Home Blog Page 122

मोहन ठोंबरे यांच्या ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ऑटो क्लस्टर थिएटर, चिंचवड, पुणे येथे एका अर्थपूर्ण आणि गौरवशाली पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बनठिया (भा.प्र.से. निवृत्त) तसेच सुरज मांढरे (भा.प्र.से.) कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभास माजी सनदी अधिकारी दौलत देसाई व सुनील पाटील, पुढारी वृत्तपत्राचे संचालक मंदार पाटील, तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. पूनम मेहता व सतीश राऊत यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
मोहन ठोंबरे (भा.प्र.से. निवृत्त) लिखित ‘A Promise to Myself’ (इंग्रजी) आणि ‘एक वचन : स्वतःला दिलेले’ (मराठी) ही पुस्तके या वेळी प्रकाशित करण्यात आली. ही पुस्तके महाराष्ट्र राज्याच्या सेवेत तीन दशकांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा प्रेरणादायी जीवनप्रवास मांडतात.
लेखकांनी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच नंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करताना अनेक महत्त्वाच्या व संवेदनशील जबाबदाऱ्या पार पाडल्या. या पुस्तकांमधून शासनव्यवस्थेकडे केवळ प्रशासकीय यंत्रणा म्हणून नव्हे, तर मानवी मूल्यांवर आधारलेली जबाबदारी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
मैदानी पातळीवर निर्णय घेताना येणाऱ्या अडचणी, प्रशासकीय आव्हाने, नैतिक पेचप्रसंग आणि जनतेच्या अपेक्षांशी समतोल राखत केलेले निर्णय—या सर्वांचा सखोल व प्रामाणिक आलेख या पुस्तकांतून उलगडतो. प्रशासन, सार्वजनिक सेवा, तसेच तरुण पिढीसाठी ही पुस्तके मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील.ही दोन्ही पुस्तके ए.पी.के. पब्लिशर्स एल.एल.पी., पुणे यांनी प्रकाशित केली आहेत.

टीव्हीएस क्रेडिटने 9 महिन्यांत मिळविला 658 कोटी रुपयांचा निव्वळ नफा

0

वितरणात 21% आणि निव्वळ नफ्यात (PAT) 22% वाढ नोंदवलीडिसेंबर 2025 ला संपलेल्या 

चेन्नई, 30 जानेवारी 2026 : टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक कंपनी असून, कंपनीने आज 31 डिसेंबर 2025 ला संपलेल्या तिमाही आणि 9 महिन्यांसाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने वित्त वर्ष 26 च्या  9 महिन्यांमध्ये वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत वितरणामध्ये 21% वाढ नोंदवली. टीव्हीएस क्रेडिटने वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये नोंदवले, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढलेले आहे. तसेच वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा (PAT) Rs 658 Crore नोंदवला, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.

तिसऱ्या तिमाहीतील ठळक बाबी:

●        एयूएम डिसेंबर ’25 अखेर Rs 29,678 कोटींवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.

●        वित्त वर्ष 26 च्या  तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्पन्न 1,870 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या  तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढले आहे.

●        वित्त वर्ष 26 च्या  तिसऱ्या तिमाहीसाठी करपूर्व नफा 370 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या  तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 15% वाढला आहे.

●        वित्त वर्ष 26 च्या  तिसऱ्या तिमाहीसाठी करानंतर निव्वळ नफा Rs 272 Crore होता, जो वित्त वर्ष 25 च्या  तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 13% वाढला आह

वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांतील  ठळक बाबी:

●        एयूएम डिसेंबर ’25 अखेर 29,678 कोटी रुपयांवर पोहोचले, जे डिसेंबर ’24 च्या तुलनेत 9% वाढले आहे.

●        वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी एकूण उत्पन्न 5,351 कोटी रुपये होते, जे वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 8% वाढले आहे.

●        वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी  करपूर्व नफा 890 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत  23% वाढले आहे.

●     वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांसाठी करानंतर निव्वळ नफा 658 कोटी रुपये होता, जो वित्त वर्ष 25 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या तुलनेत 22% वाढला आहे.

वित्त वर्ष 26 च्या  तिसऱ्या तिमाहीदरम्यान टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड ने वितरणामध्ये सातत्याने वाढ नोंदवली. जीएसटी 2.0 अंमलबजावणीनंतर सकारात्मक ग्राहक भावना आणि कमी महागाईमुळे विविध उत्पादन श्रेणींमध्ये मागणी वाढली. यामुळे विक्री वाढ, बाजारपेठेत अधिक खोलवर प्रवेश आणि मार्केट शेअरमध्ये वाढ झाली.

