Home Blog Page 124

प्रीमियम पेट्रोल ₹2.35 प्रति लिटरपर्यंत महागले: सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळत राहील

नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) स्पीड आणि पॉवरसारख्या प्रीमियम पेट्रोलच्या किमती शुक्रवारी ₹2.09-₹2.35 प्रति लिटरपर्यंत वाढवल्या आहेत. अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही वाढ करण्यात आली आहे.ही वाढ वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते. प्रीमियम पेट्रोलच्या वाढलेल्या किमती तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे मानले जात आहे.

प्रीमियम पेट्रोल BPCL चे स्पीड, HPCL चे पॉवर आणि IOCL चे XP95 या नावाने विकले जाते. तर सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळत राहील. सध्या त्यांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि प्रीमियम इंधनात मिसळल्या जाणाऱ्या ॲडिटीव्ह्जची वाढलेली किंमत हे मानले जात आहे. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत ते आधीच 5 ते 10 रुपये महाग असते. आता या वाढीनंतर हा फरक आणखी वाढेल.

सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब ही आहे की, बेस इंधन म्हणजेच सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना हात लावण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी शेवटची मार्च 2024 मध्ये सामान्य पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 2 रुपयांची कपात केली होती. प्रीमियम इंधनाची विक्री एकूण पेट्रोल विक्रीचा एक छोटा भाग असते, त्यामुळे या वाढीचा परिणाम अशा लोकांवर जास्त होईल ज्यांच्याकडे लक्झरी कार किंवा हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स बाईक्स आहेत.

प्रीमियम पेट्रोलचा ऑक्टेन नंबर 95 किंवा त्याहून अधिक असतो. हाय-एंड इंजिन असलेल्या गाड्या याच इंधनावर उत्तम परफॉर्मन्स देतात. किमतीत 2 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याने अशा ग्राहकांचे मासिक इंधन बजेट वाढेल जे आपल्या गाड्यांच्या इंजिनच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या पिकअपसाठी प्रीमियम इंधनच वापरतात. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर आता विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचू शकतात.

बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही काळापासून मार्केटिंग मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे तेल कंपन्या दबावाखाली होत्या. प्रीमियम इंधनाच्या किमती डी-रेगुलेटेड (बाजार आधारित) श्रेणीत येत असल्याने, कंपन्या त्यांच्या किमती बदलण्यासाठी स्वतंत्र आहेत. प्रीमियम इंधन सेगमेंटमध्ये मार्जिन चांगले असते, त्यामुळे कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि मध्य-पूर्वेतील तणावावर सर्वांचे लक्ष असेल. जर कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिल्या, तर येत्या काळात सामान्य पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढवल्या जाऊ शकतात.

युद्धाच्या कारणामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती वाढल्यामुळे कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलचे दर वाढवले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचे दर आज प्रति बॅरल 109.54 डॉलर आहेत. एक दिवसापूर्वी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 117.98 डॉलरवर पोहोचला होता.

तर, भारतात क्रूड तेलाच्या किमती जवळपास दुप्पट होऊन 146 डॉलरवर पोहोचल्या आहेत. भारत इराक, सौदी अरेबिया, रशिया, यूएईकडून तेल खरेदी करतो. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांच्या किमतींची जी सरासरी काढली जाते, त्यालाच ‘इंडियन बास्केट’ म्हणतात.

जगभरात कच्च्या तेलाची ओळख आणि विक्री प्रामुख्याने तीन मोठ्या बेंचमार्कच्या आधारावर केली जाते, ज्यांना ब्रेंट, WTI आणि OPEC बास्केट म्हणतात. ब्रेंट क्रूड उत्तर समुद्रातील (युरोप) सागरी विहिरींमधून काढले जाते आणि जगातील दोन-तृतीयांश तेल व्यापार याच दरावर अवलंबून आहे.

तर WTI अमेरिकेच्या भूभागातून काढले जाते आणि त्याच्या शुद्धतेमुळे अमेरिकन बाजाराचे मुख्य मानक आहे. OPEC बास्केट हे सौदी अरेबिया, इराण आणि इराकसारख्या आखाती देशांच्या संघटनेने (OPEC) उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या कच्च्या तेलांचे सरासरी मिश्रण आहे.

