Home Blog Page 110

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली असून, त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०) आणि अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. त्यानंतर, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी इतर तीन जणांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सहाही जणांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी बांधकाम मजूर असून, ते सध्या केसनंद भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहतात. यातील तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत, तर उर्वरित तीन वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने जे.जे. रुग्णालयात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावतीने नवमाता व बालकांना वस्त्रदान

​मुंबई दि.८: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा नव्हे, तर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असते. याच भावनेतून, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता आणि नवजात बालकांसाठी ‘वस्त्रदानाचा’ हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

​आई होण्याच्या आनंदात आणि प्रसूती वेदनेतून सावरणाऱ्या मातांसाठी तसेच या जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्या जीवांसाठी हे वस्त्रदान म्हणजे मायेची ऊब ठरली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः नवमातांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि बालकांना मायेने वस्त्रे अर्पण केली. अनेक गरजू मातांच्या डोळ्यांत यावेळी समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेचे शब्द उमटले.

​या उपक्रमादरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. जे.जे. प्रशासनाने दिलेल्या सर्व प्रस्तावांवर शासन दरबारी सकारात्मक पाठपुरावा करणार असून, आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठक घेण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयातील वॉर्ड्सच्या नूतनीकरणासाठी डॉ. गोऱ्हे स्वतः विशेष प्रयत्न करणार आहेत.

मुंबईतील या यशस्वी उपक्रमानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथेही डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, दिलीप नाईक, जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख वर्षा मोरे, महिला विभागप्रमुख नीलम पवार, रेखा सुरणकर, पुणे शहर संघटक आनंद गोयल, अल्का माने, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली वाढे, संतोष सावंत, जन्नत परवीन आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर ​या कार्यक्रमास रुग्णालयातील वैद्यकीय डीन डॉ.संजय सुरासे, डॉ.विजय कल्याणकर, डॉ.सोनाली देशमुख, डॉ.अरुण राठोड, डॉ.मयुरी वावधने, डॉ.अर्चना पाटील, चित्रा सेलवराज, नितीन कोलंबकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जे जे हॉस्पिटलमधील जवळपास सर्व म्हणजे निवासी १००० रुग्णांना अन्नदानही करण्यात आले.माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेला हा वाढदिवस अनेकांच्या आयुष्यात उत्साहाचा किरण ठरला असून, सर्वांनी लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

पुणे महापालिकेच्या बांधकाम मंजुरीचे बोगस कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी जोरात सुरु ..बड्या रॅकेटकडे बडे दुर्लक्ष

पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम मंजुरीचे बोगस कागदपत्रे सादर करून पुण्यात दस्तनोंदणी जोरात सुरु असून महापालिका आणि PMRDA च्या हद्दीतसुरु असलेल्या बड्या रॅकेटकडे बडे दुर्लक्ष वारंवार होत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कात्रज भागात बेकायदा बांधकामांचे दस्त नोंदणी झाल्याचे आरोप नुकतेच वसंत मोरे यांनी केले होते. पण बेकायदा बांधकामाच्या दस्त नोंदणीच्या महापुराने पुण्याचे वाट्टोळे सुरु ठेवलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे मात्र यावर डोळे उघडत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. दरम्यान असेच एक प्रकरण वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि मंजूर बांधकाम आराखड्यांच्या आधारे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदिप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५), रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), संदेश राजू आवळे (वय ३४), प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज बी, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(३), ३४०(२), ३१८(४), ३(५) तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १३, पुणे शहर कार्यालयाचे अधिकारी व्ही. डी. कासेवाड (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२४ रोजी घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्त क्र. २३७८१/२०२४ नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना फिर्यादी कासेवाड यांना जोडलेल्या पूरक कागदपत्रांबाबत संशय आला. संबंधित दस्तासोबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे कमेन्समेंट प्रमाणपत्र व मंजूर बांधकाम आराखडा जोडण्यात आला होता.

या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ती पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) यांच्याकडे पाठविण्यात आली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपअभियंता कार्यालयाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले.

या पत्रानुसार, धायरी येथील सर्व्हे नं. १०५, हिस्सा ५/१ या ठिकाणी नमूद बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यानंतर सादर केलेली कमेन्समेंट प्रमाणपत्रे, कम्प्लिशन प्रमाणपत्रे व मंजूर आराखडे बनावट असल्याची खात्री झाली. संबंधित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे करीत आहेत.