टीव्हीएस क्रेडिटला सणासुदीच्या हंगामातही मजबूत मागणीचा फायदा झाला. या कालावधीत कंपनीने विविध उत्पादन श्रेणींमध्ये जोखीम-संतुलित वाढीवर लक्ष केंद्रित ठेवत विविधीकृत कर्ज पोर्टफोलिओ तयार करण्यावर भर दिला. तसेच विद्यमान उत्पादनांची बाजारपेठेतील पोहोच वाढवणे, नवीन उत्पादन ऑफर वाढवणे, वितरण नेटवर्कचा विस्तार करणे आणि ग्राहक अनुभव तसेच ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यावर कंपनीने भर कायम ठेवला.

वित्त वर्ष 26 च्या पहिल्या 9 महिन्यांदरम्यान टीव्हीएस क्रेडिटने 41 लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहकांना कर्ज वितरित केले, ज्यामुळे कंपनीचा एकूण ग्राहक आधार जवळपास 2.3 कोटी झाला.

पुढेही टीव्हीएस क्रेडिट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करत ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणार असून मजबूत जोखीम व्यवस्थापन पद्धती कायम ठेवणार आहे.

पुणे महापालिका भाजपा गटनेते पदी गणेश बिडकर यांची निवड…

पुणे – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ ड मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार आणि भाजपच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतलेले नेते , नगरसेवक गणेश मधुकर बिडकर यांची भाजपच्या सर्व विजयी ११९ नगरसेवकांच्या गटाचे नेते म्हणून निवड झाली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

पुणे महापालिकेत गेल्या सत्रात बिडकर स्वीकृत सदस्य असताना त्यांनी सभागृह नेता म्हणून आपली कार्यकुशलता सिद्ध केली होती . महापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे पहिले जात असताना महापौर पद महिला आरक्षित झाल्याने या दोन्ही नेत्यांची महापौर पदावरील संधी हुकली.आता गेल्या सत्रातील आणि एकूणच महापालिकेच्या राजकारणातील कार्यकुशलता लक्षात घेऊन बिडकर यांना गटनेते करण्यात आले आहे. गटनेते हेच महापालिकेतील सभागृहनेते देखील होतील . येत्या ९ तारखेला महापौर ,उपमहापौर पदाची निवडणूक आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासह विविध समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु आहे. या सर्वात नेता म्हणून बिडकर यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.

कोण आहेत गणेश बिडकर :

गणेश मधुकर बिडकर हे पुणे शहरातील ज्येष्ठ नगरसेवक व भारतीय जनता पार्टीमधील शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

वडील स्व. मधुकरराव बिडकर हे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन सातत्यपूर्ण आणि यशस्वी राजकीय वाटचाल.

पुणे महानगरपालिका अनुभव

२००२ ते २०२२ : पुणे महानगरपालिकेचे सभासद.

भाजपासाठी प्रतिकूल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसच्या गटनेत्यास व पुण्याच्या तत्कालीन महापौरांना पराभूत केले.

पूर्व पुण्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यात महत्त्वाची भूमिका.

महत्त्वाची पदे:

२००९ – २०१० : अध्यक्ष, कसबा पेठ प्रभाग समिती

२०१० – २०११ : अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

२०११ – २०१२ : अध्यक्ष, स्थायी समिती

२०१४ – २०१७ : गटनेता, भारतीय जनता पार्टी

२०२० – २०२२ : सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

पक्ष संघटना

गेल्या ३० वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रिय.

प्रभाग पातळीपासून शहर पातळीपर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या.

भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘जनादेश यात्रा’ची प्रमुख जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

अलीकडील यशस्वी जबाबदाऱ्या:

२०२५ : पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुख.

२०२६ : पुणे महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी.

२०२६ : पुणे महानगरपालिकेत गटनेता व सभागृह नेतेपदी निवड.

पीएमआरडीए मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व शहिदांना भावपूर्ण आदरांजली

  • दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांच्या बलिदानाला अभिवादन

पुणे: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या शहिदांच्या स्मरणार्थ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात गुरुवारी (दि.30) आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून मौन पाळून शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, जमीन व मालमत्ता विभागाचे उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह पीएमआरडीएचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्य आणि एकात्मतेसाठी शहिदांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला उपस्थितांनी नमन केले. राष्ट्रप्रेम, त्याग आणि समर्पणाची मूल्ये जपण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. शहिदांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

एसबीआय जनरल इन्शुअरन्सची यशस्वी घौडदौड;१० हजार ७६९ कोटी रुपयांचा जीडीपी नोंदवला 

0

संपूर्ण उद्योगाच्या १.७ पट अधिक वेगवान वाढीची नोंद

मुंबई३० जानेवारी२०२६: भारतातील अग्रगण्य जनरल विमा कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या एसबीआय जनरल विमा इन्शुअरस्नने आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये पहिल्या नऊ महिन्यांत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या प्रभावी कामगिरीमुळे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारी जनरल इन्शुअरन्स कंपनी म्हणून एसबीआय जनरलचे नाव घेतले जात आहे. ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण वाढीच्या जोरावर कंपनीने विमा क्षेत्रात आपली प्रगती कायम राखली असून, हा विकास त्यांच्या कार्यक्षमतेची भक्कम साक्ष देत आहे.

