Home Blog Page 106

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

0

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६

केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहचलेली आहे, या नव्या बदलामुळे कामगारांच्या हाताला कमी संधी मिळणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारचे धोरण हे शेतकरी व कामगार विरोधी असल्याने या बंदमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशा सुचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड गणेश पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज स्वस्त नाही तर १६% ने महाग होणार: अतुल लोंढे

महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६

राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सागितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी यावर खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्या कथनी व करनीत फरक आहे. पाच वर्षात वीज दर कमी करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर केले होते. पण
महावितरणने (MSEDCL) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) २० ते ४० टक्के वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यासंदर्भातील जनसुनावणी नागपुरात झाली असून हा सर्व खटाटोप अदानीच्या फायद्यासाठी केला जात आहे. यातून राज्यातील सर्वसामान्य वीजग्राहक व छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे कंबरडे मोडणार आहे. आधीच महागाई, बरोजगारीने पिचलेल्या जनतेवर फडणवीस यांनी वीज दरवाढीचा भार टाकण्याचा घाट घातला आहे. शेजारच्या गुजरात, कर्नाटक, तेलंगण राज्यात महाराष्ट्रापेक्षा वीजेचे दर कमी आहेत. गुजरामध्ये घरगुती वीज दर ३.० ते ५.२ रुपये प्रति युनिट, कर्नाटकात ३.७ ते ७.३ रुपये प्रति युनिट, तेलंगणात २ ते १० रुपये प्रति युनिट दर असताना महाराष्ट्रात तेच दर ४.४ ते १२.८ रुपये प्रति युनिट आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा खर्च सर्व राज्यात सारखा असताना महाराष्ट्रातच वीज महाग का?, असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

अतुल लोंढे पुढे म्हणतात की, MERC प्रत्येक ५ वर्षांनी बहुवर्षीय दर निर्धारण आदेश प्रसिद्ध करतो. नवीन MYT आदेश १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार होता, यासाठी MERC ने पूर्वीच्या आदेशाच्या धर्तीवर मसुदा तयार करून आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आणि राज्यभर सार्वजनिक सुनावण्या घेतल्या, या सुनावण्यांमध्ये राज्यातील विविध औद्योगिक संस्था, ग्राहक आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या आणि प्रत्यक्ष सुनावणीत सहभाग घेतला. या विचारांनंतर MERC ने २८ मार्च २०२५ रोजी अंतिम MYT आदेश जाहीर केला, जो समाज, उद्योग आणि महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीस पोषक असल्याने स्वागतार्ह ठरला परंतु त्यानंतर म.रा.वि.वि.कं. (MSEDCL) ने या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली आणि MERC ने कोणतीही नवीन जनसुनावणी न घेता, कोणत्याही नव्या हरकती न मागवता, २५ जून २०२५ रोजी सुधारित MYT आदेश प्रसिद्ध केला. MERC चा स्वतःच्या पूर्वीच्या निर्णयावरील हा अचानक बदल आणि तोही जनतेचा सहभाग न घेता, प्रक्रियात्मकदृष्ट्या संशयास्पद व कायदेशीर दृष्टिकोनातून आव्हानयोग्य आहे. ह्याच आदेशाला महाराष्ट्रातील विविध संघटनांनी, सोलर प्रकल्प विकासक आणि धारक एकत्रित येऊन मुंबई हायकोर्टात अपील सादर केल्यानंतर मुंबई हायकोर्टानी महावितरणला फटकारून जुनाच आदेश लागू करा आणि परत जनसुनावणी करून काय घोळ केलात ते सुधारा असा आदेश पारित केला आहे.

महाराष्ट्र हे संपूर्ण देशात सर्वात महाग वीज दर असलेले राज्य आहे, ज्यामुळे अनेक नवीन उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत. अनेक विद्यमान उद्योगही इतर राज्यांत स्थलांतराच्या विचारात आहेत परिणामी राज्यात बेरोजगारी वाढत आहे. MERC च्या नव्या सुधारित आदेशामुळे विद्यमान वीज दरात २०% ते ४०% पर्यंत वाढ झाली आहे. लघु व मध्यम उद्योग (SME) जे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांच्यावर याचा थेट परिणाम होऊन संपूर्ण यंत्रणाच कोसळू शकते अशी भिती अतुल लोंढे यांनी व्यक्त केली आहे.

महाग वीज दरामुळे अनेक LT आणि HT ग्राहकांनी सौरऊर्जेच्या योजनेचा अवलंब करून स्वतःचे सौर रूफटॉप, कॅप्टिव्ह आणि ग्रुप कॅप्टिव्ह प्रकल्प उभारले. ६ ते ७ वर्षांची ROI (परतावा कालावधी) गृहित धरून मोठी गुंतवणूक केली, परंतु MERC च्या नव्या आदेशामुळे ROI अजून ४-५ वर्षांनी वाढतोय, ज्यामुळे बँकेचे हप्ते भरणेही कठीण होईल. पिक अवर्स (Peak Hours) पूर्वी संध्याकाळी ६ ते १० होते, आता ते संध्याकाळी ५ ते रात्री १२ करण्यात आले आहे, त्यामुळे अतिरिक्त ३ तासांचा लाभ नाकारला गेला. रात्रीच्या वापरासाठी दिवसा जमा केलेली युनिट्स समायोजित केली जाणार नाहीत, ही अतिरिक्त हानी होणार आहे. त्यामुळे सध्याचे सौर प्रकल्प वाया जातील आणि याचा मोठा फटका SME क्षेत्राला बसेल. अशी ही बिकट परिस्थिती जिथे सोलर पोवर गरजेपेक्षा जास्त होत असताना महावितरण थर्मल पावरचे ५-५ वर्षासाठीचे PPA का करते आहे, हे कळण्यापलीकडे आहे. कोणत्या बड्या असामीसाठी हा खेळ सुरु तर नाही ना याची शंका येते.

