Home Blog Page 123

हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयात ईव्हीएम कमिशनिंग यशस्वी – मतदानासाठी यंत्रे सज्ज!

0

पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हवेली निवडणूक कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार अर्चना निकम, तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक अधिकारी किशोर पाटील आणि गजानन किरवले यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पडली. या प्रक्रियेत, सेक्टर ऑफिसरने नामनिर्देशित केलेल्या प्रत्येक मतदान केंद्रासाठी ईव्हीएम यंत्रांची कार्यक्षमता तपासण्यासाठी प्रत्येक यंत्रावर अभिरूप मतदान (mock poll) घेण्यात आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ईव्हीएम यंत्रांवर अभिरूप मतदानाद्वारे यंत्रांची कार्यक्षमता आणि विश्वासाहर्ता तपासण्यात आली


यामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक दोष नाही, याची खात्री करण्यात आली आणि यंत्रे शीलबंद करून मतदानासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अत्यंत काटेकोरपणे राबवण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक यंत्राची तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहिली. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी देखील या प्रक्रियेत सहभागी झाले होते, त्यामुळे सर्व संबंधित पक्षांना यंत्राच्या कार्यक्षमतेबाबत पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे. या प्रक्रियेत यंत्रांमध्ये उमेदवारांचे चिन्ह (सिम्बॉल)
अपलोड करण्यात आले. यंत्रांमध्ये चिन्हे तसेच सर्व तांत्रिक घटक योग्य प्रकारे कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ही तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व यंत्रे शीलबंद करण्यात आली आणि निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.जिल्हा निवडणूक शाखेने सर्व उमेदवारांना मतदान केंद्रांवरील यंत्रांची यादी त्वरित उपलब्ध करून दिली असून, कोणतीही दिरंगाई न करता यादी वितरणाचे काम वेळेवर पूर्ण केले आहे. यामुळे उमेदवारांना आवश्यक माहिती वेळेवर प्राप्त झाली आहे आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल त्यांना विश्वासार्हता वाटत आहे. निवडणूक अधिकारी डॉ. माने यांनी याबाबत सांगितले की, “मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास वाढावा यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे. यामुळे आगामी निवडणुकीत मतदारांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मतदानाचा अनुभव मिळेल.”

अजित पवारांच्या विमान अपघाताचीAAIB संस्थेकडून चौकशी सुरू

0

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीच्या विमानतळावर लँड करत असतानाच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता याची चौकशी एएआयबी या संस्थेने सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.

विमान अपघात तपास ब्यूरो (AAIB) या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी म्हटले की, विमान अपघात ब्यूरो या संस्थेने तपास सुरू केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरू केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.

चौकशीचा अहवाल राज्य सरकारलाही देणार

तसेच पुढे बोलताना किंजरापु राममोहन नायडू म्हणाले, या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ, अशी माहिती नायडू यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रात असे म्हटले की, अजित पवार यांच्यासारख्या अतिशय वरिष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह आणखी 4 जणांना यात प्राण गमवावे लागले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात असे अपघात घडणार नाहीत या दृष्टीने तातडीने पाऊले उचलण्यात यावी, अशी देखील मागणी फडणवीसांनी पत्रातून केली होती.

दृश्यमानता कमी तर CCTV फुटेज इतके स्पष्ट कसे? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल

पुणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. विमान लँड करत असताना दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली आहे.

सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले की, बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होते. जर तिथे धुक्याचे वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या, काल लगेच यावर बोलणे संकेताला धरून नसले तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असे सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजितदादांच्या नंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगले आहे? साहेबांचे राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पत्र पाठवून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार याची चौकशी एएआयबी संस्थेकडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंतिम दर्शन

बारामती, दि.२९ : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. यावेळी त्या अत्यंत भावुक झाल्या असून, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.

डॉ. गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

“वेळेवर येणारे दादा वेळेआधीच गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये त्यांचे उत्तम जमले होते. असे अर्ध्यावर डाव सोडून गेल्याने खूप वाईट वाटत आहे,” अशी भावना डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

मुंबई, दि. 29 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

मा. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

अशोक लेलँडतर्फे वैशिष्ट्यपूर्ण TAURUS आणि HIPPO हे हेवी-ड्युटी ट्रक्स पुन्हा सादर

0

पुणे -: हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि देशातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या अशोक लेलँडने आज TAURUS आणि HIPPO हे आपले दोन अत्यंत महत्वपूर्ण ट्रक्स पुन्हा सादर केले. आधुनिक युगासाठी पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या या मॉडेल्समध्ये TAURUS हा उच्च हॉर्सपॉवर टिपर रेंजचे प्रतिनिधित्व करतो, तर HIPPO ट्रॅक्टर पोर्टफोलिओचा कणा आहे. त्यांच्या पुनर्सादरीकरणामुळे मजबुती आणि विश्वासार्हतेचे प्रतीक ठरलेली ही नावे पुन्हा एकदा बाजारपेठेत परतली असून, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नव्याने डिझाइन करण्यात आले आहे.