आपल्या प्रगतीची घौडदौड कायम राखत, कंपनीने १० हजार ६७० कोटी रुपयांचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम नोंदवला असून, यामध्ये १४.५ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही वाढ विमा क्षेत्राच्या सरासरी ८.७ टक्के वृद्धीदरापेक्षा अधिक आहे. कंपनीने पीक विमा वगळता इतर व्यवसायांमध्ये २५.५ टक्के इतकी प्रचंड वाढ साध्य केली आहे. याच काळात संपूर्ण विमा क्षेत्रातील वाढ ही १३.१ टक्के इतकी मर्यादित होती. या आकडेवारीवरुन कंपनीचे विमा बाजारातील वर्चस्व वाढत असून, सर्वच क्षेत्रांतील तिची दमदार कामगिरी स्पष्टपणे दिसून येत आहे.

कंपनीच्या विविध व्यवसाय विभागातील सातत्यपूर्ण वाढीमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीला उत्कृष्ट कामगिरी साधता आली. या कालावधीत आरोग्य विमा विभागात २९ टक्के, वैयक्तिक विमा विभागात ४९ टक्के, मोटार विमा विभागात १९ टक्के आणि फायर विमा विभागात १३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. विविध विभागातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कंपनीचा व्यवसाय विस्तार, कार्यक्षमता, ग्राहकाभिमुख उपक्रमांवर असलेला भर अधिक स्पष्ट झाला आहे. खासगी आणि स्टँडलोन हेल्थ इन्शुअरन्स कंपन्यांच्या बाजारपेठेत कंपनीने आपला हिस्सा ३९ बेसिस पॉईंट्सनी वाढवला असून, तो गेल्या वर्षाच्या ६.२५ टक्क्यांवरुन आता ६.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या काळात कंपनीने ५२२ कोटी रुपयांचा करारानंतरचा निव्वळ नफा कमावला आहे. निव्वळ नफ्याची नोंद पाहता कंपनीची आर्थिक कामगिरी अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येते. याच कालावधीत दाव्यांचे प्रमाण दर्शवणारा ‘लॉस रेशिओ’ गेल्या वर्षीच्या ८४.३ टक्क्यांवरुन लक्षणीयरित्या सुधारुन ७८.५ टक्क्यांवर आला आहे तर सॉल्व्हन्सी रेशिओ २.१२ पट राहिला आहे. सॉल्वेन्सी रेशिओचे प्रमाण हे नियामक संस्थांनी निश्चित केलेल्या किमान १.५०च्या मर्यादेपेक्षा ब-याच जास्त आहे. हे सर्व आकडे कंपनीची भक्कम आर्थिक स्थिती, जोखीम व्यवस्थापनातील शिस्त आणि दीर्घकालीन स्थैर्य अधोरेखित करतात.

कंपनीच्या कामगिरीवर एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवीन चंद्र झा यांनीही आपले मत नोंदवले. ते म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६च्या पहिल्या नऊ महिन्यांतील आमची कामगिरी ही भविष्यासठी आम्ही रचत असलेल्या भक्कम पायाभरणीचे प्रतिबिंब आहे. या कालावधीत कंपनीने संपूर्ण उद्योगाच्या तुलनेत १.७ पट आणि खासगी आणि एसएएचआय कंपन्यांच्या तुलनेत १.९ पट अधिक वेगाने प्रगती केली असूनकंपनीने १० हजार ७६९ कोटी रुपयांचा जीडीपी नोंदवला आहे. ही वाढ केवळ व्यवसायाचा विस्तार करण्यापुरती मर्यादित नसूनएक तंत्रज्ञान आधारित आणि ग्राहकाभिमुख विमा संस्था उभारण्यावर आमचा भर आहे. ग्राहकांचा विश्वास दृढ करणेबदलत्या जोखीमपूर्ण वातावरणात भारतातील प्रत्येक कोप-यापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवून शाश्वत मूल्य निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.’’

एसबीआय जनरल इन्शुअरन्सचे मुख्य आर्थिक अधिकारी श्री. जितेंद्र अत्रा म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२६मधील पहिल्या नऊ महिन्यातील कामगिरी ही कंपनीची जोखमी व्यवस्थापन प्रणालीशिस्तबद्ध कामकाजदीर्घकालीन आर्थिक रणनीती यांच्या यशामुळे साधता आली. कंपनीच्या लॉस रेशिओमध्ये मोठी सुधारणा झाली असूनतो गेल्या आर्थिक वर्षातील ८४.३ टक्क्यांवरुन ७८.५टक्क्यांवर आला आहे. हे यश उत्तम अंडररायटिंगअचूक जोखीम निवडप्रभावी दावा व्यवस्थापन आणि वाढलेली कार्यक्षमता यामुळेच शक्य झाले आहे. बदलत्या बाजारपेठेत सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण कऱणेभांडवलाची कार्यक्षमता वाढवणे आणि शाश्वत नफ्यासह आर्थिकदृष्ट्या भक्कम संस्था उभारण्यावर आमचा कायमस्वरुपी भर राहील.’’

