Home Blog Page 108

पीएमआरडीएचा अनधिकृत बांधकामांना दणका; सेक्टर ९, ११ सह भोरमधील होर्डिंग्जवर फिरवला बुलडोझर!

  • ४ हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त; अडीच एकर वाहनतळाची जागा मोकळी!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मंगळवारी (दि. १०) अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहीम राबवत, कारवाईचा बडगा उगारला. प्राधिकरणाच्या सेक्टर ९ आणि ११ मधील पत्राशेड्स, गॅरेजेस तसेच भोर तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्जवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले असून, अडीच एकर शासकीय जागा मोकळी करण्यात आली आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी सेक्टर ९ मधील पत्राशेड, तसेच सेक्टर ११ मधील ४५ मीटर रस्त्यालगत असलेल्या गॅरेज आणि लेबर कॅम्पवर (कोठी) कारवाई करण्यात आली. वाहनतळासाठी आरक्षित जागेवर उभारलेली बेकायदेशीर पत्राशेड हटवून २.५ एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले. या परिसरातील इतर टपरीचालक व वाहनतळधारकांना जागा तातडीने खाली करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच, भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथेही ‘पीएमआरडीए’च्या पथकाने कारवाई केली. येथील श्री. पानसरे (गट क्र. ६०) यांची दोन होर्डिंग्ज, तसेच श्री. शिंदे (गट क्र. ६२, संस्कृती ॲडव्हर्टायझिंग) यांच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. इतर बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
सदर कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आय़ुक्त दीपक सिंगला, आणि दक्षता विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त आशा होळकर, तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्यासह नियोजन सहाय्यक व अभियंत्यांच्या पथकाचा सहभाग होता.

परवानगी घेऊनच बांधकामे करा!
“परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि बांधकामधारकांनी पीएमआरडीएची रीतसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.” —

– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीए

म्हाडाच्या 4,186 घरांसाठी 2.15 लाख अर्ज; मार्चमध्ये आणखी 3,000 घरे:पुणे मंडळाची मोठी घोषणा, सोडतीची नवी मालिका सुरू

पुणे-गेल्या अडीच वर्षांत पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतून सुमारे 25 हजार परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. पारदर्शक कारभार आणि दर्जेदार बांधकामामुळे म्हाडावरील जनतेचा विश्वास वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाच प्रत्यय 4,186 घरांसाठी 2,15,965 अर्ज प्राप्त झाल्याने आला. संगणकीय पद्धतीने काढण्यात आलेल्या सोडतीच्या या शृंखलेला पुढे चालना देत, येत्या मार्च महिन्यात सुमारे 3,000 परवडणाऱ्या घरांसाठी नवी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए क्षेत्र तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील 4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी आज पुणे जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात संगणकीय सोडत पार पडली. या सोहळ्यात सभापती आढळराव पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते, तर पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.

सभापती आढळराव पाटील यांनी सांगितले की, म्हाडा ही सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी अग्रगण्य संस्था आहे. शिरूर येथे 574 सदनिका आणि खराबवाडी येथे 194 व्यापारी गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. ताथवडे येथील फेज-1 प्रकल्प पूर्ण झाला असून फेज-2 मधील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच 750 निवासी व अनिवासी गाळे सोडतीत येणार आहेत. याशिवाय म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर येथेही गृहनिर्माण प्रकल्प उभारणी सुरू आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतूनही काही घरे उपलब्ध होणार आहेत.

चंदननगर-खराडी येथील 15 गुंठे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती देत, जुन्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील विजेत्यांकडून वाढीव शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्यावर अनेक प्रकरणांत मध्यस्थी करून वाढीव शुल्क रद्द करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेतील विजेत्यांना इमारतीतील 50 टक्के पार्किंग उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर गुरुवारी ‘जनता दरबार’ घेण्यात येतो. अर्जदारांच्या विनंतीनुसार तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडत उशिरा झाली असली तरी संपूर्ण प्रक्रिया संगणकीय असून कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाचा संबंध नसल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

अनिल वानखडे यांनी सांगितले की, अडीच वर्षांत ही सातवी संगणकीय सोडत असून मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध झाली आहेत. सभापती आढळराव पाटील आणि म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे मंडळाला गृहबांधणीसाठी जमिनी मिळत आहेत. पुढेही अशाच प्रकारे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी विजेत्या अर्जदारांना विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरावी लागेल, तसेच सदनिका स्वीकृती अथवा नकार याचा निर्णय वेळेत कळवणे आवश्यक असल्याचे सांगितले. IHLMS 2.0 या नव्या सॉफ्टवेअरमुळे नोंदणी, अर्ज आणि पेमेंट या सुविधा घरबसल्या उपलब्ध झाल्या आहेत. काही विजेत्यांना ‘Allowed with Condition’ या अटीवर देकारपत्र दिले जाईल. प्रलंबित कागदपत्रे ऑनलाईन सादर केल्यास पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील रिक्त घरे ‘बुक माय होम’ या अधिकृत संकेतस्थळावर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एकदिवसीय साहसी पर्यटनाकरिता एमटीडीसीच्यावतीने टूरपॅकेज जाहीर

पुणे, दि. १०: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने १४, १५, २१, २२ आणि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील मुनावळे बोट क्लब परिसरात नव्या स्वरूपातील एकदिवसीय साहसी पर्यटनाकरिता टूरपॅकेज पर्यटकांसाठी जाहीर करण्यात आले आहे.