सामान्य कार/बाईक: जर तुमची गाडी 100cc ते 1500cc च्या दरम्यान असेल आणि सामान्य इंजिन असलेली असेल, तर प्रीमियम पेट्रोलची गरज नाही.

लक्झरी/स्पोर्ट्स कार: जर गाडीच्या मॅन्युअलमध्ये 95 ऑक्टेन इंधन असे लिहिले असेल, तर प्रीमियमच टाका, अन्यथा इंजिनमध्ये ‘नॉकिंग’ची समस्या येऊ शकते.

जुनी गाडी: जुन्या गाड्यांच्या इंजिनच्या स्वच्छतेसाठी कधीकधी प्रीमियम इंधन वापरणे फायदेशीर ठरू शकते.

पेट्रोलची गुणवत्ता ‘ऑक्टेन’ने मोजली जाते. सामान्य पेट्रोल 91 ऑक्टेनचे असते. प्रीमियम पेट्रोल 95 किंवा 97 ऑक्टेनचे असते. उच्च ऑक्टेन इंधन इंजिनमधील नॉकिंगला प्रतिबंध करते, त्यामुळे इंजिन सुरळीत चालते.

लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका: तुषार गांधी.

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा थाटात शुभारंभ, शंभराव्या वर्ष पूर्तीचा कार्यक्रमही धडाक्यात करणार..

मुंबई/महाड, दि. २० मार्च २०२६ :

मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे ‘समतेचे अमृत’ असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून ‘समतेचा संदेश’ सर्वदूर पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, गांधीवादी नेते जयंत दिवाण, काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाह आलम शेख, ॲड. श्रद्धा ठाकूर, अमर खानापुरे, फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येना उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिका-यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यावेळी म्हणाले की, चवदार तळ्याची क्रांती ही लोकशाही व संविधानासाठी अत्यंत महत्वाची घटना आहे. अहिंसेच्या मार्गाने ही ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. महाड मधील चवदार तळ्याची क्रांती ही स्वातंत्र्य व समतेसाठी होती. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये पाण्यासाठी सत्याग्रह केला तर त्यानंतर तीन वर्षांनी महात्मा गांधी यांनी मीठासाठी सत्याग्रह केला, या दोन घटनांमध्ये खूप महत्वाचा अर्थ आहे. आजही समाजात समता दिसत नाही. एखादा कार्यक्रम करून हा प्रश्न सुटणार नाही तर गावोगावी हा समतेचा संदेश पोहचला पाहिजे. आजचे सरकार हे काम करणार नाही. महाडच्या घटनेलाही रा. स्व. संघाचे स्वरूप देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. समतेची ही लढाई सर्वांनी मिळून लढली पाहिजे. काँग्रेस एक विचार आहे तसाच रा. स्व संघाचा विचार आहे. संघाचा विषारी विचार संपवला पाहिजे. लोकांमध्ये वाद निर्माण करूनच त्यांचा विचार जिवंत राहू शकतो पण लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच मध्ये गाडून टाका. असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांमुळे असतो, काँग्रेसचा कार्यकर्ता समाजसेवक, सत्याग्रही, व काँग्रेसच्या विचाराचा असतो, आज मात्र यातील पहिले दोन गुण लुप्त पावले आहेत. दुस-या पक्षातील कार्यकर्ते आदेशावर काम करतात पण काँग्रेसचा कार्यकर्ता आदर्शावर काम करतो, असेही तुषार गांधी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज व डॅा.आंबेडकरांना जातीच्या चौकटीत बंद करू नका…
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यावेळी म्हणाल्या की, 20 मार्च 1927 च्या आधी 19 मार्चला महाडच्या गाडीतळावर एक परिषद घेतली होती, त्यात अनेक प्रस्ताव पारित करण्यात आले, त्यावेळी सर्व जातीचे लोक सहभागी झाले होते आता मात्र चवदार तळे सत्याग्रह कार्यक्रम हा केवळ एकच समाज साजरा करतो, हे दुर्दैवी आहे. रायगड जिल्ह्य़ातच महाराष्ट्राचे दोन मानबिंदू आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. ‘शिवराय ते भिमराय’ असा उपक्रम आम्ही मागील 9 वर्षापासून करत आहोत, हा संगर सर्व जाती व धर्मांनी मिळून केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मध्ये ज्या ऐतिहासिक गाडी तळावर परिषद घेतली त्या जागेचे संवर्धन झाले पाहिजे. संविधानाबद्दल भाजपा अपप्रचार केला जातो तो खोडून काढला पाहिजे. संत विचाराचा धागा पुढे आणला पाहिजे. संविधानाची बिजे याच मातीत रुजलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज एकाच जातीचे नाहीत ते सर्व समाजाचे आहेत, त्यांना जातीच्या चौकटीत बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन उल्का महाजन यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी केले. चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष राज्यभर साजरे केले जाणार आहे, अशी माहिती हत्तीअंबिरे यांनी दिली व शंभराव्या वर्षी भव्य प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करू असेही त्यांनी सांगितले.