या वाहनांचे अनावरण अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी MHCV अध्यक्ष श्री. संजीव कुमार आणि नॅशनल सेल्स हेड श्रीमती माधवी देशमुख यांच्यासह मान्यवर ग्राहक, डीलर्स आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च उत्पादकता, सुधारित अपटाइम, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि चालकांना  आराम मिळण्याच्या दृष्टीने सुधारित सेवा यांसह नवीन TAURUS आणि HIPPO रेंज फ्लीट ऑपरेटर्सना अधिक चांगले लाइफसायकल इकॉनॉमिक्स आणि जास्त नफाक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. अशोक लेलँडच्या प्रगत AVTR मॉड्युलर ट्रक प्लॅटफॉर्मवर आधारित या नव्या रेंजमध्ये विविध कॉन्फिगरेशन्स आणि फीचर पर्यायांमुळे अधिक लवचिकता उपलब्ध आहे. TAURUS आणि HIPPO हे दोन्ही मॉडेल्स भारतभरातील अशोक लेलँड डीलरशिप्समार्फत नोंदणी आणि डिलिव्हरीसाठी उपलब्ध असतील.

अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अग्रवाल म्हणाले, “TAURUS आणि HIPPO हे खाणकाम, पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील हेवी-ड्युटी गरजांसाठी खास तयार करण्यात आले आहेत. ही नवीन ट्रक रेंज अशोक लेलँडच्या A-Series 6-सिलेंडर इंजिन्सवर चालते. अतुलनीय टिकाऊपणा आणि विश्वासार्हता, अधिक उत्पादकता आणि जलद टर्नअराउंड टाइम्स सादर करत त्यामध्ये आता इंडस्ट्रीतील आघाडीचा पीक टॉर्क आणि पॉवर उपलब्ध आहे.”

अशोक लेलँड MHCV अध्यक्ष श्री. संजीव कुमार संजीव कुमार म्हणाले, “HIPPO आणि TAURUS ही केवळ उत्पादनांची नावे नाहीत; ती भारतीय वाहतूकदारांच्या अनेक पिढ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या दंतकथा बनली आहेत. भारतीय महामार्गांपासून ते खाण क्षेत्रांपर्यंत हेवी-ड्युटी परफॉर्मन्सचे हेच प्रतीक ठरले आहे आणि हाच वारसा आम्ही पुढे नेत आहोत. टिपर्स आणि ट्रॅक्टर्स हे MHCV उद्योगातील सर्वात वेगाने वाढणारे विभाग असून भारताच्या पायाभूत सुविधा विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कठीण भूभाग आणि अत्यंत टोकाच्या परिस्थितींमध्ये काम करणाऱ्या या वाहनांना उत्कृष्ट विश्वासार्हता, मजबुती आणि चालकांना आरामाची गरज असते. नवीन TAURUS आणि HIPPO या सर्वमान्य मजबुतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देतात. कामकाजाची सुलभता, चालकाचा थकवा कमी करणे आणि यातील भागांचा टिकाऊपणा वाढवणे यामध्ये आम्ही लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. अधिक टिकाऊ ड्राइव्हट्रेन आणि जलद टर्नअराउंड टाइम्स यांसारखी वैशिष्ट्ये थेट जास्त अपटाइम आणि अधिक नफ्यात रूपांतरित होतील. या सादरीकरणातून ग्राहक-केंद्रित नवकल्पना आणि कामकाज उत्कृष्टतेबाबत असलेली आमची बांधिलकी अधोरेखित होते.”

परंपरेचे पुनर्सादरीकरण

TAURUS आणि HIPPO ही नावे अनेक दशकांची सिद्ध कामगिरी आणि ग्राहकांचा विश्वास घेऊन येतात. 1980 च्या दशकापासून 2000 च्या सुरुवातीपर्यंत HIPPO च्या अत्यंत यशस्वी प्रवासामुळे ते त्या काळातील निश्चित हेवी हॉलर ठरले. हेवी-ड्युटी अ‍ॅग्रीगेट्ससह सुसज्ज असलेल्या या वाहनाने विश्वासार्हता, मजबुती, पॉवर आणि अतुलनीय टिकाऊपणासाठीची अढळ प्रतिमा निर्माण केली. फ्लीट मालकांसाठी हे नाव कधीही निराश न करणाऱ्या विश्वासू वर्कहॉर्सच्या आठवणी जागवते.