एसबीआय जनरल इन्शुअरन्सने तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांच्या उत्कृष्ट अनुभवावर सातत्याने भर देत आपली प्रगतीची गती अधिक मजबूत केली आहे. शिस्तबद्ध कार्यप्रणाली, समतोल व्यावसायिक पोर्टफोलिओच्या जोरावर भविष्यातील नफ्यासाठी स्थिर पाया तयार केला आहे. कंपनीने प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बाजारपेठेतील स्थान भक्कम केले आहे. एसबीआय जनरल इन्शुअरन्स कंपनी आता दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी सज्ज आहे. कंपनी विकासाच्या सर्व धोरणात्मक बाबींच्या आधारावर आपले स्थान अधिक भक्कम करत आहे. 

म्हाळुंगेला गोदरेज प्रॉपर्टीजकडून सुमारे 8.5 एकर भूखंडाचे संपादन

या प्रकल्पातून अंदाजे 2,000 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता

पुणे-भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल), (बीएसई स्क्रिप आयडी: GODREJPROP) ने पुणे येथील वेगाने विकसित होत असलेल्या महाळुंगे परिसरातील सुमारे 8.5 एकर जमिनीचा तुकडा थेट खरेदीद्वारे अधिग्रहित केल्याची घोषणा आज केली.

प्रस्तावित विकासामध्ये प्रामुख्याने सामूहिक गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश असेल आणि त्यातून अंदाजे 2.1 दशलक्ष चौरस फूट बांधकामयोग्य जागा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, ज्यातून अंदाजे 2,000 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे.

महाळुंगे-मान-नांदे पट्ट्यात मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे, ती महाळुंगे-हिंजवडी मायक्रो-मार्केटचा भाग आहे आणि शहराच्या वेगाने वाढणाऱ्या हिंजवडी-बालेवाडी कॉरिडॉरजवळील आगामी पुणे इनर रिंग रोडच्या जवळ आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह सुविकसित सामाजिक पायाभूत सुविधांचा या जागेला फायदा होतो. याव्यतिरिक्त, हे ठिकाण बालेवाडी आणि हिंजवडी या दोन्ही प्रमुख मायक्रो-मार्केटमध्ये सहज प्रवेश देते, जे पुण्यातील प्रमुख आयटी आणि बीएफएसआय (BFSI) केंद्र म्हणून ओळखले जातात.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, मजबूत पायाभूत सुविधा विकास आणि भरभराटीच्या व्यावसायिक केंद्रांमुळे पुणे हे भारतातील सर्वात चैतन्यपूर्ण शहरांपैकी एक आहे. मोक्याची कनेक्टिव्हिटी आणि नियोजनबद्ध सामाजिक परिसंस्थेमुळेमहाळुंगे शहराच्या विकासाचा व्यापक विस्तार दर्शवते आणि ग्राहकांना सोयीसुविधा तसेच दर्जेदार जीवनाचे एक उत्तम मिश्रण देते. या जमिनीचे संपादन हे पुण्यातील आमचे अस्तित्व अधिक मजबूत करण्याच्या आणि भारताच्या प्रमुख शहरांमधील उच्च-क्षमतेच्या सूक्ष्म-बाजारांमध्ये विस्तार करण्याच्या आमच्या व्यापक धोरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. दीर्घकालीन मूल्य निर्माण करणाऱ्या आणि ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागा रहिवाशांना उपलब्ध करून देणेहेच आमचे ध्येय असेल.”

पिकअप वाहनाच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

पुणे- खराडी परिसरात पिकअप वाहनाच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.मयूर अमर माळवे (वय 2) असे मृत बालकाचे नाव आहे. राजू मगन ढोले (वय 66, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) या पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम अमर माळवे (वय 25, रा. ढोले पाटील वाडा, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा मुलगा मयूर घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. ढोले यांचा गोठा याच मोकळ्या जागेत असून, ते दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन तेथे आले होते. खेळत असताना मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर जखमी झाला.

मयूरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक गोडसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दुबार मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना

0

पुणे : येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली जिल्हा परिषद निवडणूक कार्यालयाच्या वतीने मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. दुबार मतदानाचा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेला सतर्क राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांची ओळख काटेकोरपणे तपासण्यात येणार असून मतदार यादीतील नोंद, वैध ओळखपत्राची खातरजमा तसेच बोटावर अमिट शाई लावण्याची प्रक्रिया अत्यंत दक्षतेने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.
संशयास्पद बाबी आढळून आल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले असून दुबार मतदानाचा प्रयत्न करणाऱ्यांवर निवडणूक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी मतदारांनी निर्भयपणे, प्रामाणिकपणे व जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. तसेच तहसीलदार तृप्ती कोलते, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम व सचिन आखाडे यांनीही मतदान प्रक्रिया शांततेत व नियमबद्ध पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे सांगितले.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने सजग भूमिका घ्यावी, असेही निवडणूक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हवेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २६३ मतदान केंद्रांसाठी ३७० टीम्स सज्ज

0

पुणे :हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली येथील निवडणूक कार्यालयातील मनुष्यबळ विभागाने अहोरात्र काम करत निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
हवेली तालुक्यात एकूण २६३ मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी शिपाई, पीआरओ (Presiding Officer), मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ अशा पाच सदस्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या प्रमाणे एकूण २६३ नियमित मतदान टीम्सची रचना करण्यात आली आहे. यासोबतच आकस्मिक परिस्थिती किंवा अनुपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह टीम्सही तयार ठेवण्यात आल्या असून, रिझर्व्ह धरून एकूण सुमारे ३७० मतदान टीम्सची आखणी पूर्ण झाली आहे.
या व्यापक नियोजनासाठी जवळपास २,००० कर्मचाऱ्यांचे प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया, जबाबदाऱ्या, आचारसंहिता, निवडणूक साहित्य हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उर्वरित रिझर्व्हमधील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण करून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
संपूर्ण मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जात आहे. मनुष्यबळ विभागात सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद भांड, भूमेश मसराम, अश्विनी कुलकर्णी, प्रियांका शिंगाडे, सरस्वती पोंदे, स्मिता बगाटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत. प्रशिक्षण, नियुक्ती, माहिती संकलन व समन्वय अशी सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विभागाने विशेष दक्षता घेतली आहे.
हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध व्हावे आणि मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासन कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सोन्याच्या भावात ७ हजारांची घसरण, चांदीच्या भावात १२ हजारांची घसरण

पुणे- आज सोन्याच्या भावात कालच्या तुलनेने ७ हजारांची घसरण झाली. काल 29 जानेवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,486 रुपयांनी वाढून 1,76,121 रुपयांवर पोहोचला होता. आज तो १ लाख ६८ हजार चारशे पंचाहत्तर रुपयांवर आला. १ लाख ६७ हजार ८०० ते १ लाख ७४ हजार ६३८ असा २४ कॅरेट सोन्याचा भाव आज आहे. काल चांदीचा भाव ३ लाख ७९ हजार ९८८ वरून आज तो ३ लाख ५७ हजार १६३ वर आला .

आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १लाख ६४ हजार ४३० वर आला .२० कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४९ हजार ९४० वर आला.१८ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ४७० वर आला .तर १८ कॅरेट सोन्याचा भाव १लाख ८ हजार ६७० वर आला

काल 29 जानेवारी रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,486 रुपयांनी वाढून 1,76,121 रुपयांवर पोहोचला आहे. तीन दिवसांत सोने 21,811 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 1,54,310 रुपये/10 ग्रॅम होता.तर, एक किलो चांदीची किंमत 27,666 रुपयांनी वाढून 3,85,933 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तीन दिवसांत चांदीची किंमत 68,228 रुपयांनी महागली आहे. यापूर्वी शुक्रवारी त्याची किंमत ₹3,17,705 रुपये प्रति किलो होती. यावर्षी आतापर्यंत केवळ 29 दिवसांत चांदी 1.55 लाख रुपयांनी आणि सोने 43 हजार रुपयांनी महागले.

रुपयाची विक्रमी घसरण, परदेशी वस्तू महाग होतील,परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढण्याचा ओघ वाढला

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आरबीआयच्या मते, गुरुवारी (29 जानेवारी) 1 डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी घसरून 91.96 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांच्या (FPI) सततच्या विक्रीमुळे आणि जागतिक स्तरावर वाढत्या व्यापारी तणावामुळे रुपयात ही घसरण दिसून येत आहे.

2026 च्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये रुपया प्रथमच 90 च्या पातळीच्या वर गेला होता. आता अवघ्या 29 दिवसांत तो 92 च्या पातळीजवळ पोहोचला आहे. बाजार तज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन शुल्क धोरणांमुळे आणि जागतिक तणावामुळे जगभरातील गुंतवणूकदार सोने आणि डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत.
रुपयाच्या घसरणीची तीन प्रमुख कारणे