डॉ. चेतना पाठक, पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांचे भावस्पर्शी गायन

पुणे : लयबद्ध, भावपूर्ण रितीने साकारलेले डॉ. चेतना पाठक यांचे गायन तसेच पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांनी सुमधुर आणि बहारदारपणे सादर केलेले विविध राग अशी सांगीतिक मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते मधुकर खांडवे आणि मधुकर हस्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित चौथ्या मधु-स्मृती संगीत समारोहाचे!

संगीत शिक्षणाला समर्पित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. विद्या खांडवे व आजच्या तरुण पिढीचे आघाडीचे गायक कलाकार आदित्य खांडवे यांच्या संकल्पनेतून न्यू इंग्लिश हायस्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.  समारोहाचे उद्‌घाटन ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते झाले.

समारोहाची सुरुवात किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेल्या डॉ. चेतना पाठक यांनी राग अपूर्वकल्याणमधील ‘साई सबन के बनवारे’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीत ‘ऐसी लगन तुम्ही सो लागी’ ही रचना सादर केली. स्वरांची लयबद्ध आणि भावपूर्ण मांडणी करत राग दुर्गामधील द्रुत खयालातील ‘माता भवानी काली दुर्गा गौरी’ ही रचना तेजस्वीपणे सादर केली. त्यानंतर ‘तान तदानी दानी तदानी’ हा तराणा सादर करून डॉ. पाठक यांनी आपल्या गायनाची सांगता मिश्र पहाडीमधील ‘तुम बिन साजन बरसत नैना’ या रचनेने केली. प्रणव गुरव (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), फ्युमी निगेशी, पल्लवी कुलकर्णी-घोडके (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

स्वरांचे सखोल चिंतन आणि कमालीच्या संवेदनशीलतेतून साकारलेल्या पंडित मधुप मुद्‌गल यांच्या मैफलीने कार्यक्रमाची रंगत गहरी झाली. पंडित मुद्‌गल यांनी गायनाची सुरुवात छायानट रागातील ‘नेवरकी झनकार’ या विलंबित खयालाने केली. त्याला जोडून ‘झनन झनन’, ‘नही आना’ हे दोन छोटा खयाल प्रभावीपणे सादर केले. राग जोग सादर करताना ‘पिहरवा कोबेर मायो’ ही रचना सादर करून ‘दे रे न तदानो’ हा तराना ऐकविला. ‘डार डार पात पात बुलाये’ ही काफी कानडीतील रचना ऐकविताना पंडित मुद्‌गल यांनी शब्दांचा भाव जपत रागाचे स्वरूप साकारत नेले. याला जोडून ‘तनन तेरे ना तना दे रे ना दिम’ हा तराना तसेच हिंडोल हा प्रकार ऐकविताना ‘आयी बसंत रितु’ हा इंदोर घराण्यातील खयाल बहारदारपणे सादर करत त्याला जोडून ‘ताना दिड ताना नोम’ हा तराणा सादर केला. भक्तीसंगीतावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या पंडित मुद्‌गल यांनी मैफलीची सांगता संत कबीर यांच्या ‘आवे न जावे मरे नही जन मे’ या भक्तीरचनेने केली. पंडित मधुप मुद्गल यांनी तालाचे वैविध्य दाखवताना हींडोल रागातील सुरफाक्ता सारख्या तालातील बंदीश सादर करून रसिकांची दाद मिळविली. भावस्पर्शी सादरीकरण आणि स्वरांमधून साकारलेल्या अनोख्या अनुभूतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), निलेश धाक्रस (तानपुरा) तसेच कुशाल शर्मा (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.

छोट्या मैफलीतून घडतो कलाकार अन्‌ श्रोत्यांमध्ये संवाद : पंडित सुहास व्यास

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित सुहास व्यास म्हणाले, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत हे देशाचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. छोटेखानी मैफलीतून शास्त्रीय संगीताचे आयोजन करण्याचे श्रेय मधुकर खांडवे आणि मधुकर हस्तक यांना जाते. छोटेखानी मैफलींचा आनंद वेगळाच असतो. या मैफलींमध्ये गाणे नुसते रंगतच नाही तर श्रोते आणि कलाकारांमध्ये संवाद घडतो.

कलाकारांचा सत्कार डॉ. विद्या खांडवे, मोहन खांडवे यांनी केला. आदित्य खांडवे यांनी सूत्रसंचालन केले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये २०१–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित असेल. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्या ६ मार्च २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येणार असून, अंतिम मतदारयादी मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना व सूचना-आदानप्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
000

बिल्डर सुशील रहेजासाठी पोलिस तत्पर; वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक!

मुंबई : एकीकडे अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिल्डर सुशील रहेजा अद्याप मोकळा असताना, दुसरीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांनी तडकाफडकी अटक केल्याने खळबळ माजली आहे.

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून महिला पदाधिकाऱ्यांना काल सायंकाळी ७ वाजेनंतर अटक  केल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, भाजप समर्थक मानले जाणारे बिल्डर सुशील रहेजा यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र, त्यांना अटक करण्यात टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  याच प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेले वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागर गवई, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे.  कायद्यानुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी (विशेष परिस्थिती वगळता आणि दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय) अटक करता येत नाही. मग स्नेहल सोहनी आणि इतर महिलांना सायंकाळी ७ वाजेनंतर कोणत्या कायद्याच्या आधारे अटक केली? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच ज्या तत्परतेने आंदोलकांना अटक करण्यात आली, तीच तत्परता गंभीर गुन्ह्यातील आरोपी सुशील रहेजाला अटक करताना का दाखवली जात नाही? पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत आहेत आणि न्यायासाठी लढणाऱ्या महिलांना रात्रीच्या वेळी अटक केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की हा कोणता कायदा आहे? असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाने आता जोर धरला असून, वंचित बहुजन आघाडीने या अटकेचा तीव्र निषेध केला आहे. अट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याने मध्यरात्रीपासून भिवंडी पोलिस चौकीत वंचितचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. आणि  प्रशासनाला जाब विचारला.

बिल्डर सुशील रहेजाला वंचितने शिकवला धडा:फोडले ऑफिस, रहेजा अक्षरशः पळून गेला

“तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” म्हणत मराठी तरुणास मारहाण केल्याचा होता आरोप

मुंबई-प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने एका मराठी तरुणास जातीवाच शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या सुशील रहेजा नामक बिल्डरला चांगलाच धडा शिकवला आहे. वंचितच्या महिला कार्यकर्त्यांनी या बिल्डरच्या कार्यालयावर धाव घेत त्याचे कार्यालय फोडले. या घटनेमुळे रहेजावर अक्षरशः पळून जाण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या राहुल जाधव या बौद्ध तरुणास क्षुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली होती. ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर त्याला मारहाण केली होती. यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला होता. रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीसुद्धा पोलिसांनी आरोपी रहेजा बिल्डरला अद्याप अटक केली नाही. यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुशील रहेजा शनिवारी त्याच्या चेंबूर येथील ऑफिसमध्ये होते. ही गोष्ट समजल्यावर वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी त्याच्या ऑफिसमध्ये धाव घेतली होती. ते तिथे पोहोचताच रहेजाने आपल्या कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाचे ऑफिस फोडले.
पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजाकडे कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कागदपत्रे (पेपर) नीट स्टेपल न केल्याचा राग मनात धरून रहेजा यांनी राहुलला मारहाण केली. केवळ इतक्यावरच न थांबता, “तुम घाटी, जय भीम वाले लोग कभी सुधरेगा नही” असे वादग्रस्त आणि जातीवाचक शब्द वापरून त्याचा अपमान केला व स्टाफ समोरच मारहाण केली होती. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला होता. “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे.

आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असा इशाराही गजानन काळे यांनी या प्रकरणी दिला आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्यासमोर झाली होती, अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा

मुंबई- अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्या पुढेच झाली होती, असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्यापुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा आता थंड पडलेली असताना या दाव्याने भाजप आणि अजितदादा गटाच्या काही नेत्यांकडे पुन्हा एकदा संशयाने पाहिले जाऊ लागणार आहे. सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आपल्यापुढेच झाली होती असाही दावा केला. आमच्यासमोर बोलणे झाले होते की, हे आता सर्व एकत्रपणे सुरू होईल. पण आता ते अचानक असे घडल्यामुळे कुणी त्याला वेगळे वळण देऊ नये. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे काम पुढे नेले तरच महाराष्ट्र चांगला राहील. विकसित महाराष्ट्र होईल, असे सयाजी शिंदे म्हणाले.

सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, अजित पवारांनी सर्वधर्म समभाव घेऊन, गरीब – श्रीमंत न पाहता, खालून आल्यामुळे सर्वकाही खूप पुढे घेऊन जाण्याचे ठरवले होते. मला असे वाटते की, त्यांचे हे स्वप्न आपण सगळ्यांनी स्पेशली सुनेत्रा वहिनी, सुप्रिया ताई व पवारांनी पुढे न्यायला पाहिजे. दोन्ही गट एकत्र यावेत हे दादांचे पहिले स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. असे झाले तरच महाराष्ट्राची ताकद वाढेल.महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी ताबडतोब एकत्र आले पाहिजे. त्यांचे काही कौटुंबीक इगो असतील किंवा त्यांच्या काही भावना असतील तर त्या त्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे, असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असलेली विलीनीकरणाची चर्चा थंडावली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी आग्रही होते असा ठाम दावा केला आहे. पण सत्ताधारी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांनी शरद पवार गटाशी अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे स्पष्ट करत त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. पण आता सयाजी शिंदे यांनी विलीनीकरणाची चर्चा माझ्यापुढेच झाली होती असा दावा केला आहे.

भारतीय कलेचा महासागर ठाण्यात,संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हलला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

ठाणे : मराठी भाषा, वेशभूषा, भोजन, वास्तुशैली आणि भारतीय संस्कृतीतील सौंदर्य यांचा सुरेख संगम साधणारा संस्कृती आर्ट्स फेस्टिव्हल उपवन, ठाणे येथे उत्साहात सुरू असून या महोत्सवाला विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देत कलाकार व आयोजकांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात विविध कला प्रकारांचे सादरीकरण होत आहे. मुद्रा या व्यासपीठावर सादर झालेल्या नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून, भाषा कळत नसली तरी भावनांची एकरूपता साधणारा हा महोत्सव असल्याचे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

या वेळी बोलताना त्यांनी ठाणे हे केवळ प्रशासकीय नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही एक आगळेवेगळे केंद्र असल्याचे सांगितले. “पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते, मात्र ठाण्यालाही सांस्कृतिक राजधानी म्हणावे इतके समृद्ध काम येथे होत आहे,” असे त्या म्हणाल्या. विविध संस्थांचे सामाजिक कार्य, सेवाभाव आणि कार्यकर्त्यांची मेहनत या महोत्सवातून ठळकपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवीन महापौर मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, ठाण्यातील सुविज्ञ व सुसंस्कृत नागरिकांचे दर्शन या निमित्ताने घडल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी वाढवलेल्या ठाण्याच्या गौरवात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव सरनाईक यांनी मोलाची भर घातल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. त्याचबरोबर मंत्री प्रतापराव सरनाईक व संयोजकांचे आभार मानत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन केले.

मोहन भागवतांच्या व्याख्यानाला सलमान खानसह अक्षय कुमार आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईत ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात शनिवारपासून ‘नवे क्षितिज’ ही दोन दिवसीय व्याख्यानमाला सुरू झाली असून, याच्या उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमर जगतातील दिग्गजांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान. एरवी राजकीय किंवा वैचारिक व्यासपीठांपासून काहीसा दूर राहणारा सलमान खान जेव्हा संघाच्या कार्यक्रमात दाखल झाला, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. सलमान खान सभागृहात येताच सर्व कॅमेऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वळाले. त्याच्याभोवती चाहत्यांचा आणि मान्यवरांचा गराडा पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या वैचारिक व्यासपीठावर सलमानची उपस्थिती ही या सोहळ्याचा ‘शो स्टॉपर’ क्षण ठरली.
आरएसएसच्या कार्यक्रमाला केवळ सलमान खानच नव्हे, तर बॉलीवूडमधील अनेक बड्या हस्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. तरुण पिढीचा सुपरस्टार रणबीर कपूर यानेही या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही या व्याख्यानमालेत हजेरी लावली. याव्यतिरिक्त मुंबईतील विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवर आणि उद्योजकही या सोहळ्याला उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात साजरे करत आहे. मुंबईतील हा कार्यक्रम त्याचाच एक भाग असून, विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींपर्यंत संघाचा विचार पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. नेहरू सेंटरमधील या कार्यक्रमामुळे वैचारिक शिस्त आणि चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर यांचे एक वेगळेच मिलन मुंबईकरांना अनुभवायला मिळाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या दोन दिवसीय व्याख्यानमालेतून उपस्थितांना संबोधित करत आहेत. ‘नवे क्षितिज’ या संकल्पनेतून संघाची भविष्यातील वाटचाल, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक समरसता या विषयांवर ते भाष्य करत आहेत.

महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याने विरोधकांचं कटकारस्थान मुंबईकरांनी उधळून लावलेलं- अमीत साटम

मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे- अमीत साटम

मुंबई-

महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासह महापौरपदाच्या उमेदवार श्रीमती रितू तावडे, भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमीत साटम म्हणाले, “४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेत विराजमान होणार असून येणाऱ्या काळात मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याच्या हेतूने, मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या, तसेच शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईच्या महापौर कार्यरत असतील. महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल. मुंबईकरांचं जीवन सुकर करणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर आणि उपमहापौर हे कार्य करतील.”

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून उमेदवारीची शक्यता असल्याने याचं आव्हान वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “सर्वांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं. त्यामुळे ज्यांना अर्ज दाखल करायचे आहेत ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात पण भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे ११८ नगरसेवक आणि नगरसेविका आहेत आणि त्या ११८ व्यतिरिक्त आणखी काही नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेलं आहे.” यासोबत एमआयएमच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाणार का या प्रश्नाचं उत्तर देताना, “मी अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. समाजविरोधी, समाजविघातक, देशविरोधी वृत्तींच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांशी आम्ही नेहमीच संघर्ष केलेला आहे आणि तो कायम राहील.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, “मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच असेल ही सुरुवातीलाच सांगितलेलं होतं. कदाचित विरोधकांना त्यांचा महापौर हा दुसराच कोणीतरी करायचा होता मात्र महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असून त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबईकरांना, हिंदू, मराठी, कोकणी आणि मालवणी महापौर लाभलेला आहे. मातृशक्तीचं नेतृत्व मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं आहे. ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली मुंबई शहर भ्रष्टाचारमुक्त करून शहराचा विकास करायचा आहे. त्या सर्व हिंदूत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत करतो.”

महायुतीकडून महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवरासाठी राखीव असल्याचे जाहीर झाल्यानंतर महापौर कोण होणार याची बरीच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाने श्रीमती रितू तावडे यांच्या नावाची घोषणा महापौर पदाच्या उमेदवारीसाठी करत या प्रश्नाला पूर्ण विराम दिला आहे. तर शिवसेनेकडून श्री. संजय घाडी यांचे नाव उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारीसाठीच्या नावांची घोषणा महायुतीच्या वतीने भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमीत साटम यांनी केली. यावेळी भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार मनोज कोटक, भाजप गटनेते श्री. गणेश खणकर, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्रीमती श्वेता परुळकर, ज्येष्ठ नगरसेवक श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शिवसेना गटनेते अमेय घोले, शिवसेनाच्या शीतल म्हात्रे, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. भाजपा हा सध्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असून रितू तावडे या महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या तसेच संघटनात्मक दृष्टीकोनातून मजबूत अशा उमेदवार म्हणून ओळखल्या जातात.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रितू तावडे म्हणाल्या, “महापौर नाही तर मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यासाठी मी आभारी आहे.”

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांना उपमहापौर पदाची उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे आणि हे उपमहापौरपद पुढील सव्वा वर्षासाठी असणार असल्याचेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी संख्याबळाचा विचार करता आगामी काळात ही निवडणूक बिनविरोध होऊन महायुतीच्या उमेदवरांचा विजय निश्चित मानला जात आहे.

हवेली निवडणूक कार्यालयाच्या EVM स्ट्रॉंग रूमवर कडेकोट सुरक्षा; २४ तास सीसीटीव्ही निगराणी

हवेली (पुणे):
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूम परिसरात २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवून सील करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली.
ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही स्ट्रॉंग रूम परिसरात प्रवेश दिला जात नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना निकम, तृप्ती कोलते तसेच माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे,माध्यम कक्षाचे राम कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुरक्षा व तांत्रिक व्यवस्थापन राबविण्यात येत आहे. नोडल अधिकारी सचिन आखाडे यांच्या समन्वयातून मतदानाच्या दिवशी ईव्हीएमशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी प्रभावीपणे हाताळण्यात आल्या.
या तांत्रिक व सुरक्षा व्यवस्थेत सचिन आखाडे, किशोर पाटील, गजानन किरवले, महादेव दुधाळ, विवेक गावंडे, राजू राजपुरे व अनिल पाटील या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मतमोजणीपर्यंत ईव्हीएम सुरक्षित राहाव्यात यासाठी निवडणूक अधिकारी, पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणेमार्फत नियमित तपासणी करण्यात येत आहे.
स्ट्रॉंग रूमवरील कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही व्यवस्था, सील प्रक्रिया व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद

भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगात सुरू

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

पुणे, दि. 8: सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 मधील अनुभवाच्या आधारे नाशिक कुंभमेळा कालावधीत नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. साधारणत दररोज सुमारे एक लाख भाविक येथे येण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027 –गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधा) या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिलेली आहे. या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आलेली असून त्यामध्ये नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याची कामे सध्या प्रगतिपथावर असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कुंभमेळ्याच्या वेळेस श्री.क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जूना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडप पुर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करताना श्री भिमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय सदरील काम करणे शक्य होणार नव्हते. तसेच सदर कामांच्या अंमलबजावणीदरम्यान बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे.

कामांचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती व भाविकांच्या मोठ्या संख्येचा विचार करता, बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

पूर्वी भाविकांच्या सोयीचा विचार करून महाशिवरात्री कालावधी (दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026) वगळण्यात आला होता. तथापि, सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा वेग, व्याप्ती व सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून पूर्वी महाशिवरात्री कालावधीत मंदिर खुले ठेवण्याच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला असून, दि. 12 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

मोदींनी बांगलादेशाला हिंदूंच्या हत्येसाठी पैसा दिला का?:संजय राऊत यांचा अर्थसंकल्पीय तरतुदीवर सवाल

मुंबई-खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे यांच्या विधानाचा समाचार घेताना केंद्र सरकार आणि भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे. बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ज्या बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत आणि हिंदूंच्या कतली होत आहेत, त्याच बांगलादेशला मोदी सरकार अर्थसंकल्पातून कोट्यवधींची मदत का देत आहे?” असा जळजळीत सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्याच्या रितू तावडे यांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महापौरांनी आधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली पाहिजे. बांगलादेशात गेल्या काही काळात हिंदूंची ४५० मंदिरे पाडली गेली, हजारो हिंदूंची घरे जाळली गेली आणि सुमारे २३० ते २४० हिंदूंची हत्या झाली. यावर देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री एक अक्षरही बोलायला तयार नाहीत. उलट, भारताच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या मारेकऱ्यांना काही कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हा पैसा हिंदूंच्या हत्येसाठी दिला आहे का? हे महापौरांनी मोदींना विचारावे.”

मुंबईच्या महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, त्यांनी शहराच्या विकासावर बोलले पाहिजे, असे सांगत राऊत म्हणाले, “जर महापौर पुन्हा हिंदू-मुस्लिम हाच मुद्दा घेऊन बसणार असतील, तर काल संघाच्या व्यासपीठावर सलमान खानला बोलावून काहीच उपयोग झाला नाही असे म्हणावे लागेल. घुसखोर बांगलादेशींना हाकलायची आमचीही भूमिका आहे, पण त्याचे राजकारण करू नका.”
रितू तावडे यांच्या निवडीवर बोलताना राऊतांनी भाजपवर खोचक टीका केली. “मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची निवड केलेली आहे. या निवडीचे मी स्वागत करतो. भाजपला या निमित्ताने कळले की, मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानेच देशाच्या स्वातंत्र्याचे आणि हिंदुत्वाचे रक्षण केलेले आहे. शिवसेनेने जो निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरवली. मराठी माणूस, मराठी अस्मित आणि मराठी जनतेला आम्हाला भरभरून मतदान केले. त्या दबावापोटीच भाजपला मराठी महापौर करावा लागला, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. रितू तावडे या मुळच्या काँग्रेसच्या आहेत. भाजपकडे स्वत:चे ओरिजिनल असे काही नाही,” असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मलाही आमंत्रण होते, पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे असल्याने मी तिथे गेलो नाही. व्यासपीठावर सलमान खान होते, असे मला कळले. हे सलमान खानचे स्वागत गर्दी जमवायला होते की, संघात यापुढे मुस्लिमांनाही खुले आमंत्रण आहे? हे मोहन भागवतांनी स्पष्ट केले असते, तर योग्य झाले असते.

संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने हिंदू-मुस्लीम असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे. त्यामध्ये संघही सामील आहे. कारण मोदी, फडणवीस, अमित शहा किंवा इतर सगळे लो जे हिंदू-मुस्लीम यांचे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, ते सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्यामुळे सलमान खान आमच्या व्यासपीठावर आला हे लोकांना दाखवायला होते का? उद्या सत्ता गेल्यावर हे सगळे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा गमतीचा प्रश्न आहे. सलमान खान याला बोलावले याचे स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचेही स्वागत करा, असेही ते म्हणाले.

अर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

व्यापार–उद्योगासाठी अनुकूल धोरणांचा सूर; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे

“न्याय व सक्षमीकरणाकडे समाजाची वाटचाल आवश्यक”

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२६ :
ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (TACCI) यांच्या वतीने मुंबईत आयोजित “TACCI बजेट मीट २०२६” या विशेष परिसंवादात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षित पर्यटन, पायाभूत सुविधा, आरोग्य, डिजिटल अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास यावर सखोल भाष्य केले. “हा अर्थसंकल्प केवळ कल्याणकारी न राहता समाजाला सक्षमीकरणाकडे नेणारा आहे. ‘वेल्फेअर टू एम्पॉवरमेंट’ हीच यामागची भूमिका आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उच्च शिक्षणात मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहे, औद्योगिक व लॉजिस्टिक हबजवळ युनिव्हर्सिटी टाउनशिप्स, ग्रामीण महिलांसाठी SHE-MARTS, तसेच महिलांच्या बचत गटांचा रूफटॉप सोलर व वीज व्यापारातील सहभाग हे निर्णय महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी निर्णायक ठरणार आहेत. डिजिटल अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून महिलांनी स्टार्टअप्स, कंटेंट क्रिएशन, STEM आणि विविध नव्या क्षेत्रांमध्ये पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, फार्मास्युटिकल्स, क्लिनिकल रिसर्च, बायो-फार्मा, वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना देणाऱ्या तरतुदी या परिवर्तनकारी आहेत. आयुष्मान भारत योजनेमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून कॅन्सर व मधुमेहावरील औषधांच्या किमती कमी होणे, १७ कॅन्सर औषधांवरील आयात शुल्क माफ होणे हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पात महामार्गांवरील आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा आणि आरोग्य पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटन आणि पायाभूत सुविधांवर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी महिला सुरक्षित पर्यटन (Women Safe Tourism) या संकल्पनेवर विशेष भर दिला. धार्मिक व वैद्यकीय पर्यटन, महामार्ग, हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर, लहान व मध्यम शहरांचा विकास यामुळे रोजगारनिर्मिती होईल आणि महानगरांवरील ताण कमी होईल, असे त्या म्हणाल्या. जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम समाजावर होत असून त्याचा विचार करून धोरणे आखली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

न्यायव्यवस्था आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, गुन्ह्यांतील दोषसिद्धीचा दर कमी असणे ही चिंतेची बाब आहे. काही राज्यांतील सामाजिक मानसिकता वेगळी असून समाजात न्याय व सक्षमीकरणाकडे जाणारा दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त, करप्रणालीतील सुलभीकरण, महिला व युवक केंद्रस्थानी ठेवणारी विकासनीती आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत निर्णय यामुळे देश व राज्य अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या परिसंवादात TACCI चे अध्यक्ष श्री. प्रविण लुंकड, TACCI हिंदुस्तानी चॅप्टरचे अध्यक्ष श्री. निहार ठाकरे, सनदी लेखापाल श्री. स्नेहल मुजुमदार, TACCI चे संस्थापक व सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय भिडे, विदेश व्यापार महासंचालक श्री. आर.के. मिश्रा यांच्यासह कर, पर्यावरण, कृषी व कौशल्य विकास क्षेत्रातील तज्ज्ञ, TACCI चे सदस्य आणि इत्तर नागरिक उपस्थित होते.