Home Blog Page 103

कोंढव्यातील महेंद्र लोणकर यांचेवर गुन्हा दाखल

भरमसाठ कर आकारणीचा आरोप करत, तो कमी करण्यासाठी पिस्तुल काढून दिली आत्महत्येची धमकी

पुणे- महापालिकेच्या मिळकत कर आकारणी विभागात जादा कर आकारणी केल्याचा आरोप करत एका मिळकत करदात्याने रिव्हॉल्व्हर उगारून आत्महत्येची धमकी दिल्याने त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.या प्रकरणी कोंढवा खुर्द येथील रहिवासी महेंद्र नरसिंग लोणकर असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या मिळकत करदात्याचे नाव आहे. महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी गणेश दिलीप ठोंबरे (वय ३७, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळकत कर दाते लोणकर शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास कर आकारणी विभागात आले . त्यांनी यावेळी आपल्यावर जादा मिळकत कर आकारण्यात आल्याची तक्रार करत कर कमी करून योग्य मिळकत कर लावा असे सांगत कार्यालयातून उडी मारण्याची धमकी दिली. तसेच, ‘माझ्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे,’ असे सांगून त्याने आपल्या पँटच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढून दाखवीले. रिव्हॉल्व्हर उगारून त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे ठोंबरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. वलसे करत आहेत.

मिळकतकर विभागात नागरिकांचा छळ:-मिळकतीला कर लावणे, नाव बदलणे, मोकळ्या जागेचा योग्य कर लावणे, मिळकतीच्या वापरता बदल करणे यासह अन्य कामांसाठी नागरिक मिळकतकर विभागात गेले आणि त्यांचे सहजपणे काम झाले असे होत नाही. त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कागदपत्र मागविणे, नवीन नियम सांगणे, नवीन त्रुटी शोधून काम प्रलंबित ठेवायचे. सगळे व्यवस्थित होत असले तर अचानक फाइल गायब होते असा अनुभव अनेकांना येत आहे. महापालिकेच्या मिळकतकर विभागात नागरिकांचा छळ सुरु आहे. प्रशासनाविरोधात चिड निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या गप्पा मारणारे अधिकारी ही व्यवस्था सुधारण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मिळकतकर विभागात मुख्य कार्यालयापासून ते क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नागरिकांना असाच अनुभव येत आहे. कोणाची तरी ओळख असणे, एजंटला पैसे देणे किंवा थेट अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम लगेच होत नाही. त्यामुळे जे नागरिक स्वतः पाठपुरावा करून मिळकतकरात कामे करुण घेत आहेत. त्यांना मिळकतकर विभागातील बाबूगिरीचा अनुभव वारंवर येतो.मिळकतकर विभागात काम घेऊन आलेल्या व्यक्तीचे काम लगेच होत नाही. त्याला अनेक दिवस खेटे मारावे लागतातच. पण एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फाइल जाणे, ती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे यासाठी पाठपुरावा करताना आख्खा दिवस वाया जातो. या कारभारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कोकणात केलं तरी काय ?:राऊत VIDEO शेअर करत म्हणाले – घटना का व कुठे घडली? हे सांगता की सांगू?

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ‘ब्रेकिंग’ असा उल्लेख करत हा व्हिडिओ पोस्ट केला. ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा थेट सवाल त्यांनी केला आहे. हे ट्विट त्यांनी राहुल नार्वेकरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक महिला आणि एक पुरुष काही कारणावरून राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर महिला नार्वेकरांसोबतच्या एका व्यक्तीला मारहाण करतानाही दिसून येत आहे. पण संजय राऊत यांनी दावा केला तसा नार्वेकरांशी धक्काबुक्की झाली आहे का? हे या व्हिडिओत दिसत नाही. हा व्हिडिओ जुना आहे की ताजा? हे ही अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे हा प्रसंग नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर घडला, तो वैयक्तिक स्वरूपाचा होता की सार्वजनिक कार्यक्रमातील, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या व्हिडिओवर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रतिक्रिया आली नाही. सत्ताधारी पक्षानेही यावर अद्याप स्पष्टीकरण दिले नाही. पण संजय राऊत यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आधीच राजकीय वातावरण तापले असताना या व्हिडिओमुळे आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फेरीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी संजय राऊत यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

अलिबागच्या म्हात्रोळी गावातला व्हिडिओ – काँग्रेस

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. तसेच हा व्हिडिओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचाही दावा केला आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला, असे ते म्हणालेत.

राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड

पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीची खेळाडू भाग्यश्री घुले हिने उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले. 

या उल्लेखनीय यशासह भाग्यश्री घुलेची आगामी आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी हे शिबिर असणार आहे. भाग्यश्री ही एमआयटी एडीटी शिक्षण संकुलातील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून तिला विद्यापीठातील राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भाग्यश्रीच्या या यशामुळे विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत मानाची भर पडली आहे.

या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, माईर्स शिक्षण संस्थेच्या सचिव डाॅ.स्वाती चाटे-कराड, कुलगुरू डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, माईर्स एमआयटी गुरुकुलच्या प्रकल्प संचालक डाॅ.ज्योती जोटवानी, एमआयटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.रिपल शर्मा यांनी या यशाबद्दल भाग्यश्रीचे अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या कामगिरीमुळे विद्यापीठातील तसेच राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मिळकतकराच्या भल्या मोठ्या रकमेने ‘तो’ हादरला ? अन पिस्तूल काढून म्हटलं बास आता खेळ खलास झाला..!

पुणे महापालिकेच्या भवनातला प्रकार

पुणे- शासकीय,निमशासकीय संस्था हल्ली सामान्य माणूस अथवा मध्यवर्गीय किंवा धनाढ्य असा कोणताही भेदभाव न करता सर्रास वाट्टेल तेवढी भरमसाठ,मनमानी कर,वा शुल्क आकारणी करून लोकांना जेरीस आणीत असल्याचे अनेक उदाहरणे समोर येत असतात,मग ती विजेची बिले असो, महापालिकेचा मिळकत कर असो,Tds असो वा कोणत्याही स्वरूपाची वसूली असो अशा वसुलीच्या रकमेवर,त्यावर लावले गेलेले व्याज यावर कसलाही अंकुश कोणाचाही उरलेला नाही आणि कारवाईच्या धमक्यांनी हैराण माणसे ठिकठिकाणी धक्के खाताना अनेकदा दिसून येतात.ज्या मिळकत कर विभागात बोगस कर्मचारी बसून मिळकत कराची वसूली करताना माय मराठी ने पकडले होते आणि त्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली होती त्या घटनेनंतर काही वर्षानंतर या विभागात पुन्हा देखरेखीची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात असताना काल..भर महापालिकेत..एकाने पिस्तुल काढल्याच्या घटनेने खळबळ उडाली,नेहमीप्रमाणे सीसी टीव्ही दाखविण्यास प्रशासनाने नकार तर दिलाच पण त्यांचे बिल अवाजवी असल्याचा गैरसमज त्यांचा कोणाच्या तरी सांगण्यावरून झाल्याचा पवित्रा मिळकत कर विभागानेघेतला.विशेष म्हणजे 3 वाजता महापालिकेची मुख्य सभा सुरू झाल्यावर महापालिकेच्या मुख्य भवनातील जुन्या इमारतीत असलेल्या मिळकत कर विभागात हा प्रकार घडला, जिथे कर्मचारी आणि अधिकारी बदली होण्यासाठी मोठे प्रयत्न करत असतात तोच हा विभाग..हमारे जेल मे पिस्तूल ?..अशी भूमिका जणू अर्थात या सर्वांनी घेतली आणि पत्रकारांपूढे प्रश्न निर्माण करून ठेवत गायब झाले..

पण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा मात्र त्यांनी यांची चांगलीच गंभीर दखल घेतली.महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसमोर पिस्तूल काढून आत्महत्या करण्याची धमकी एका तरुणाने दिली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे, संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. इतकेच नव्हे, तर संबंधित तरुणाकडील शस्त्र जप्त करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना स्पष्ट केले.