  1. परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार: परदेशी गुंतवणूकदार (FPI) भारतीय शेअर बाजारातून सतत आपले पैसे काढून घेत आहेत. जानेवारी 2026 च्या पहिल्या 20 दिवसांतच त्यांनी ₹29,315 कोटींची विक्री केली आहे. जेव्हा हे गुंतवणूकदार आपले पैसे परत घेतात, तेव्हा ते रुपयाच्या बदल्यात डॉलरची मागणी करतात. डॉलरची मागणी वाढल्याने त्याची किंमत वाढते आणि रुपया घसरतो.
  2. ट्रम्पची टॅरिफ धोरणे आणि जागतिक तणाव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर नवीन कर (टॅरिफ) लावण्याची धमकी दिल्याने आणि ‘ग्रीनलँड’ वादामुळे जगभरातील बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा भीतीमुळे गुंतवणूकदार आपला पैसा भारतसारख्या विकसनशील देशांमधून काढून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकन डॉलरमध्ये किंवा सोन्यात गुंतवू लागतात, त्यामुळे डॉलर आणखी मजबूत होत आहे.
  3. मजबूत अमेरिकन अर्थव्यवस्था आणि उच्च व्याजदर: अमेरिकेत बेरोजगारीचा दर कमी झाला आहे आणि तेथील अर्थव्यवस्था मजबूत दिसत आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना असे वाटत आहे की अमेरिकेत व्याजदर अजूनही उच्च राहतील. जास्त नफ्याच्या लालसेने गुंतवणूकदार आपला पैसा अमेरिकन बँका आणि बॉन्ड्समध्ये गुंतवत आहेत, त्यामुळे जगभरात डॉलरची ताकद वाढली आहे.

रुपयाच्या घसरणीमुळे आयात करणे महाग होईल

रुपयाच्या घसरणीचा अर्थ असा आहे की भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल. याशिवाय, परदेशात फिरणे आणि शिक्षण घेणे देखील महाग झाले आहे.

समजा, जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते, तेव्हा अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांमध्ये 1 डॉलर मिळत होता. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 91 रुपये खर्च करावे लागतील. यामुळे विद्यार्थ्यांसाठी फीपासून ते राहणे-खाणे आणि इतर गोष्टी महाग होतील.

चलनाचे मूल्य कसे ठरवले जाते?

डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाच्या मूल्यामध्ये घट झाल्यास त्याला चलनाचे अवमूल्यन, घसरण किंवा कमकुवत होणे असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला ‘करन्सी डेप्रिसिएशन’ म्हणतात.

प्रत्येक देशाकडे परकीय चलन साठा असतो, ज्याद्वारे तो आंतरराष्ट्रीय व्यवहार करतो. परकीय साठ्याच्या कमी-जास्त होण्याचा परिणाम चलनाच्या किमतीवर दिसून येतो.

जर भारताच्या परकीय साठ्यात डॉलर, अमेरिकेच्या रुपयाच्या साठ्याइतका असेल तर रुपयाची किंमत स्थिर राहील. आपल्याकडे डॉलर कमी झाल्यास रुपया कमकुवत होईल, वाढल्यास रुपया मजबूत होईल.

13 लाखांपर्यंतची कमाई करमुक्त होऊ शकते,आरक्षणाची प्रतीक्षा यादी संपविण्यासाठी ३०० रेल्वेगाड्यांची होऊ शकते घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात 5 मोठ्या घोषणा करू शकतात…

  1. आयकर: 13 लाखांपर्यंतची कमाई करमुक्त

आयकरच्या नवीन प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन 75 हजार रुपयांवरून वाढवून 1 लाख रुपये केले जाऊ शकते. यामुळे पगारदार लोकांचे 13 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होईल. सध्या 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.

घोषणा का होऊ शकते

उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच, CII ने सरकारला सूचना केली आहे की, वापर वाढवण्यासाठी लोकांच्या हातात जास्त पैसे सोडणे आवश्यक आहे. कर सवलत वाढल्याने लोकांची ‘खरेदी शक्ती’ वाढेल. यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
सरकार जुनी कर प्रणाली नवीन कर प्रणालीने बदलू इच्छिते. यासाठी नवीन कर प्रणाली फायदेशीर ठेवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने नवीन प्रणालीमध्ये पगारदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन वाढवले जाऊ शकते.
फायदा: मध्यमवर्गीयांच्या हातात येणारे पैसे वाढतील. महिन्याला काही हजार रुपयांची बचत होऊ शकते. हे खर्च, बचत किंवा गुंतवणुकीत उपयोगी पडेल.
२. शेतकरी सन्मान निधी: ५०% वाढू शकते वार्षिक रक्कम

पीएम-किसान योजनेची रक्कम ६ हजार वरून ९ हजार रुपये वार्षिक केली जाऊ शकते. गेल्या ३ वर्षांपासून ती वाढवण्याबद्दल चर्चा सुरू आहे.

घोषणा का होऊ शकते

2019 मध्ये योजना सुरू झाल्यापासून या रकमेत बदल झालेला नाही. डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने ही रक्कम दुप्पट करून 12 हजार रुपये वार्षिक करण्याची शिफारस केली होती.
शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, 2019 पासून मिळत असलेल्या 6 हजार रुपयांची किंमत महागाईमुळे 5 हजार रुपये राहिली आहे. त्यामुळे ती वाढवून 8 हजार ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान असावी.
नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार सरकारने शेतकऱ्यांना 3 हजार रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा केली होती. यामुळे तेथील शेतकऱ्यांना एकूण 9 हजार रुपये मिळतील. केंद्र सरकार संपूर्ण भारतात हे लागू करू शकते.
खर्चाचे गणित: सध्या सुमारे 11 कोटी लोकांना किसान सन्मान निधी मिळत आहे. केंद्र सरकार दरवर्षी यावर 60 हजार ते 65 हजार कोटी रुपये खर्च करते. ही रक्कम वाढवून 9 हजार रुपये वार्षिक केल्यास हा खर्च सुमारे 95 हजार कोटी रुपये वार्षिक होईल.

