Home Blog Page 121

शहराच्या विकासाला आणखी गती देत पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवणार – गणेश बिडकर

गटनेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक गटाची अधिकृत नोंदणी

पुणे (दि ३१ ) : पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवत मोठ्या बहुमताने सेवा करण्याची संधी दिली आहे. पक्षाचे ११९ नगरसेवक विजयी करत नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजपाचे सर्व नगरसेवक कटिबद्ध असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक काम केले जाईल, असा विश्वास भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित ११९ भाजप नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी विधानसभवन येथे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सभासदांची नोंदणी व इतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या प्रसंगी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सलग तिसऱ्यांदा माझ्यावर गटनेते पदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पुणे शहर अधिक गतिमान, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायम कटिबद्ध आहे. मेट्रो, नदी सुधार यांसारखे मोठे विकास प्रकल्प मार्गी लावतानाच, सामान्य पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यावर आमचा विशेष भर राहणार आहे.”


पुण्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. मी महापालिकेतील विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी विकासासाठी कायम सकारात्मक आणि मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या स्वप्नातील विकसित, आधुनिक आणि सक्षम पुणे शहर साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नगरसेवक एकजुटीने कार्य करतील, अशी भावनाही यावेळी गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केली.

राजेश पांडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे विनोद कुलकर्णी यांची मागणी

साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा  वापर केल्याचा आरोप
पुणे: सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात  सरकारी यंत्रणांचा वापर करुन साहित्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठणकावून व्यासपीठावर सांगितले  तेव्हा मी मुख्यमंत्री असेपर्यंत साहित्य संस्थांची स्वायत्तता अबाधित राहील. कोणत्याही साहित्य संस्थेत सरकार लक्ष घालणार नाही किंवा हस्तक्षेप करणार नाहीअसे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात  सांगितले होते. मात्र संमेलन होऊन महिना होण्यापूर्वीच त्यांना खोटे ठरवण्याचा उद्योग त्यांचे नाव घेत पुणे पुस्तक महोत्सवाशी  निगडीत राजेश पांडे यांनी केला आहे. त्यांनी दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता राजेंद्र ननावरे यांच्या निमंत्रणावरून आयोजित केलेल्या एका झूम मीटिंगमध्ये साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने सुरू आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जाहीरपणे स्पष्ट करणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गड़करी यांचे नाव आले, त्यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे तातडीने लेखी खुलासा केला त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा आणि त्यांच्याशी निगडीत लोकांना साहित्यधर्मात लुड़बुड़ करू नका असे बजावले पाहिजे आणि आपली निस्पृह भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मुंबई मराठी साहित्य संघ आणि एशियाटिक बाबत जे घडले ते आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बाबतीत घडू देणार नाही असे  परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर जोशी, वि.दा.पिंगळे, माधव राजगुरु, प्रमोद आडकर, डॉ आशुतोष जावडेकर, राजन लाखे, राजीव बर्वे यावेळी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, एनबीटीमार्फत शाखांना पैसे दिले जातील असे थेट आमिष दाखवून सरकारी यंत्रणांचा वापर राजेश पांडे करत आहेत. मतदारांना आमिष दाखवणे, निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे यासारखे प्रकार राजेश पांडे करत आहेत. योगेश सोमण यांच्या नावाने आपण पॅनल करतो आहोत हे या क्लिपमध्ये उघड म्हटलेले आहे. त्यामुळे योगेश सोमण यांच्यासह त्यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. तोंड लपवून झूम मीटिंगमध्ये बोलणारे पांडे हे एका पक्षाचे पदाधिकारी एनबीटीचा उल्लेख करत आहेत. वेगवेगळ्या संघटनांची नावे घेत आहेत आणि त्या संघटना आणि मी कुठेही समोर दिसणार नाही, असे सांगून छुप्या पध्दतीने साहित्य परिषद ताब्यात घेण्याची योजना बोलत आहेत. समोर येऊन लढण्यापेक्षा पाठीमागून हे वार करत आहेत. त्याचा अर्थ उघड़ आहे की यांच्या मनात पाप आहे, खोट आहे. मराठी साहित्य विश्वाची आणि मराठी विचारधारेची एवढी भीती त्यांना का वाटते आहे? याचा खुलासा त्यांनी करावा. एका मतदारापाठीमागे एक माणूस लावण्याची भाषा आणि लोकसभेप्रमाणे तयारी याचा अर्थ साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व आयुधांचा वापर करू, मात्र परिषद ताब्यात घेऊ ही भूमिका सर्व काही स्पष्ट करणारी आहे अशा प्रवृत्तींचा निषेधच केला पाहिजे.

सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक बेकायदेशीर आहे असे म्हणणाऱ्या मंडळींनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन ही निवडणूक कायदेशीर आहे हे कृतीतून दाखवून दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आमच्या आघाडीत सर्व विचारधारांचे उमेदवार आहेत. सर्वसमावेशक अशी  ही आघाडी आहे.साहित्य  हिच आमची विचारधारा आहे.आजवर कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारांची संघटना कोणत्याही साहित्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली नव्हती यावेळेसचे चित्र मात्र वेगळे आहे. विरोधी पॅनलचे उमेदवार समविचारी लोकांनी एकत्र येऊन पॅनल स्थापन केले आहेअसे जाहीरपणे सांगत असले तरी ते धादांत  खोटे आहे. पडद्यामागून त्यांना कोणाचा पाठिंबा आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे. आणि एनकेन प्रकारें साहित्य परिषद गिळंकृत करण्याचा कुणाचा डाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. त्याबाबतची ध्वनिचित्रफीत सर्व काही सांगणारी आहे. योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि  प्रदीप निफाडकर हे केवळ प्यादे आहेत. ज्यांना स्वतःचा विचार नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता नाही असे लोक साहित्य परिषदेची स्वायत्तता कशी अबाधित राखणार ? आपल्या बोलवित्या धन्याचे  नाव त्यांनी सांगावे.असेही कुलकर्णी म्हणाले. आमच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीने ३१ पैकी ३१ जागी उमेदवार उभे केले. विरोधी आघाडीला पुणे शहर वगळता इतरत्र उमेदवारही मिळाले नाहीत.पुणे जिल्हा वगळता सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार आणि कोकणातील सर्व जिल्ह्यात आमच्या आघाडीचे १८ प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे वरच्या तीन  पदाधिकाऱ्यांच्या जागा निवडून आणण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी स्थानिक पोस्टाला मॅनेज करण्यापासून पत्रिका गोळा कशा करायच्या, गोळा केल्या तरी त्या कशा लगेच मतपेटीत टाकायच्या नाहीत याविषयी हे महाशय  बोलत आहेत. पुण्यात एका व्यक्ती मागे एका कार्यकर्त्याची नेमणूक केल्याचेही  त्यांनी सांगितले आहे. पुण्यातील नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागातील पत्रिका गोळा करण्याचे आदेश दिल्याचे समजते. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप करणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी आणि सदर व्यक्ती विरुद्ध तत्काळ फौजदारी कारवाई करावी असे पत्र त्यांना परिवर्तन उत्कर्ष आघाडीने दिले आहे. हे कुलकर्णी यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेवर प्रशासक आणण्याची भाषा  आणि धमकी गेल्या तीन वर्षापासून दिली जात आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र साहित्य परिषदेने आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्याकडे आल्यानंतर महामंडळाने ठाम भूमिका घेत जाहीर विरोध केला. साहित्य संमेलनातही त्याचा पुनरुच्चार केला. त्याचा परिणाम म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेला आणि  पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साहित्य परिषदेशी संबंधित एका केस मध्ये एकाच दिवशी तीन आदेश बेकायदेशीररित्या काढण्यात आले त्यावेळी जैन बोर्डिंग प्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेने एका पत्रकाद्वारे मागेच जाहीर केले होते. महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. निवडणुकीद्वारे संस्थेत येणे कठीण दिसू लागल्याने आणि  प्रशासक आणण्यात यश न मिळाल्याने आता राजकीय पक्ष आणि संघटनांचा आधार ही मंडळी घेऊ लागली आहेत .हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी चित्र आहे.असेही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य  स्त्रियांमध्ये वैदिक काळापासून-डॉ. अंजली पर्वते

पुणे : इतरा (ऐतरेय), जबाला, मदालसा, चुडाला, अपाला, विश्पला या तेजस्वी स्त्रिया प्राचीन भारतात होऊन गेल्या. समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य त्याही काळात स्त्रियांमध्ये होते. समाजात कर्तृत्व सिद्ध करणारी आणि स्वत्व जपायचे शिक्षण देणारी स्त्री त्याही काळात भारतात होती. तेजाला वय, जात, माणूस किंवा प्राणी याचे बंधन नसते, हे आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासात पाहिल्यावर लक्षात येते, असे मत प्राचीन भारताच्या अभ्यासिका लेखिका डॉ. अंजली पर्वते यांनी व्यक्त केले.