एकीकडे महावितरण कांगावा करतो कि सोलर मुळे त्यांच्या तिजोरीवर ताण पडतो मग महावितरण १६००० mw ची मुख्यमंत्री कुसुम योजना का राबवत आहे. हाच पैसा त्यांनी storage system साठी वापरला तर बऱ्यापैकी पीक अवर मधून नफा कमावता येईल. महाराष्ट्रात सौर प्रकल्प वाढल्यामुळे विजेच्या वहन तोट्यांमध्ये घट झाली आहे, आणि तीच MSEDCL साठी अतिरिक्त नफा आहे. सौर निर्मित वीज स्थानिक पातळीवर वापरली गेल्यामुळे ट्रान्समिशन लॉसेसही कमी झाले आहेत. दिवसा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त सौर युनिट्स MSEDCL इतर नॉन-सोलर ग्राहकांना विकते, आणि त्या बदल्यात कोणतेही खरेदी शुल्क न भरता १००% नफा मिळवते. ह्याची महावितरण कुठेही उल्लेख करीत नाही किंवा तो नफा आकड्यात पण सांगत नाही.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, MERC ने २५ जून २०२५ चा सुधारित MYT आदेश तत्काळ रद्द करावा. २८ मार्च २०२५ रोजीचा आदेश पुन्हा अंमलात आणावा, ज्यामुळे उद्योग, SME आणि सौर प्रकल्प वाचू शकतील. MSEDCL ला सौर प्रकल्पांमधून मिळणारे उत्पन्न सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणे बंधनकारक करावे. राज्य सरकारने या विषयात तत्काळ हस्तक्षेप करून पुन्हा जनसुनावणी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास वाचवावे, असेही अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीर

चेन्नई- पुण्यातील सरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीर झाला आहे.
भगवान महावीर फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या महावीर पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.अहिंसा व शाकाहार, शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि समुदाय व समाज सेवा या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील संस्थांमधून पुरस्कारविजेत्यांची निवड केली जाते.

२९ व्या महावीर पुरस्कारासाठी देशभरातून आलेल्या २६७नामांकन अर्जाचे मान्यवरांच्या परीक्षण मंडळाद्वारे काळजीपूर्वक मूल्यमापन करण्यात आले. भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एम. एन. वेंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदा ही जवाबदारी पार पाडली. ज्येष्ठ संन्यासिनी आचार्य चंदनाजी महाराज, माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड, भारतीय रिझर्व बँकेचे अंशकालीन संचालक तसेच तुघलकचे संपादक एस. गुरुमूर्ती, भारतीय विद्या भवन मंगलगुरू केंद्राचे चेअरमन प्राध्यापक बी. एम. हेगडे, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, निवृत्त आयएएस अधिकारी तसेच सेवीचे माजी अध्यक्ष डी. आर. मेहता, भारत सरकारचे माजी कॅबिनेट सचिव श्री. प्रभात कुमार (निवृत्त आयएएस अधिकारी) आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. जी. एस. सिंघवी यांचा परीक्षण मंडळावर समावेश होता.

उत्कृष्ट मानवतावादी सेवेची दखल घेण्याच्या उद्देशाने भगवान महावीर फाउंडेशनतर्फे दिला जाणारा २९वा राष्ट्रीय महावीर पुरस्कार सरहद या पुणेस्थित सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. अहिंसा व मानवीय कार्याच्या समर्थनासाठी तसेच शिक्षण, सांस्कृतिक संवाद व जनसंवाद यांच्या माध्यमातून मानवतावादी मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल महावीर पुरस्कार २०२६ द्वारे घेण्यात आली आहे. अहिंसा , शिक्षण, वैद्यकशास्त्र आणि समुदाय व समाज सेवा या क्षेत्रांमधील कामगिरीसाठी दरवर्षी महावीर पुरस्कार प्रदान केला जातो. प्रत्येक महावीर पुरस्कार विजेत्याला १० लाख रुपये रोख आणि त्यासोबत स्तुतीपर मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुण्यातील संजय नहार यांनी १९९५ मध्ये स्थापन केलेली सरहद पंजाब, जम्मू-काश्मीर व ईशान्य भारत आदी भारतातील संघर्षप्रवण भागांमध्ये शांतता राखण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आहे. शांतताफेन्या, दोन धर्मामधील संवाद, सांस्कृतिक उत्सव, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी आदानप्रदान उपक्रम यांच्याद्वारे ‘सरहद’ने विविध समुदायांमध्ये सौहार्द, विश्वास व परस्पर सामंजस्य जोपासले आहे. त्याचबरोबर संघर्षप्रवण प्रदेशांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक व निवासी सहाय्यही संस्थेतर्फे पुरवले जाते.


सरहद संस्थेसोबतच पुढील संस्थांना २९व्या महावीर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
कॉर्ड, हिमाचल प्रदेश, शिक्षण; श्री शंकरा कॅन्सर फाउंडेशन, कर्नाटक, वैद्यकशास्त्र, आणि श्रीमती संगखुमी बुआलघुआक, मिझोराम व निर्माण, ओडिशा, समुदाय व सामाजिक सेवा.