राजस्थानातील नागौर येथे नवीन हरितक्षेत्र एकात्मिक सिमेंट प्रकल्पात उत्पादनाला सुरुवात

उत्तर भारतात प्रवेश करत JSW सिमेंट विस्तारत आहे आपला ठसा

एकूण जोडणी ग्राइंडिंग क्षमता 24.1 MTPA पर्यंत वाढवली

मुंबई/नागौर (राजस्थान): भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत JSW समूहाचा एक भाग असलेल्या JSW सिमेंटने आज त्यांच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून राजस्थानातील नागौर जिल्ह्यात अत्याधुनिक, हरितक्षेत्र, एकात्मिक सिमेंट उत्पादन प्रकल्पात उत्पादनास प्रारंभ केला आहे. उत्तर भारतातील त्यांचा हा पहिलाच असा प्रकल्प आहे.

उत्तर भारतात या प्रवेशासह कंपनीची एकूण सिमेंट ग्राइंडिंग क्षमता 24.1 MTPA झाली आहे आणि एकूण क्लिंकर उत्पादन क्षमता (कंपनीच्या JSW सिमेंट FZC या संयुक्त उपक्रमासहित क्लिंकर क्षमता) 9.74 MTPA झाली आहे.

नागौर येथील एकात्मिक प्रकल्प 3.30 MTPA क्षमतेचे क्लिंकरायझेशन युनिट आणि 2.50 MTPA क्षमतेच्या सिमेंट ग्राइंडिंग युनिटने सुसज्ज आहे. याशिवाय, या ठिकाणी अतिरिक्त 1.00 MTPA सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे बांधकाम सुरू आहे. महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या या प्रकल्पामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) या उच्च-वाढीच्या बाजारपेठांना सेवा पुरवता येईल.

नागौर युनिटसाठी इक्विटी आणि दीर्घकालीन डेब्ट यांच्या धोरणात्मक मिश्रणातून निधी उभारण्यात आला आहे. कंपनीने आपल्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मधून मिळालेल्या फ्रेश इश्यूच्या निधीतून 800 कोटी रु. या प्रकल्पाच्या अंशतः वित्तपुरवठ्यासाठी विशेषतः राखून ठेवले होते.

याबद्दलची घोषणा करताना JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले: “राजस्थानातील नागौर येथील प्रकल्पात उत्पादनास सुरुवात होणे हा JSW सिमेंटसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीला अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कंपनी बनविण्याच्या मार्गावर दृढपणे उभे करणे हे आमचे उद्दिष्ट आम्ही आमच्या आयपीओ प्रक्रियेच्या वेळी स्पष्ट केले होते. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनामुळे कंपनीने जलदगतीने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आम्ही या प्रदेशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास आणि राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच एनसीआर क्षेत्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यास उत्सुक आहोत. मला अत्यंत आनंद आहे की कंपनीने केवळ 21 महिन्यांत हा ग्रीनफिल्ड एकात्मिक प्रकल्प कार्यान्वित करून आपल्या प्रकल्प अंमलबजावणी क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. या कामाची सुरुवात करून कंपनी आर्थिक वर्ष 29 पूर्वी किंवा तोपर्यंत 41.85MTPA क्षमता साध्य करण्याच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे.”