श्री देवदेवेश्वर संस्थानच्या वतीने  डॉ. अंजली पर्वते यांचे ‘प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. अंजली पर्वते म्हणाल्या, प्राचीन भारतात लोखंडी पाय जिला बसवला होता अशी विश्पला नावाची स्त्री होती. जिने युद्ध करून राज्याचे थांबवलेले पाण्याचे प्रवाह मोकळे केले आणि राजाचा तसेच जनतेचा आदर मिळवला. अपाला जिला कुष्ठरोग असल्यामुळे तिच्या पतीने स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. इतरा या त्या काळातील खालच्या जातीतील स्त्रीने आपल्या आणि मुलाच्या स्वतःसाठी लढा देऊन महिदास या तिच्या पुत्राने ऐतरेय ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती ज्ञान अर्जित करून केली. स्वत्व टिकवायला शिकविणारी जबाला तसेच केवल भौतिकच नाही तर आध्यात्मिक उन्नतीचा मुलांना उपदेश देणारी मदालसा ही देखील तेजस्वी स्त्री होती.

त्यापुढे म्हणाल्या, चूडाला ही प्राचीन भारतातील अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान स्त्री होती, जिने आपल्या पतीला राजा शिखिध्वज ला गुरु बनून उपदेश केला. हनुमानाची माता अंजनी तसेच ऋग्वेदातील देवशुनी सरमा या देखील प्रत्यक्ष मानवी नसणाऱ्या तेजस्वी स्त्रिया  दैवी स्त्री शक्तीचे प्रतीक आहेत.

एकीकडे शरद पवार सक्रीय तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्यास होकार

पुणे-एकीकडे शरद पवार यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची माहिती घेऊन राजकीय सक्रियतेचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे वृत्त आले आहे . तसेच उद्याच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाची शनिवारी सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच नरेश आरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे देखील समोर आले आहे. राजकीय गोष्टींची चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नरेश आरोरा यांना बारामती येथे बोलावले असल्याची माहिती आहे. त्यानुसार नरेश आरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आरोरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची उद्या 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष पदावर कोण असणार यावर देखील निर्णय घेतला जाणार आहे. सुनेत्रा पवारच पक्षाच्या अध्यक्षा असाव्यात, अशी लोकांची भावना आहे. त्यानुसारच पक्ष निर्णय घेईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे देखील पक्षाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत असल्याचे समजते.

लक्ष्मीनाराण चौक,मोदी प्लाझा मधील प्रतिक मेहताच्या हुक्का पार्लरवर छापा-फायरब्रिगेडकडून शटर तोडून आतला उध्वस्त केला बाजार …