पुरस्काराच्या चार प्रवर्गामध्ये निस्वार्थ सेवा करणाऱ्यांकडून फाउंडेशनने ३० व्या महावीर पुरस्कारांसाठीही अर्ज मागवले आहेत. नामांकन अर्ज फाउंडेशनच्या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकतील: www.bmfawards.org.

भगवान महावीर फाउंडेशनचे संस्थापक सुगलचंद जैन यावेळी म्हणाले, “सरहद संस्थेने अहिंसा व मानवतावादी मूल्यांचे चैतन्य कृतीत उतरवण्याचे उदाहरण घालून देण्याजोगे कार्य केले आहे. संवाद, शिक्षण व नीतीमत्तापूर्ण सहभाग समाज परिवर्तनात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात हे ‘सरदह’च्या कामातून दिसून येते. शांतता व सौहार्दाचा प्रसार करण्यासाठी ‘सरहद’ने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली मान्यता ‘सरहद’चे उद्दिष्ट आणखी दृढ करण्यात तसेच अन्य अनेकांना प्रेरणा देण्यात उपयुक्त ठरेल, अशी आशा आम्हाला वाटते.”

२०२६ सालासाठी जाहीर केलेले पुरस्कार विजेते २६ राज्ये व २ केंद्रशासीत प्रदेशांतील आहेत. २९व्या पुरस्कारांपूर्वी महावीर पुरस्कार प्राप्त करणायांची संख्या १६ होती. गेल्या अनेक वर्षांपासून महावीर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जात आहेत. यांमध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे. औपचारिक सोहळ्यांमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.

फटाका सायलंसर बसविणाऱ्या गॅरेजवर पोलिसांचा छापा– १५ बुलेटचे सायलंसर रोड रोलर खाली चक्काचूर

पुणे : वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनीप्रदूषण व शांततेचा भंग करणाऱ्या फटाका सायलंसर बसविणाऱ्या दुचाकी वाहनांवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून वारजे, कर्वेनगर व शिवणे परिसरात पेट्रोलिंग करत १५ बुलेट दुचाकी चालकांवर कारवाई केली.चौकशीत या दुचाकींना मॉडिफाय सायलंसर वारजे येथील रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी गॅरेज मालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल केला असून भारतीय न्याय संहिता, मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.जप्त केलेले सर्व मॉडिफाय सायलंसर आरएमडी कॉलेज समोर रोड रोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले. तसेच दुचाकी चालकांचे समुपदेशनही करण्यात आले.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत बुलेट दुचाकी गाड्यांना मॉडिफाय केलेले व फटाके वार्जावणारे सायलंसर बसवून शांततेचा भंगकरुन ध्वनीप्रदुषण निर्माण करणारे दुचाकीचालक यांच्यावर परिणामकारक कारवाई करा म्हणून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने दिनांक १०/०२/२०२६ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या मागर्दशनाखाली मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायंलसर लावून फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरुध्द कारवाई करणेबाबत पथक नेमून आदेश दिले होते. त्याप्रमाणे कारवाई करणेकरीता तपास पथकाचे पोलीस अधिकारी संजय नरळे व स्टाफ यांनी वारजे, कर्वेनगर, शिवणे भागत पेट्रोलिंग करुन पेट्रोलिंग दरम्यान मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलेंसर लावून शांततेचा भंग करणाऱ्या १५ बुलेट दुचाकी चालकांविरुध्द वाहतुक विभागाच्या मदतीने कारवाई करुन सदर दुचाकींचे सायलंसर जप्त केले. तसेच कारवाई केलेल्या दुचाकीचालकांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचे मॉडिफाय केलेले सायलंसर हे वारजे येथिल रॉयल बाईक सर्विस या गॅरेजमधून बसविले असल्याचे सांगितल्याने पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे सदर गॅरेजमध्ये जावून चौकशी केली असता तेथे सदर गॅरेजचे मालक योगेश दामोदर सपकाळ, वय ३३ वर्षे, धंदा गॅरेज, रा. ओप्यूलन्स बिल्डींग, झील कॉलेज चौक, नन्हे, पुणे हा बुलेट मोटारसायकलला मॉडिफाय केलेले व फटाके वाजविणारे सायलंसर बसवितांना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७०,४९, मोटार वाहन कायदा कलम १९० (२) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) सह१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाई दरम्यान जप्त केलेले मॉडिफाय सायलंसर हे आर एम डी कॉलेज समोर रोड रोलरने चकणाचुर करुन दुचाकीचालकांचे समुपदेशन केले आहे. अशा पद्धतीने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मोठ्या आवाजांच्या वाहनांच्या बाबत तक्रार करून नागरिक पोलिसांमार्फत कारवाई करू शकतात . जागृत नागरिकांनी अशा बाबी पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.जी अशा प्रकारच्या वाहने निदर्शनास येतील पोलीस त्यावर स्वताहून कारवाई करतील .
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे,अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग,मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम,सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी,पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या देखरेखीत वारजे माळवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा

मुंबई l दि. ११ फेब्रुवारी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर आज नवे महापौर लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते दोघांनी पदभार स्वीकारला.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार उभा नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. या निवडीमुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात येऊन पुन्हा एकदा ‘मेयर राज’ची सुरुवात झाली आहे, असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