त्यानुसार संबंधित तरुणाविरुद्ध महापालिकेकडून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेमध्ये महापौर,उपमहापौर निवडणुकीवेळी परवानाधारक पिस्तूल असणाऱ्या व्यक्तीचा वावर सुरु होता. हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आला होता, मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, मिळकत कराची थकबाकी असणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. संबंधित योजनेअंतर्गत मिळकत कराबाबत चर्चा करण्यासाठी तरुण महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाकडे आला होता. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मिळकत कर विभागाच्या कार्यालयामध्ये संबंधित तरुणाकडून कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत विचारणा करण्यात आली.कर्मचाऱ्यांनी मिळकतकराच्या थकबाकीबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कर जादा असल्याचे सांगत तरुण संतप्त झाला. त्याने त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढत थेट धमकावले. त्यानंतर, त्याने पिस्तूल स्वतःच्या डोक्‍याला लावत मी आता आत्महत्या करणार असे सांगत तो कार्यालयाबाहेर आला. या प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेले महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी आवाक झाले.

काही कर्मचाऱ्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दरम्यान महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांच्यासह एका नगरसेविकेकडूनही संबंधित तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने संबंधित तरुणाच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.

संबंधित व्यक्तीचे कोविड काळातील बंद अवस्थेतील पुरावे पाहून त्यांचे मिळकत करामध्ये दुरुस्ती आम्ही केली आहे. त्यांचे बिल खूप कमी झाले आहे. पण त्यांना काल कोणीतरी चुकीची माहिती दिली की त्यांचे बिल कमी नाही झाले. आणि मग हा प्रकार घडला.” रवी पवार: मिळकत कर विभाग प्रमुख

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

मसाप निवडणूक
‘साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध

पिंपरी, पुणे (दि. १३ फेब्रुवारी २०२५) साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि.१३) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह पदाचे उमेदवार डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल, असे योगेश सोमण यांनी सांगितले.

प्रमुख कार्यवाह पदाचे उमेदवार डॉ. स्वाती महाळंक यांनी सांगितले की, राज्यभर कार्यरत असलेल्या परिषदेच्या विविध जिल्हा शाखा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाह्य देण्याचे धोरण राबवले जाईल. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच युवा लेखकांना योग्य दिशा मिळावी यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत असे डॉ. स्वाती महाळंक यांनी सांगितले.

कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर यांनी सांगितले की, परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परीक्षांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, तसेच परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच
परिषदेच्या आजीव सदस्यांना ग्रंथ प्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देणे आणि ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा एकदा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी सांगितले की, ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने कार्यक्षेत्रात १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे.
या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत. तसेच पुणे जिल्हा कार्यवाह पदासाठी संदीप भानुदास तापकीर हे उमेदवार आहेत. इतर पदासाठी आघाडीचे अन्य सात उमेदवार निवडणूक लढवत असून, या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आजीव सदस्यांचा सक्रिय पाठिंबा अपेक्षित असल्याचे आवाहन आघाडीने केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मतदार सभासदांनी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ च्या उमेदवारांना मतदान करावे. तसेच दि. १२ मार्च २०२६ पर्यंत पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात सर्व सभासदांनी आपल्या मतपत्रिका पोस्टद्वारे किंव्हा प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा कराव्यात. असे आवाहन ‘साहित्य संवर्धन आघाडी’ च्या वतीने करण्यात आले आहे.

अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

पुणे (दि. १३) : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती. या पार्श्वभूमीवर योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत महापालिका कर विभागाकडून तात्काळ निर्णय घेत अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.

“अभय योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेचा महसूल वाढवतानाच नागरिकांना मोठी सवलत देणारी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. आणखी काही थकबाकीदारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक होती. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार. मुदतवाढीमुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन थकीत कर भरावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे”, अशी प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली.

वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत- विभागीय आयुक्त

पुणे, दि. १३: पुणे शहरातील वाहतूक योजनांचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे मनपा अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियमन योग्यरितीने होण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा अभ्यास करावा. वाहतुकीचा प्रारंभ व दिशा याचा योग्य अभ्यास करून सर्वेक्षणानुसार प्रकल्पांचे सादरीकरण करावे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

यावेळी विश्रांतवाडी, मुंढवा चौक, मार्केट यार्ड ते सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान, घोरपडी ब्रीज, मगरपट्टा परिसरातील सार्वजनिक वाहतूक, कॉरिडॉर, डबल डेकर टनेल, पीएमपीएलच्या नवीन बसेस साठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन आदींबाबत चर्चा करण्यात आली.
0000

महापालिकेच्या विविध समित्यांवर सदस्यांची झाली निवड

पुणे – महापालिकेच्या मुख्य सभेत आज स्थायी समिती सदस्यांच्या निवडीनंतर विविध समित्यांच्या सदस्यांची देखील निवड झाली .महापौर मंजुषा नागपुरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . त्यांनी विविध समित्यांवर निवड झालेल्या सदस्यांची नावे जाहीर केली .

