पुणे- ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ऑटो क्लस्टर थिएटर, चिंचवड, पुणे येथे एका अर्थपूर्ण आणि गौरवशाली पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बनठिया (भा.प्र.से. निवृत्त) तसेच सुरज मांढरे (भा.प्र.से.) कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास माजी सनदी अधिकारी दौलत देसाई व सुनील पाटील, पुढारी वृत्तपत्राचे संचालक मंदार पाटील, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. पूनम मेहता व सतीश राऊत यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
मोहन ठोंबरे (भा.प्र.से. निवृत्त) लिखित ‘A Promise to Myself’ (इंग्रजी) आणि ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ (मराठी) ही पुस्तके या वेळी प्रकाशित करण्यात आली. ही पुस्तके महाराष्ट्र राज्याच्या सेवेत तीन दशकांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा प्रेरणादायी जीवनप्रवास मांडतात.
लेखकांनी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच नंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करताना अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील जबाबदाऱ्या पार पाडल्या. या पुस्तकांमधून शासनव्यवस्थेकडे केवळ प्रशासकीय यंत्रणा म्हणून नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारलेली जबाबदारी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
मैदानी पातळीवर निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय आव्हाने, नैतिक पेचप्रसंग आणि जनतेच्या अपेक्षांशी समतोल राखत केलेले निर्णय—या सर्वांचा सखोल व प्रामाणिक आलेख या पुस्तकांतून उलगडतो. प्रशासन, सार्वजनिक सेवा, तसेच तरुण पिढीसाठी ही पुस्तके मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील.ही दोन्ही पुस्तके ए.पी.के. पब्लिशर्स एल.एल.पी., पुणे यांनी प्रकाशित केली आहेत.
टीव्हीएस क्रेडिटने 9 महिन्यांत मिळविला 658 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
वितरणात 21% आणि निव्वळ नफ्यात (PAT) 22% वाढ नोंदवली; डिसेंबर 2025 ला संपलेल्या
चेन्नई, 30 जानेवारी 2026 : टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक कंपनी असून, कंपनीने आज 31 डिसेंबर 2025 ला संपलेल्या तिमाही आणि 9 महिन्यांसाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने वित्त वर्ष 26 च्या 9 महिन्यांमध्ये वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत वितरणामध्ये 21% वाढ नोंदवली. टीव्हीएस क्रेडिटने वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये नोंदवले, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढलेले आहे. तसेच वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा (PAT) Rs 658 Crore नोंदवला, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.
तिसऱ्या तिमाहीतील ठळक बाबी:
● एयूएम डिसेंबर ’25 अखेर Rs 29,678 कोटींवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्पन्न 1,870 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी करपूर्व नफा 370 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 15% वाढला आहे.
● वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी करानंतर निव्वळ नफा Rs 272 Crore होता, जो वित्त वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 13% वाढला आह
वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांतील ठळक बाबी:
● एयूएम डिसेंबर ’25 अखेर 29,678 कोटी रुपयांवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करपूर्व नफा 890 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 23% वाढले आहे.
● वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा 658 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.
वित्त वर्ष 26 च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ने वितरणामध्ये सातत्याने वाढ नोंदवली. जीएसटी 2.0 अंमलबजावणीनंतर सकारात्मक ग्राहक भावना आणि कमी महागाईमुळे विविध उत्पादन श्रेणींमध्ये मागणी वाढली. यामुळे विक्री वाढ, बाजारपेठेत अधिक खोलवर प्रवेश आणि मार्केट शेअरमध्ये वाढ झाली.
टीव्हीएस क्रेडिटला सणासुदीच्या हंगामातही मजबूत मागणीचा फायदा झाला. या कालावधीत कंपनीने विविध उत्पादन श्रेणींमध्ये जोखीम-संतुलित वाढीवर लक्ष केंद्रित ठेवत विविधीकृत कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर दिला. तसेच विद्यमान उत्पादनांची बाजारपेठेतील पोहोच वाढवणे, नवीन उत्पादन ऑफर वाढवणे, वितरण नेटवर्कचा विस्तार करणे आणि ग्राहक अनुभव तसेच ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यावर कंपनीने भर कायम ठेवला.
वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांदरम्यान टीव्हीएस क्रेडिटने 41 लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहकांना कर्ज वितरित केले, ज्यामुळे कंपनीचा एकूण ग्राहक आधार जवळपास 2.3 कोटी झाला.