TAURUS ने भारतातील पहिला मल्टी-अ‍ॅक्सल ट्रक म्हणून आपला ठसा उमटवत हेवी-ड्युटी ऑपरेशन्ससाठी मापदंड निश्चित केले. कठीण, आव्हानात्मक परिस्थितीत सातत्याने काम करण्याची त्याची क्षमता देशभरातील उच्च लोड कामांसाठी त्याला पहिला पसंतीचा पर्याय बनवत होती. आजही भारतभरातील अनेक फ्लीट ऑपरेटर्स मल्टी-अ‍ॅक्सल टिपर्सना “TAURUS” असे म्हणतात. उद्योगक्षेत्रावर या नावाचा असलेला दीर्घकालीन प्रभाव आणि व्यावसायिक वाहन क्षेत्रावर त्याने उमटवलेली अमीट छाप याचे हे द्योतक आहे.

अत्याधुनिक कामगिरी

नवीन TAURUS आणि HIPPO रेंज हा वारसा जपत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. 8.0-लिटर A-Series 6-सिलेंडर इंजिनवर चालणाऱ्या या ट्रक्स रेंजमध्ये 360 HP पॉवर आणि 1,600 Nm इतका सर्वोत्तम-इन-क्लास टॉर्क मिळतो. मजबूत चासिज, हेवी-ड्युटी ड्राइव्हट्रेन आणि उत्कृष्ट स्थिरतेमुळे ही वाहने अत्यंत कठीण वापर उपयोजनाच्या वेळीही अतुलनीय टिकाऊपणा आणि चालकांना अधिक चांगला आराम देतात.

TAURUS मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आणि आव्हानात्मक खाण क्षेत्रासाठी डिझाइन करण्यात आला असून, सिद्धहस्त टिपर परंपरा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचे संयोजन सातत्यपूर्ण उच्च कार्यक्षमता देते. HIPPO हे बल्क कमोडिटीज, औद्योगिक कच्चा माल आणि ODC वाहतुकीसारख्या हेवी-ड्युटी कामांसाठी तयार करण्यात आले आहे. सुधारित केबिन कम्फर्ट, अधिक टिकाऊ ड्राइव्हट्रेन आणि जलद टर्नअराउंड टाइम्समुळे TAURUS आणि HIPPO दोन्ही मॉडेल्स आधुनिक फ्लीट ऑपरेटर्सना अपेक्षित असलेली उत्कृष्ट पुलिंग पॉवर, कामकाज कार्यक्षमता आणि लाइफसायकल इकॉनॉमिक्स पुरवितात.

अनेक दशकांच्या अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर आणि देशव्यापी मजबूत नेटवर्कसह, अशोक लेलँड व्यावसायिक वाहन उद्योगातील आपले स्थान अधिक मजबूत करत नाविन्यपूर्ण, विश्वासार्ह आणि मूल्याधारित MHCV उपायसुविधा देत आहे. TAURUS आणि HIPPO सह, अशोक लेलँडने व्यावसायिक वाहन क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक दृढ केले असून उच्च हॉर्सपॉवर MHCV विभागामध्ये नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.

ऍक्सिस बँक:ठेवींमध्ये आणि कर्जवाढीत अनुक्रमे 15% आणि 14% अशी मजबूत वार्षिक वाढ

0

स्थिर NII आणि सुदृढ फी उत्पन्नाच्या आधारावर कोर ऑपरेटिंग नफा तिमाहीदरतिमाही (QoQ) 9% ने वाढलातर निव्वळ नफा (PAT) 28% ने वाढला

पुणे-भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज Q3FY26 चे निकाल जाहीर केले असून, ₹6,490 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. Q3FY26 मध्ये बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वार्षिक 5% आणि तिमाहीत 4% वाढून 14,287 कोटी झाले. Q3FY26 साठी बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 3.64% होते. तिमाही सरासरी शिलकीचा (QAB) विचार करताएकूण ठेवी तिमाही आधारावर 5% आणि वार्षिक आधारावर 12% ने वाढल्या. MEB CASA गुणोत्तर 39% होतेजे मोठ्या बँकांमधील सर्वोत्तम बँकेपैकी एक आहे. 31 डिसेंबर 2025 रोजीबँकेचे नोंदवलेले एकूण NPA आणि निव्वळ NPA अनुक्रमे 1.40% आणि 0.42% पर्यंत सुधारलेजे 30 सप्टेंबर 2025 रोजी 1.46% आणि 0.44% होते. Q3FY26 साठी शुल्क उत्पन्न वार्षिक आधारावर 12% वाढून 6,100 कोटी झाले. किरकोळ शुल्क वार्षिक आधारावर 12% वाढलेआणि बँकेच्या एकूण शुल्क उत्पन्नाच्या 71% होते. एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (CAR) 16.55%​​होतेतर CET 1 गुणोत्तर 14.50% होतेजे तिमाहीच्या तुलनेत 7 बेसिस पॉइंट्सने वाढले.