अध्यक्ष सभागृहात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नव्या महापौर व उपमहापौरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, त्यावेळी भूषण गगराणी आणि महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयाबद्दल अभिनंदन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आज मुंबईला मराठी महापौर आणि उपमहापौर लाभणे ही अभिमानाची बाब आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून मराठी माणसाला सन्मान आणि संधी देण्याची भूमिका महायुतीने सिद्ध केली आहे. मुंबईच्या सर्वसमावेशक विकासासोबत मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक स्वाभिमान यांचे जतन करणे ही आमची बांधिलकी आहे.”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून रस्ते विकासासह विविध प्रकल्पांमुळे शहराच्या प्रगतीला वेग आला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचा वाढलेला सहभाग आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर जनजागृती यामुळे महायुतीला व्यापक जनसमर्थन मिळाले आहे. महापौर रितू तावडे यांनी आपल्या भाषणात महिलांचे प्रश्न, मराठी भाषा व मराठी शाळांचे संवर्धन, मुंबईची सुरक्षितता तसेच बेकायदेशीर घुसखोरीच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली. उपमहापौर म्हणून संजय घाडी यांच्यासारखे आक्रमक व क्रियाशील नेतृत्व लाभल्याने प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शेवटी, उपसभापती या नात्याने दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, मुंबईकर जनतेचे आभार मानले.

मुंबई महापालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर, श्रीमती रितू तावडे महापौरपदी विराजमान

0

मुंबई, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६

बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आज महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती रितू तावडे विराजमान झाल्या. तर उपमहापौरपदी शिवसेनाच्या श्री संजय घाडी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार श्रीमती रितू तावडे आणि श्री. संजय घाडी यांनी स्वीकारला. यावेळी सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष व आमदार राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, भाजप आमदार पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती विद्या ठाकूर, भाजप गटनेते गणेश खणकर, भाजप सरचिटणीस राजेश शिरवाडकर, श्रीमती श्वेता परुळकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रितू तावडे यांच्या रुपाने मुंबई महानगरपालिकेत ४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. तसेच त्या भाजपाच्या पहिल्या महिला महापौरही ठरल्या आहेत. रितू तावडे या घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १३२ मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्यांनी याआधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. रितू तावडे यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या सभागृहाचं काम मी आज पहिल्यांदाच पाहिलं. मला अतिशय आनंद आहे की आज महापौर उपमहापौरपदी भाजप- शिवसेनाच्या महायुतीचे सदस्य विराजमान झाले आहेत. महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री संजय घाडी हे महायुतील शिलेदार मुंबईच्या महानगरपालिकेत कामकाज पाहणार आहेत. मुंबईच्या महानगरपालिकेला लोकाभिमुख पारदर्शी प्रशासन देण्यासाठी हे पदारोहण होत आहे. अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून रितू तावडे यांच्याकडे पाहिलं जातंय . मुंबईच्या विकासासाठी त्यांची नेहमी आक्रमक आणि आग्रही भूमिका राहिली आहे. त्यांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे आणि अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित असं मुंबईचं प्रशासन देण्याचं काम आम्ही करू. महापौर आणि उपमहापौर नवीन मुंबई घडवण्याला गती देण्याच्या कामी महापौर आणि उपमहापौरांना जी मदत लागेल ती मी आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे करणार आहोत.”

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईकरांना मनापासून धन्यवाद, मुंबईकरांनी महायुतीला कौल देऊन महाविकासाला स्वीकारलं आहे. महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांचं मी अभिनंदन करतो. मुंबईत महायुतीने अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर आणि उपमहापौर दिले आहेत. मुंबईकरांना आम्ही वचन आणि आश्वासन दिली त्यावर मुंबईकरांनी विश्वास दाखवला आहे. मागच्या २५ वर्षे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्यांना महायुतीने विकास करून मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी मागच्या काही वर्षांपासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आम्हाला कौल देत विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातली मुंबई घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमधील जागतिक दर्जाचं शहर म्हणून आगामी काळात मुंबईला घडवण्यासाठी आम्ही महापौर आणि उपमहापौर यांना नक्कीच सहकार्य करू.”

‘एन. ए.’ परवानगी आता इतिहासजमा..बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी,जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज

0

महसूलमंत्र्यांची जमीन महसूल कायद्यात महत्वाची सुधारणा-राजपत्र जारी….
मुंबई. दि. ११ : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. एन. ए. करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एन. ए. परवानगी असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून राजपत्र जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आली. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपली
आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजूरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी चकरा माराव्या लागत होत्या. नव्या नियमानुसार, जर एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल, तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच ‘अकृषक परवानगी’ मानली जाईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा सनदेची गरज राहणार नाही.

बँक कर्जासाठी सनदेची अट रद्द
अनेक बँका कर्ज देताना अकृषक सनदेचा आग्रह धरतात. मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की, नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यावर बँकांनी सनदेसाठी आग्रह धरू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश सर्व बँकांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

जुन्या थकबाकीतून मुक्तता
ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे, त्यांना दिलासा देताना शासनाने या सुधारणेच्या दिनांकापर्यंतचा थकीत कर वसूल करण्यापासून सूट दिली आहे. मात्र, ज्या जमिनी २००१ पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत, त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून एक वर्षाच्या आत विहित दराने एकरकमी अधिमूल्य भरावे लागेल.
या नव्या नियमांबरोबरच बांधकाम परवानगीसाठी BPMS किंवा Auto DCR द्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.
बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार आहे. केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून ‘भोगवटादार वर्ग-२’ (कमी श्रमाच्या जमिनी) च्या दर्जा मध्ये बदल होणार नाही; त्यांच्यासाठी आवश्यक असलेले नजराणा शुल्क भरावेच लागेल.