निसर्गसौंदर्य, इतिहास आणि थरारक साहसी उपक्रम यांचा सुरेख संगम साधणारे हे पॅकेज फक्त ३ हजार २०० प्रति व्यक्ती या विशेष दरात उपलब्ध असून, एका दिवसात अविस्मरणीय पर्यटन अनुभव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या पॅकेजमध्ये एसी बसने प्रवास, पुणे-मुनावळे-पुणे, बारा मोटेची विहीर- ऐतिहासिक बावडी दर्शन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुनावळे बोट क्लब येथे ४ थरारक वॉटर राईड्स- जेट स्की , बनाना राईड , व्हर्लपूल राईड व बम्पर राईड, शेंबडी मठ दर्शन, निसर्गरम्य तलाव परिसर, छायाचित्रे व रिलॅक्सेशन टाइम, स्वादिष्ट नाश्ता, शाकाहारी व मासांहरी जेवण व हाय-टी, अनुभवी सहल व्यवस्थापक, प्रथमोपचार संच, दूर मॅनेजर, सुरक्षित गिअर आदी सुविधा आहेत.

सहलीचे एमटीडीसी, सेंट्रल बिल्डिंग पुणे येथून सकाळी ६ वाजता प्रस्थान होणार असून, दिवसभरात ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य परिसर, साहसी उपक्रम आणि आरामदायी वेळ असा परिपूर्ण अनुभव पर्यटकांना मिळणार आहे, शेवटी रात्री ८ वा. पुणे येथे येणार आहे.

या सहलीचा आनंद घेण्यासाठी कुटुंब, मित्रमंडळी, युवक व साहसी पर्यटनप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी असून, जागा मर्यादित असून जागेचे आरक्षण व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय, पुणे आय बॅरॅक, सेंट्रल बिल्डिंग, ससून रुग्णालयाजवळ, पुणे-०१, तसेच दिपाली गुजर-९६८९१३६७९१, सिद्धेश तुंगलकर- ७७९६५९०३७५, गोविंद खवणेकर-८२७५६७७६१९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी केले आहे.

स्मार्ट वीजमीटर : काळाची गरज

आधुनिक वीज व्यवस्थापनाचे सक्षमीकरण

आजच्या वेगवान डिजिटल युगात, तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. संवादापासून ते बँकिंगपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपण आधुनिकतेचा स्वीकार करत असताना, आपली वीज वितरण प्रणालीही मागे राहिलेली नाही. महावितरणने सुरू केलेली ‘स्मार्ट वीजमीटर’ योजना याच आधुनिक प्रगतीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, काही ठिकाणी या मीटरबद्दल गैरसमज किंवा विरोध दिसून येतो. दि. ९ ते २३ फेब्रुवारी या पंधरवाड्यात महावितरण स्मार्ट मीटर संदर्भात जनजागरण मोहीम राबवत आहे. त्यानिमित्त स्मार्ट मीटरची गरज, फायदे आणि त्याबाबतच्या शंकांचे निरसन करून, ग्राहकांची स्वीकारार्हता वाढवण्याच्या उद्देशाने हा शब्द प्रपंच केला आहे.

तंत्रज्ञानाचा प्रवास: जुन्याकडून स्मार्टकडे

पूर्वी वेळ पाहण्यासाठी यांत्रिक घड्याळे होती, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आली आणि आता डिजिटल स्मार्टवॉच आली आहेत, ज्यात आरोग्याची माहितीही मिळते. वीज मीटरचा प्रवासही असाच यांत्रिक (चकतीचे) ते इलेक्ट्रॉनिक्स आणि आता स्मार्ट डिजिटल मीटरपर्यंत पोहोचला आहे. तंत्रज्ञानातील हा बदल स्वीकारणे काळाची गरज आहे.

स्मार्ट मीटर म्हणजे काय?
स्मार्ट मीटर हे केवळ मीटरिंग उपकरण नसून, ते ‘टू-वे कम्युनिकेशन’ प्रणालीवर काम करते. हे मीटर स्वयंचलित (automatic) मीटर रीडिंग घेतात आणि थेट महावितरणच्या प्रणालीला माहिती पाठवतात. यामुळे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळला जातो.

गैरसमज आणि सत्यता
महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेबाबत काही चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत

• गैरसमज १: यामुळे बिल वाढेल ?
o सत्य: हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होते. जुन्या मीटरमध्ये रीडिंग घेताना होणाऱ्या मानवी चुका किंवा अंदाजे बिल देण्याची पद्धत स्मार्ट मीटरमुळे बंद झाली आहे. तुम्ही जितकी वीज वापरली, तेवढेच अचूक बिल तुम्हाला मिळेल.
• गैरसमज २: मीटर बसवण्यासाठी पैसे द्यावे लागतील ?
o सत्य: नवीन वीज जोडणीसाठी किंवा जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. हे मीटर १०० टक्के मोफत आहेत.
• गैरसमज ३: हे प्रीपेड मीटर आहेत ?
o सत्य: सध्या बसवले जाणारे स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटर पोस्टपेडच आहेत. ग्राहकांना मासिक पद्धतीनेच बिलांची आकारणी होत आहे.