संपत्ती व्यवस्थापन व्यवसाय हा बँकेच्या भारतातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक आहेज्याच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 31 डिसेंबर 2025 रोजी ₹6,87,738 कोटी रुपये होतीज्यात गेल्या तिमाहीत 7% आणि वार्षिक 8% वाढ झाली. बँकेच्या देशांतर्गत उपकंपन्यांनी स्थिर कामगिरी केली असूनआर्थिक वर्ष 26च्या पहिल्या 9 महिन्यांत त्यांचा निव्वळ नफा (PAT) ₹1,490 कोटी रुपये होताजो गेल्या वर्षाच्या तुलनेत 6% जास्त आहे.

बँकेने आपला चांगलाच विस्तार केला असून 31 डिसेंबर 2025 रोजी देशांतर्गत 6,110 शाखा आणि विस्तार काउंटर तसेच 3,315 केंद्रांमध्ये स्थित 281 बिझनेस करस्पॉन्डंट बँकिंग आउटलेट्स (बीसीबीओ) इतके होते. 31 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत शाखा आणि विस्तार काउंटर 5,706 होत्यातर 3,122 केंद्रांमध्ये स्थित 202 बीसीबीओ होते.

ऍक्सिस बँकेचे एमडी अँड सीईओ अमिताभ चौधरी म्हणालेग्राहकांच्या आवश्यक गरजांवर तातडीचे उपाय शोधण्याकडे असलेले आमचे लक्ष म्हणजे या तिमाहीतील आमची प्रगती. यात कर्जाची सुलभ उपलब्धताडिजिटल बँकिंगची पुनर्कल्पना आणि भविष्य घडवणाऱ्या कल्पनांमध्ये गुंतवणूक करणेयाचा समावेश होतो. आमचे प्लॅटफॉर्म आधुनिक करूनआमच्या कर्मचाऱ्यांना सक्षम करून आणि स्मार्ट तसेच क्रांतिकारी उपायांद्वारे ग्राहकांच्या वर्तनातील बदलांच्या पुढे राहून आम्ही आमची स्पर्धात्मकता सातत्याने अधिक मजबूत करत राहू.” 

सर्व्हायकल कॅन्सर :वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती महिना : टाटा एआयए हेल्थ बडीमुळे कुटुंबांसाठी प्रतिबंधात्मक सोपा  सहज उपाय उपलब्ध

मुंबई२८ जानेवारी २०२६ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) अनेकदा शांतपणे वाढतो, लक्षात न येता राहतो आणि गंभीर परिणाम घडवतो. पण ही परिस्थिती बदलू शकली, तर? या आजाराचा प्रतिबंध आजच आपल्या आवाक्यात असेल, तर?

सर्व्हायकल कॅन्सर : टाळता येणारे संकट

सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण या आजाराचे असतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे, यापैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना हा आजार वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो. तरीसुद्धा, ३० ते ४९ वयोगटातील केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी आजपर्यंत या आजाराची तपासणी करून घेतलेली आहे (स्रोत: hpvcentre.netcdc.govwho.int). हे त्यांच्या उदासीनतेमुळे होत नाही, तर अनेक महिलांना योग्य माहिती, सुविधा आणि वेळेवर मदत मिळत नाही म्हणून असे होते. यावरचा उपाय सोपा आहे. प्रतिबंधासाठी आधीच एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) ही लस घेणे, हा ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळविण्याचा प्रभावी मार्ग आहे.

प्रतिबंधाची सुरुवात वेळेवर कृतीपासून होते

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याआधीच एखाद्या कुटुंबाने पावले उचलली तर काय? टाटा एआयए हेल्थ बडी कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण घेण्यास सक्षम करते. ‘हेल्थ बडी’च्या सुविधांमधून ‘एचपीव्ही’चे लसीकरण सहज उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांना ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळवता येते, तेही सवलतीच्या दरात. बाहेर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स घेण्याचा त्रास आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. त्यांपासून टाटा एआयए सुटका करून देते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणे कुटुंबांसाठी सोपे होते.

‘टाटा एआयए हेल्थ बडी’चा वापर ग्राहक कंपनीच्या अ‍ॅपवर करू शकतात:

अॅंड्रॉईड : गूगल प्लेवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप
आयओएस : अॅप स्टोअरवरवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसमधील मार्केटिंग विभागाचे चीफ ऑफ प्रॉडक्ट्स सुजीत कोठारे म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांना भेडसावणारा खूप मोठा धोका आहे, पण त्याचा प्रतिबंध आपल्या हातात आहे. एचपीव्ही लसीकरणासारखे सक्रिय पाऊल वेळेवर उचलल्यास आपण आगामी पिढ्यांचे संरक्षण करू शकतो. महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने देण्यासाठी आम्ही ‘टाटा एआयए’मध्ये कटिबद्ध आहोत. आमच्या टाटा एआयए हेल्थ बडी सुविधांद्वारे आम्ही एचपीव्ही लसीकरणावर खास सवलत देत आहोत. त्यातून आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्या आरोग्यकल्याणाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक बळकट करतो. एकत्र येऊन आपण ‘सर्व्हायकल कॅन्सर’विरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.”

