधीक्षक दयानंद सदाशिव गावडे, पोलीस निरीक्षक अविनाश रोकडेराव शिळीमकर, एसआरपीएफ गट क्रमांक–१ मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सानंतु, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त विठ्ठल खेहुली कुबडे, तसेच महेंद्र दामोदर कोरे, अमोल फडतरे आणि उपअधीक्षक अनंत माळी यांचा समावेश होता.

    उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘स्वच्छ पुणे संकल्प–2026’ प्रचार प्रसिद्धी रथास झेंडी
    पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ पुणे संकल्प–2026 या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी रथाला आज उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
    यावेळी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या संकल्पनेवर भर देण्यात आला. प्रचार रथाच्या माध्यमातून कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता सवयी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
    यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम,जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. संदीपसिंह गिल, पुणे महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    धर्मेंद्र यांना पद्मविभूषण:रोहित शर्मा, आर.माधवन,भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2026 या वर्षासाठी 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह पाच व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहे.

    महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शिबू सोरेन आणि गायिका अलका याज्ञिक यांच्यासह 13 व्यक्तींची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.

    दुसरीकडे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर. माधवन, पॅरा-अ‍ॅथलीट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू सविता पुनिया यांच्यासह 113 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

    पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी 19 महिला आहेत. त्यापैकी सहा परदेशी/NRI/PIO/OCI श्रेणीतील आहेत. सोळा व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार

    महाराष्ट्रातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण, तर अलका याज्ञिक, दिवंगत पीयूष पांडे(मरणोपरांत), उदय कोटक यांना पद्मभूषण तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता आर माधवन, लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर, डॉ. अर्मिडा फर्नांडिस, तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांच्यासह 11 पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे.

    महाराष्ट्रातील पद्म विजेते

    पद्मविभूषण

    धर्मेंद सिंह देओल (मरणोत्तर ) (कला)


    पद्मभूषण

    अलका याज्ञिक (कला)
    पीयूष पांडे (मरणोपरांत) (कला)
    उदय कोटक (उद्योग)

    ईश्वराला जाणून त्याच्या सतत जाणीवेतून आत्ममंथन शक्य आहे

    -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

    सांगली, 25 जानेवारी, 2026: “ईश्वर सर्वव्यापी आहे, सृष्टीच्या कणा-कणा मध्ये तो विराजमान आहे. याला अंगसंग पाहून सदैव त्याच्या जाणीवेत जीवन जगल्यानेच आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य आहे. वरील उद्गार निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या 59व्या संत समागमाच्या प्रथम दिवशी 24 जानेवारी, 2026 रोजी उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले.

    सांगली ईश्वरपूर रोडलगत जवळपास 350 एकरच्या विशाल मैदानात आयोजित या तीन दिवसीय समागमामध्ये महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून तसेच देशाच्या विविध प्रांतातून लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तगण व प्रभूप्रेमी सज्जन सहभागी झाले आहेत.

    सतगुरू माताजी म्हणाल्या, की भक्ती आपण स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे नाव आहे. मनाला निर्मळ करून जीवनाला सुंदर बनवत मानवतेच्या मार्गावर चालून सहज जीवन जगायचे आहे. साधु-संतांनी निरंतर इतरांचे अवगुण न पाहता स्वतःमध्ये सुधारणा करण्याची शिकवण दिली आहे. नम्रता व सहनशीलता यांसारख्या दिव्य गुणांना धारण करून आपले जीवन उज्ज्वल करायचे आहे.

    सतगुरू माताजींनी पुढे सांगितले, की जीवनात जेव्हा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश येतो, तेव्हा भक्ताला इतरांच्या वेदनांची जाणीव होऊ लागते. त्याच्या अंतरमनात दया व करूणेचा भाव उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे स्वतःच्या जीवनाचे कल्याण झाले आहे, तद्वत इतरांच्या जीवनातही या ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न तो अत्यंत उदार व नम्र भावनेने करतो. असे संतजन स्वतः ज्ञानाच्या आधारे जीवन जगून हा दैवी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.

    शेवटी सतगुरू माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन हा हृदयापासून विचार करण्याचा विषय आहे शुष्क बौद्धीक तर्क-वितर्काचा विषय नाही. परमात्म्याने या सुंदर जगाची रचना केली आहे. जर आपण या जगात आलो आहोत, तर मनातील विपरीत भावनांना दूर करत मानवतेच्या भावनेने युक्त होऊन जीवन जगायचे आहे. त्याचबरोबर जे बाह्यरूपी प्रदूषण आहे, त्याला देखील दूर करणे आपले कर्तव्य आहे ज्यायोगे या जगताची सुंदरता कायमस्वरूपी टिकेल.

    सत्संग कार्यक्रमामध्ये देश-विदेशातून आलेल्या विद्वान वक्ता महात्म्यांनी विविध भाषांचा आधार घेत विचार, भक्ती रचना, कविता व विविध प्रस्तुतींच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले. समागम समितीचे समन्वयक आदरणीय नंदकुमार झांबरे यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशाला अधोरेखित करत आपले भाव प्रकट केले.

    सेवादल रॅली
    समागमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात एका आकर्षक सेवादल रॅलीने झाली ज्यामध्ये महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून आलेल्या हजारो सेवादल बंधु-भगिनी आपआपली खाकी-निळी वर्दी परिधान करून सहभागी झाले होते. विदेशातील सेवादल सदस्यांनी देखील त्यांच्या विशिष्ट गणवेषामध्ये या रॅलीमध्ये भाग घेतला. सतगुरू माताजी व निरंकारी राजपिताजींचे रॅलीमध्ये आगमन होताच मंडळाच्या सेवादल आधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन या दिव्य युगुलाचे सहर्ष स्वागत केले.