पुणे- स्वारगेट जवळील लक्ष्मीनारायण चौकातील मोदी प्लाझा मध्ये असलेल्या एलडिनेरो हॉटेलमधील अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारून हॉटेलचा आणि हुक्का पार्लर चा मालक प्रतिक विकास मेहता याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक मेहता हा धनकवडी चव्हाण नगर येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी असेही सांगितले कि,’स्वारगेट पो.स्टे. दि.३०.०१.२०२६ रोजी हद्दीत लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असलेबाबत खबर प्राप्त होताच स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस निरीक्षक विकास भारमळ, महिला फौजदार सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, मार्शल जाधव व साळवे यांनी प्राप्त माहितीचे ठिकाणी छापा टाकण्यासाठी मोदी प्लाझा बिल्डीग, तिसरा मजला वरील एलडिनेरो हॉटेल येथे गेले असता सदर हॉटेलचे शटर आतून बंद होते. शटर उघडण्यासाठी वारंवार आवाज देवून देखील हॉटेलचे आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने फायरब्रिगेड जनता अग्नीशमन केंद्र जनता वसाहत पर्वती पुणे ०९ यांना घटनास्थळी बोलावून त्यांचे स्टाफ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने मोदी प्लाझा एलडिनेरो हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये बेकायदेशीररित्या ग्राहकांकडुन रोख रक्कम घेवुन तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरिता कामगाराकरवी आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास धोकादायक/अपायकारक असा अवैधरित्या हुक्का, सेवना करिता हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना विक्री करताना मिळुन आले. तसेच विविध हुक्का पॉट, चिलीम, वेगवेगळे प्रतिबंधीत तंबाखूजन्य फ्लेवर व अन्य साहित्य मिळून आले. सदर बाबत हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार, वय-३३ वर्षे, रा. गुलटेकडी स्वारगेट पुणे. याचेकडे विचारणा करता त्याने हॉटेलचे मालक प्रतिक विकास मेहता, रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे यांचे सांगणेवरुन हॉटेलमधील वेटर यांचेकरवी, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले.
सदर बाबत एलडिनेरो हॉटेल, मोदी प्लाझा, स्वारगेट याचे मालक प्रतिक विकास मेहता, हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार व हॉटेलमधील वेटर दिपक सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादुर परिहार यांचेवर स्वारगेट पो.स्टे. गु.रजि.नं. २०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम- २०१८ चे कलम ४-अ, २१- अ, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून एकूण रु. २२,५६०/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त साो, परि. २ पुणे शहर मिलींद मोहिते, मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक गुन्हे विकास भारमळ, महिला पोलीस उप निरीक्षक सुजाता जाधव, व पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोबरे, जाधव, साळवे यांनी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त त्यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महात्माजींच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीजींच्या १९४२ च्या इंग्रज ‘चले जाव’ या घोषनाने सर्व देश पेटून उठला. १९४२ च्या आंदोलनात युवक, विद्यार्थी, तरूण या शिवाय या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील महिला मोठ्या संख्येने या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झाल्या. अनेक काँग्रेसजणांबरोबर महिलानांही तुरूंगवास सहन करावा लागला. पुण्यामध्ये बरीच वर्षे आगाखान पॅलेस मध्ये महात्माजी व कस्तुरबा यांचे वास्तव्‍य होते. आगाखान पॅलेसमध्ये असताना गांधीजींचा सातत्याने पत्र व्‍यवहार चालू असे. ‘चले जाव’ चळवळी नंतर इंग्रजानो भारत सोडा, स्वातंत्र्य द्या असा पत्रव्‍यवहार चालू ठेवला. इंग्रजांना जनता स्वस्थ बसू देईना आंदोलन सतत चालू होते. अखेर १९४७ ला इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. परंतु पाकिस्थान वेगळा देश केला. त्यानंतर नौखाली येथे मोठी दंगल झाली तेथे स्वत: गांधीजी गेले व शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. अशा या महान मानवतावादी नेत्यास मी शतश: प्रणाम. करतो.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अजित दरेकर, प्राची दुधाने, द. स. पोळेकर, नवनिर्वाचित नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, प्रशांत जगताप, रफिक शेख, अविनाश साळवी, सायरा शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके, रामचंद्र कदम, दिपाली डोख, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, साहिल केदारी, तसलिम शेख, आसिया शेख, काशिफ सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नऱ्हेगाव येथील वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. ३०: सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या नऱ्हे गाव येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील प्रवेशासाठी ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑफलाईनपद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वस्तीगृहात बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीनी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, ओमकार होम्स, सर्वे नं. १४/४, जे.एस.पी.एम. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ, भुमकर मळा, नऱ्हेगाव, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदिप संकपाळ यांनी केले आहे.

“पुण्याच्या राजकीय व सामाजिक सुसंस्कृत संवादाचा दुवा हरपला” – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

शांतीलाल सुरतवाला यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “सुरतवालाजींशी माझा गेल्या ३५ वर्षांपासूनचा ऋणानुबंध होता. पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात एक सक्रिय नागरिक, अभ्यासू कार्यकर्ता आणि लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात कायम राहील. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा असलेला सुसंस्कृत संवाद आणि कामातील सुजाणपणा हा वाखाणण्याजोगा होता.”

शांतीलाल सुरतवाला हे सहिष्णू आणि समजूतदार राजकारणाचे खंदे प्रतिनिधी होते. अनेक सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराने एक अनुभवी, संयमी आणि सर्वसमावेशक नेतृत्व गमावले आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समन्वय साधणारा एक महत्त्वाचा दुवा आज नाहीसा झाला आहे.