JSW सिमेंटचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नार्वेकर यांनी पुढे सांगितले: “वेगाने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे ही आमच्यासाठी एक धोरणात्मक प्राधान्याची गोष्ट आहे. या राज्यांमध्ये उच्च वाढ दर आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास होत आहे. नागौर प्रकल्पाद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे, पर्यावरणपूरक सिमेंट आणि जागतिक दर्जाचा सेवा अनुभव पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच जगातील सर्वात शाश्वत सिमेंट उत्पादकांपैकी एक म्हणून आपले स्थान आम्ही कायम राखत आहोत. या विस्तारासह, कंपनी भारतातील 41.85 MTPA मिड टर्म क्षमता लक्ष्याच्या जवळ पोहोचत आहे आणि 60 MTPA क्षमतेच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाकडेही वाटचाल करत आहे.”

हा प्रकल्प शाश्वत उत्पादनाचे आदर्श उदाहरण म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामध्ये किल्नमध्ये पर्यायी इंधनांच्या सह-प्रक्रियेसाठी तरतूद आहे तसेच खाणीतून चुनखडी वाहून नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीमुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी होतो. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पात लवकरच 16 MW क्षमतेचा वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (WHRS) देखील समाविष्ट होणार आहे. त्यायोगे उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता पुनर्प्राप्त करून पुन्हा वापरली जाईल आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ

पुणे -अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असताना, त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांतील छायाचित्रे समोर आल्यानंतर चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली…, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली असून, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरातशी संबंधित ट्रस्टमध्ये चाकणकर यांची भूमिका असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यामुळेच पोलिसांनी कारवाई उशिरा केली का? तसेच, जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर किती महिलांवर अत्याचार झाले असतील, याबाबतही त्यांनी गंभीर शंका व्यक्त केली.

पाटील-ठोंबरे यांनी पुढे सांगितले की, चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्या पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, हा मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर राजीनामा दिला नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवनवीन दावे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली असून या प्रकरणाला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी करत, खरातचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी आहे का, याचा तपास व्हावा असे म्हटले आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर तसेच बारामतीतील निवासस्थानाबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या कृत्यामागे अशोक खरात किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा हात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आढळलेल्या वस्तूंचा आणि खरातचा काही संबंध आहे का? त्याने कोणत्याही प्रकारची काळी जादू केली होती का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून, याबाबत सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या या व्यक्तीकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि नव्याने समोर आलेल्या दाव्यांमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड तर्फे 4,400 दशलक्ष रु. ची प्राथमिक समभाग विक्री 24 मार्च रोजी खुली होणार

10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअर साठी (“इक्विटी शेअर”) किंमतपट्टा 201 रु. ते 212 रु. निश्चित

  बोली मंगळवार 24 मार्च 2026 रोजी सुरु होईल आणि शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिनांक सोमवार, 23 मार्च 2026 असणार आहे.

बोली प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 70 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी शेअर्सच्या पटीत करता येतील.

पुणे- 19 मार्च 2025: अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड (the “Company”) आपली इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री संदर्भातील बोली/ इश्यू मंगळवार 24 मार्च 2026 रोजी खुली करणार असून शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे 4,400 दशलक्ष रु. चा फ्रेश इश्यू आहे.

आतापर्यंत 10 रु. दर्शनी मूल्य असलेले 82,796,840 इक्विटी शेअर्स आहेत.

कंपनीने अंदाजे 4,400 दशलक्ष रु. इतक्या निव्वळ निधीचा उपयोग आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (एकत्रितपणे, the “Object of Issue”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“Book Running Lead Managers” किंवा “BRLMs”) आहेत. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

कंपनीचे इक्विटी शेअर्स 12 मार्च 2026 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे (“RHP”) रजिस्ट्रार ऑफ कंपनिज, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली-II, सेंट्रल दिल्ली (the “RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले असून हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, सिम्बायोसिस महाविद्यालय ऑडिटोरियम, जुना कॅम्पस, विमाननगर, पुणे – ४११०१४ येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य राहणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमात “मोगरा फुलला” या आध्यात्मिक-सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा परिचय करून देण्यात येणार असून श्री. गणेश शिंदे (व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

पुणे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने आधीपासूनच लक्ष घातल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई अचानक नसून पूर्णपणे नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. अशोक खरातविरोधातील व्हिडिओ क्लिप्स आणि इतर संवेदनशील माहिती पोलिसांनी आधीच ताब्यात घेतली होती. या पुराव्यांच्या आधारे कारवाई अधिक मजबूत करण्यात आली. त्यानंतरच पोलिसांना कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेमुळे आरोपीविरुद्ध ठोस केस तयार करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अशोक खरातला पकडण्यासाठी सापळा रचला. अटकेची माहिती मिळताच तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळाच डाव आखला. परिसरात चोरी झाल्याचा बनाव करून पोलिसांनी कारवाई सुरू केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक घरात शिरले, तर दुसरे पथक बाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या संपूर्ण घटनेमुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची चर्चा जोर धरत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकरांनी पद सोडावे, असे म्हटले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची बाजू घेतल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिकच राजकीय रंग चढला आहे.

पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार; नाशिकला ज्याेतिषी खरात अटकेत

नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनुसार, अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ (तृप्ताबाला बंगला, रा. कर्मयोगीनगर) याने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओक‌्स प्रॉपर्टीज‌्च्या ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला जाळ्यात ओढले. दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. ‘तुझे आयुष्य बरबाद करेन’, ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

नेव्ही कॅप्टननंतर खरात थेट ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष

खरातने मर्चंट नेव्हीत २२ वर्षाच्या कारकीर्दीनंतर अंकशास्त्र, ‘कॉस्मॉलॉजी’चा (विश्वशास्त्र) अभ्यास केला. ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत २०१० पासून मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष झाला. २०२२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंदिरात गेले असता खरातने त्यांच्याशीही राजकीय भविष्यावर चर्चा केली. नेव्हीत असताना १५४ देशांचे दौरे केले. १३ भाषा शिकल्या.

सरकार म्हणाले- पॅनिक बुकिंगमध्ये घट; अमेरिकेकडून एलपीजीचा पुरवठा होतोय, किमतीत वाढ नाही

ऑनलाइन सिलेंडर बुकिंग 94% पर्यंत पोहोचली
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या तेल आणि वायू संकटावरील सद्यस्थितीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयातील (MEA) संयुक्त सचिव (गल्फ) असीम महाजन म्हणाले की, ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी एक कसोटीची वेळ आहे.

पेट्रोलियम मंत्रालयातील संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि तेल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, युद्धामुळे एलपीजीची (LPG) स्थिती चिंतेचा विषय बनली आहे. तथापि, देशातील कोणत्याही एलपीजी वितरकाकडे सिलिंडरची कमतरता नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते, देशात ऑनलाइन बुकिंग वाढून ९४% पर्यंत पोहोचले आहे. सुमारे ८३% रिफिल डिलिव्हरी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेट’ कोडद्वारे होत आहे. पॅनिक बुकिंगमध्ये घट होत आहे.

सुजाता शर्मा यांनी सांगितले की, भारतात सुमारे ७०% कच्चे तेल आता होर्मुज सामुद्रधुनीच्या बाहेरील प्रदेशातून येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निश्चितच दबाव आहे, परंतु अद्याप किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की, एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सामान्य आहे. 18 मार्च रोजी सुमारे 57,000 रिफिल बुकिंग झाल्या. सरकारने व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना सीएनजीवर शिफ्ट होण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, अनेक कंपन्यांनी यासाठी प्रोत्साहनपर योजनाही जाहीर केल्या आहेत.

सुजाता शर्मा म्हणाल्या की, मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम होतो, त्यामुळे सरकार इतर ठिकाणांहूनही पुरवठा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान मोदींनी कुवेतच्या क्राऊन प्रिन्सशी चर्चा केली

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी बुधवारी रात्री कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबाह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि अलीकडील घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी कुवेतवरील हल्ल्यांचा तीव्र निषेधही केला.

पंतप्रधान मोदींनी क्राउन प्रिन्सना सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित आणि अखंडित वाहतूक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधानांनी कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी क्राउन प्रिन्सचे आभारही मानले, कारण तेथे मोठ्या संख्येने भारतीय समुदाय राहतो.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सी. सेंथिल राजन यांनी एलएनजी (LNG) सेवांशी संबंधित सोशल मीडिया फसवणुकीबाबत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले- एलएनजी (LNG) ग्राहकांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहावे. अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि गरज पडल्यास पोलिसांत तक्रार करा.

मध्य-पूर्वेतील तणावामुळे देशात एलपीजी (LPG) संकट

अमेरिका-इस्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे देशभरात एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस एजन्सींच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस सिलेंडरची काळाबाजार आणि साठेबाजीही होत आहे.

याच दरम्यान बातम्या आल्या होत्या की, जर ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) केले नाही, तर त्यांचे गॅस कनेक्शन कापले जाईल. ई-केवायसीशी संबंधित या बातम्यांनंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

तथापि, पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले होते की, हा कोणताही नवीन नियम नाही. ई-केवायसीची (eKYC) गरज फक्त त्याच ग्राहकांना आहे, ज्यांची पडताळणी (verification) अद्याप झालेली नाही.

मंत्रालयाने म्हटले होते की, याचा उद्देश फक्त एवढाच आहे की, जास्तीत जास्त गॅस ग्राहकांनी आपली बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून सिस्टीममध्ये फसवणूक होऊ नये.
LPG सिलेंडर बुकिंगचे नियम तीन वेळा बदलले

6 मार्च: घरगुती LPG बुकिंगसाठी लॉक-इन कालावधी 21 दिवसांचा करण्यात आला.

9 मार्च: मागणी वाढल्याने शहरांमध्ये लॉक-इन कालावधी वाढवून 25 दिवसांचा केला.

12 मार्च: ग्रामीण भागांमध्ये सिलेंडर बुक करण्यातील अंतर 45 दिवसांचे करण्यात आले.

पुरवठा संकटाचे कारण होर्मुझ सामुद्रधुनी (स्ट्रेट) जवळजवळ बंद होणे

अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर संयुक्त हल्ला केला, ज्यात अनेक लष्करी आणि अणु ठिकाणे लक्ष्य करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह अनेक अधिकारी मारले गेले. अमेरिकेने याला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले.

या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव निर्माण झाला आणि पुरवठा विस्कळीत झाला. येथून भारताची 80-85% एलपीजी आयात होते. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश आहे आणि 60% पेक्षा जास्त एलपीजी बाहेरून येते.

यामुळे भारतात एलपीजीच्या तुटवड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, परंतु भारत सरकारने लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. सरकारने सांगितले की, देशात एलपीजी आणि तेलाची कोणतीही कमतरता नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. धोका लक्षात घेता, कोणतेही तेल टँकर तेथून जात नाहीत.

जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20% हिस्सा येथून जातो. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत.

प्रेक्षकांच्या विश्वासाचे संरक्षण करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळण्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांचे आवाहन

मुंबई,

“जाहिरातींनी केवळ प्रसार लक्षात न घेता विश्वास निर्माण केला पाहिजे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू यांनी केले. मुंबई येथे आज आयोजित ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेत बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी, भारतात जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात परिसंस्थेच्या उभारणीची तातडीची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी अधोरेखित केली. विशेषतः हे क्षेत्र प्रमाण, गुंतागुंत आणि प्रभाव यांच्या बाबतीत वेगाने वाढत असताना हे अधिक आवश्यक आहे. जाहिरात क्षेत्राने वृद्धी करत राहायला हवे, मात्र या क्षेत्रात, खास करून डिजिटल विश्वात, जबाबदारीने वागणे आवश्यक आहे यावर जाजू यांनी अधिक भर दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दृष्टीकोन विश्वासाची उभारणी, विकासाला पाठबळ आणि जबाबदारीची सुनिश्चिती यावर केंद्रीत आहे, असे ते म्हणाले. 