    सेवादल रॅलीला आरंभ केल्यानंतर सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या करकमलाद्वारे शांतीचे प्रतीक असणारा मिशनचा श्वेत ध्वज फ़डकवला. या रॅलीमध्ये बॅंण्डच्या सूरात पी.टी.परेड, संगीतमय योगा, मानवी पिरॅमिड, मल्लखांब, ॲरोबिक, अम्ब्रेला फॉर्मेशन तसेच अनेक विविध खेळ व साहसी प्रकार प्रस्तुत केले.

    त्याचबरोबर मिशनच्या शिकवणीवर आधारित विविध भाषांच्या माध्यमातून लघु नाटिका सादर करण्यात आल्या ज्याद्वारे भक्तीमधील सेवेचे महत्व अधोरेखित केले गेले तसेच अहंकार रहित होणे, सेवेमधील चेतनता व आदर भाव इत्यादी दिव्य गुण धारण करण्याची प्रेरणा देण्यात आली.

    सेवादल व श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी प्रतिपादन केले, की जीवनात निराकार परमात्म्याला प्राथमिकता देत समर्पित भावनेने सेवा करायची आहे. सेवा केवळ एक कार्य नसून ते पूर्ण मनोभावे श्रद्धा व सत्कार भावनेने करायची साधना आहे. सेवेच्या सोबत जीवनात सत्संगला महत्व देणे सुद्धा सेवेचेच एक रूप आहे. सेवेच्या मूळ भावनेला समजून केले गेलेले कार्यच जीवनामध्ये सुधारणा घडवते. 

    निरंकारी मिशनच्या नूतन साहित्याचे प्रकाशनः
    समागमाच्या पहिल्या दिवशी सत्संग कार्यक्रमा दरम्यान सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करकमला द्वारे समागम विशेषांक “आत्ममंथन” आणि ‘गुरूदेव हरदेव’ या पुस्तकाची नुतन भाषांतर आवृत्ती तसेच अन्य पुस्तकांच्या भाषांतर आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. ही सर्व प्रकाशन सामग्री व मिशनच्या पत्र-पत्रिका समागम मध्ये लावलेल्या प्रकाशनाच्या स्टॉल्सवर अत्यंत माफ़क दरात उपलब्ध आहेत ज्याचा लाभ श्रद्धाळू भक्तगण मोठ्या उत्साहाने घेत आहेत.

    लंगर व कॅंटीन व्यवस्था
    समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाची (लंगर) व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे. या व्यतिरिक्त चार कॅंटीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीत पेये व अल्प-उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅंन्टीन्समध्ये करण्यात आली आहे.

    स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    ‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

    पुणे, दि. २५: कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्त स्त्री आधार केंद्रातर्फे ‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर दि.२४ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, कायद्याचे प्रशिक्षण फक्त महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आवश्यक आहे. पुरुषांचाही यात सक्रिय सहभाग असावा. लवकरच किमान तीन ठिकाणी असे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

    याशिवाय प्रत्येक शाळेतील स्कूल बसमध्ये परिचारिका नेमण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्त्री आधार केंद्राकडून शाळांना पत्र पाठवले जाणार आहे. गुड टच आणि बॅड टचबाबत जागृती कार्यशाळाही घेण्यात येणार आहेत.

    स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसाठी विधानभवन पाहणी दौराही लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

    कार्यक्रमादरम्यान आरोग्य विषयावरही खुली चर्चा झाली. महिलांची सुरक्षितता, सक्षमीकरण आणि समुपदेशन या विषयांवरही लवकरच चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.

    ‘Transform Her’ या महिला उद्योजक गटातील महिला उद्योजकांनीही या परिसंवादात सहभाग घेतला.

    कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, अपर्णा पाठक, आश्लेषा खंडागळे, अनिता शिंदे, नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिका नगरसेविका पदाच्या उमेदवार वैष्णवी किराड, सायली पवार, सोनाली लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

    मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

    आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात  महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?

    मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्वीट करत मागील दाव्होस दौऱ्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या MoU बाबत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील दौऱ्यांतील MoU पैकी महाराष्ट्रात प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक प्रत्यक्षात आली? आणि त्यातून किती रोजगार निर्माण झाले? हे प्रश्न आजही अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

    “मोठ्या आकड्यांच्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्षात आलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार महत्त्वाचा आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी आपल्या ट्वीटमधून मांडले आहे.

    दरम्यान, दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्याच राज्यातील किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करण्याबाबत कर्नाटक सरकारचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी यापूर्वी केलेले निरीक्षणही पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखित केले आहे. कर्नाटक सरकार दाव्होस मध्ये केवळ परकीय गुंतवणूकदारांशीच करार करते, त्यामुळेच कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर परकीय उद्योग येतात आणि त्या राज्याचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

    या पार्श्वभूमीवर अदानी, लोढा यांसारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दाव्होस मध्ये MoU करणे हे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे असून, हा प्रकार ‘क्रूर विनोद’ असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

    महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना इव्हेंट्स किंवा मोठ्या घोषणांपेक्षा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगार हवा आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या दाव्होस दौऱ्यांमध्ये जाहीर करण्यात आलेल्या MoU पैकी प्रत्यक्षात किती मोठे परकीय उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले, किती गुंतवणूक आली आणि किती रोजगार निर्माण झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी ठाम मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
    नेमके चव्हाणांची पोस्ट

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत.आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?