“मी शांतीलाल सुरतवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवले पुलावर स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्याकामी ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान लेन बंद

0

नागरिकांना सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे, दि. ३०: पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यासाठी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांनी या सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू, मोहम्मद अली जीना व भाजपाची जुनीच युती, आता त्याच युतीचे पुनरुज्जीवन.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा.

मुंबई, धाराशिव, दि. ३० जानेवारी २०२६

राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की,
एकीकडे भाजपा व एमआयएम धार्मिक द्वेष पसरवत आहेत तर दुसरीकडे निवडणूक आयोग, पैसा, हिंदु , प्रशासकीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील कठपुतली बाहुली बनलेलेही राज्याने पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लोकशाही पायमल्ली करण्यात आली. या परिस्थितीत आम्ही वंचित बहुजन आघाडी, रासप, ओबीसी बहुजन आघाडी हे नवे मित्र पक्ष जोडले आहेत. कार्यकर्त्यांना संधी दिली व जनतेने मोठा विश्वास दाखवत काँग्रेसला राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले. नगरपालिकेत ४१ नगराध्यक्ष १००६ नगरसेवक तर महानगरपालिकेत ३५० नगरसेवर निवडून दिले, तीन महानगरपालिकेत काँग्रेसच पक्षाचे महापौर होत आहेत असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

अजित पवारांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या लोकनेत्याचे अकाली निधन मनाला चटका लावून गेले. विमान अपघातात झालेल्या निधनाने संशयाचे ढग निर्माण झाले आहेत, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. जर संशय व्यक्त केला जात असेल तर सखोल चौकशी करून संशय दूर झाला पाहिजे.
यावेळी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार व प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते धीरज देशमुख, धारश्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेत काँग्रेसच्या ‘गटनेते’ पदी अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची निवड.

पुणे- महा-पालिकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले. आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व पुण्याचे निरिक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेस भवन येथे सर्व नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांची स्वतंत्र भेट घेवून गटनेता पदासाठीचा कल घेतला होता. तेव्हाच कदम यांच्या नावास एकमताने समंती मिळाली होती.
गटनेते पदी निवड झाल्यानंतर अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत विभागीय आयुक्तांकडे जाऊन तसे पत्र सादर केले.


अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम हे कोथरूडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रणी नाव आहे. चंदूशेठ यांना लोकसवेची प्रेरणा घरातून म्हणजेच माजी मंत्री आणि भारती वि‌द्यापीठाचे संस्थापक स्व.डॉ. पतंगराव कदम आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष स्व. सुबराव कदम यांच्याकडून मिळाली. पुण्यातील कोथरुड भाग भाजपाचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत आहे. भाजपाच्या होम पीचवर चंदूशेठ गेली १५-२० वर्षांपासून नॉट आऊट बॅटिंग करत आहेत.२००७ साली चंदूशेठ यांनी पुण्यासारख्या महानगरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रथम पाच वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कामाच्या जोरावर मोठा जनाधार मिळवला. आपल्या अथक परिश्रमाने लोकांशी जिव्हाळ्याच्या नाते जोडले.२०१२ साली त्यांनी पहिल्यांदा पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना स्वतः तर मोठा विजय मिळवलाच शिवाय काँग्रेस पक्षाच्या सहकारी महिला उमेदवारला देखील निवडून आणले. हीच किमया त्यांनी २०१७ आणि आता २०२६ मध्ये करून दाखवली आहे.
लोकप्रतिनिधीत्वाच्या या प्रवासात त्यांनी प्रभागात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा सक्षम केल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कोरोनात स्व. खर्चाने ५००० महिलांचे लसीकरण, महिला सशक्तीकरण योजना, बांधकाम कामगार योजना, घरेलू कामगार योजना, संजय गांधी निराधार योजना, पेन्शन योजना, आधारकार्ड वाटप, मोफत ई-श्रम योजना अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले.
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी ते नेहमी उपलब्ध असतात. प्रत्येकाला आपुलकीने भेटतात, विचारपूस करतात, त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी राबतात. त्यांच्या या मनापासूनच्या कामामुळे लोक त्यांना ‘आपलं चंदूशेठ’ म्हणून ओळखतात.
पुणे शहरात काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमांकडे चंदूशेठ सक्रिय सहभाग घेत असतात. पक्षाची ध्येय धोरणे तळगळात पोहोचवण्यासाठी तळमळीने काम करतात. युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस मध्ये जाऊन तरुणांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शनपर प्रोत्साहन ते करत असतात. पक्षाच्या पातळीवर विविध मेळाव्याचे आयोजन ते करतात. लोकांच्या हक्कांसाठी मोर्चे, विविध आंदोलनात सहभागी होतात. म्हणून ते लोकभूमिख नेतृत्व ठरतात. विचारांची बैठक पक्की असली की कार्यकर्ते घडतात, हेच कार्यकर्ते पुढे प्रतिनिधित्व करतात अस ते नेहमी सांगतात. चंदूशेठ यांनी त्यांच्या आचरणातून काँग्रसचा सर्वसमावेशक विचार जपला आहे.
भाजपच्या प्रचंड ताकदीच्या विरोधातही चंदूशेठ यांनी कधी हार मानली नाही. कोथरुड सारख्या अभेद्य बालेकिल्ल्यात चंदूशेठ यांनी त्यांच्या अथक मेहनतीने, लोकांशी असलेल्या जवळीकने आणि काँग्रेसच्या मूल्यांवरचे अटळ विश्वासाने कोथरूडमध्ये काँग्रेसचा गड मजबूत केला. चंदूशेठ यांचे यश लोकांच्या मनातील विश्वासाची आणि प्रेमाची साक्ष आहेत.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय:दूषित झालेल्या नीरा नदीची केली पाहणी, बारामतीकरांना आता ‘साहेबांचा’ आधार