एकवेळचा रुपांतरण दर
दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजारमूल्यानुसार टप्पा निहाय एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ (Conversion Premium) आकारले जाईल. त्याचे दर खालीलप्रमाणे असतील.
भूखंडाचे क्षेत्रफळ एकरकमी अधिमूल्य दर :
१००० चौ.मी. पर्यंत – चालू बाजार मूल्याच्या ०.१०%
१००१ ते ४००० चौ.मी. – चालू बाजार मूल्याच्या ०.२५%
४००० चौ.मी. पेक्षा जास्त – चालू बाजार मूल्याच्या ०.५०%

सर्वसामान्य जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मी हा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत करण्यात आल्या. हिवाळी अधिवेशातच याबाबतची रूपरेषा ठरली होती. फडणवीस सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करते, याचे प्रत्यंतर देणारा हा निर्णय आहे. आता वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे.–चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री

‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे शहर कृषी-तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने सज्ज

विजेत्यास २५ लाख रुपये ; उपविजेत्यास १५ लाख रुपये बक्षीस

पुणे, दि. ११: पुणे शहर आणि परिसराची कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील आघाडी लक्षात घेऊन, शहराला नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाचे ‘हब’ बनवण्यासाठी ‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ या स्पर्धेचे कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ या कालावधीत भव्यस्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

स्पर्धेचे वेळापत्रक : यास्पर्धेत स्पर्धकांना सहभागी होण्याकरिता २३ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत ऑनलाईनपद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येणार आहे. प्राप्त अर्जाची तज्ज्ञ समितीद्वारे छाननी करुन अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय, पुणे येथे १५, १६ आणि १७ मे २०२६ येथे प्रत्यक्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे मुख्य विषय: स्पर्धकांना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जमिनीचा पोत राखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्मार्ट जलव्यवस्थापन: पाण्याचा दर्जा, ऑटोमेशन आणि फर्टिगेशनमधील नवकल्पना, शेती यांत्रिकीकरण: शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सचा वापर, कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी: विपणन आणि निर्यातीसह प्रक्रिया तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा: शेतीमधील अक्षय ऊर्जेचा वापर आणि शेतीतील कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण: कीड आणि रोगांचे भाकीत व व्यवस्थापन, हवामान अनुकूल, डिजिटल आणि शाश्वत शेतीमधील बदल आणि शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेली नाविन्यपूर्ण साधने किंवा तंत्रज्ञान या आठ महत्त्वाच्या विषयांवर आधारित आपले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सादर करता येतील.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे: या स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. अंतिम फेरीतून निवडल्या जाणाऱ्या विजेत्यास २५ लाख रुपये तर उपविजेत्यास १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुणे हे कृषी आणि तंत्रज्ञानाचे संगम केंद्र असून, या हॅकाथॉनच्या माध्यमातून देशातील गुणवंत संशोधकांना आणि शेतकऱ्यांना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरु असून ते २३ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन

पुणे, दि. ११: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत भोर, पुरंदर, मुळशी व वाघोली येथे मंगळवार, १७ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सरदार कान्होजी जेधे शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे आयोजन करण्यात येणार आहे. निटॅब इंडिया प्रा.लि. डेलवल प्लो कंट्रोल्स प्रा.लि, प्रसाद इंटरप्राईजेस, अॅनटेक टेक्नोलॉजी फांउडेशन, यशस्वी अॅकडमी फॉर स्किलींग, प्रयोग इलेक्ट्रिकल्स प्रा.लि. व यझाकी इंडिया प्रा.लि., बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकूण ६७० रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय आद्यौगिक प्रशिक्षण संस्था, पुरंदर येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिका इंडिया प्रा.लि, , यशस्वी अॅकडमी फॉर स्किलींग, जेएस सायाकी लि, देवकी मोटर्स एलएलपी, फोर्ट जाधवगड, यझाकी इंडिया प्रा.लि., बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ६४५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

सिम्बॉयसिस सेंटर फॉर ट्रेनिग इन अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलोजिस, सिम्बॉयसिस कम्युनिटी कॉलेज, गट नं. १०१९ पौड रोड, मु.पो. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये हिंदुस्तान कोका कोला बेवरेज प्रा.लि., वॉस ऑटोमोटिव्ह इंडिया, होर पेंकिग सिस्टिम प्रा.लि., वल्कन टेक्नोलॉजिस प्रा.लि., पुसळकर सुरक्षा कंम्पोनंटस, यशस्वी अॅकेडमी फॉर स्किलींग, स्कॅटो इंडिया प्रा.लि, महाले आनंद फिल्टर सिस्टीम, ब्रिनटन्स कारपेंटस एशिया प्रा.लि., जिझल इंडिया प्रा.लि., यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ७७८ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्सेंट्रीक पंप्स पुणे प्रा.लि., दर्शना इंडस्ट्रीज प्रा.लि, वॅलीओ इंडिया प्रा.लि., सिलीकंट प्रा.लि., जीकेएन ड्राईव्ह लाईन इंडिया लि. यशस्वी अॅकेडमी फॉर स्किलीग, यझाकी इंडिया प्रा.लि. बजाज अॅटो लि. या कंपन्यातील एकुण ८६५ रिक्तपदे भरण्यात येणार आहे.

या रिक्तपदांकरिता किमान १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविका, बीई अशा विविध पात्रताधारक उमेदवारांकरिता असून जिल्ह्यातील अधिकाधिक नोकरीइच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या उपस्थित राहावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांकरिता नोकरीइच्छूक उमेदवारांनी मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वा. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना उमेदवारांनी सोबत सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती, पारपत्र आकाराचे छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या प्रती सोबत आणाव्यात,

अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्तपदांना शैक्षणिक अहर्तानुसार अर्ज करावे. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे ४११०११ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे या कार्यालयाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी केले आहे.

केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले-होय, एपस्टीनसोबत 3-4 व्यावसायिक बैठका झाल्या,पण …

0

पुणे-केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, ते लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनला तीन किंवा चार वेळा भेटले होते. ही चर्चा पूर्णपणे व्यावसायिक होती, जी इंडिपेंडेंट कमिशन ऑन मल्टीलॅटरलिझम आणि इतर आंतरराष्ट्रीय कामांशी संबंधित होती.पुरी यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत एपस्टीन वादात त्यांचे नाव घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी एपस्टीनच्या गुन्हेगारी प्रकरणांशी आपला कोणताही संबंध असल्याचा आरोप निराधार असल्याचे सांगितले. पुरी म्हणाले,
मी मे 2009 पासून न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून, 2017 मध्ये मंत्री होईपर्यंतच्या कालावधीचे 30 लाख ईमेल जारी करण्यात आले आहेत. या काळात, केवळ तीन किंवा चार भेटींचाच उल्लेख आढळतो आणि माझी चर्चा पूर्णपणे व्यावसायिक होती.

खरं तर, राहुल गांधींनी बुधवारी लोकसभेत एपस्टीन फाइल्सबद्दल पुरी यांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते- अनिल अंबानींना तुरुंगवास का झाला नाही? कारण त्यांचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये आहे. मला माहीत आहे की त्यांना एपस्टीनला कोणी भेटवले होते. हरदीप पुरींनाही माहीत आहे की कोणी भेटवले होते.

पुरींनी हे देखील सांगितले की ते लिंक्डइनचे संस्थापक रीड हॉफमन यांनाही भेटले होते, परंतु ही भेट भारतात इंटरनेट आणि व्यवसायाच्या संधींवर व्यावसायिक चर्चेसाठी होती.पुरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, या भेटींचा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कृतीशी संबंध नव्हता. ते म्हणाले की, त्यावेळी ते एक खाजगी नागरिक म्हणून भारताच्या संधींबद्दल त्यांची समज सामायिक करत होते.

काँग्रेसने 1 फेब्रुवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी एपस्टीन फाइल्सचा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस नेते पवन खेड़ा यांनी X वर दोन पोस्ट शेअर केल्या. यामध्ये अनिल अंबानी आणि अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्यात 16 मार्च 2017 रोजी झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला.

अनिल अंबानी चॅटमध्ये एपस्टीनला कुशनर आणि बॅनन (ट्रम्पचे जवळचे) यांच्या भेटीसाठी मदत मागताना दिसत आहेत. तसेच, ट्रम्प-मोदी यांच्या भेटीसाठीही ते एपस्टीनची मदत मागत आहेत.

खेड़ांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये 24 मे 2019 रोजी जेफ्री एपस्टीन आणि स्टीव बॅनन यांच्यातील संवादाचा स्क्रीनशॉट होता. यात एपस्टीनने बॅननला सांगितले आहे की, मोदींची भेट खरोखरच रंजक होती. मोदींच्या ‘माणसाने’ त्याला सांगितले की, वॉशिंग्टन (अमेरिका) मध्ये कोणीही त्याच्याशी बोलत नाही.

यापूर्वी, खेडा यांनी 31 जानेवारी रोजी दावा केला होता की, पंतप्रधान मोदींनी मानवी तस्करी, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराचा दोषी असलेल्या जेफ्री एपस्टीनचा सल्ला मानला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फायदा पोहोचवण्यासाठी इस्रायलमध्ये नाच-गाणे केले. यापूर्वी काही आठवड्यांपूर्वी त्यांची भेट झाली होती.

एपस्टीन फाइल्सवर परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदनही आले होते. त्यात लिहिले होते – आम्ही एपस्टीन फाइल्सशी संबंधित एका ई-मेलबद्दलच्या बातम्या पाहिल्या, ज्यात पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्याचा उल्लेख आहे. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांचा इस्रायल दौरा अधिकृत आणि सत्य आहे. ई-मेलमध्ये याव्यतिरिक्त सांगितलेल्या इतर गोष्टी एका दोषीच्या मनाने रचलेल्या आणि निरुपयोगी गोष्टी आहेत, ज्या पूर्णपणे फेटाळून लावल्या पाहिजेत.

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले:हवाई सुंदरी पिंकी माळीच्या वडिलांचा दावा; पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला

0

सकाळी 6 वा. मुंबईत कुठे ट्रॅफिक असते?

मुंबई-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बारामतील येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा दावा केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूविषयी ना-ना प्रकारचे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना पिंकी माळीच्या वडिलांनी हा आरोप केल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा गत 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला होता. त्यात अजित पवार व पिंकी माळी यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिक नव्हे तर विमानही बदलण्यात आले होते. यापूर्वी पिंकी माळीने 4 वेळा अजित पवारांसोबत काळ्या व करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र त्यांना पांढऱ्या रंगाचे विमान देण्यात आले. असे का?