फक्त लसीकरणापुरतीचच नव्हेस तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण साथ

सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध ही केवळ सुरुवात आहे. टाटा एआयए हेल्थ बडी हे अॅप कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यप्रवासात साथ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात पुढील सुविधा मिळतात:

·         डॉक्टरांशी सल्लामसलत : गरज पडेल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज मिळतो.

·         आरोग्य तपासण्या : नियमित तपासण्यांमुळे आरोग्याची योग्य वेळी काळजी घेता येते.

·         दुसऱ्या डॉक्टरांचे मत आणि केस मॅनेजमेंट : गंभीर आजाराच्या काळात कुटुंबाला समर्पित आणि विश्वासार्ह मदत.

·         अतिरिक्त बचत : डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांवर आणि लॅब चाचण्यांवर सवलत.

या सेवा फक्त सोयीसाठी नाहीत, तर कुटुंबाला योग्य निर्णय घेण्यासाठी, तसेच आवश्यक ती माहिती, आधार व प्रत्येक टप्प्यावर आपली काळजी घेतली जात आहे ही मानसिक शांती देण्यासाठी आहेत.

संपूर्ण कुटुंबासाठी खरे फायदे

आरोग्याशी संबंधित निर्णयांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी असो, आपल्या माणसांची काळजी घेणे ही सगळ्यांचीच सामायिक जबाबदारी आहे. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’मुळे संपूर्ण कुटुंबाला आवश्यक आरोग्यसेवा सहज उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी सक्षम होतो. हे फायदे केवळ पॉलिसीधारकांपुरते मर्यादित नाहीत. टाटा एआयए हे लाभ नामनिर्देशित व्यक्तींना (नॉमिनी) आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही उपलब्ध करून देते.

दृष्टीकोनात बदल : आरोग्याचीही काळजी घेणारा आयुर्विमा

आयुर्विमा हा फक्त आर्थिक संरक्षणापुरता न राहता आरोग्याचीही काळजी घेणारा असेल तर? तो वेळेवर प्रतिबंध, लवकर कृती आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन यांवर आधारित असेल तर? टाटा एआयए हा दृष्टिकोन जोपासत आहे. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’द्वारे कंपनी केवळ कुटुंबाच्या आर्थिक भविष्याचे संरक्षण करत नाही, तर निरोगी राहण्यासाठी, योग्य माहिती मिळवण्यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेण्यासाठी कुटुंबाला सक्षम करीत आहे.

टाटा एआयए हेल्थ बडी योजना – नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड वैयक्तिक आरोग्य उत्पादन
(यूआयएन: 110N183V01)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांना बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले आहे. 

या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांसह कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे  आणि सेवेकरी व भाविक देखील उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते होते. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच अजितदादा पवार यांच्या सोबत असताना अपघातात निधन पावलेल्या मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

मंदिरासमोर ही रंगावली साकारण्यात आली असून रविवार, दि. १ फेब्रुवारी पर्यंत ठेवण्यात येणार आहे. श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या कलाकारांनी ही रंगावली साकारली आहे. तब्बल २० बाय २५ फूट आकारातील ही भव्य रंगावली पाहण्यासाठी आणि अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा होणार गौरव

0

गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपतर्फे जीवीस अवॉर्ड्स २०२६सीझन ५ चे आयोजन

अर्ज नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ अंतिम तारीख असेल

पुणे , २९ जानेवारी २०२६ – गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्स विभागाने भारतातील वास्तुकला आणि अंतर्गत सजावट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी जीवीस अवॉर्ड्स २०२६ची घोषणा केली आहे. यंदाचे या पुरस्काराचे ५वे पर्व आहे. या वार्षिक पुरस्कारांद्वारे देशभरातील नाविन्यपूर्ण प्रकल्प, अफाट कल्पकता आणि पर्यावरणपूरक शाश्वत डिझाइन पद्धतींचा सन्मान केला जाणार आहे. देशभरातील सर्व वास्तुविशारद आणि डिझाइर्नसाठी ही स्पर्धा खुली असून, नामांकित तज्ज्ञांच्या समितीद्वारे या प्रवेशिकांचे मूल्यमापन केले जाईल. मार्च २०२६मध्ये एका भव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लबचा एक भाग असलेला हा उपक्रम, उद्योगातील व्यावसायिकांना एकत्र आणून डिझाइनवर आधारित विचारसरणीला चालना देण्यासाठी आयोजित केला जातो.

खालील तारखांनुसार कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले जाईल:

·         पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत३१ जानेवारी २०२६

·         प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची घोषणा७ फेब्रुवारी २०२६

·         निवड समितीच्या पाहणीत थेट प्रक्षेपणातून होणारी अंतिम फेरी : १३ आणि १४ फेब्रुवारी २०२६

·         विजेत्यांची घोषणा आणि पुरस्कार सोहळा७ मार्च २०२६

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात निवासी, व्यावसायिक, संस्थात्मक आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रांतील एकूण १५ श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांचे सर्वोत्तम काम प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पूर्ण झालेले प्रकल्प ग्राह्य धरले जातील.

जीवीस अवॉर्ड्स २०२५ बद्दल उत्साह व्यक्त करताना, गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे बिझनेस प्रमुख श्रीश्याम मोटवानी म्हणाले, ‘’जीवीस हे नेहमीच डिझाइनमधील उत्कृष्टता तसेच घर आणि कार्यालयीन स्थळांचे डिझाइन घडवणा-या व्यक्तींचा सन्मान करणारे व्यासपीठ ठरले आहे. यंदाच्या ५व्या पर्वात आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सकडून नाविन्यपूर्ण, जबाबदार आणि माणूस-केंद्रित डिझाइन उपायांद्वारे सातत्याने नवे मापदंड सादर करण्याचे कौशल्य पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आतापर्यंत २ हजारांहून अधिक नामांकने प्राप्त झाली आहेत. यंदाच्या पर्वात सखोल आणि विचारपूर्वक नियोजन दाखवणारे तसेच डिझाइन उत्कृष्टतेचे निकष नव्याने ठरवणारे प्रकल्प अनुभवण्याची आम्हांला उत्सुकता आहे.’’  

देशातील प्रसिद्ध आर्किटेक्ट्स, डिझाइन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ या पुरस्कार सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून कामकाज पाहतील. यंदाच्या पर्वातील विजेत्यांच्या निवडीसाठी आर्किटेक्ट कोलकाता येथील विवेक सिंग राठोड (सॅलियंट), अहमदाबादचे आर्किटेक्ट हार्टमुट (ब्लॉटर), मुंबईचे आर्किटेक्ट यतिन पटेल (डीएसपी डिझाइन असोसिएट्स), दिल्लीचे आर्किटेक्ट सौरश चंद्रा (डीडीएफ कन्सल्टंट्स), पुण्यातील आर्किटेक्ट राहुल साठे(सीसीबीए), दिल्लीचे आर्किटेक्ट चरणजीत सिंह शाह (क्रिएटीव्ह ग्रुप) यांसारख्या दिग्गज व्यक्ती परिक्षक म्हणून निमंत्रित केले आहेत. विविध प्रकारच्या वास्तुकलेत या तज्ज्ञांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवांसह सामूहिक संवाद आणि ज्ञानाच्या बळावर पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाईल. पुरस्कार निवडीची प्रक्रिया अत्यंत काटोकोरपणे, पारदर्शक आणि विश्वासार्हतेने पार पाडली जाईल.

या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले भारतीय वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकार यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वांनी आपली कुशलता नामांकित परीक्षकांच्यासमोर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवीस अवॉर्ड्स हे डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टतेचे आणि मानाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. या स्पर्धेतील विजेत्यांचा मार्च २०२६मध्ये एक भव्य सोहळ्यात सन्मान केला जाईल. यासह विजेत्यांना गोदरेजचे विविध प्लॅटफॉर्म्स आणि भागीदार माध्यम समूहांच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्धी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळेल.

अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी https://www.geeveesawards.com/sign-up या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संपर्क क्रमांक – +918657028166

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद,बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर

पुणे : आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले.

एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. 

तब्बल १५ क्रीडा प्रकारांत१५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम)ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरीडॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले.

बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.

बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली.

फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले.

कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले.

टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.

भारती विद्यापीठाकडे क्रिकेट करंडक

स्पर्धेतील सर्वांत रोमांचक ठरलेल्या क्रिकेट अंतिम सामन्यात भारती विद्यापीठाने निकमार विद्यापीठावर ७४ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. भारती विद्यापीठाच्या ओम खटावकरने १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने अवघ्या ५४ चेंडूंमध्ये नाबाद ९२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारती विद्यापीठाने ७ बाद २३२ धावा, तर प्रत्युत्तरात निकमार विद्यापीठाने ७ बाद १५८ धावा केल्या. महिलांत अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा पराभव करत करंडक पटकाविला.

फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीला ठाण्यात अखेरचा निरोप

कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार

महाराष्ट्रातील बारामती येथे बुधवारी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा कर्मचारी, दोन वैमानिक आणि एक महिला क्रू सदस्य अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर विमानातील सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर दिल्लीत आणि क्रू सदस्य पिंकी माळी यांच्यावर मुंबईतील ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमानाचे वैमानिक सुमित कपूर यांच्यावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी (PSO) विदिप दिलीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार झाले होते.
अजित पवार यांचे सुरक्षा कर्मचारी विदिप दिलीप जाधव यांच्यावर बुधवारी रात्री त्यांच्या मूळ गावी साताऱ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. 9 वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. दिलीप यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन अखेरचा निरोप देण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. जाधव गेल्या चार वर्षांपासून पवारांसोबत काम करत होते. ते 2009 पासून मुंबई पोलिसात होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी संध्या, एक मुलगी, एक मुलगा आणि त्यांचे आई-वडील आहेत.

गुरुवारी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. पार्थिव शरीर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शांभवी ग्वाल्हेरची रहिवासी होती. ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या शांभवीची आजी गुरुवारी सकाळी नातेवाईकांसह दिल्लीला रवाना झाली. शांभवीने मृत्यूच्या काही तास आधी आजीलाच शेवटचा मेसेज केला होता.
विमान अपघातात प्राण गमावलेले कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर आज संध्याकाळी किंवा उद्या दिल्लीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पंजाबी बाग येथील त्यांच्या घरी लोकांची गर्दी जमली आहे. शेजारी आणि नातेवाईक कुटुंबीयांना सांत्वन देण्यासाठी पोहोचत आहेत.

कॅप्टन कपूर यांच्याकडे 16 हजार तासांपेक्षा जास्त फ्लाइट टाइमचा अनुभव होता. त्यांनी सहारा, जेटलाइन आणि जेट एअरवेजसोबत काम केले होते.

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा:मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी

पुणे- राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, ही भेट नेमकी कशाबद्दल होती, याची माहिती अजून पुढे आली नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी बारामतीत हजारोंचा जनसागर उसळला होता. सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. आपल्या लाडक्या ‘दादा’ला अखेरचा निरोप देताना संपूर्ण बारामती भावुक झाली होती.

अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. चिता पेटताना उपस्थितांची मने सुन्न झाली होती. अंत्यसंस्काराच्या संपूर्ण विधी दरम्यान पार्थ पवार आणि जय पवार हेच प्रमुखपणे समोर उभे राहून सर्व मान्यवरांच्या भेटी घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य खाली बसून होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा पार्थ आणि जय पवार यांच्यावर खिळल्या होत्या. अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून हे दोघे पुढे येणार, असे संकेत यातून मिळाल्याची चर्चा सुरू झाली.

अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अर्थमंत्री, बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागा कोण भरणार, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना अधिकच धार दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे. झिरवाळ यांच्या या मागणीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने तातडीने निर्णय घ्यावा, असा संकेत या विधानातून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अंत्यसंस्काराच्या दिवशीच अशी मागणी समोर आल्यामुळे तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

पवार कुटुंबीय हे कायमच राजकारणात प्रॅक्टिकल आणि दूरदृष्टीने विचार करणारे मानले गेले आहेत. परिस्थितीची गरज, पक्षाची दिशा आणि सत्तासमीकरणे ओळखून निर्णय घेण्याची परंपरा या कुटुंबाची राहिली आहे. त्यामुळे एका बाजूला अजित पवार यांच्या जाण्याचे दु:ख असले, तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही निर्नायकी अवस्था निर्माण होऊ नये, यासाठी हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. झिरवळ यांच्या मागणीमागेही हाच राजकीय व्यवहार्यतेचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार यांच्या अंत्यविधीत दिसलेली मांडणी, पार्थ आणि जय पवार यांची सक्रिय उपस्थिती आणि त्यानंतर लगेच सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा, या सर्व घटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत संकेत दिले आहेत. पक्षात नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, उपमुख्यमंत्रीपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. झिरवाळ यांच्या विधानामुळे हे आव्हान अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत बैठकांमध्ये आणि सत्ताधारी आघाडीत यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा, नेतृत्व आणि सत्तेतील भूमिका काय असेल, यावरच राज्याच्या राजकारणाचे पुढचे चित्र ठरणार आहे.

मोदी-फडणवीसांनी अजित पवारांवरील 70 हजार कोटींचे घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावे:संजय राऊत

वर्तमान पत्रात जाहिरात देऊन होणार काय ? आरोप मागे घ्या तीच खरी श्रद्धांजली ठरेल

मुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच, भाजपकडून देण्यात आलेल्या पानभर श्रद्धांजली जाहिरातींवरून नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत, जाहिराती देणे ही श्रद्धांजली नाही, तर अजित पवारांवर लावलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असा थेट हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी यावेळी स्पष्ट सल्ला दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली असली, तरी त्याचवेळी आरोप-प्रत्यारोपांचाही नवा अध्याय सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या. या जाहिरातींमधून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मात्र, या जाहिरातींवरूनच आता राजकीय टीकेची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या जाहिरातींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने कमाल केली आहे. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या. पण त्याने काय होणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, केवळ जाहिराती देऊन सहानुभूती दाखवणे हा श्रद्धांजलीचा खरा अर्थ नाही. अजित पवार यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप करणाऱ्यांनी आता अचानक श्रद्धांजली देणे हे राजकीय दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

राऊत यांनी आपल्या टीकेत प्रामुख्याने 70 हजार कोटींच्या कथित आरोपांचा मुद्दा उपस्थित केला. भाजप नेते, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर यापूर्वी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असे राऊत म्हणाले. हे आरोप आजही अधिकृतरीत्या मागे घेण्यात आलेले नाहीत. अशा परिस्थितीत, त्याच नेत्यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना थोर नेते म्हणून गौरवणे, हे केवळ राजकीय सोयीचे असल्याची टीका त्यांनी केली.