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली.

अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विशेषतः बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे, आता अजितदादानंतर बारामतीकडे कोण बघणार, इथल्या लोकांच्या समस्या कोण बघणार, असा प्रश्न बारामतीकरांना पडला होता. परंतु, अजित पवारांच्यानंतर आता शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांनी येथील नीरा नदीची पाहणी केली आहे.

नीरा नदीबद्दल सातत्याने चर्चा होती की नीरा नदी प्रदूषित झाली आहे. आता त्याची पाहणी करून यासंदर्भात शरद पवारांनी माहिती घेतली आहे. अजितदादांच्या निधनाने शरद पवार खचल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज शरद पवारांनी पुन्हा कामाला सुरुवात करत बारामतीकरांना विश्वास धीर देण्यासाठी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शरद पवार जेव्हा नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तेव्हा येथील स्थानिकांनी कार्यकर्त्यांनी येथील तक्रारी व समस्या मांडल्या. नदीचे पाणी क्षारयुक्त झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दूषित पाण्यामुळे शेतीवर परिणाम होत असून जमिनी सुद्धा क्षारपट झाल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच नीरा नदीत कारखान्याचे दूषित पाणी सोडल्याने नदीचे पाणी खराब झाले आहे. यावर कारखान्यांनी आता वेस्ट पाणी टाकणार नाही असे सांगितले असेल तरी इतर अनेक घटकांमुळे पाणी दूषित होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

यावेळी शरद पवारांनी नदीच्या भागातील सर्व कारखान्यांची नावे घेतली. ज्यातून दूषित पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारखान्यांचे जे दूषित पाणी येत आहे, ते नदीत सोडण्यापेक्षा बॉयलर सिस्टम आणावी, अशी मागणी स्थानिकांनी शरद पवारांकडे केली आहे. अजित पवारांनी देखील खूप लक्ष घातले असल्याची आठवण देखील यावेळी स्थानिकांनी सांगितली.

अनेक वर्षांपासून बारामतीची जबाबदारी शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवली होती. त्यानंतर शरद पवार हे देशाच्या राजकारणात सक्रिय होते. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला. अनेक विकासकामे इथे केली. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीचे सूत्र हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

0

पुणे, दि. ३०: राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’चे ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून परीक्षेचे प्रवेशपत्र https://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

ही परीक्षा दोन्ही दिवस तीन सत्रांमध्ये होईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी १८०० २२२ ३६६/ १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://cgrs.ibps.in या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन आयडी (रजिस्ट्रेशन क्रमांक) आवेदनपत्रावर उपलब्ध आहे. तसेच पासवर्ड हा संबंधित उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे. याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उरुळी कांचन पोलिस ठाण्यास विचारणार जाब

