Home Blog Page 124

अजित पवार पंचत्वात विलीन: दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी,बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज दुपारी १२:१५ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंजावाती पर्वाचा आज अंत झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते.महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली.

या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

त्याआधी, अंत्ययात्रेत हजारो लोक उपस्थित होते. बारामतीचे रस्ते जाम झाले होते. गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात आले होते.बारामती येथे बुधवारी सकाळी 8.46 वाजता झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार (66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव होते. त्यातील एकही जण वाचू शकला नाही.

भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. . त्यांच्या निधनामुळे दादा या शब्दाच्या वकुबाला जागणारा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने अजित पवार अमर रहेचा जयघोष करत आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांवरील अखंड प्रेमाची साक्ष देत होता. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात एक चबुतरा उभारण्यात आला होता. या चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार राज्याच्या राजकीय वर्तुळात कामाचा माणूस म्हणून परिचित होते. ते भल्या पहाटे उठून आपल्या कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जनतेच्या समस्या सोडवत राहायचे. राज्यातील जनता त्यांच्याकडे केवळ एका नेता म्हणून नव्हे तर आपला आधार, आपला दादा म्हणून काम पाहत होते. राज्याच्या राजकारणात मागील साडेचार दशकांपासून त्यांनी आपला शब्द ‘खरा’ करून दाखवला. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला आज आबालवृद्धांपासून महिलांपर्यंत हजारोंचा जनसमुदाय जमला होता.

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण

मुंबई, दि. २८:- जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.

मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. २८ :

राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली.

व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणारा, “मी आहे” असं सांगणारा आवाज आज कायमचा शांत झाला आहे.

अजितदादांचे जाणं ही माझ्या वैयक्तिक आयुष्यातील फार मोठी हानी आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवातच अजितदादांच्या सहवासातून झाली. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दादांचा आधार, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला लाभला. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं, घडवलं, विश्वास दिला. कार्यकर्त्यापासून जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, आमदार आणि तीन वेळा मंत्री होण्यापर्यंतचा माझा प्रवास दादांच्या पाठबळामुळेच शक्य झाला.

गेल्या चार दशकांत त्यांनी लाखो कार्यकर्त्यांना ताकद दिली. अजितदादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. फक्त विकास आणि सर्वसामान्य माणूस हे त्यांचं व्हिजन नेहमी स्पष्ट होतं. रोखठोक, स्पष्ट राहून हीच विकासाची भूमिका घेत अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य नागरिकांसाठी काम केलं. महाराष्ट्राच्या आणि सर्वसामान्यांसाठी विकासासाठी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला सुरुवात करुन रात्री ऊशीरापर्यंत हा नेता धावत होता.

आजही विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यात नाहीत. आज बारामती तालुक्यात त्यांच्या जाहीर सभा नियोजित होत्या. मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानाच्या लँडिंगदरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाले, ही घटना मनाला खोलवर हादरवून टाकणारी आहे.

अजितदादांसोबतच्या असंख्य आठवणी आजही डोळ्यांसमोर तरळत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसारखी रोल मॉडेल शहरं उभारताना त्यांनी विकासाची एक वेगळीच दिशा दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वाधिक ११ वेळा मांडला. यासोबतच सिंचन, ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळताना सर्वोत्तम कामगिरी केली होती. असंख्य संस्था, शासकीय इमारती आणि विकासकामांमधून त्यांची दूरदृष्टी कायम जिवंत राहणार आहे. दादा आज आपल्यात नसले, तरी प्रत्येक विकासकामाकडे पाहताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

आपल्यासोबत असणारा, प्रेरणा देणारा, कामातून नेतृत्व शिकवणारा सहकारी गमावणं म्हणजे आयुष्यात निर्माण झालेली प्रचंड पोकळी आहे. प्रभावी, कणखर आणि निर्णायक नेतृत्व म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या सोबत काम करणं म्हणजे राजकारणात शिकण्याचा एक अखंड प्रवास होता. अविरत कामात स्वतःला झोकून देत लोकांची कामं करण्याचा त्यांचा हातखंडा होता. मातीतील माणसाशी जोडलेला हा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला आहे, ही कल्पनाच असह्य आहे.

हा शोकसंदेश लिहिताना अंतःकरणात अपार वेदना होत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्यातील गोरगरीब, तळागाळातील जनतेसाठी झटणारा नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे.

या दुःखद घटनेने पवार कुटुंबीयांवर आलेल्या आघातातून त्यांना सावरण्याची शक्ती देव मिळो, हीच प्रार्थना करतो. या महान लोकनेत्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य

देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला !

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शोकसंवेदना

मुंबई : अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला आहे आणि मी माझा एक जिवलग ज्येष्ठ मित्र! अजितदादा आता आपल्यात नाहीत ही जाणीव अजूनही मनाला स्वीकारता येत नाही, या शब्दात महसूलमंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

शोकसंवेदनेत ते म्हणतात,” महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमीने मी अक्षरशः हादरून गेलो आहे. मन सुन्न झाले आहे.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील.

प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.अजितदादांचा प्रशासनातील अनुभव अतिशय समृद्ध होता. अनेकदा मी स्वतः त्यांच्याकडून सल्ला घेत असे, विविध विषयांवर त्यांच्याशी हक्काने चर्चा करीत असे. महायुतीत कार्य करत असताना अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. त्यांच्या सहवासातून मी स्वतः अनेक गोष्टी शिकलो.

अजितदादांसह या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकीयांच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे.

हा केवळ अपघात, यात राजकारण नाही- शरद पवार

पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला . विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला.या अपघाताबाबत विविध शंका व्यक्त होऊ लागल्याने ..दुखाने व्यथित असतानाही शरद पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.

अजितदादा आपल्यातून गेले ही गोष्ट स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा श्रद्धांजली संदेश…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे.
अजितदादा आपल्यातून गेले ही गोष्ट स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही.

माझ्यावर पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी असताना विविध विकासकामांच्या निमित्ताने दादांशी निकटचा संबंध आला. विविध विषयांवरील त्यांची मते अतिशय सुस्पष्ट आणि परखड होती. त्यांची विकासाची दूरदृष्टी, वक्तशीरपणा, ठोस निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावरील घट्ट पकड वाखाणण्याजोगी होती. कोरोना साथीच्या संकटात पुणे शहरातील स्थिती नियंत्रणात आणण्यास दादांचे मोठे सहकार्य मिळाले. अतिशय कठीण परिस्थिती त्यांनी धैर्याने सांभाळली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

मुरलीधर मोहोळ ( केंद्रीय सहकार राज्यमंत्री)

हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला… भीषण , थरार…
पुणे :सकाळचे पावणे नऊ वाजले होते.. अजितदादांचं विमान अगदी पाच मिनिटांत लँड होणार होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं… परिस्थिती लँडिंग घेण्यासरखी नव्हती, त्यामुळे ते विमान घिरट्या घेत होतं.
शेवटी विमानतळाच्या जवळच शेतात ते कोसळलं अन् स्फोट झाला. कामाचा माणूस अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे अजितदादा मरण पावले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव तर फारच भीषण आणि थरारक आहेत.

बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी धाऊन गेलेल्या एका महिलेने सांगितलं की, विमानाने एक घिरटी मारली आणि दुसऱ्यांदा ते घिरटी मारत होतं.. ते खूपच खालून गेलं आणि कोसळलं आणि स्फोट झाला.. आम्ही फोन केल्यानंतर विमानतळाचे पोलिस आणि कर्मचारी धाऊन आले.. परंतु स्फोट एवढा होता की कोणी काहीच करु शकत नव्हतं. त्यानंतर अग्मिशमन दल दाखल झालं.

दुसऱ्या एका महिलेने अनुभव सांगितला, आम्ही बादलीने पाणी आणत होतो. साईडला एक बॉडी उडून पडली होती.. शीर नव्हतं फुगलेली बॉडी होती. आम्ही ब्लँकेट दिलं आणि पोलिसांनी बॉडी गुंडाळून घेतली.

तिसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमान कोसळलं आणि लगेच दोन बॉडी बाहेर फेकल्या गेल्या.. चेहरा काहीच दिसत नव्हता. गॉगल आणि वॉचवरुन हे दादाच आहेत, हे आम्ही ओळखलं. आम्ही पहिल्यांदा दादांची बॉडी काढली. हे विमान विमानतळावर केवळ पाच मिनिटांत उतरले असते, पण दुर्दैवी मृत्यू झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

”असं नेतृत्व घडायला मोठा काळ जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजितदादांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात आहे. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनाही घडलेल्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. त्यांनी याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे देशामध्ये हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करुन ठरवण्यात येतील. सुप्रियाताई आणि पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं आहे. संपूर्ण परिवार बारामतीत पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलेला आहे.” अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली

आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं:आमच्या डोक्यावरील मायेची सावलीच हिरावून घेतली, रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट

लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा
पुणे-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, संपूर्ण राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, तर अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या शेवटच्या संवादाचे हृदयद्रावक अनुभव कथन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची.

आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता बारामतीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार, काका शरद पवार, अजित पवारांचे दोन्ही मुले आणि बहीण सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झाले आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत.

भारत फोर्ज लिमिटेडकडून अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक संदेश…

२८ जानेवारी २०२६ | पुणे, महाराष्ट्र
भारत फोर्ज परिवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एक दिग्गज नेते, अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे. या दुःखाच्या काळात आम्ही त्यांचे कुटुंबीय – श्रीमती सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि आप्तेष्ट यांच्या बरोबर आहोत.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सिंचन, शेती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. एक गतिमान आणि निर्णायक नेता अशी त्यांची ख्याती होती. त्यांची प्रशासकीय क्षमता आणि सार्वजनिक सेवेतील योगदान याचा जनमानसावर कायमचा प्रभाव पडला आहे. त्यांची उणीव प्रत्येक क्षणी सर्वांना निश्चित जाणवेल यात शंका नाही.

महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुःखद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रति आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. या प्रचंड दुःखाला सामोरे जाण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.

भारत फोर्ज महाराष्ट्रातील जनतेसोबत एकजुटीने उभे आहे आणि या दुःखद घटनांमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी शक्ती, धैर्य आणि शांततेसाठी प्रार्थना करत आहोत!

— बाबा कल्याणी, अमित कल्याणी आणि कल्याणी ग्रुप

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई, दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

‘फोनपे लिमिटेड’ने ‘सेबी’कडे दाखल केला ‘यूडीआरएचपी-१’

0

डिजिटल पेमेंट सेवा, डिजिटल वितरण सेवा आणि वित्तीय सेवा यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणाऱ्या फोनपे लिमिटेड या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने ‘सेबी’कडे आपला ‘यूडीआरएचपी-१’ दाखल केला आहे.

कंपनी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहक पेमेंट, व्यापारी पेमेंट, कर्ज वितरण तसेच विमा वितरण या सेवा पुरविते. याशिवाय कंपनीने दोन नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले असून त्यांचा वेगाने विस्तार करत आहे. यातील एक आहे Share.Market हा या कंपनीचा स्टॉक ब्रोकिंग आणि म्युच्युअल फंड्स वितरणासाठीचा प्लॅटफॉर्म आहे. दुसरा आहे इंडस अ‍ॅपस्टोअर. हा मोबाईल अ‍ॅप्ससाठी मार्केटप्लेस म्हणून काम करतो. कंपनीचे सर्व प्लॅटफॉर्म पुरस्कारप्राप्त आणि उच्च क्षमतेच्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ही तंत्रज्ञान प्रणाली मजबूत आणि विश्वासार्ह आहे. ती एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काम करू शकते, सुरक्षित आहे आणि खर्चही कमी ठेवते. त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तसेच नव्या गरजांसाठी ती सहज वापरता येते.

या यूडीआरएचपी अंतर्गत कंपनीचे सध्याचे भागधारक आपले ५०,६६०,४४६ पर्यंत इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य १ रुपया आहे.

एप्रिल २०१६ मध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, ऑगस्ट २०१६ मध्ये या कंपनीने यूपीआयवर आधारित अ‍ॅप सुरू केले. असे करणारी ही भारतातील पहिली खासगी, बॅंकेतर कंपनी ठरली, अशी माहिती ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एनपीसीआय) आकडेवारीवर आधारित रेडसीयर अहवालात नमूद करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात यूपीआय व्यवहारांची संख्या आणि एकूण व्यवहार मूल्य (टीपीव्ही) या दोन्ही बाबतीत कंपनीने सतत आघाडी ठेवली. त्यामुळे ती भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म बनली आहे, असे ‘एनपीसीआय’च्या आकडेवारीवर आधारित रेडसीयर अहवालात नमूद आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीकडे सुमारे ६५.७५ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आणि ४.७२ कोटी नोंदणीकृत व्यापारी होते.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जे. एम. फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या शेअर बाजारांमध्ये नोंदविण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

‘यूडीआरएचपी-१’ची लिंक:

https://investmentbank.kotak.com/kib-cms/sites/default/files/offer-documets/PhonePe%20Limited%20-%20UDRHP-I.pdf

महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित दादा पवार यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत अजित दादांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. कामाच्या बाबतीत ते अत्यंत स्पष्ट, वक्तशीर, कणखर आणि निर्णयक्षम भूमिका घेत असत. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्याच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.

आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आणि प्रत्येक पदाला त्यांनी पूर्ण न्याय दिला. राजकारणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. बारामतीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवला. सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत, हीच त्यांची कायम भूमिका होती. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

अजित दादा पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी संस्थात्मक बांधणी केली, नेतृत्वाची पुढील पिढी घडवली आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी राजकीय हानी झाली आहे. स्व.विलासराव जी देशमुख, गोपीनाथ जी मुंडे यांच्याप्रमाणेच अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

“प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती” – डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६ :
उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो.

विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अजित पवार हे उत्तम संसदपटू होते आणि विधानपरिषदेत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना व सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट.

महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.आता अपघाताच्या अगदी आधीची कहाणी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. वैमानिकांनी बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना रनवे दिसला नाही. वैमानिकांनी विमान पुन्हा वर घेतले. थोड्या वेळाने पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकले, पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटले आणि जमिनीवर आदळले. अपघाताच्या अगदी आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते – ओह शिट…ओह शिट.

विमानातील प्रवाशांची नावे

खाजगी VSR कंपनीचे विमान

  1. अजित पवार 2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 4. कॅप्टन संभवी पाठक 5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,’डोंगराएवढे दुःख, मोठा भाऊ हरपला’

करतो, बघतो, पाहतो, हे शब्दच अजित पवारांच्या डिक्शनरीत नव्हते

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अजित पवार चुकीला चूक म्हणत होते. ते मनाने अतिशय निर्मळ होते. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला. त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळातही काम केले. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अजित पवारांनी या योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याचे उत्कृष्ट काम केले. त्याचा अनुभव मला आहे. एकदा करायचे ठरवले की ते करायचेच. करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हते. होत नसेल तर होणार नाही असे ते ठामपणे सांगायचे.

असा स्पष्टवक्तेपणा या महाराष्ट्राने पाहिला. मी असेन. मुख्यमंत्री असतील. अजित पवार असतील. आम्ही टिम म्हणून काम केले. आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. दादा पहाटे लवकर उठून कामाला लागत होते. देवेंद्र दिवसभर काम करतात.

ते पुढे म्हणाले, अजित पवारांनी पहाटे 6 वा. वेळ दिल्याचे अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पाहिले आहे. अतिशय वेळेचे महत्त्व व वेळेचे भान ठेवणारा नेता हरवलेला आहे. खरे म्हणजे काल परवाच सरन्यायाधीशांसोबतच्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली. ते येण्यापूर्वी आम्ही तिथेच एका चेंबरमध्ये बसलो होतो. त्यावेळी झालेल्या चर्चा, गप्पा, गोष्टी आज मला त्यांच्या अपघाताची बातमी कळली तेव्हा डोळ्यासमोरून गेल्या.

अजित पवार माझ्यापेक्षा वयाने व राजकारणाने मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक विषय हाताळले होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. मंत्रिमंडळात देखील ज्यावेळी काही विषय यायचे त्यावेळी आपल्य राज्याची आर्थिक परिस्थिती अशी अशी आहे, आपल्या सर्वांना काटकसर करावी लागेल असे ते निर्भिडपणे सांगत होते. शिस्तिचा नेता म्हणूनही त्यांना अनुभवले. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

अजित पवार माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. आमच्यात गत काही वर्षांपासून फार जवळीक निर्माण झाली होती. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी सुद्धा एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. मनात दुःखाच्या फार भावना आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी. हे कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे झालेले नुकसान आहे. मी व मुख्यमंत्री आम्ही बारामतीला जात आहोत.

आम्ही सरकार म्हणून जे काही निर्णय घ्यायचो ते मिळूनच घ्यायचो. एखादी सूचना आली की, त्याला तिघांनी बळ देऊन ते पूर्ण करायचो. अजित पवार कधीकधी असेही म्हणायचे की, नव्या योजनांमुळे आपल्याला काटकसर करावी लागेल. पण जेव्हा काही निर्णय आपल्याला जेव्हा घ्यावेच लागत होते तेव्हा ते मागे हटत नव्हते, याचा अनुभवही आम्ही घेतला आहे.

या अपघातात आमच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. ती नक्कीच होईल. कारण, यापुढेही अशा प्रकारचे अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची चौकशीही होईल.