महिला व बालकल्याण समिती पुणे महापालिका

महिला व बालकल्याण समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • अल्पना गणेश वरपे
  • उज्वला सुभाष जंगले
  • अर्चना तुषार पाटील
  • कोमल समीर शेंडकर
  • तन्वी प्रशांत दिवेकर
  • भक्ती अजित गायकवाड
  • रोहिणी सुधीर चिमटे
  • ज्योती किशोर गोसावी
  • ऐश्वर्या सम्राट थोरात
  • ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी
  • सुरेखा चंद्रकांत कवडे
  • प्रिया शिवाजी गदादे
  • अश्विनी डॅनियल लांडगे

नाव समिती पुणे महापालिका

महापालिकेच्या नाव समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • विवेक महादेव यादव
  • उज्वला गणेश यादव
  • पल्लवी चंद्रशेखर जावळे
  • गणेश बुगाजी कल्याणकर
  • श्वेता सचिन घुले
  • वैशाली नागनाथ भालेराव
  • शैलजा अरूण भोसले
  • सुनील नामदेव पांडे
  • सायली रमेश वांजळे
  • अश्विनी राहुल भंडारे
  • रूपाली सचिन पवार
  • रामदास दत्तात्रय दाभाडे
  • खंडू सतीश लोंढे

विधी समिती पुणे महानगरपालिका

महापालिकेच्या विधी समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • अर्चना अमित जगताप
  • हर्षदा शंतनु भोसले
  • सिद्धी अविनाश शिळीमकर
  • स्वरदा गौरव बापट
  • मीताली कुलदीप सावळेकर
  • पुजा अनिल पांचाळ
  • पायल विराज तुपे
  • शैलजीत जयवंत बनसोडे

हरिदास कृष्णा चरवड

  • वर्षा भिमराव साठे
  • रेखा चंद्रकांत टिंगरे
  • स्मिता सुधीर कोंढरे
  • साहील शिवाजी केदारी

क्रीडा समिती पुणे महानगरपालिका

महापालिकेच्या क्रीडा समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • अपूर्व दत्तात्रय खाडे
  • किशोर उत्तम धनकवडे
  • सई प्रशांत थोपटे
  • तेजश्री महेश पवळे
  • नारायण मोहन गलांडे
  • रेशमा संतोष बराटे
  • स्नेहा नामदेव माळवदे
  • दिनेश महादेव माथवड
  • व्यंकोजी मारूती खोपडे
  • महेश विलास आवळे
  • गौरव गणेश घुले
  • प्रतिक प्रकाश कदम
  • काशिफ फकरूल सय्यद

शिक्षण समिती पुणे महानगरपालिका

महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य ठरले ! ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • वृषाली आनंद रिठे
  • कोमल सारंग नवले
  • वीणा राजेश घोष
  • हर्षवर्धन दिपक मानकर
  • शितल अजय सावंत
  • अरविंद तुकाराम शिंदे
  • कुणाल शैलेश टिळक
  • निवेदिता गजानन एकबोटे
  • अरूण भगवान राजवाडे
  • अतुल नारायण तरवडे
  • ऐश्वर्या अतुल पाटील
  • मनिषा संदीप बुटाला
  • सारिका अमित घुले

शहर सुधारणा पुणे महानगरपालिका

महापालिकेच्या शहर समितीवर ‘या’ नगरसेवकांना मिळाली संधी

  • मारूती शिवाजी तुपे
  • डॉ. श्रेयस प्रीतम खांदवे
  • पुनीत श्रीकांत जोशी
  • स्मिता पद्माकर वस्ते सुभाष मुरलीधर नाणेकर
  • स्वप्निल देवराम दुधाणे
  • अजित दत्तात्रय घुले
  • रफिक अब्दुल रहीम शेख
  • किशोर विष्णू धायरकर
  • श्रीकांत शशिकांत जगताप
  • सपना आनंद छाजेड
  • मृणाल पांडुरंग कांबळे
  • स्वप्नाली नितीन पंडित

