पुणे -“राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून १६ आमदारांची यादी असलेलं पत्र शेअर केलं आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस विभागाला पाठवलं असून या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात मविआतील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे”, असं आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.