पुढेही टीव्हीएस क्रेडिट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करत ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून मजबूत जोखीम व्यवस्थापन पद्धती कायम ठेवणार आहे.
एसबीआय जनरल इन्शुअरन्सची यशस्वी घौडदौड;१० हजार ७६९ कोटी रुपयांचा जीडीपी नोंदवला
संपूर्ण उद्योगाच्या १.७ पट अधिक वेगवान वाढीची नोंद
मुंबई; ३० जानेवारी, २०२६: भारतातील अग्रगण्य जनरल विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एसबीआय जनरल विमा इन्शुअरस्नने आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये पहिल्या नऊ महिन्यांत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या प्रभावी कामगिरीमुळे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारी जनरल इन्शुअरन्स कंपनी म्हणून एसबीआय जनरलचे नाव घेतले जात आहे. ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण वाढीच्या जोरावर कंपनीने विमा क्षेत्रात आपली प्रगती कायम राखली असून, हा विकास त्यांच्या कार्यक्षमतेची भक्कम साक्ष देत आहे.
आपल्या प्रगतीची घौडदौड कायम राखत, कंपनीने १० हजार ६७० कोटी रुपयांचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम नोंदवला असून, यामध्ये १४.५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही वाढ विमा क्षेत्राच्या सरासरी ८.७ टक्के वृद्धीदरापेक्षा अधिक आहे. कंपनीने पीक विमा वगळता इतर व्यवसायांमध्ये २५.५ टक्के इतकी प्रचंड वाढ साध्य केली आहे. याच काळात संपूर्ण विमा क्षेत्रातील वाढ ही १३.१ टक्के इतकी मर्यादित होती. या आकडेवारीवरुन कंपनीचे विमा बाजारातील वर्चस्व वाढत असून, सर्वच क्षेत्रांतील तिची दमदार कामगिरी स्पष्टपणे दिसून येत आहे.
कंपनीच्या विविध व्यवसाय विभागातील सातत्यपूर्ण वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीला उत्कृष्ट कामगिरी साधता आली. या कालावधीत आरोग्य विमा विभागात २९ टक्के, वैयक्तिक विमा विभागात ४९ टक्के, मोटार विमा विभागात १९ टक्के आणि फायर विमा विभागात १३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. विविध विभागातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कंपनीचा व्यवसाय विस्तार, कार्यक्षमता, ग्राहकाभिमुख उपक्रमांवर असलेला भर अधिक स्पष्ट झाला आहे. खासगी आणि स्टँडलोन हेल्थ इन्शुअरन्स कंपन्यांच्या बाजारपेठेत कंपनीने आपला हिस्सा ३९ बेसिस पॉईंट्सनी वाढवला असून, तो गेल्या वर्षाच्या ६.२५ टक्क्यांवरुन आता ६.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
या काळात कंपनीने ५२२ कोटी रुपयांचा करारानंतरचा निव्वळ नफा कमावला आहे. निव्वळ नफ्याची नोंद पाहता कंपनीची आर्थिक कामगिरी अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते. याच कालावधीत दाव्यांचे प्रमाण दर्शवणारा ‘लॉस रेशिओ’ गेल्या वर्षीच्या ८४.३ टक्क्यांवरुन लक्षणीयरित्या सुधारुन ७८.५ टक्क्यांवर आला आहे तर सॉल्व्हन्सी रेशिओ २.१२ पट राहिला आहे. सॉल्वेन्सी रेशिओचे प्रमाण हे नियामक संस्थांनी निश्चित केलेल्या किमान १.५०च्या मर्यादेपेक्षा ब-याच जास्त आहे. हे सर्व आकडे कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती, जोखीम व्यवस्थापनातील शिस्त आणि दीर्घकालीन स्थैर्य अधोरेखित करतात.