स्मार्ट मीटरचे ग्राहकांसाठी फायदे
विरोध मावळून स्वीकारार्हता वाढण्यासाठी ग्राहकांना होणारे थेट फायदे समजून घेणे आवश्यक आहे:

• अचूक आणि पारदर्शक बिलिंग : स्वयंचलित रीडिंगमुळे बिलिंगच्या तक्रारी पूर्णपणे संपुष्टात येतात आणि ग्राहकांचा मनस्ताप वाचतो.
• वीज वापराचे नियंत्रण : ग्राहक आपल्या मोबाईल ॲपवर दर तासाला, दिवसाला, आठवड्याला आणि महिन्याला झालेला वीज वापर रिअल-टाइममध्ये पाहू शकतात. यामुळे विजेचा वापर नियंत्रित ठेवण्याची सोय उपलब्ध होते.
• टीओडी (ToD) सवलत : स्मार्ट मीटरमध्ये टीओडी प्रणाली समाविष्ट आहे, ज्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंतची सवलत मिळते. यामुळे प्रामाणिक ग्राहकांचे वीज बिल कमी होत आहे.
• सौर ऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त : ज्या ग्राहकांनी सूर्यघर योजनेतून किंवा इतर योजनेतून स्वत:च्या छतावर सोलर पॅनेल (Net Metering) लावले आहेत, त्यांच्यासाठी स्मार्ट मीटर अत्यंत उपयुक्त आहेत, कारण ते वापरलेल्या आणि ग्रीडला परत पाठवलेल्या विजेचा अचूक हिशोब ठेवते.
• जलद सेवा : वीज यंत्रणेतील बिघाड संबंधित अभियंत्यांना लगेच कळतो, परिणामी वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी कमी होतो.
• वापर तपासता येतो : सध्या तुमच्या घरात किती दाबाने वापर सुरू आहे हे समजते. तुम्ही दर तासाला, दिवसाला किंवा महिन्याला किती युनिट वीज वापरली याचा आलेख (Graph) पाहू शकता. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वापर वाढला की कमी झाला, हे लगेच कळते. एखादे उपकरण (उदा. AC किंवा गीझर) सुरू केल्यावर रीडिंग किती वेगाने वाढते, हे पाहून तुम्ही वीज बचतीचे नियोजन करू शकता.

महावितरणने ग्राहकांचे हित आणि पारदर्शकता लक्षात घेऊनच स्मार्ट मीटरचा पर्याय निवडला आहे. हे तंत्रज्ञान वीज व्यवस्थापनात क्रांती घडवून आणणारे आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, एक जागरूक आणि आधुनिक नागरिक म्हणून स्मार्ट मीटरचा स्वीकार करणे हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.

विकास पुरी,
जनसंपर्क अधिकारी
महावितरण, पुणे परिमंडल

खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

0

मुंबई-भाजपचे वरिष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार करण्यात येणार असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, स्थानिक नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर नारायण राणे यांचा कणकवली येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणे यांनी केलेल्या भाषणात आता आपण थकलो असल्याचे वक्तव्य केले होते. आता अजून किती करणार याला काही मर्यादा असाव्यात, असे त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी आपली दोन्ही मुले कर्तुत्ववान असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असून त्यांना आशीर्वाद देताना नांदा सौख्य भरे असा आशीर्वाद देखील त्यांना दिला होता.

अजितदादांचा घातपात झाला:रोहित पवार यांचा आरोप

0

लोकांना सत्य कळावे, म्हणून पत्रकार परिषद

मुंबई-अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार सादर केले.

दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, आज अजित दादा आपल्यात नाही. आम्ही प्रयत्न करुन आम्हाला ही सर्व माहिती मिळाली आहे. मग सरकारच्या एजन्सीने जर काम केलं तर या अपघाताचे रहस्य लवकरात लवकर आपल्याला कळेल, असे म्हणत रोहित पवार यांनी अजितदादांचा घातपात झाल्याचा आरोप केला. तसेच VSR आणि ॲरो विमान या कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त केला.

रोहित पवार यांनी अफवांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना एक प्रसंग सांगितला. पिंपरी चिंचवडमध्ये सिग्नलला थांबले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना विचारले की, 9 तारखेला तुम्ही अजितदादांबाबत काही सांगणार होता, त्याचं काय झालं? त्यावर रोहित पवार यांनी त्याला 10 तारखेला सर्व सांगणार असल्याचे उत्तर दिले. काही लोकांनी भावनिक होऊन दादा परत येतील असे व्हिडिओ टाकले, काहींनी विमानात सहा जण होते आणि दादांचे पार्थिव सापडले नाही असे सांगितले. या सर्व चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळेच लोकांना सत्य कळावे, म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी रोहित पवार अत्यंत भावुक झाले. त्यांनी सांगितले की अपघातानंतर सलग सहा दिवस त्यांना हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटत होते. दादांचा अपघात झालाच नाही असे त्यांना सतत वाटत होते. मात्र, जेव्हा त्यांनी अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या, तेव्हा वास्तव समोर आले. जळालेला स्वेटर, चप्पल आणि अजितदादांच्या हातातील घड्याळ त्यांनी पाहिले. दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घड्याळात 9 वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून त्यांना खात्री पटली की अजितदादा आता हयात नाहीत.

रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांच्या प्रेमापोटी त्यांनी या अपघाताबाबत शक्य ती माहिती गोळा केली. काही जण विचारतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली, परंतु दादांबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळेच हा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत नसतानाही जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. दादा आणि साहेबांनी नेहमी एकच सांगितले, प्रयत्न करत राहा. त्याच विचारातून हा संपूर्ण तपशील समोर आणण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे, हीच भूमिका त्यांनी मांडली.


अनेक गंभीर शंका –

दादांचा मूळ प्रवास कारने होणार असताना शेवटच्या क्षणी त्यांना विमानाने जाण्यास भाग पाडले गेले का.
अपघाताच्या दिवशी विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलले गेले.
विमानाचा अपघात होत असताना पायलटने ‘मेडे कॉल’ का दिला नाही.
ट्रान्सपाँडर का बंद होता, विमान टेकऑफपूर्वी नीट तपासले गेले होते का, टेकलॉग व एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत.
व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिले आणि त्याचा अहवाल सार्वजनिक का होत नाही.
दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का

रोहित पवार यांनी दावा केला की, अपघातापूर्वी काही घडामोडींमुळे दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का, याची चौकशी व्हावी. एका नेत्याच्या फाईलमुळे उशीर झाला, पक्षातील एका नेत्याची भेट उशिरा झाली, आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला, यामागे काही नियोजन होते का, असा सवाल त्यांनी केला.
विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीत चेकलिस्ट पद्धत नसणे, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर बंद असणे, मेंटेनन्समध्ये त्रुटी, पायलटांवर दबाव, स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद असणे, दुसरा ‘गो अराऊंड’ न घेणे, इंधन बचतीसाठी घाई करणे अशा बाबींची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक संस्थांकडून नव्हे तर परदेशी तपास यंत्रणांकडूनही व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अपघातानंतरही या कंपनीच्या विमानातून मंत्री प्रवास करतात, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

महाराष्ट्रातून ७० प्रमुख प्रतिनिधींची उपस्थिती ; एप्रिल २०२६ मध्ये होणार अखिल हिंदू साहित्य संमेलन

पुणे : अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने पुण्यात एक महत्त्वाची नियोजन बैठक सदाशिव पेठेतील पेरूगेट येथील भावे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद कैलासनाथ नंदा यांनी भूषविले. बैठकीस संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचे सुमारे ७० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी १५ प्रमुख समित्यांची रचना करण्यात आली असून, प्रत्येक समितीत ७ ते ८ प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियोजन प्रक्रियेत हिंदू नेटवर्कचे सुनील सोनवणे, प्रा. डॉ.संजय भांडारकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक विभागाचे संजय मुरदाळे, सक्रियपणे सहभागी झाले होते.

बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रम रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित अखिल हिंदू साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, कवी कट्टा, हिंदू साहित्यावर आधारित व्याख्याने, धर्मविचार मांडणारे परिसंवाद, तसेच पारंपरिक वाद्य व कला सादरीकरण यांचा समावेश असणार आहे. यासोबतच काही विशेष प्रकट मुलाखतीही घेण्यात येणार आहेत.

तसेच हिंदू धर्मासाठी जागरणात्मक व निःस्वार्थ कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना संमेलनात “हिंदू तेज पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अखिल हिंदू साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीद्वारे संमेलनाच्या तयारीला अधिक गती देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

एमआयटीचे आचार्य श्री शिवम जागतिक आध्यात्मिक संवादात सहभागी-थिऑसॉिफिकल सोसायटी चेन्नई येथे शांती व विश्व कल्याणाचा आवाज