फायदा: देशातील सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल. 3 हजार रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान-सहान गरजा पूर्ण करू शकतील.

  1. रेल्वे पायाभूत सुविधा: 300+ नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेन

सरकार नवीन गाड्या चालवून आरक्षणाची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) संपवू इच्छिते. अशा परिस्थितीत 300 हून अधिक नवीन अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनची घोषणा होऊ शकते.

मागील अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.65 लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे निधी आहे. यावेळीही तो वाढण्याची शक्यता आहे.

घोषणा का होऊ शकते

सरकारला 2030 पर्यंत ट्रेन आरक्षणातील प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) संपवायची आहे. सध्या, पीक सीझनमध्ये मागणी आणि सीट उपलब्धतेमध्ये सुमारे 20-25% फरक असतो. यासाठी, गाड्या वाढवण्यासोबतच ट्रॅकचा विस्तारही करावा लागेल.
फायदा: गाड्यांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 2 कोटी लोकांना याचा फायदा होईल.

  1. पंतप्रधान सूर्य घर योजना: 2 KW च्या सोलर पॅनलवर ₹80 हजार सबसिडी

अर्थसंकल्पात 2 किलोवॅट (KW) पर्यंतच्या सोलर सिस्टिमवरील सबसिडी 30 हजार प्रति किलोवॅटवरून वाढवून 40 हजार करण्याची घोषणा होऊ शकते.

सध्याच्या नियमांनुसार, 2 KW ची सोलर सिस्टिम बसवल्यास 30 हजार प्रति किलोवॅटनुसार एकूण 60 हजार रुपयांची सबसिडी मिळते.

जर अर्थसंकल्पात प्रति किलोवॅट 10 हजार रुपयांची सबसिडी वाढवली, तर 2KW च्या सौर प्रणालीवर एकूण 80 हजार रुपये सबसिडी मिळेल. म्हणजेच 20 हजार रुपयांची बचत होईल.

तर, 2 ते 3 KW दरम्यानच्या प्रणालीसाठी सबसिडी प्रति किलोवॅट 18 हजार रुपये आहे. 3 KW पेक्षा जास्त क्षमतेच्या प्रणालीसाठी सबसिडी 78 हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.

घोषणा का होऊ शकते :

केंद्र सरकारचे मार्च 2026 पर्यंत 40 लाख आणि 2027 पर्यंत 1 कोटी घरांना सौर ग्रीडशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे सरकारला आपले उद्दिष्ट वेगाने साध्य करण्यास मदत होईल. डिसेंबर 2025 पर्यंत 19.45 लाखांहून अधिक पॅनेल बसवण्यात आले आहेत.
फायदा: सबसिडी वाढल्याने 2 KW ची प्रणाली बसवणाऱ्या कुटुंबांना थेट 20 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल. यामुळे कुटुंबांना केवळ मोफत वीजच मिळणार नाही, तर ते अतिरिक्त वीज ग्रीडला विकून कमाई देखील करू शकतील.

  1. आयुष्मान भारत: 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना लाभ

सरकार आयुष्मान भारत (PM-JAY) योजनेचा विस्तार करू शकते. सध्या 70 वर्षांवरील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळत आहे, तो कमी करून 60 वर्षे केला जाऊ शकतो. यासोबतच, वार्षिक ₹5 लाखांच्या मोफत उपचाराची मर्यादा वाढवली जाऊ शकते, जेणेकरून कर्करोग आणि हृदय शस्त्रक्रिया यांसारख्या गंभीर आजारांचा खर्च कव्हर होऊ शकेल.

घोषणा का होऊ शकते:

आउटलुकच्या एका अहवालानुसार, भारतात 60+ वयोगटातील 82% वृद्धांकडे कोणतेही आरोग्य विमा नाही. जरी 70+ वयोगटातील लोक आयुष्मानमध्ये समाविष्ट असले तरी. 60 ते 70 वयोगटातील असे वृद्ध ज्यांच्याकडे आरोग्य विमा नाही, त्यांना गंभीर आजारांसाठी आपली जमापुंजी खर्च करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देऊ शकते.
फायदा: उपचाराची व्याप्ती 60 वर्षे झाल्याने कोट्यवधी नवीन कुटुंबे योजनेत सामील होतील. तसेच, उपचाराची मर्यादा वाढल्याने कुटुंबांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी कर्ज घ्यावे लागणार नाही. रुग्णांना मोठ्या आणि विशेषज्ञ रुग्णालयांमध्येही मोफत उपचार मिळू शकतील. गंभीर आजारांचा खर्च कव्हर होऊ शकेल.