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे विमानाचा पायलट पोहोचू शकला नाही, हा दावाही शिवकुमार माळी यांनी खोडून काढला आहे. मुंबईत सकाळी 6 वा. कोणत्या भागात ट्रॅफिक असते? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्याकडील पुरावे सर्वांपुढे मांडले. त्यांच्या सारखेच आम्हाला हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शिवकुमार माळी यांच्या या आरोपामुळे अजित पवारांचे विमान खरेच ऐनवेळी बदलण्यात आले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विमान कंपनीने आमच्याशी संपर्क साधला नाही

पिंकीने आदल्या दिवशी मला फोन करून आपण अजित पवारांसोबत प्रवास करणार असल्याचे सांगितले होते. बारामतीला पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्याशी बोलेन असे ती म्हणाली होती. तुला काही बोलायचे आहे का? असे विचारले असता तिने आपल्याला खूप काही बोलायचे आहे असे सांगितले. पण दुर्दैवाने लँडिंगवेळी अपघात झाला. दुर्दैव म्हणजे, पिंकीच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान कंपनीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. माझे जावई व नंतर मी स्वतः तिचा मृतदेह आणण्यासाठी बारामतीला गेलो. आम्ही गेलो नसतो तर तिचा मृतदेहही आमच्या हाती लागला नसता. त्यानंतरही कंपनीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. तिचे वेतन, भत्ते व विम्याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आले नाही, असेही शिवकुमार माळी यावेळी म्हणाले.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या संवादाच्या एका क्लिपचा दाखला दिला आहे. या क्लिपमध्ये त्या ओह शीट, ओह शीट असे म्हणताना ऐकू येत आहेत. आपले विमान कोसळणार असल्याचा अंदाज आल्यानंतरच त्या असे बोलल्या असतील, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचे विमान ज्या गावात कोसळले तेथून नेहमी विमाने जातात. तेथील लोकांना विमानांचा आवाज परिचित आहे. गावातील लोकांच्या मते, अजित पवारांच्या विमानातून एक वेगळाच आवाज येत होता. त्यांचे विमानही खूप खाली होते. या सर्व परिस्थितीचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असावा. कदाचित कुणीतरी विमानातील सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून विमान खाली आणले असावे. विमान खूप खाली आल्यानंतर स्टॉल वॉर्निंग सिस्टीम सुरू होते. पण कदाचित अजित पवारांच्या विमानातील ही इशारा यंत्रणा बंद असावी.

विमान खाली आल्यानंतर आता ते कोसळणार याचा अंदाज कॅप्टन शांभवी पाठक यांना आला असेल. कारण, जीवाची पर्वा करणारा माणूसच जशी प्रतिक्रिया देतो, तशीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळेच त्या शेवटच्या काही सेकंदांत ओह शीट… ओह शीट म्हणताना ऐकू येत आहेत. त्यानंतर अवघ्या 9-10 सेकंदांत विमान खाली कोसळले. आमचा कॅप्टन शांभवी पाठक यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. आमचा मुख्य आक्षेप पायलट सुमीत कपूर यांच्यावर आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील गट-ड पदभरतीबाबत उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध

पुणे, दि.११: नोंदणी व मुद्रांक विभागात गट-ड संवर्गातील २८४ पदे भरतीची प्रक्रिया सुरु असून उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या विभागातील गट-ड पदभरतीसाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत जुलै- २०२५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी करण्यात आली असून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलावण्यात येणार आहे. त्याबाबत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर स्थळ व तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी कळविली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद

पुणे, दि. ११: पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे ४ वा. ते सायंकाळी 6 वा. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव यांनी दिली आहे.

पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते पुरंदर हॉल बाणेर रोड वरील मुख्य प्रवेशद्वार तसेच पाषाण रोडवरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रोड वरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार या दरम्यान वाहतुकीस बंद राहणार आहे. नागरिकांनी पुणे विद्यापीठ चौक मार्गे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती…

महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्मानाने गौरवण्यात आले. आपण श्री गुरु तेग बहादूरजींचा ३५० वा शहिदी समागम वर्ष साजरा करत असताना, धार्मिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मानवजातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणाऱ्या त्यांच्या महान आदर्शांना पुन्हा समर्पित करणे आवश्यक आहे.

अतुलनीय श्री गुरु तेग बहादूरजींनी आपल्याला निर्भयपणे मुक्त जीवन जगण्याची शिकवण दिली. मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या अत्यंत छळास ते शरण गेले नाहीत, तर दैवी शांततेने तो सहन केला. त्यागमल ते तेग बहादूर असे झालेले त्यांचे परिवर्तन मानवी इतिहासात फार कमी समांतर असलेली धार्मिक दृढता, औचित्य, नैतिकता आणि शौर्याची कथा आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण सत्याचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या देवत्वाची अशी शक्ती होती की जेव्हा त्यांच्या शिष्यांना त्यांच्या समोर मारण्यात आले, तेव्हा ते खोल ध्यानात राहिले. जेव्हा त्यांनी स्वतः परम त्याग केला, तेव्हाही ते ध्यानात मग्न होते. श्री गुरु तेग बहादूरजी म्हणाले की धर्म हा केवळ पूजा-पाठ नसून कर्तव्य आहे आणि एक आदर्श जीवनपद्धती आहे.

आजच्या तरुण पिढीने श्री गुरु तेग बहादूरजींच्या जीवनातून, चारित्र्यातून आणि त्यागातून प्रेरणा घेऊन मानवता आणि नैतिक मूल्ये अंगीकारण्याची गरज आहे, जेणेकरून भारत पुन्हा विश्वगुरू होईल. अत्याचार आणि अन्यायापुढे झुकण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्यांनी आदर्श आणि तत्त्वांच्या मार्गावर चालण्याची निवड केली. काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ श्री गुरु तेग बहादूरजींना भेटण्यासाठी आजच्या श्री आनंदपूर साहिब येथे आले, ज्याला चक्क नानकी असेही म्हणतात. त्यांचे म्हणणे धीराने ऐकून घेतल्यानंतर, त्यांनी त्यांना औरंगजेबाला किंवा त्याच्या माणसांना सांगण्यास सांगितले की जर त्यांचे गुरू धर्म सोडतील, तरच ते आपला धर्म सोडतील.