…तर त्यांचे केंद्रातील मंत्रीपद जाईल !” अमोल बालवडकरांचा नेमका कोणाला इशारा

पुणे- निवडणूक लढविल्याने भाजपा मधून हकालपट्टी असे पत्रक कोणाबद्दल काढताय ? ज्यांनी पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात गेले आणि तुमच्या नाकावर टिच्चून निवडून देखील आले,अशांच्या नावाचे हकालपट्टी केल्याचे पत्रक काढणे म्हणजे खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्याचे अवमान करणारे राजकारण करणे होय,तुम्ही डावलून हि आम्ही निवडून आलो त्यामुळे यांनी सांगायला हवे होते का डावलले चला त्यांनी नाही सांगितले तरी…माझ्याकडे एक असा विषय आहे की, मी तो काढला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला,तर भाजपच्या केंद्रातील एका मंत्र्याचे निलंबन होईल,” असा अप्रत्यक्ष इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे..अमोल बालवडकर यांनी हा इशारा नेमका कोणाला दिला ? यावर मात्र मौन पाळले असले तरी त्यांच्याबाबत राजकारण झाल्याचे यामुळे स्पष्ट होते आहे .योग्य वेळी आपण तो विषय नक्की काढू असे बालवडकर म्हणालेत पण हा विषय कोणता ? योग्य वेळ कोणती ? आणि केंद्रातले मंत्री कोणते ? असे प्रश्न यामुळे साहजिकच चर्चिले जाऊन राजकारण तापू शकणार आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली. पुणे शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये अमोल बालवडकर यांच्सया नावाचा समावेश असल्याने बालवडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बालवडकर म्हणाले की, “आम्ही आता शांत बसलो आहोत. आम्ही निवडून आलो असून जनतेची कामे करायची आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही आधीच दुःखात आहोत आणि खचलेलो आहोत. अशा परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. त्यामुळे ‘हकालपट्टी’ किंवा ‘निलंबन’ असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आहे, याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवावी.”. अमोल बालवडकर २०१७ मध्ये ते भारतीय जनता पक्षाकडून बाणेर परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर बालवडकर यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला आणि पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.

अभय योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ द्या,सभागृह नेते गणेश बिडकरांची आयुक्तांकडे मागणी

पुणे : महापालिकेकडून मिळकतकराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‌अभय योजनेची मुदत 15 फेबुवारी रोजी संपणार आहे. पुणेकर मिळकत धारकांकडून या योजनेस उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात थकीत कर देखील भरण्यात आलेला आहे. त्यामुळे योजनेस आणखीन एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कर संकलन विभागाकडून ही योजना १५ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली. मोठ्या प्रमाणात करवसुली झाली असली, तरी अनेक थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा करणे बाकी आहे. योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होतानाच पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. त्यामुळे १५ मार्च २०२६ पर्यंत अभय योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी गणेश बिडकर यांनी केली आहे.

“अभय योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत जवळपास १ लाख ३५ हजारांच्यावर मिळकतकर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ८०१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कराची वसुली झाली आहे. पालिकेचा महसूल वाढवणे आणि नागरिकांना सवलतीचा लाभ देण्यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पुणेकरांना आणखी एक संधी देण्यासाठी अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक आहे” असं गणेश बिडकर यावेळी म्हणाले.

बसथांबे ते महापालिका इमारती…सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर..महापौर मंजुषा नागपुरे

सार्वजनिक ठिकाणी सौर प्रकल्प राबवणार

पुणे – राज्यातील सर्वात मोठ्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ या सौर ऊर्जा प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवाजीनगर येथील न्यू अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे सुरू असलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर नागपुरे यांनी पुण्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यावहारिक व अंमलात आणता येण्याजोगे सौर प्रकल्प राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सार्वजनिक ठिकाणे जसे की बसथांबे, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये तसेच महापालिकेच्या इमारतींवर सौर पॅनेल्स बसवून ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल माहिती फलक, मोबाईल चार्जिंग स्टेशन यांसारख्या सुविधा उभारल्यास शहर अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पारंपरिक विद्युत ऊर्जेवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रदूषणात घट घडवून आणण्यासाठी सौर ऊर्जेचा व्यापक वापर आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सौर ऊर्जा आणि इतर पर्यावरणपूरक ऊर्जास्रोतांचा समन्वय साधून पुण्याला हरित व स्वयंपूर्ण शहर बनविण्याचा संकल्प महापालिकेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महापौर नागपुरे यांनी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून प्रायोगिक सौर प्रकल्प राबवून ते टप्प्याटप्प्याने शहरभर विस्तारण्याची तयारी दर्शवली. पुण्याच्या विकासासाठी महापालिका सकारात्मक पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेविका मंजुषा खेडेकर, स्वातंत्रवीर सावरकर यांचे नातू सत्यकी सावरकर, जर्मन इंडो इनोवेशन कॉरिडोर (GIIC) चे संस्थापक उपेंद्र बर्वे, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रदीप खाडे आणि माजी अध्यक्ष शशिकांत वाकडे उपस्थित होते.

प्रदर्शनात सौर ऊर्जा उत्पादनांबरोबरच महावितरण, महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (मेडा) तसेच पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एनर्जी स्टडीज विभागाचे स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विविध सौर उपकरणे, रूफटॉप सिस्टिम्स, बॅटरी साठवण उपाय आणि ऊर्जा बचत तंत्रज्ञानाबाबत नागरिक माहिती घेत आहेत.

हे प्रदर्शन आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, सौर ऊर्जा क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती व खरेदीची संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना केली.

उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना आमदार शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, याकरीता पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना द्याव्यात, असेही सुचविले.

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक वाड्या-वस्त्यांवर महावितरणच्या ओव्हरहेड वायर्स आहेत, त्या धोकादायक असल्याने भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

तसेच पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावलं उचलावीत, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

पुणे शहराने ३.१३ लाख कोटी रूपये एयूएम गाठला

पुणे: असोसिएशन ऑफ म्‍युच्‍युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने आज
महाराष्‍ट्रातील म्‍युच्‍युअल फंड परिसंस्‍थेमधील पुणे शहराची वाढती भूमिका निदर्शनास आणली,
ज्‍यासह शहरातील गुंतवणूकदारांना शिस्‍तबद्ध, दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती साधन म्‍हणून म्‍युच्‍युअल
फंड्समधील त्‍यांची गुंतवणूक वाढवण्‍याचे आवाहन केले आहे. एएमएफआयच्‍या मते, महाराष्‍ट्र
भारतातील म्‍युच्‍युअल फंड उद्योगामध्‍ये आघाडीवर आहे, जेथे डिसेंबर २०२५ पर्यंत अॅसेट्स अंडर
मॅनेजमेंट (एयूएम) ३२,३९,४८६ कोटी रूपये होते, जे भारतातील एकूण एयूएम ८०,२३,३७९ कोटी
रूपयांच्‍या ४०.४ टक्‍के आहे. राज्‍यामध्‍ये पुणे शहर ३,१३,२३८ कोटी रूपयांच्‍या एयूएमसह प्रमुख
गुंतवणूक केंद्र ठरले आहे, जे महाराष्‍ट्रातील एकूण एयूएमच्‍या ९.७ टक्‍के आहे आणि एयूएमसंदर्भात
देशातील चौथे सर्वात मोठे शहर ठरले आहे.

पुणे शहरामध्‍ये ७९,६५,७०२ म्‍युच्‍युअल फंड फोलिओ देखील आहेत, ज्‍यामधून प्रबळ व व्‍यापक रिटेल
सहभाग दिसून येतो. शहरातील वाढत्‍या गुंतवणूकदारवर्गामधून आर्थिक सहभागामध्‍ये महाराष्‍ट्राचे
नेतृत्‍व दिसून येते, ज्‍याला राज्‍याच्‍या प्रबळ अर्थव्‍यवस्‍थेचे पाठबळ आहे, जेथे राज्‍याने भारतातील
जीडीपीमध्‍ये (२०२४-२५) १३.७ टक्‍के योगदान दिले आहे.
सिस्‍टेमॅटिक इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लॅन्‍स म्‍हणजेच एसआयपी राज्‍यभरात शिस्‍तबद्ध गुंतवणूकीला आकार देत
आहेत. महाराष्‍ट्रात २,१०,११,८७५ एसआयपी फोलिओ आहेत, जे राज्‍याच्‍या एकूण फोलिओपैकी ३५
टक्‍के आहे आणि देशातील एसआयपी फोलिओंपैकी जवळपास २१ टक्‍के आहे. महाराष्‍ट्रातील एसआयपी
एयूएम ४,५०,३८२.६० कोटी रूपये आहे, जे भारतातील एकूण एसआयपी एयूएमपैकी २७ टक्‍के आहे.
यामधून पुण्‍यासह राज्‍यातील कुटुंबे पद्धतशीर गुंतवणूकीचा मुख्यत्वे अवलंब करत असल्‍याचे दिसून येते.
राज्‍याच्‍या या कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत एएमएफआयचे चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह श्री. वेकंट
चालासनी म्‍हणाले, ”पुणे शहर भारतातील म्‍युच्‍युअल फंड विकासगाथेच्‍या पुढील टप्‍प्‍याला सादर
करते. शहरातील दृढ आर्थिक मुलभूत तत्त्वे, उद्योजकता संस्‍कृती आणि वाढता पगारदार वर्ग दीर्घकालीन
गुंतवणूकीला चालना देतात. म्‍युच्‍युअल फंड्स वैविध्‍यीकरण, व्‍यावसायिक व्‍यवस्‍थापन आणि
पारदर्शकता देतात, ज्‍यामुळे गुंतवणूकदार पारंपारिक बचतींऐवजी संरचित मालमत्ता निर्मितीला प्राधान्‍य
देत आहेत. प्रत्‍येक गुंतवणूकदार जागरूकता, शिस्‍तबद्धता आणि दीर्घकालीन दृष्टिकोनासह गुंतवणूक
करण्‍याची खात्री घेण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत.”
गुंतवणूकदारांचा सहभाग देखील वाढत आहे. महाराष्‍ट्रात १,०६,२३,४१७ अद्वितीय गुंतवणूकदार आहे,
ज्‍यापैकी ३०.४ टक्‍के महिला आहेत. हे प्रमाण राष्‍ट्रीय सरासरी २६.३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त आहे.
यामधून महिला गुंतवणूकदारांमध्‍ये वाढती आर्थिक जागरूकता आणि त्‍यांचा वाढता सहभाग निदर्शनास
येतो.
महाराष्‍ट्रात प्रबळ वितरण नेटवर्क देखील आहे, जे गुंतवणूकदारांना साह्य करत आहे. ३१ डिसेंबर २०२५
पर्यंत राज्‍यामध्‍ये ८६,६८० एआरएनधारक आणि सहयोगी कर्मचारी आहेत, ज्‍यापैकी पुण्‍यामध्‍ये
१०,४९६ एआरएनधारक व सहयोगी कर्मचारी आहेत, ज्‍यासह गुंतवणूकदार विभागांमध्‍ये सल्‍लामसलत
व सेवा पोहोचण्‍याची खात्री घेण्‍यात येत आहे.
भारतातील म्‍युच्‍युअल फंड उद्योग विस्‍तारित होत असताना एएमएफआयने निदर्शनास आणले की
दीर्घकालीन सहभाग, मालमत्ता वाटपामध्‍ये शिस्‍तबद्धता आणि एसआयपी-केंद्रित गुंतवणूक आर्थिक

स्थिरता निर्माण करण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. पुण्‍यातील गुंतवणूकदारांसाठी बचतीसह भारतातील
दीर्घकालीन विकासगाथेमध्‍ये सहभाग घेण्‍याकरिता धोरणात्‍मकरित्‍या गुंतवणूक करण्‍याची देखील संधी
आहे.

‘थकबाकीमुक्त व अपघातशून्य महावितरण’ हीच प्राथमिकता – संचालक राजेंद्र पवार

महावितरणमधील पहिल्या ‘वूडन बॅडमिंटन कोर्ट’चे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे, १३ फेब्रुवारी २०२६:

महावितरण कंपनीने आपल्याला समाजात मान-सन्मान आणि ओळख दिली आहे. आता आपणही कंपनीला उत्तम योगदान देण्याची वेळ आली आहे. जागतिक दर्जाची उत्कृष्ट ग्राहकसेवा, थकबाकीमुक्ती आणि सुरक्षिततेचे नियम पाळून ‘अपघातशून्य महावितरण’ घडवणे हीच आपली प्राथमिकता आहे. असायला हवी,” असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी गुरुवारी (दि. १२) केले.

राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूने पुण्यातील रास्तापेठ प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महावितरणमधील पहिले ‘वुडन बॅडमिंटन कोर्ट’ साकारण्यात आले आहे. पुणे येथे मुख्य अभियंता असताना श्री. राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेनुसार कोर्टचे काम सुरू झाले होते. या कोर्टचे उद्घाटक म्हणून संचालक श्री. राजेंद्र पवार बोलत होते.

यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य अभियंता सुनिल काकडे, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, डॉ. संतोष पाटणी यांचेसह परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संचालक श्री. राजेंद्र पवार म्हणाले, ‘समाजात आपल्याला मिळणारा मान-सन्मान हा कंपनीमुळेच आहे. त्यामुळे आपली प्राथमिकता कायम महावितरण असले पाहिजे. कर्मचारी कल्याणासाठी लागणाऱ्या बाबी पुरविण्याकरिता महावितरणचे वरिष्ठ प्रशासन कायम सकारात्मक आहे. कितीही स्पर्धा झाली तरी आपला ग्राहक टिकून राहील यासाठी ग्राहकसेवा सुधारण्यावर भर द्या.’

प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे म्हणाले, मी सुद्धा एक खेळाडू आहे. अशा प्रकारचे सुसज्य असे ‘वुडन कोर्ट’ उपलब्ध होणे ही पर्वणीच आहे. खेळाडुंनी त्याचे चीज करावे. त्याचे पावित्र्य राखावे. नियम पाळावेत, स्वच्छता ठेवावी. तर मुख्य अभियंता सुनिल काकडे म्हणाले, कंपनीच्या क्रीडा स्पर्धांत पुणे परिमंडलाचे खेळाडू सरस ठरले आहेत. खेळांमुळेच कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण होते. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा तत्परतेने पुरविण्यावर मी भर देत आहे.

सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी व प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांनी केले. तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय सुळे यांनी आभार मानले. याप्रसंगी बॅडमिंटनपटू भरत वशिष्ट, सुरेश जाधव यांचेसह अजय जाधव, संगिता देशमुख व कुस्तीपटू दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

महावितरणचे क्रीडा धोरण लवकरच

महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात. राष्ट्रीय पातळीवरही महावितरणचे अनेक खेळाडू चमकत आहे. त्यांच्या सेवा-सुविधा वाढविणे व प्रोत्साहन देण्यासाठी कंपनी स्वत:चे क्रीडा धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले.

राज्यात महावितरणचे पहिलेच ‘बॅडमिंटन कोर्ट’

बॅडमिंटन तसा महागडा खेळ आहे. व्यावसायिक कोर्टवर सराव करायचा झाल्यास तासाला पैसे मोजावे लागतात. तसेच ते आपल्या वेळेत उपलब्ध होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन श्री. पवार यांनी महावितरणचे हक्काचे ‘वुडन बॅडमिंटन कोर्ट’ साकारण्याचा निर्णय घेतला. लवकरच या कोर्टवर मॅट टाकण्याचेही काम होणार आहे.

लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर, सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर: हर्षवर्धन सपकाळ

निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

मुंबई, दि. १३ फेब्रुवारी.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मंत्रालयातील लाचखोरीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात लोकाभिमुख कारभार करण्यासाठी लोकांना सरकार आपले वाटावे यासाठी राज्य सरकारचे मुख्यालय असणा-या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय करण्यात आले. पण महाभ्रष्ट भाजपा महायुतीने मंत्रालयाचे भ्रष्टाचारालय केले आहे. झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे, हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. “संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका मंत्री नरहरी झिरवळ यांनी मांडली आहे मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरु असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..