महापौर,उपमहापौर,चेअरमन,विशेष समित्या सर्वांचीच निवड 9 फेब्रुवारीला…

0

पुणे : महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठीची निवडणूक आता ६ ऐवजी ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे, तर स्थायीसह अन्य विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्तीही त्याच दिवशी केली जाणार आहे.

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही पदांसाठीची निवडणूक होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवरच स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती, इतर विषय समित्यांवर १३ सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषयदेखील घेण्यात आला आहे.

माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

0

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले.
वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शांतीलाल सुरतवाला यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नव्हती, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि कल्पक प्रशासक म्हणूनही ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास १९७९ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीने सुरू झाला. सिटी पोस्ट वॉर्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली. १९७९ ते २००७ या प्रदीर्घ काळात त्यांनी नगरसेवक आणि महापौर म्हणून शहराची सेवा केली..

शरद पवारांचे निकटवर्तीय

शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठा दबदबा होता.अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आधीच कडकडीत बंद आणि दुखवटा पाळला जात असतानाच, सुरतवाला यांच्या जाण्याने पुणेकरांवर दुहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक संयमी, अभ्यासू आणि विकासकामे तडीस नेणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हिंदूस्तान कॉपरच्या शेअरने घेतली 40% ची झेप

0

हिंदूस्तान कॉपरच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला. गेल्या चार दिवसांत या शेअरने तब्बल 40% ची झेप घेतली आहे. इतकेच नाही, तर गेल्या 30 दिवसांत यात सुमारे 55.92 % ची वाढ झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास, हा शेअर 194% पेक्षा जास्त वाढला आहे.
दोन प्रमुख कारणं समोर
जगभरात तांब्याच्या किमती सध्या खूप तेजीत आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर (MCX) जानेवारी महिन्यातील डिलिव्हरीसाठी असलेल्या तांब्याच्या किमतीत 5% पेक्षा जास्त वाढ झाली. या वाढीमुळे तांब्याची किंमत प्रति किलो 1350 रुपयांच्या पुढे गेली. भू-राजकीय तणाव, व्यापारातील अनिश्चितता आणि डॉलरच्या घसरलेल्या किमती यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.तसेच हिंदुस्तान कॉपरला मिळालेला एक नवीन तांब्याचा ब्लॉक, या दोन प्रमुख कारणांमुळे शेअरमध्ये एवढी मोठी तेजी दिसून येत आहे.

कंपनी, शेअर बाजारातील कामगिरी
गुरुवारी, एनएसईवर हिंदुस्तान कॉपरचे शेअर्स 20% नी वाढून 760 रुपयांवर पोहोचले. या शेअरमधील ही तेजी गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाली होती. 22 जानेवारी रोजी हे शेअर्स 543.30 रुपयांवर बंद झाले होते आणि त्यानंतर तेजी अविरतपणे सुरूच आहे. मंगळवारी 5% आणि बुधवारी 12.5% ची वाढ झाली, ज्यामुळे धातूंच्या बाजारात एकच खळबळ उडाली. नवीन तांब्याच्या ब्लॉकमुळे वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कंपनीशी संबंधित बातम्यांनीही या तेजीला आणखी बळ दिले आहे. गेल्या आठवड्यात हिंदुस्तान कॉपरने जाहीर केले की, ते मध्य प्रदेशात एका नवीन तांब्याच्या ब्लॉकसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. यामुळे भविष्यात उत्पादन वाढण्याची अपेक्षा अधिक मजबूत झाली आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा जगभरात तांब्याची मागणी वाढत आहे.
इंडसइंड सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, तांबे त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, तांब्याच्या फ्युचर्समध्ये 5% ची वाढ झाली असून ते 6.2 डॉलर प्रति पाउंडच्या वर गेले आहे. हा विक्रम मोडला गेला कारण गुंतवणूकदार रिअल इस्टेट (जसे की सोने, चांदी, तांबे) सारख्या मालमत्तांकडे वळत आहेत. भू-राजकीय आणि व्यापारी अनिश्चितता तसेच डॉलरमध्ये अचानक आलेली घसरण यामुळे गुंतवणूकदार थोडे घाबरले आहेत. या कारणांमुळेही तेजी येत आहे.

जिगर त्रिवेदी पुढे म्हणाले की, तांब्याच्या मूलभूत घटकांमध्येही मजबुती आहे. तांब्याला सतत पुरवठ्याची कमतरता आणि औद्योगिक क्षेत्राकडून असलेली मजबूत मागणी यांचा आधार मिळत आहे. विशेषतः, जगभरात रिन्यूएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता वापर यामुळे तांब्याची मागणी वाढली आहे.