पुणे,: ” दैनंदिन जीवनात आध्यात्मिक शिकवणींचा सराव या विषयावर आध्यात्मिक संवादात एमआयटी डब्ल्यूपीयूशी संलग्नीत आचार्य श्री शिवम यांनी नुकतेच चेन्नई येथील थिऑसॉफकल सोसायटीच्या प्रतिष्ठित स्कूल ऑफ द विस्डम येथे भाग घेतला. त्यांच्या यशस्वी प्रवचनानंतर एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी त्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक विचारवंत प्रो. एमेरिटस रवी रवींद्र यांनी केले होते. या मध्ये जगभरातील ५५ देशांतील थिऑसॉफिकल परंपरेशी संबंधित असंख्य अनुयायी, साधक आणि विद्वान सक्रियपणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आध्यात्मिक ज्ञानाचे व्यावहारिक जीवन, आचरण आणि चेतनेत रुपांतर करणे हा होता.
या संदर्भात माईर्स एमआईटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रो.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे जागतिक शांततेचे स्वप्न विशेष महत्वाचे आहे. डॉ. कराड यांचे अध्यात्माची वैज्ञानिक प्रयोगशाळा विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि कला यांचा संयोग  तत्वज्ञान शिक्षणाला आंतरिक आणि जागतिक  शांततेचे साधन म्हणून कल्पित करते. हे स्वप्न माईर्स एमआयटीचा पाया आहे. जिथे शिक्षण केवळ करिअरचा मार्ग नाही तर मानवी चेतनेच्या विकासाचे साधन मानले जाते.
या विषयाशी पुढे जाताना आचार्य श्री शिवम म्हणाले की एमआयटी ट्रस्टशी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेद्वारे ते व्यक्तींमध्ये विशेषता तरुणांमध्ये आत्म जागरुकता, विवेक आणि आंतरिक परिवर्तन जागृत करण्यासाठी सतत काम करतात. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट तरुणांना अशा आंतरिक प्रवासात प्रेरित करणे आहे जिथे ज्ञान, मूल्ये आणि चेतना एकत्रितपणे विकसित होतात.
स्कूल ऑफ विज्डममधील हा संवाद केवळ एक बौद्धिक मंच नव्हता, तर सामान्य चेतना आणि सामयिक उद्देशाचा संगम होता जागृत व्यक्ती निर्माण करण्याची वचनबद्धता जे करुणा, संतुलन आणि शांतीसह जगाच्या कल्याणात योगदान देऊ शकतात.

पुणे मेट्रोमध्ये सुलभ प्रवासासाठी एनपीसीआयने एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने ‘रुपे ऑन-द-गो’ कार्ड सादर केले

महा मेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडआणि एचडीएफसी बँक यांच्यामधील सहयोगामुळे लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार

पुणे ,: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने महा मेट्रो आणि पुणे मेट्रोसाठी विशेष अ‍ॅक्वायरर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेसोबत सहयोगाने पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो (ओटीजी) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू केल्याची आज घोषणा केली. या उपक्रमामुळे प्रवासी त्यांच्या विद्यमान रुपे ऑन-द-गो कार्डचा वापर करून पुणे मेट्रोच्या सर्व कार्यरत स्थानकांवर प्रवास करू शकतात. संपर्करहित आणि इंटरऑपरेबल पेमेंट सोल्यूशन्सद्वारे ही डिजिटल तिकीट यंत्रणा विनासायास आणि सुलभ अनुभव देते. ही सुविधा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.

कागदी तिकीट, मोबाइल क्‍यूआर तिकीट, तसेच एचडीएफसी बँक वन पुणे एनसीएमसी रुपे कार्डद्वारे प्रवाशांना सुविधा देणारी पुणे मेट्रो आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो स्वीकारण्याच्या सुविधेमुळे अधिक सुधारित प्रवास अनुभव देत आहे. या उपक्रमामुळे कोणतेही विद्यमान किंवा नवीन रुपे ऑन-द-गो कार्ड वापरून अ‍ॅक्वा आणि पर्पल मार्गिकांवरील सर्व २९ कार्यरत स्थानकांवर ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ करता येणार आहे.

ही प्रगती दैनंदिन प्रवाशांना एकसंध, सोयीस्कर आणि विनासायास प्रवासाची सुविधा देणार आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवासी संपूर्ण नेटवर्कमध्ये एकाच कार्डचा वापर करू शकतील. प्रत्येक प्रवासासाठी किंवा वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करण्याची गरज न राहिल्याने प्रवास अधिक सोपा होईल. रुपे ऑन-द-गो कार्ड विविध बस आणि मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटीला पाठबळ देते, तसेच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही प्रदान करते, ज्यामुळे कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही प्रवाशांना कोणताही अडथळा येणार नाही.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्रीश्रवण हार्डीकर, आयएएस म्हणाले, “पुणे मेट्रोसाठी एनसीएमसी कार्ड इंटरऑपरेबिलिटीची सुरुवात हा खरोखरच एक परिवर्तनकारी टप्पा आहे. माननीय पंतप्रधानांच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम प्रवाशांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करणार आहे. स्वयंचलित भाडे सवलतींसह सुलभ ‘पे-अ‍ॅज-यू-गो’ अनुभव देऊन आम्ही सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, परवडणारी आणि प्रवासी-अनुकूल बनवत आहोत. या महत्त्वपूर्ण यशासाठी मी संपूर्ण पुणे मेट्रो टीमचे, आमचे भागीदार एचडीएफसी बँक आणि पेक्राफ्ट यांचे, तसेच हे यश शक्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्‍या शहरासाठी आणि देशासाठी विनासायास, स्मार्ट आणि भविष्यासाठी सज्ज वाहतूक परिसंस्था उभारण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.”

