Home Blog Page 109

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा – भाऊसाहेब भोईर

पिंपरी, पुणे (दि.०९ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रशासन काळात झालेल्या मोठ्या प्रकल्पांची प्राधान्याने चौकशी करावी. ५० हजार नागरिकांच्या हरकती येत असतील तर डीपी रद्द करावा. रस्ते लहान करणारा हरित सेतू प्रकल्प रद्द करा. प्रशासनाने अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी, पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी काय केले याची माहिती द्या.
या मागण्यांसह महापौर रवी लांडगे यांनी पाणी पुरवठा २४ तास सुरू करू असे सांगितले आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मी विरोधी पक्षनेता असलो तरी विरोधाला विरोध करणार नाही. तर सत्ताधारी आणि विरोधक, नागरिक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
सोमवारी, मनपा कार्यालयात भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भोईर म्हणाले की, आम्ही राज्य सरकार मध्ये महायुतीत सत्तेत आहोत. परंतु येथे विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांशी समन्वय साधून शहर विकासासाठी काम करणार आहे. काही अधिकारी निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेऊन अटी, शर्ती ठरवतात. अनेक अधिकारी तर मनपाचे मालक झालो आहोत अशा आविर्भावात आहेत. शहरात अनेक भागात अजूनही टँकर ने पाणी घ्यावे लागते याला जबाबदार कोण ? अनेक निविदा वाढवून तिजोरीची लूट सुरू आहे. कालांतराने कामगारांच्या पगारासाठी राज्य सरकार वर अवलंबून रहावे लागेल. मनपाची आर्थिक घडी पुन्हा बसवावी लागेल. प्रशासन काळात झालेल्या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी करण्यात येईल. हॉकर झोनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावा लागेल. तलाठी, सर्कल ऑफिस, तहसीलदार ऑफिस, पोलिस स्टेशन, पोलिस आयुक्तालय अशा या शहराच्या हद्दीत असणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र सरकारच्या कार्यालयांवर मनपा चा अंकुश पाहिजे. याठिकाणी नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत. कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. नदी सुधार योजनेच्या ऐवजी नद्यांची गटारं झाली आहेत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. राज्यकर्त्यांनी भानावर येण्याची गरज आहे. आता चुकीच्या कामावर लक्ष ठेऊन सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ; फुले प्रेमींचा मोठा सहभाग
पुणे : क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध असो… क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे… महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो… अशा घोषणा देत माळी महासंघ पुणे शहर च्या वतीने माळी समाज बांधव आणि फुले प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. तेलंगणा राज्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.

यावेळी माळी महासंघ पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप, महिला अध्यक्ष स्मिता लडकत, नाना कुदळे, बाळासाहेब लडकत, सोमनाथ बटवाल, यशोधन आखाडे, चांगदेव पिंगळे ,शशिकला ढोले पाटील, राजेंद्र लडकत, प्रज्वल बनकर, रीमाताई लडकत, गिरीश झगडे, रवी सहाणे, प्रतिभा झगडे विजय कोठावळे, अभिजीत भुजबळ, शांता ताई नेवसे, मारुती भुजबळ, सारंग राऊत गणेश वाडकर यांसह समाजबांधव, भगिनी व फुले प्रेमी उपस्थित होते.

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला करून केलेल्या विटंबनेची घटना घडली. ही घटना निंदनीय असून या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे. अशा मनोविकृत लोकांचा जाहीर निषेध करण्यासाठी माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने करण्याकरिता निषेध आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष दीपक जगताप म्हणाले, ज्या महात्मा फुले यांनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. चांगल्या विचारांचे लोक तयार केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यांची विटंबना होत असेल, तर अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी ही विटंबना केली, त्या समाजकंटकांवर तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

अजितदादा पवार यांच्या स्मृती पुणे महापालिकेत कायम उजळत राहणार

सभागृह नेते गणेश बिडकरांकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांचे तैलचित्र भेट

पुणे (दि ०९): दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्मरण पुणे महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, या उद्देशाने सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेला स्व. अजितदादा पवार यांचे तैलचित्र भेट देण्यात आले. हे तैलचित्र नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले. हे तैलचित्र महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार विजेता अमित ढाणे यांनी साकारले आहे.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिकेच्या सभागृहात दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याचा, राजकीय व सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, अशी भावना सभासदांनी व्यक्त केली.

गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया
“स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेसाठी सतत झटणारे लोकनेते होते. पुणे शहराच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे तैलचित्र महापालिकेत कायमस्वरूपी राहावे, जेणेकरून भावी पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, यासाठी ही आदरांजली अर्पण केली आहे.”

हा तर भ्रष्टाचाराचा एक्सप्रेसवे!स्मार्ट सिटी नको, निदान एक्सप्रेसवे तरी स्मार्ट करा

— अनंत गाडगीळ यांची सरकारवर खरमरीत टीका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून तब्बल ३० तास वाहतूक ठप्प राहिली. या कोंडीमुळे विशेषतः महिला, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला पाच दिवस उलटूनही वाहतूक अजून पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.

या घटनेतून एक्सप्रेसवेवरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अपयश समोर आले असून, अशा प्रसंगी जबाबदारी नेमकी राज्य सरकारची की टोल कंपनीची, हे स्पष्ट व्हायला हवे, अशी ठाम मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

एक्सप्रेसवेवर नियमित प्रवास करणारे आणि सुमारे वीस वर्षांपूर्वी याच महामार्गावरील एका भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेले गाडगीळ यांनी, प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, एक्सप्रेसवेवरील अंदाधुंदी, निष्काळजीपणा आणि व्यवस्थेच्या कोलमडलेल्या स्थितीवर सडकून टीका केली आहे.

गाडगीळ यांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे :

१) अवजड वाहनांचा बिनधास्त वावर
नियमांनुसार ट्रक व टँकरसारख्या अवजड वाहनांना उजव्या व मधल्या लेनमधून प्रवासास मनाई असतानाही, हीच वाहने सर्रास या लेन अडवून चालतात. परिणामी, वेगात असलेल्या मोटारींचे भीषण अपघात सातत्याने घडत आहेत.
या वाहनांना रोखण्यासाठी एकही वाहतूक पोलीस पुढे येत नसल्याने दररोज वाहतूक कोंडी हेच वास्तव बनले आहे.

२) वेगमर्यादेतील गोंधळ आणि दंडाचा सापळा
एक्सप्रेसवेवर मोटारींसाठी तासाला १०० किमी वेगमर्यादा असताना, घाट विभाग वगळता अनेक ठिकाणी ४०, ६० आणि १०० किमीचे फलक अंतराअंतरावर अनियमितपणे बदलतात.
या विसंगतीमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो आणि नेमक्या अशाच ठिकाणी पोलीस दंड आकारतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

३) कोंडीच्या ठिकाणी पोलीस गायब, टोल नाक्यांवर गर्दी
शिंग्रोबा देवळाजवळ व लोणावळा फाट्याजवळ १–२ ठिकाणे वगळता, संपूर्ण एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी असतानाही बहुतेक वेळा एकही वाहतूक पोलीस दिसत नाही.
मात्र दोन्ही टोल नाक्यांवर किमान २० वाहतूक पोलीस ‘गिऱ्हाईकांच्या’ शोधात उभे असतात, असा आरोप गाडगीळ यांनी केला. इतकेच नव्हे, तर या टोल नाक्यांवर एकाही पोलीस उपनिरीक्षक वा वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याची माहितीही त्यांनी उघड केली.

४) मोबाईल फोटोद्वारे बेकायदेशीर दंड
स्वतःच्या मोबाईलवर घेतलेल्या फोटोच्या आधारे दंड आकारू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही, एक्सप्रेसवेवर अनेक वाहतूक पोलीस मोबाईलवर फोटो काढून वाहनचालकांना वेठीस धरत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दर महिन्याला ठरावीक ‘टार्गेट’ दिले जाते, त्यामुळे दंड केल्याशिवाय पर्याय नसल्याची कबुली काही वाहतूक पोलीस खासगीत देत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

५) पोलीस चौक्या गायब, व्यवस्था कोलमडलेली
काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत गाडगीळ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, तत्कालीन पोलीस महासंचालकांनी घाट विभागात दर २–३ किमीवर लहान पोलीस चौक्या उभारल्या होत्या.
मात्र कालांतराने त्या चौक्यांमधील पोलीसच नव्हे, तर आज त्या चौक्याच पूर्णपणे गायब झाल्या आहेत, हे वास्तव गाडगीळ यांनी उघड केले.

“स्मार्ट सिटीच्या जाहिराती सोडून द्या, पण युती सरकारने निदान किमान एक्सप्रेसवे तरी स्मार्ट करावा,” असा उपरोधक टोमणा लगावत गाडगीळ यांनी सरकारच्या ‘विकासाच्या’ दाव्यांची पोलखोल केली आहे.

नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकरांचा आदर्श निर्णय,नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र देत, शहरातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (अ) १ अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणार नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या मानधनाची रक्कम दरमहा ‘महापौर निधी’ मध्ये जमा करण्यात यावे आणि त्यातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले की, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नगरसेवक पद हे या सेवेसाठी ताकद देणारे पद आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे मानधन घेणे मला पटत नाही. त्यांनी दिलेल्या या संधीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन हे त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे या भावनेतून मी हा निर्णय घेतला. अनेकदा गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या मानधनाचा विनियोग अशा रुग्णांच्या सेवेसाठी झाल्यास त्याचे मला अधिक समाधान मिळेल.”

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हा व तालुका तर शहरात झोन निहाय समन्वय बैठका घेण्यात याव्यात अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली.

विधानभवनात आयोजित या उच्चस्तरीय बैठकीत कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, २००५ अधिक परिणामकारक करण्याबाबत, शक्ती विधेयकाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पुढील दिशा ठरविण्याबाबत तसेच अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुधारणा याचिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बीएनएस प्रमाणे कार्यप्रणालीत ३५ अ ते आय या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी पोलीसांनी केल्यास पिडीतांना दिलासा मिळेल म्हणुन पोलीसांनी योग्य ती कार्यप्रणाली तयार करावी अशाही सुचना ऊपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्या . पुढील एका महिन्यात या सर्व बाबतीत पाठपुरावा करून संबंधित विभागांनी तपशील ठरवावा असेही सुचवण्यात आले. या बैठकीचा अहवाल मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा.ना. एकनाथजी शिंदे, मा.ना. सुनेत्राताई पवार यांचेकडे पाठविण्यात येंणार असल्याचे नीलमताई गोर्हेंनी नमुद केले.

या बैठकीस पोलीस महासंचालक सदानंद दाते, अपर पोलीस अधीक्षक अश्वती दोरजे, माजी न्यायमूर्ती साधना जाधव, महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, उपसचिव डॉ. जयंत सरोदे, विधी व न्याय विभागाचे उपसचिव सागर बोन्द्रे, गृह विभागाचे अवर सचिव जयसेन इंगोले
उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीदरम्यान नमूद केले की, महिलांचा आत्मसन्मान, सन्मान आणि सुरक्षितता यासाठी राज्य यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांचा बळी जाणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे राबविणे आवश्यक आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, महिलांना तातडीने न्याय मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सजग आणि संवेदनशील बनविणे अत्यावश्यक आहे. पोलीस विभाग आणि महिला व बाल विकास विभागाने संयुक्तरित्या कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर करावी. जिल्हास्तरीय महिला दक्षता समित्यांच्या कार्याचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

पीडित महिलांना तातडीने संरक्षण आदेश मिळवून देणे, पोटगी मिळविण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब टाळणे, तसेच महिलांना कायदेशीर सल्ला मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी समन्वय वाढवणे या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणाबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशी सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर, अर्नेश कुमार विरुद्ध बिहार राज्य प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका दाखल करण्याबाबत कायदेशीर चाचपणी सुरू असून त्यावर चर्चा बैठकीत झाली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी सांगितले की, महिलांवरील अत्याचार हा समाजाच्या मनोवृत्तीशी निगडित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे फक्त कायदे कठोर करणे पुरेसे नाही, तर त्यांची अंमलबजावणी ही पारदर्शक, संवेदनशील आणि परिणामकारक असावी. महिलांचे सक्षमीकरण, न्यायप्राप्ती आणि सुरक्षिततेसाठी शासनाने एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

‘फॉर्म्युला भारत’मध्ये ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे दैदिप्यमान यश

0

यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने जिंकले विजेतेपद
पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या (मेकॅनिकल) ‘टीम स्पीडटेल रेसिंग’ने तामिळनाडूतील कोईम्बतूरच्या कारी मोटर स्पीडवेवर नुकत्याच पार पडलेल्या ‘फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स)’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कंबशन प्रकारात ‘ओव्हरऑल डायनॅमिक्स’ विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत संघातील अभिषेक साहा याने उत्कृष्ट वाहनचालन कौशल्य व तांत्रिक प्रावीण्याच्या जोरावर ‘सर्वोत्तम चालक पुरस्कार’ मिळवला. वाहन रचना, गतिशास्त्र तसेच अभियांत्रिकी नवकल्पनांतील प्रावीण्याच्या बळावर संघाने हे यश संपादन केले. फॉर्म्युला भारत २०२६ (डायनॅमिक्स) ही भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीची एक प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील मोटरस्पोर्ट स्पर्धा आहे. यात देशभरातील महाविद्यालयीन संघ स्वतः डिझाइन व तयार केलेल्या फॉर्म्युला-शैलीतील रेस कार्स सादर करतात.

या यशात एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स विभाग तसेच इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) मधील विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असून, विविध शाखांतील समन्वयाचे प्रभावी दर्शन घडले. संपूर्ण संघाला डॉ.अनुराग नेमा आणि प्रा. विजयकुमार शेप यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरु डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र.कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.सुराज भोयार यांनी विशेष कौतुक केले.

बौद्ध समाजातील संस्थांसाठी १० लाख रुपये अनुदान योजनाप्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2026 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध विश्वस्त, सदस्य असलेल्या बौद्ध समाजातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांसाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० लाख रुपये अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.

ही योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अंमलात आणण्यात येणार असून, पात्र व इच्छुक संस्थांनी शासनाच्या नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ते शासनाकडे दिनांक ०६ मार्च २०२६ पर्यंत सादर करण्यात येणार आहेत.

तरी पात्र संस्थांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यांक अधिकारी यांनी केले आहे.

0000

परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन

0

पुणे, दि.९: परदेशातील नामांकित विद्यापीठात पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी तत्काळ ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च युएस व इतर देशांसाठी (युके वगळून) १ हजार ५०० युएस डॉलर तर युकेसाठी १ हजार १०० जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.

योजनेचे पात्रता निकष :- विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख रुपये तसेच विद्यापीठांची क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल केली जाईल. तर क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक ‘टीओईएफएल’ (TOEFL) किंवा ‘आयईएलटीएस’ (IELTS) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही विभागाने कळविले आहे.
0000

पुणे जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार, महापौर मंजुषा नागपुरेंचा निर्धार

पुणे-पुण्याला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी पुणे शहर देशातील पहिल्या दहा महत्त्वाच्या शहरांमध्ये असल्याचे नमूद केले. जनतेने भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे आभार मानले.

नागरी कर्तव्य आणि पर्यावरण याला आपले प्राधान्य राहील, असे महापौर नागपुरे म्हणाल्या. आगामी काळात पुण्यात मोठे प्रकल्प येणार असून, ते सांभाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अंत्योदय विचार, वाहतूक कोंडीमुक्त शहर, आरोग्य सुविधा, शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आपल्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मनपा सभागृहात उपमहापौर खुर्चीत बसेन असे स्वप्न कधी पाहिले नव्हते, असे ते म्हणाले. यापूर्वी आपण मनपावर सातत्याने आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

झोपडपट्टीत गरिबीत आयुष्य गेले असून, संघर्षमय जीवन जगलो आहे. घरात माझी पत्नी यापूर्वी उपमहापौर झाल्यामुळे मला हे पद मिळेल असे वाटले नव्हते, असे वाडेकर यांनी नमूद केले. भाजपने साथ दिल्याने हे यश मिळाल्याचे सांगत, आपल्या निवडीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेकांना आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन केले. राजकीय परिवारात खेळीमेळीचे आणि विश्वासाचे वातावरण असते, असे ते म्हणाले. विरोधकांनी बिनविरोध निवडणुकीसाठी पाठबळ दिल्याचे त्यांनी नमूद केले. पुणेकरांनी निर्णायक मतदान भाजपला केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला असल्याचे घाटे यांनी सांगितले.

पुणेकर सुजाण असून, त्यांनी कामाची जबाबदारी भाजपवर दिली आहे. महापौर आणि उपमहापौर यांनी सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू ठेवून काम करावे, अशी अपेक्षा घाटे यांनी व्यक्त केली. महापौर नागपुरे यांचे कुटुंब हिंदुत्ववादी असून, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत काम करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदासाठी संधी दिली गेली आहे. आगामी निवडणुकीत भाजप सभागृहात १२० चा सदस्यांचा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांची तब्येत खालावल्याने पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले होते. त्याचा मोठा धक्का शरद पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना बसला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार सातत्याने श्रद्धांजली कार्यक्रम व भेटीगाठींमध्ये व्यस्त होते. यामुळे त्यांची दगदग वाढली होती. त्यातच गत काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले होते. आज अजित पवार यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी घरीच विश्रांती घेणे पसंत केले होते. पण त्यानंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार शरद पवार यांना बारामतीहून पुण्यात आणण्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या ताफ्यात वैद्यकीय पथकासह कार्डियाक सुविधांनी सज्ज अशी रुग्णवाहिका ठेवण्यात आली. काही वेळापूर्वीच ते रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर सिमोन ग्रँट यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. शरद पवारांच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यावरील पुढील उपचारपद्धती ठरवली जाणार आहे. गरज भासली तर त्यांना रुग्णालयात अॅडमिटही केले जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत आहे. आज सकाळपासून त्यांचा त्रास वाढला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेही आहेत.ऑक्सिजन मास्क घालून बेडवरुनच तपासण्या सुरू

शरद पवारांना सुरूवातीला गाडीतून व्हिलचेअरवर बसवून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना ऑक्सिजन मास्क घालून बेडवरुनच तपासणीला नेण्यात आले. त्यांचा यासंबधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवारही शरद पवारांसोबत रूग्णालयात आहेत. सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दगदगीमुळे पवारांच्या छातीत कफ झाला असून, त्यांच्या योग्य त्या तपासण्या केल्या जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ एक कौटुंबिक सदस्य म्हणून नाही, तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ‘डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसंच आम्ही सगळे वागू. तुमचं सजेशन आमच्यासाठी अंतिम राहील,’ असे म्हणत त्यांनी उपचाराची पूर्ण सूत्रे डॉक्टरांच्या हाती सोपवली. माध्यमांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी त्यांनी विनंती केली की, ‘पुढील १० मिनिटांत डॉक्टर स्वतः माध्यमांना शरद पवार यांच्या प्रकृतीची अधिकृत माहिती देतील.’ तसेच कोणत्याही व्हिजिटर्सला आत सोडू नका. हॉस्पिटलचे सगळे नियम काटेकोरपणे पाळा, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.

आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना काही प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथे ठेवले जाईल. ते आयसीयूमध्ये नाहीत, तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. तेथील डॉक्टर अभिजीत लोढा आपल्या सर्वांना शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल माहिती सांगतील.

डॉक्टर अभिजीत लोढा यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले, फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे शरद पवारांच्या छातीत कफ झाला आहे. आम्ही योग्य त्या तपासण्या केल्या आहेत. ट्रीटमेंट चालू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर आम्हाला उपचारात काय बदल करायचा असेल ते बदल करू. सध्या रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आणखी काही माहिती सांगू शकत नाही. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. पवार साहेब आता रूममध्ये आहेत. त्यांना दोन – तीन दिवसांपासून त्रास होता. ते नॉर्मल बोलत आहेत, असे डॉक्टर म्हणाले.

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

पुणे :महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले. भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची महापौर पदी बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तीन सदस्य यांनी पुणे मनपा महापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. भारतीय जनता पक्षाकडून मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून शितल सावंत तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी दाखल केला होता. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल अजय सावंत आणि काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी त्यांची नावे १५ मिनिटांच्या माघारी वेळेत मागे घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा करून संबंधित निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिष्टाई केली आणि ती फळाला आली. त्यानंतर मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

उपमहापौर पदासाठी तीन जणांनी सहा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अर्ज माघारी मुदतीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौर पदासाठी काँग्रेस पक्षाकडून साहिल केदारी यांनी दोन अर्ज दाखल केले. भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी देखील तीन अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केले होते. संबंधित अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांशी चर्चा केली. अखेर उपमहापौरपदी साहिल केदारी आणि दत्ता बहिरट यांनी अर्ज माघारी घेतला. त्यानंतर परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नियुक्तीचे पत्र त्यांना दिले.

महाराणी ताराराणी यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न

पुणे ; सरहद पुणे, येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षां निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या करिता राज्यातील ३५ शाळेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेचे विषय हे ताराराणी यांच्या जीवनावर आधारित होते.स्पर्धेकरिता भाषेचं बंधन नसल्याने स्पर्धेला खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नगरसेविका वर्षाताई तापकीर , संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर अनुज नहार सर, मुख्याध्यापिका सौ.सुजाता गोळे, सौ.गीता खोत, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक मयूर मसुरकर, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख तर परीक्षक म्हणून लाभलेले तिन्ही इतिहास अभ्यासक, लेखक व कवी सचिन खोपडे, गोपाळ कांबळे, सौ. रश्मी वानखडे हे यावेळी उपस्थित होते. तसेच पुढे परीक्षक म्हणून तिघांनी काम पाहिले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

५ वी ते ७ वी गटातून
प्रथम क्रमांक – गुंजन राऊत
ज्ञानेश प्राथमिक शाळा,
द्वितीय क्रमांक – ईश्वरी शिवतरे , महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कन्या शाळा, वाई
तृतीय क्रमांक– श्रावणी तावरे कान्होजी जेधे विद्यालय, कारी तालुका
हिने पटकावला तसेच

उत्तेजनार्थ पारितोषिक
स्पर्श कालवणकर- ब्लॉसम पब्लिक स्कूल नऱ्हे , अवनि उल्हाळकर – सरहद स्कूल कात्रज, श्लोक विश्वासराव- पी.इ.एस मॉडेल इंग्लिश हायस्कूल शिवाजी यांनी पटकविले.

8वी ते 10वी गटातून
प्रथम क्रमांक– वक्रतुंड कारले, सरहद ग्लोबल स्कूल गुजरवाडी

द्वितीय क्रमांक– अनुष्का बाबर, सुंदराबाई मराठे विद्यालय
तृतीय क्रमांक– अलफिया पठाण सिग्नेट पब्लिक स्कूल नऱ्हे यांना मिळाला.

उत्तेजनार्थ पारितोषिक अंकिता जाधव- चाटे पब्लिक स्कूल, सान्वी मुंदडा- पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव, आराध्या गर्जे- सरहद पब्लिक स्कूल धनकवडी. या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल बोंद्रे, देविका भोसले यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मयूर मसूरकर यांनी केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सृष्टी ढोरे यांनी केले.

.

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली असून, त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०) आणि अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. त्यानंतर, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी इतर तीन जणांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सहाही जणांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी बांधकाम मजूर असून, ते सध्या केसनंद भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहतात. यातील तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत, तर उर्वरित तीन वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.