भारतीय जाहिरात मानक परिषदेतर्फे (एएससीआय) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेसाठी जाहिरात, माध्यमे, तंत्रज्ञान आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिनिधींना जबाबदार जाहिरात क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमयासाठी एकत्र आले. या परिषदेतील चर्चा नव्याने उदयाला येणाऱ्या पद्धती, कायदेशीर चौकटी तसेच नवीन तंत्रज्ञानांचा जाहिरातींच्या पद्धतींवर होणारा परिणाम यांवर केंद्रीत होत्या.

या शिखर परिषदेत बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव जाजू यांनी सांगितले की, जाहिरात हे केवळ एक व्यावसायिक कृती नसून ते बाजारपेठांना आकार देणारे, ब्रँड निर्माण करणारे, ग्राहकांना माहिती देणारे, संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि आकांक्षांवर प्रभाव टाकणारे क्षेत्र आहे. भारतासारख्या मोठ्या आणि वेगाने डिजिटलीकरण होत असलेल्या देशात, जाहिरात हा नवोन्मेष, आर्थिक कृती, कार्यक्रम निर्मिती आणि समावेशन यांचा महत्त्वाचा चालक बनला आहे. डिजिटल मंच आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे घटक आता प्रवेशातील अडथळे कमी करून आणि सहभागाचा विस्तार करून ब्रँड्स, स्टार्टअप्स, स्थानिक व्यवसाय आणि सर्जकांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य करतात.

त्याचवेळी, जाजू यांनी आर्थिक घोटाळे, दिशाभूल करणाऱ्या गुंतवणूक जाहिराती तसेच फसव्या नोकरीच्या संधी यांच्यासह डिजिटल जाहिरातींशी संबंधित जोखमींच्या संदर्भात सावधानतेचा इशारा देखील दिला. अशा जाहिराती बहुतेकदा असुरक्षित जनतेला लक्ष्य करतात असे ते म्हणाले. व्यावसायिक भाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असला तरीही दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींचे नियमन करता येते आणि ते केलेच पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला.

जाहिरात क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, डीपफेक, डार्क पॅटर्न्स तसेच प्रभावक-विरोधी विपणनाकडे वाढता कल यांसारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या समस्यांबाबत सदर परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. त्यांनी जाहिरातदारांना जाहिरातींची पोहोच लक्षात घेतानाच त्यांच्या विश्वासार्हतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या, तर सर्जक आणि प्रभावक यांना अस्सलपणा राखून आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळून प्रेक्षकांचा विश्वास सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या.

जाजू यांनी त्यानंतर जबाबदारीने जाहिरात करण्यासंबंधीची पाच प्रमुख तत्त्वे पुढे विषद केली, ती पाच तत्वे म्हणजे: i) सर्व संवादांमध्ये सत्याशी तडजोड करता कामा नये, ii) जाहिरात, प्रायोजकत्व आणि प्रचारात्मक संबंध ओळखण्यासाठी पारदर्शकतेची आवश्यकता, iii) सर्व आशयाची रचना आणि वितरण मार्गदर्शक असेल याची जबाबदारी, iv) दुर्बल गटांच्या, विशेषतः मुलांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता, v) विश्वासार्हतेसह नवोन्मेष करताना तांत्रिक आणि सर्जनशील प्रगतीमुळे विश्वास कमी होण्याऐवजी तो अधिक दृढ होईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता.

संजय जाजू यांनी शिखर परिषदेत, एएससीआय च्या सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर, मॅडिसनचे अध्यक्ष सॅम बलसारा, एएससीआयचे अध्यक्ष आणि पिडीलाइट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स, एएससीआय संचालक मंडळाचे सदस्य प्रवीण त्रिपाठी आणि खैतान अँड कंपनीचे भागीदार इशान जोहरी आणि तनु बॅनर्जी यांच्यासमवेत ‘जाहिरात कायदा संकलन’ (अ‍ॅडव्हर्टाइजमेंट लॉ कम्पेडियम) चे संयुक्तरीत्या प्रकाशन केले. हे संकलन संपूर्ण जाहिरात उद्योगात अधिक जागरूकता, जाणीव आणि अनुपालनाला प्रोत्साहन देईल तसेच जाहिरातविषयक कायदे आणि नियमांच्या बाबतीत व्यावहारिक मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी एएससीआय च्या नेतृत्वासह, विपणनकर्ते, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कायदेविषयक क्षेत्रातील सदस्यांसह जाहिरात उद्योगातील भागधारकांसोबतही बैठक घेतली.

”राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर केवळ चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

थिएटरमध्ये गाजणार ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर; ‘धुरंधर द रिव्हेंज’ सोबत खास सादरीकरण

स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर *

मुंबई: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.

या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

भव्यतेचा नवा अध्याय, इतिहासाची थरारक गर्जना भारतासह जगभरात गाजण्यासाठी भव्य पडद्यावर सज्ज झाली आहे…

२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे.

तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार असून, शास्त्रीय गायन, वादन, नाट्यसंगीत आणि नृत्य यांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :
२० मार्च रोजी सायंकाळी  ‘स्वराभिषेक’ या संकल्पनेतून नाट्यभाव भक्ती संगीताची विशेष मैफल सादर होणार आहे. यामध्ये राजयोग धुरी, विश्वजित मैत्रेयी, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

२१ मार्च रोजी सकाळी ९ वा. च्या सत्रात शर्वरी दिघेकर-फोकळे यांचे गायन, पार्थ भुमकर व प्रथ्मेश तारळकर यांचे जुगलबंदी सादरीकरण आणि श्रुती ढोकळकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता  पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रंगणार आहे.

२२ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सत्रात निवेद व्यास, अनुपम जोशी (सरगम) आणि जयंत केजकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात नयनिका घोष यांचे कथक नृत्य, पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन आणि विदुषी डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’  मध्ये रसिकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ओळखा पाहू हे डोळे कुणाचे ?

तुंबाडची मंजुळा चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता !

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यातील डोळे नेमके कुणाचे आहेत? हे कलाकार कोण आहेत? या काळया पोपटाचे रहस्य काय ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. सोबतीला “गावात सारी चर्चा रे गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत ” अशा गाण्याच्या ओळी ऐकायला येत आहेत. यामुळे या गावाबद्दलची यातील कलाकाराबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.


या आगळ्यावेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की,” तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अनेक वर्षानंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा, त्याचा विषय अतिशय मनोरंजक असल्यामुळे याबद्दल प्रदर्शित होणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उत्सुकतापूर्ण तथा वेगळी असावी या विचारानेच या पोस्टरची ही कल्पना आम्हाला सुचली. या पोस्टर मध्ये दिसणारे गाव आणि हे गावकरी सर्वच अतरंगी असून आता टप्प्याटप्प्याने यातील एक एक गोष्ट उघड करू ज्यामुळे सर्वांची उत्कंठा आणखीनच वाढेल हे निश्चित.”

झी स्टुडिओजच्या वतीने उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर विविध कोरगांवकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

महाडमध्ये शुक्रवारी काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम.

मुंबई:
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासह अनेक मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच काँग्रेस पक्षाने कार्य केले आहे. काँग्रेस पक्षाने सत्तेचा वापर हा नेहमीच महिला, वंचित, शोषित, दलित, आदिवासी, बहुजनांच्या कल्याणासाठी केला आहे. ज्या ऐतिहासिक घटनेने बाबासाहेबांनी क्रांतीचा पाया रचला त्या क्रांतीकारी घटनेची शताब्दी काँग्रेस पक्षातर्फे साजरी करून बाबासाहेबांना व त्यांच्या क्रांतीला अभिवादन केले जाणार आहे. २० मार्च २०२६ ते २० मार्च २०२७ हे वर्ष काँग्रेस पक्षातर्फे “चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष” म्हणून साजरे केले जाणार आहे. सामाजिक न्यायाशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समतेशिवाय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही प्रत्यक्षात अवतरणार नाही. हे लक्षात घेऊन “सामाजिक न्यायातून समतेकडे” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.