एनपीसीआयच्या कार्यकारी संचालिका (ग्रोथसोहिनी राजोला म्हणाल्या: “पुणे मेट्रोमध्ये ‘रुपे ऑन-द-गो’ सुरू करणे हे भारतातील शहरी गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी एमआयेएचयूए, महा मेट्रो आणि एचडीएफसी बँकेसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. याद्वारे आम्ही डिजिटल पेमेंटची व्याप्‍ती वाढवून त्‍याला सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहोत.”

एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंग चॅनेल प्रमुख श्रीराजनिश परमानंद प्रभू म्हणाले: “आम्ही ग्राहकांना सुलभ, सर्वोत्तम आणि आधुनिक प्लॅटफॉर्मवर आधारित डिजिटल अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत. रुपे ऑन-द-गो कार्डमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्‍यासह प्रवासाचा दर्जाही सुधारेल. पुणे मेट्रोकरिता रूपे ऑन-द-गो कार्डसाठी पेमेंट पार्टनर म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही एनपीसीआय, एमओएचयूए आणि महा मेट्रोचे आभारी आहोत.”

पुणे मेट्रोमध्ये रुपे ऑन-द-गो स्वीकारण्यामुळे देशभरातील विविध मेट्रो आणि बस नेटवर्कमध्ये एनसीएमसीचा व्यापक अवलंब वाढण्यास मदत होत आहे. यामुळे भारताचा स्मार्ट मोबिलिटी पायाभूत सुविधांकडे होणारा प्रवास वेगाने पुढे जात असून प्रवाशांना सोपा आणि सातत्यपूर्ण प्रवास अनुभव मिळत आहे.

वापरकर्ते केवळ पुण्यातच नव्हे, तर मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद आणि कानपूर यांसारख्या शहरांतील मेट्रो सेवांमध्ये, तसेच मुंबई (B.E.S.T), गुवाहाटी, हरियाणा, जम्मू, श्रीनगर, हिमाचल आणि औरंगाबाद येथील बस सेवांमध्येही रुपे ऑन-द-गो कार्डचा लाभ घेऊ शकतात. रुपे एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी वापरकर्ते सहभागी बँका, मेट्रो स्थानके किंवा नियुक्त कार्यालयांना भेट देऊ शकतात आणि त्यांच्या सुलभ प्रवासाच्या सुरुवातीसाठी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट भूमिपूजन सोहळा संपन्न!

पुणे-येथील महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी दोन टेनिस कोर्ट विकसित केले असून काल तिसऱ्या टेनिस कोर्टचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मातोश्री माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे नागरिकांतून संतोष व्यक्त होत आहे.

या संदर्भात नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सांगितले कि,’ आपल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथील बास्केट बॉल मैदानाची दुरावस्था झाल्याने अपघात होण्याची संभाव्यता वाढली होती. गेल्या आठ वर्षांपासून अविरतपणे सेवा देणाऱ्या या मैदानाची डागडुजी होणे, काळाची गरज बनले होते. याकरिता आपण चार महिन्यांपूर्वी मनपाकडे पाठपुरावा करत ५० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून टेनिस कोर्टच्या सोबतीने बास्केट बॉल कोर्टच्याही कामाचा शुभारंभ होत आहे.यामुळे येत्या दोन महिन्यात उत्तम दर्जाचे सिंथेटीक टेनिस कोर्ट आणि बास्केट बॉल कोर्ट साकारत असून यामुळे प्रभागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडू वर्गाला प्रोत्साहन प्राप्त होईल, यात शंकाच नाही. याप्रसंगी माझे सहकारी, पक्षाचे पदाधिकारी, खेळाडू तसेच अनेक नागरिक यांनी उपस्थिती दर्शवत कामाबद्दल भरभरून कौतुक केले. लवकरच सदर प्रकल्प पूर्णत्वास जात असून असेच अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा मानस असेल .

एमएसएमईसाठी उच्च कर्जमूल्य आणि त्याच दिवशी वितरण सुविधेसह अॅक्सिस बँकेची सुवर्ण कर्ज योजना

पुणे : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सुवर्ण कर्ज योजना सुरू केली आहे. ही एक सुरक्षित ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे, जी लहान व्यवसायांना त्यांच्याकडील सोन्याच्या मालमत्तेवर जलद प्रक्रिया, लवचिकता आणि किमान कागदपत्रांसह निधी उपलब्ध करून देण्यास मदत करण्यासाठी तयार केली आहे. ही योजना उद्योजक आणि एकल मालकांसाठी उपलब्ध आहे, ज्यात बँकेचे विद्यमान आणि नवीन ग्राहक या दोघांचाही समावेश आहे. सुवर्ण कर्ज सुविधा असलेल्या 3300 हून अधिक शाखांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.

पात्र ग्राहक त्याच दिवशी काउंटरवर (OTC) रक्कम मिळवू शकतात, जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पात्रता आणि अंतर्गत धोरणांवर आधारित, कर्जाची रक्कम 50,000 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत असते. कागदपत्रांच्या आवश्यकतांमध्ये केवळ केवायसी, उद्यम नोंदणी किंवा असिस्ट प्रमाणपत्र आणि आयटीआर किंवा जीएसटी नोंदणी यांचा समावेश आहे. ही सुविधा सोन्याच्या दागिन्यांसाठी ओव्हरड्राफ्ट म्हणून कार्य करते, ज्यामध्ये कर्जदारांना फक्त मासिक व्याज भरावे लागते.