त्यानंतर औरंगजेबाने केलेले कारनामे इतके भयानक होते की आजही त्यांची आठवण झाल्यावर अंगावर काटा उभा राहतो. श्री गुरु तेग बहादूरजी आणि त्यांच्या तीन भक्तांना -भाई सती दास, भाई मती दास आणि भाई दयाला – बंदिवान करण्यात आले. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्या उदात्त त्रिकूटांना त्यांच्या गुरूंसमोर फाशी देण्यात आले. त्यांनी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिले. इ.स. १६७५ मध्ये श्री गुरु तेग बहादूरजींनी अत्यंत शांतपणे हौतात्म्य पत्करले. जुन्या दिल्लीतील चांदणी चौकातील गुरुद्वारा शीशगंज साहिब हे ‘त्याग’ आणि ‘बलिदान’ यांच्या अंतिम गाथेचे प्रतीक आहे, ज्याला मानवी इतिहासात तोड नाही. भाई जैता सिंग यांनी श्री गुरु तेग बहादूरजींचे पवित्र शीश श्री आनंदपूर साहिब येथे नेले, जे जगभरातील शीखांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे.

त्यांच्या बलिदानामुळे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित प्राचीन सभ्यता आणि संस्कृती केवळ नष्ट होण्यापासून वाचली नाही, तर एक दृढ आणि सर्वसमावेशक राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये तो एक ऐतिहासिक टप्पा ठरला. शीख धर्माचा पाया हा मानवी इतिहासातील सामान्य विकास नव्हता, तर तो सर्व प्रकारच्या अत्याचारांविरुद्ध मानवतेची ढाल बनला. ही एक महान परंपरा होती आणि आजही आहे. नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजींनी केवळ लोकांचा धर्मरक्षणाचा संकल्प जपला आणि बळकट केला नाही, तर शीख धर्माला महानतेच्या पुढील स्तरावर नेले.

श्री गुरु तेग बहादूरजींना माहीत होते की त्यांच्या भक्तांनी कोणताही पश्चात्ताप न करता धर्मासाठी किंमत मोजली. त्यांनी सर्व मोह नाकारले, सर्व वेदना आणि त्रास सहन केले, पण अश्रू ढाळले नाहीत. धर्मकार्यावरील त्यांची बांधिलकी आणि श्रद्धा अतूट होती. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन हे धर्म आणि मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानांचे सर्वोच्च उदाहरण आहे. औरंगजेबाच्या क्रूरतेपुढे त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. प्रत्येक प्रश्नाला त्यांचे उत्तर स्पष्ट होते – मी शीख आहे आणि शीखच राहणार!

श्री गुरु तेग बहादूरजींच्या शिकवणीतून आणि त्यागातून आपल्याला अनेक आणि बहुआयामी धडे मिळतात. त्यांचा त्याग, सत्यावरील अढळ विश्वास, अहिंसा आणि सर्वांप्रती परोपकारी दृष्टीकोन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला, जेणेकरून प्रत्येक मानवाला आपल्या आवडीचे जीवन जगता येईल. धर्म हे सर्वांचे कर्तव्य आहे. खरा धर्म आपल्याला सर्वांशी चांगले वर्तन करण्याची आणि समाजाची शक्य तितकी सेवा करण्याची शिकवण देतो. त्यांनी दुर्बल आणि वंचितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी केवळ वडिलांची तत्त्वे आणि मूल्ये जपली नाहीत, तर खालसा निर्माण करून त्यांना पुढे नेले, जो धार्मिकता आणि न्यायासाठी लढण्याचे प्रतीक आहे.

आपण श्री गुरु तेग बहादूरजींचे हे महान वचन सदैव लक्षात ठेवले पाहिजे -“आपण आपले जीवन सुख-दुःखात तसेच मान-अपमानात समान भावनेने जगले पाहिजे.” त्यांच्या शिकवणीतून जीवनाचा उद्देश तसेच समता, समरसता आणि त्याग यांचे महत्त्व अधोरेखित होते. श्री गुरु तेग बहादूरजींचे महान शब्द हे मानवतेसाठी ऊर्जा आणि ज्ञानाचे चिरंतन स्रोत आहेत. गुरूंच्या शब्दांच्या मधुर पठणाचा भक्तांवर खोल परिणाम होत असे. त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि मानवतावादी मार्गाने निरंकुश व धर्मांध शासकाशी संघर्ष केला. त्यांची शिकवण कालातीत आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन आपल्याला प्रत्येक परिस्थितीला शांततेने आणि खंबीरतेने सामोरे जाण्याची तसेच सौहार्द, न्याय, समता आणि समरसतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देते.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा

नव्या धोरणांचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

बारामती, दि. ११ फेब्रुवारी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नव्या धोरणानुसार शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला; या नव्या धोरणाचा अधिकाधिक लाभ उद्योजकांनी घ्यावा तसेच याबाबत सर्व उद्योजकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यवतीने बारामती, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता विजय पेटकर, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, विविध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक, उद्योगांमधील मानव संसाधन विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १५ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे प्रचलित धोरणांमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरील विविध अधिकार खालच्या पातळीवर वर्ग करण्यात आल्याने उद्योगांची होणारी ससेहोलपट कमी होऊन उद्योगांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

एमआयडीसीच्या या निर्णयामुळे उद्योग प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार असून औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.