जर खरोखरच अजित पवार यांना श्रद्धांजली द्यायची असेल, तर पानभर जाहिराती देण्याऐवजी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप अधिकृतपणे मागे घ्या, असा स्पष्ट सल्ला संजय राऊत यांनी मोदी आणि फडणवीसांना दिला. आरोप मागे घेणे म्हणजे अजित पवार यांच्या प्रतिमेवरील डाग पुसण्यासारखे ठरेल आणि तीच खरी श्रद्धांजली असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

एकीकडे अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी नेता गमावला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या नावावरून सुरू झालेला हा राजकीय वाद अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. संजय राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपवर दबाव वाढला असून, आता या आरोपांवर भाजप काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रद्धांजली ही केवळ शब्दांत किंवा जाहिरातींत न राहता, कृतीतून दिसली पाहिजे, असा संदेश देत राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाला नवी दिशा दिली आहे.

संजय राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

भाजपने कमाल केली!
दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या!
त्याने काय होणार?
अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं. मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल

अजित पवारांच्या आईंसमोर सत्य लपवण्याची धावपळ…एका आईसाठी आयुष्यातला सर्वात कठीण क्षण.

पुणे-काल सकाळची वेळ. अजित पवारांच्या फार्महाऊसवर दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. सकाळची शांतता, रोजची दिनचर्या आणि टीव्ही सुरू असलेली बैठक, कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणांतच या घरावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार सकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत बसल्या होत्या. नाश्त्याची तयारी सुरू होती. वातावरणात कुठलाही तणाव नव्हता. मात्र, टीव्ही स्क्रीनवर अचानक एक बातमी झळकली आणि त्या शांततेला क्षणार्धात तडा गेला.

टीव्हीवर विमान अपघाताची बातमी दिसताच आशाताईंनी लगेच प्रश्न विचारला, अरे, दादांचा अपघात झाला आहे का? त्यांच्या आवाजात काळजी होती, पण अजूनही विश्वास नव्हता. सुरुवातीला त्यांनाही वाटत होतं की किरकोळ अपघात असेल, दादांना फारसं काही झालं नसेल. फार्महाऊसमध्ये उपस्थित असलेले कर्मचारी आणि कुटुंबातील लोक मात्र त्या क्षणी पूर्णपणे हादरले होते. समोर दिसणाऱ्या बातम्या आणि आतल्या भीतीमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला, आईंना सत्य कसं सांगायचं?

थोड्याच वेळात टीव्हीवर पुढील अपडेट्स येऊ लागल्या. बारामतीत रुग्णालयात नेल्याची माहिती झळकताच उपस्थितांची धावपळ सुरू झाली. आशाताईंना आणखी धक्का बसू नये म्हणून फार्महाऊसमधील टीव्हीची केबल काढण्यात आली. टीव्ही बंद पडलाय, असं सांगण्यात आलं. त्यांचा मोबाईल फोनही फ्लाइट मोडवर टाकण्यात आला. सगळे जण एकच प्रयत्न करत होते, आईंना काही वेळ तरी या कटू वास्तवापासून दूर ठेवायचं.

मात्र, आईचं मन कुठे थांबणार होतं? दादांना भेटायला जाऊया, असं म्हणत त्या स्वतः चालतच फार्महाऊसच्या बाहेर निघाल्या. गाडीबद्दल विचारल्यावर ड्रायव्हरने गाडी बंद असल्याचं सांगितलं. तरीही त्या ऐकायला तयार नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, डोळ्यांत प्रश्न आणि मनात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. उपस्थित सगळे जण स्तब्ध झाले होते. कोणालाच शब्द सुचत नव्हते.

शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नाईलाजाने आशाताईंना बारामती येथील बंगल्यावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतानाही सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. एकीकडे सत्य दडपण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे आईच्या नजरेतून निसटत चाललेली शंका, हा संघर्ष फार्महाऊसमध्ये उपस्थित प्रत्येकाच्या मनात सुरू होता. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं.

हा केवळ एका राजकीय नेत्याचा अपघात नव्हता, तर एका आईसाठी तो तिच्या आयुष्याचा सर्वात कठीण क्षण होता. फार्महाऊसवर घडलेला हा प्रसंग आजही अनेकांच्या काळजात घर करून बसला आहे. अजित पवारांच्या जाण्याने राज्य हादरलं, पण त्या सकाळी फार्महाऊसवर जी शांतता तुटली, ती कधीच पूर्वीसारखी होणार नाही, असं तिथे उपस्थित असलेले लोक सांगतात.