हे उत्पादन 82% पर्यंत कर्जमूल्य अर्थात लोन-टू-व्हॅल्यू (LTV) प्रदान करते, जे या क्षेत्रातील सामान्य ऑफरपेक्षा जास्त आहे, आणि त्याच वेळी नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पूर्णपणे पालन केले जाते. उत्तम कर्जमूल्य व्यवस्था ॲक्सिस बँकेची मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली, शिस्तबद्ध ग्राहक वर्गीकरण, कठोर सुवर्ण मूल्यांकन आणि तारण देखरेख प्रक्रियांमुळे शक्य झाली आहे. हे सर्व घटक एकत्रितपणे पोर्टफोलिओमध्ये शिस्त राखत जलद कर्ज उपलब्ध करून देतात.

या लाँचबद्दल भाष्य करताना, ॲक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि भारत बँकिंगचे प्रमुख बिपिन सराफ म्हणाले, लघु व्यवसाय हे भारताच्या आर्थिक गतीच्या केंद्रस्थानी आहेततरीही खेळत्या भांडवलाचा वेळेवर अभाव ही एक सातत्यपूर्ण समस्या आहे. आमचे सुवर्ण कर्ज हे एमएसएमईसाठी सुरक्षित कर्जाची ताकदवेगलवचिकता आणि सुलभ शाखा-आधारित अनुभवाचे संयोजन करून त्रुटी दूर करण्यासाठी तयार केले आहे. मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली आणि शिस्तबद्ध अंडररायटिंगचा लाभ घेऊनआम्ही विवेकपूर्ण मर्यादेत सोन्यावर अधिक कर्जाची पात्रता देऊ शकत आहोतज्यामुळे एमएसएमई त्यांच्या व्यवसायाच्या गरजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतील.”

भारताच्या पतपुरवठा क्षेत्रातील व्यापक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिथे सुरक्षित कर्जपुरवठा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) वित्तपुरवठा हे वाढीचे प्रमुख चालक म्हणून उदयास येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमती, सुरक्षित कर्ज पोर्टफोलिओवर बँकांचा वाढता भर आणि MSME उद्योगांना जलद, अल्प-मुदतीच्या तरलतेची गरज, या घटकांमुळे सोन्याच्या तारणावर आधारित व्यावसायिक कर्जाचे महत्त्व लक्षणीयरित्या वाढले आहे.

या उपक्रमाद्वारे, एमएसएमईंना सुरक्षित, उच्च-गुणवत्तेचे कर्ज उपाय प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला ॲक्सिस बँक अधिक दृढ करते, जे व्यवसायाच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करतात आणि भारताच्या पतवाढीच्या बदलत्या गतिशीलतेशी जोडलेले आहेत.

भारतीय वारसा हीच आपली खरी ओळख‘हेरिटेज यात्रा २०२६’चा मुकेश शर्मा यांच्या उपस्थितीत दिमाखदार समारोप

पुणे: “भारतीय कला आणि संस्कृतीचा वारसा हा केवळ इतिहास नसून तो आपल्या प्रगत भविष्याचा पाया आहे,” असे प्रतिपादन फिल्म्स विभागाचे माजी महासंचालक डॉ. मुकेश शर्मा यांनी केले.
पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा समारोप पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र. कुलपती डॉ. नचिकेत ठाकूर, अधिष्ठाता डॉ. माधवी गोडबोले, डॉ. प्रिया सिंग आणि डॉ. अश्विनी पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावर्षीच्या महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दररोज सुमारे २,००० पर्यटकांनी नोंदणी करून या महोत्सवाला भेट दिली. एकूण २२ शाळांच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. महोत्सवादरम्यान रील मेकिंग, वादविवाद, निबंध लेखन आणि श्लोक पठण अशा विविध स्पर्धा पार पडल्या. तसेच हस्तकला विभागात पारंपरिक विटांची भिंत तयार करणे, वारली चित्रकला आणि मातीकाम अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांनी भारतीय कलांचे बारकावे शिकून घेतले. अत्यंत कल्पकतेने डिझाइन केलेल्या ‘हेरिटेज प्लेलँड’मध्ये विद्यार्थ्यांना खेळता-खेळता इतिहासाची सफर घडली. यामध्ये प्रामुख्याने ‘महामिस्टरी’, ‘डार्ट अँड डिस्कव्हर’ आणि महाराष्ट्रासाठी स्वतःच्या ‘चलनाची रचना करणे’ यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.

डॉ. मुकेश शर्मा यांनी आपल्या भाषणात हिंदीतून संवाद साधत तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय वारशाचे मूल्य समजून घेणे आणि तो पुढील पिढीसाठी जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी सहा पुरस्कार पटकावत आपले वर्चस्व राखले.