सोरतापवाडी हुंडाबळी प्रकरणाचा पाठपुरावा; ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारींची सद्यपरिस्थिती जाणून घेणार

पुणे.दि.३०: सोरतापवाडी (उरुळी कांचन) येथील हुंडाबळी प्रकरणात एका उच्चशिक्षित इंजिनियर विवाहितेने (दि.२४जानेवारी) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संवेदनशील प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उद्या (दि. ३१) सकाळी ११.३० वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाबाबत निवेदन दिले असून, तपासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासह पुढील कारवाईबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच, ग्रामीण भागातील महिलांवरील हिंसाचार, कौटुंबिक छळ आणि संबंधित तक्रारी कशा हाताळाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी परिसरातील महिला समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या यांनी दुपारी १२ वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्यात संवाद साधण्यासाठी जरूर यावे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. या भेटीद्वारे ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.

गांधी विचारांना जगभरात सन्मान, ते संपणार नाहीत – उल्हास पवार

पुणे-जगभरात भारताची ओळख ही गांधीजींचा देश अशीच आहे. गांधी विचाराला जगभरात मान्यता आणि सन्मान आहे. ते विचार संपवणारांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. गांधी विचारांचे महत्व संपता संपणार नाही असा विश्वास ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी सकाळी गांधी भवन, कोथरूड येथे सर्वधर्म प्रार्थना आणि भजन करण्यात आले. त्यानंतर “मानवतेसाठी लढणारा महात्मा” या लेखक अॅड. शंकर निकम लिखित पुस्तकाचे प्रकाशन शीलाताई बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, डॉ. चैत्रा रेडकर, लक्ष्मिकांत देशमुख, अन्वर राजन यावेळी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने केले.

उल्हास पवार म्हणाले की, लंडन येथे मी गेलो होतो . तेथे गांधीजींच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे सहा ठिकाणी शो होते ते सर्वच्या सर्व हाऊस फुल्ल होते. असाच अनुभव वॉशिंग्टन येथे देखील आला. तेथे तीन पिढ्या एकत्र बसून हा चित्रपट पहात होते. तेथील लोक गांधीजींच्या देशातून आलेला म्हणून माझ्याशी संवाद साधत होते. आपल्याकडे सहा वेळा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न झाला. गांधीजींचे विचार संपविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला व होत आहे. गांधीजींची हत्या झाली तरीही गांधीजींचे विचार अजूनही मनात, विचारात, आचरणात जिवंत आहेत. त्यांच्या वर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. अॅड. शंकर निकम यांनी अतिशय बारकाईने गांधी विचारांचा मागोवा घेतला आहे. त्याचे वाचन व चिंतन सर्व वयोगटातील लोकांनी करावे.

डॉ. चैत्रा रेडकर म्हणाल्या की, जात नको पण जात ज्या व्यवसायामुळे नावास आली तो व्यवसाय आणि ते कलाकौशल्य मात्र टिकवलं पाहिजे अशी भूमिका गांधीजींनी घेतली. गांधीजींनी जात निर्मूलनाविषयी महत्वपूर्ण कार्य केले. तेल घाणा कसा चालवायचा त्यातले बारीक ज्ञान हे तेली समाजातील व्यक्तींना आहे, त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी , देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी होऊ शकतो, मात्र तेली समाजाला वर्षानुवर्षे जातीवरून हिणवलं गेले. त्यामुळे तरुण पिढी आता इतर व्यवसाय, नोकरी कडे वळत आहे, त्यामुळे जात नको पण व्यवसाय टिकवा, असे गांधीजींचे मत होते.

मुद्दाम समाजात द्वेष पसरविण्यासाठी समाजमाध्यमातून केलेला गांधीजींविषयीचा अपप्रचार याला अभ्यासपूर्ण लेख आणि अनुभव याद्वारे नेस्तनाबूत करण्याची गरज आहे.

अॅड. निकम म्हणाले की, गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांवर दबाव आणला. त्यांच्या आंदोलनात प्रत्येक जाती धर्म आणि व्यवसायाचे लोक सहभागी होते.

प्रास्तविक महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर आभार लक्ष्मीकांत देशमुख यांनी मानले.