कंपनीच्या कामगिरीवर एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवीन चंद्र झा यांनीही आपले मत नोंदवले. ते म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६च्या पहिल्या नऊ महिन्यांतील आमची कामगिरी ही भविष्यासठी आम्ही रचत असलेल्या भक्कम पायाभरणीचे प्रतिबिंब आहे. या कालावधीत कंपनीने संपूर्ण उद्योगाच्या तुलनेत १.७ पट आणि खासगी आणि एसएएचआय कंपन्यांच्या तुलनेत १.९ पट अधिक वेगाने प्रगती केली असून, कंपनीने १० हजार ७६९ कोटी रुपयांचा जीडीपी नोंदवला आहे. ही वाढ केवळ व्यवसायाचा विस्तार करण्यापुरती मर्यादित नसून, एक तंत्रज्ञान आधारित आणि ग्राहकाभिमुख विमा संस्था उभारण्यावर आमचा भर आहे. ग्राहकांचा विश्वास दृढ करणे, बदलत्या जोखीमपूर्ण वातावरणात भारतातील प्रत्येक कोप-यापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवून शाश्वत मूल्य निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’’
एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे मुख्य आर्थिक अधिकारी श्री. जितेंद्र अत्रा म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६मधील पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरी ही कंपनीची जोखमी व्यवस्थापन प्रणाली, शिस्तबद्ध कामकाज, दीर्घकालीन आर्थिक रणनीती यांच्या यशामुळे साधता आली. कंपनीच्या लॉस रेशिओमध्ये मोठी सुधारणा झाली असून, तो गेल्या आर्थिक वर्षातील ८४.३ टक्क्यांवरुन ७८.५टक्क्यांवर आला आहे. हे यश उत्तम अंडररायटिंग, अचूक जोखीम निवड, प्रभावी दावा व्यवस्थापन आणि वाढलेली कार्यक्षमता यामुळेच शक्य झाले आहे. बदलत्या बाजारपेठेत सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण कऱणे, भांडवलाची कार्यक्षमता वाढवणे आणि शाश्वत नफ्यासह आर्थिकदृष्ट्या भक्कम संस्था उभारण्यावर आमचा कायमस्वरुपी भर राहील.’’
एसबीआय जनरल इन्शुअरन्सने तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांच्या उत्कृष्ट अनुभवावर सातत्याने भर देत आपली प्रगतीची गती अधिक मजबूत केली आहे. शिस्तबद्ध कार्यप्रणाली, समतोल व्यावसायिक पोर्टफोलिओच्या जोरावर भविष्यातील नफ्यासाठी स्थिर पाया तयार केला आहे. कंपनीने प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बाजारपेठेतील स्थान भक्कम केले आहे. एसबीआय जनरल इन्शुअरन्स कंपनी आता दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी सज्ज आहे. कंपनी विकासाच्या सर्व धोरणात्मक बाबींच्या आधारावर आपले स्थान अधिक भक्कम करत आहे.
दुबार मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना
पुणे : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. दुबार मतदानाचा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांची ओळख काटेकोरपणे तपासण्यात येणार असून मतदार यादीतील नोंद, वैध ओळखपत्राची खातरजमा तसेच बोटावर अमिट शाई लावण्याची प्रक्रिया अत्यंत दक्षतेने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.
संशयास्पद बाबी आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले असून दुबार मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांवर निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मतदारांनी निर्भयपणे, प्रामाणिकपणे व जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम व सचिन आखाडे यांनीही मतदान प्रक्रिया शांततेत व नियमबद्ध पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे सांगितले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सजग भूमिका घ्यावी, असेही निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हवेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २६३ मतदान केंद्रांसाठी ३७० टीम्स सज्ज
पुणे :हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली येथील निवडणूक कार्यालयातील मनुष्यबळ विभागाने अहोरात्र काम करत निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
हवेली तालुक्यात एकूण २६३ मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी शिपाई, पीआरओ (Presiding Officer), मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ अशा पाच सदस्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या प्रमाणे एकूण २६३ नियमित मतदान टीम्सची रचना करण्यात आली आहे. यासोबतच आकस्मिक परिस्थिती किंवा अनुपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह टीम्सही तयार ठेवण्यात आल्या असून, रिझर्व्ह धरून एकूण सुमारे ३७० मतदान टीम्सची आखणी पूर्ण झाली आहे.
या व्यापक नियोजनासाठी जवळपास २,००० कर्मचाऱ्यांचे प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया, जबाबदाऱ्या, आचारसंहिता, निवडणूक साहित्य हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उर्वरित रिझर्व्हमधील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण करून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
संपूर्ण मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जात आहे. मनुष्यबळ विभागात सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड, भूमेश मसराम, अश्विनी कुलकर्णी, प्रियांका शिंगाडे, सरस्वती पोंदे, स्मिता बगाटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत. प्रशिक्षण, नियुक्ती, माहिती संकलन व समन्वय अशी सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विभागाने विशेष दक्षता घेतली आहे.
हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध व्हावे आणि मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासन कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महापौर,उपमहापौर,चेअरमन,विशेष समित्या सर्वांचीच निवड 9 फेब्रुवारीला…
पुणे : महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठीची निवडणूक आता ६ ऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर स्थायीसह अन्य विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्तीही त्याच दिवशी केली जाणार आहे.
महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही पदांसाठीची निवडणूक होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवरच स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती, इतर विषय समित्यांवर १३ सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषयदेखील घेण्यात आला आहे.
माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले.
वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शांतीलाल सुरतवाला यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नव्हती, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि कल्पक प्रशासक म्हणूनही ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून शहराची सेवा केली..
शरद पवारांचे निकटवर्तीय
शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठा दबदबा होता.अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आधीच कडकडीत बंद आणि दुखवटा पाळला जात असतानाच, सुरतवाला यांच्या जाण्याने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
हिंदूस्तान कॉपरच्या शेअरने घेतली 40% ची झेप
हिंदूस्तान कॉपरच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला. गेल्या चार दिवसांत या शेअरने तब्बल 40% ची झेप घेतली आहे. इतकेच नाही, तर गेल्या 30 दिवसांत यात सुमारे 55.92 % ची वाढ झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास, हा शेअर 194% पेक्षा जास्त वाढला आहे.
दोन प्रमुख कारणं समोर
जगभरात तांब्याच्या किमती सध्या खूप तेजीत आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) जानेवारी महिन्यातील डिलिव्हरीसाठी असलेल्या तांब्याच्या किमतीत 5% पेक्षा जास्त वाढ झाली. या वाढीमुळे तांब्याची किंमत प्रति किलो 1350 रुपयांच्या पुढे गेली. भू-राजकीय तणाव, व्यापारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या घसरलेल्या किमती यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.तसेच हिंदुस्तान कॉपरला मिळालेला एक नवीन तांब्याचा ब्लॉक, या दोन प्रमुख कारणांमुळे शेअरमध्ये एवढी मोठी तेजी दिसून येत आहे.
कंपनी, शेअर बाजारातील कामगिरी
गुरुवारी, एनएसईवर हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स 20% नी वाढून 760 रुपयांवर पोहोचले. या शेअरमधील ही तेजी गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाली होती. 22 जानेवारी रोजी हे शेअर्स 543.30 रुपयांवर बंद झाले होते आणि त्यानंतर तेजी अविरतपणे सुरूच आहे. मंगळवारी 5% आणि बुधवारी 12.5% ची वाढ झाली, ज्यामुळे धातूंच्या बाजारात एकच खळबळ उडाली. नवीन तांब्याच्या ब्लॉकमुळे वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कंपनीशी संबंधित बातम्यांनीही या तेजीला आणखी बळ दिले आहे. गेल्या आठवड्यात हिंदुस्तान कॉपरने जाहीर केले की, ते मध्य प्रदेशात एका नवीन तांब्याच्या ब्लॉकसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. यामुळे भविष्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा अधिक मजबूत झाली आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जगभरात तांब्याची मागणी वाढत आहे.
इंडसइंड सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, तांबे त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तांब्याच्या फ्युचर्समध्ये 5% ची वाढ झाली असून ते 6.2 डॉलर प्रति पाउंडच्या वर गेले आहे. हा विक्रम मोडला गेला कारण गुंतवणूकदार रिअल इस्टेट (जसे की सोने, चांदी, तांबे) सारख्या मालमत्तांकडे वळत आहेत. भू-राजकीय आणि व्यापारी अनिश्चितता तसेच डॉलरमध्ये अचानक आलेली घसरण यामुळे गुंतवणूकदार थोडे घाबरले आहेत. या कारणांमुळेही तेजी येत आहे.
जिगर त्रिवेदी पुढे म्हणाले की, तांब्याच्या मूलभूत घटकांमध्येही मजबुती आहे. तांब्याला सतत पुरवठ्याची कमतरता आणि औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मजबूत मागणी यांचा आधार मिळत आहे. विशेषतः, जगभरात रिन्यूएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता वापर यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.