स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व

या सोहळ्यात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजने सलग दुसऱ्या वर्षी सहा पुरस्कार पटकावत आपले वर्चस्व राखले.
वादविवाद स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सार्थक भारेकरने, काव्यवाचन स्पर्धेत लोणी-काळभोर येथील एमआयटी व्हीजीएसच्या सान्वी मिश्राने, निबंध स्पर्धेत विश्वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयाच्या अभिषेक रामकिशन जाट, सोनाली राहुल कास्के आणि यश राहुल देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवला. श्लोक पठण स्पर्धेत विश्वकर्माच्या भार्गवी बिराजदारने, तर श्लोक लेखन स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूलच्या रेणुका कुलकर्णीने प्रथम क्रमांक पटकावला.

पुण्यात मोफत प्रवासाचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा – अमोल बालवडकर

पुणे : अजित पवार असते तर पुण्याच्या विकासाच्या आड कोणी येणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला असता, असे मत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना बालवडकर यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि पुण्याविषयीच्या जिव्हाळ्याचा उल्लेख केला.पुण्यातील मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी दाखवलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत बालवडकर म्हणाले, “मोफत मेट्रोचे स्वप्न अजितदादांनी पुणेकरांना दाखवले होते. तसा प्रयत्न आपण करून दाखवला पाहिजे. अजितदादांनी यासाठी नेमका काय आराखडा तयार केला होता, याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.”बालवडकर म्हणाले, “पुण्याचा जिव्हाळा असणारा नेता हरपला आहे. प्रशासनावर पकड असलेला आणि शहराच्या प्रत्येक विषयाची तंतोतंत माहिती असणारा अजितदादा हा एकमेव नेता होता. कार्यकर्त्यांना बळ देणारा, त्यांना न्याय देणारा आणि दिलेला शब्द पाळणारा असा दुर्मिळ नेता आज आपल्यातून गेला आहे.”

अजित पवार यांची कार्यक्षमतेंचा उल्लेख करत बालवडकर यांनी सांगितले की, ते चोवीस तास काम करूनही वेळ कमी पडत असल्यासारखे वाटत असे. शहरातील वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, तसेच नागरी प्रश्नांवर अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असे. कोणताही विषय असो, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न अजितदादांकडून होत असे, असेही त्यांनी नमूद केले.अजितदादा अभ्यासू होते आर्थिक विषयावर त्यांचा गाढ अभ्यास होता मोफत प्रवासाच्या संदर्भात बालवडकर यांनी यावेळी एक सूचनाही मांडली. प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी मेट्रो मोफत करून पाहावी. त्यातून प्रदूषण, हवेची गुणवत्ता आणि वाहतूक कोंडीवर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करता येईल, असे बालवडकर यांनी सांगितले. शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर आणि प्रदूषणावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रद्धांजली अर्पण करताना बालवडकर यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. तसेच अजित पवार यांनी पुणेकरांना आणि शहरासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.

राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या.

पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा – भाऊसाहेब भोईर

पिंपरी, पुणे (दि.०९ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रशासन काळात झालेल्या मोठ्या प्रकल्पांची प्राधान्याने चौकशी करावी. ५० हजार नागरिकांच्या हरकती येत असतील तर डीपी रद्द करावा. रस्ते लहान करणारा हरित सेतू प्रकल्प रद्द करा. प्रशासनाने अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी, पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी काय केले याची माहिती द्या.
या मागण्यांसह महापौर रवी लांडगे यांनी पाणी पुरवठा २४ तास सुरू करू असे सांगितले आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मी विरोधी पक्षनेता असलो तरी विरोधाला विरोध करणार नाही. तर सत्ताधारी आणि विरोधक, नागरिक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.
सोमवारी, मनपा कार्यालयात भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी भोईर म्हणाले की, आम्ही राज्य सरकार मध्ये महायुतीत सत्तेत आहोत. परंतु येथे विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांशी समन्वय साधून शहर विकासासाठी काम करणार आहे. काही अधिकारी निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदारांना समोर ठेऊन अटी, शर्ती ठरवतात. अनेक अधिकारी तर मनपाचे मालक झालो आहोत अशा आविर्भावात आहेत. शहरात अनेक भागात अजूनही टँकर ने पाणी घ्यावे लागते याला जबाबदार कोण ? अनेक निविदा वाढवून तिजोरीची लूट सुरू आहे. कालांतराने कामगारांच्या पगारासाठी राज्य सरकार वर अवलंबून रहावे लागेल. मनपाची आर्थिक घडी पुन्हा बसवावी लागेल. प्रशासन काळात झालेल्या सर्व बेकायदेशीर कामांची चौकशी करण्यात येईल. हॉकर झोनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावा लागेल. तलाठी, सर्कल ऑफिस, तहसीलदार ऑफिस, पोलिस स्टेशन, पोलिस आयुक्तालय अशा या शहराच्या हद्दीत असणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र सरकारच्या कार्यालयांवर मनपा चा अंकुश पाहिजे. याठिकाणी नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत. कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. नदी सुधार योजनेच्या ऐवजी नद्यांची गटारं झाली आहेत. पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. राज्यकर्त्यांनी भानावर येण्याची गरज आहे. आता चुकीच्या कामावर लक्ष ठेऊन सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिली.