अमरावती-त्रिपुरा दंगलीच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील अमरावतीतजास्त तणावपूर्ण व दहशतीचे वातावरण झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे शुक्रवारपासून अमरावती शहरात तणाव आणि दशहतीचे वातावरण झाले होते. आज अमरावतीतील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला आणि दुकानांची तोडफोड केली. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.
अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 20 एफआयआर नोंदवले आहेत, तर 20 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आम्ही स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणी चिथावणी दिल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
दरम्यान, भाजपने आज संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जी दुकाने सुरू आहे त्याला बंद करा. अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलक घोषणा देत असून, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आहेत. पोलीस घटनास्थळी असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी मुस्लिम समाजाने बंद पुकारले होते, शुक्रवारी दुपारी नमाज अदा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन काढण्यात आले होते. त्याच दरम्यान चित्रा चौकातील काही दुकाने सुरू दिसली. आंदोलकांनी दुकानदारांना बंद करण्याची विनंती केल्यानंतरही दुकान बंद न केल्याने आक्रमक आंदोलनकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केली. या दगडफेकीत शहरातील सुमारे 20 ते 22 दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने संपुर्ण राज्यात आज आंदोलक केले. त्यात नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना शांततेत राहण्याचे आवाहन करतो. असे वळसे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ले केले जात आहेत. त्यानंतर त्रिपुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. मुस्लिम समाजाने असे आरोप केले आहे की, आम्हाला धमकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याच्या बातम्या देखील पसरत आहेत.
दरम्यान, त्रिपुरा येथे घडलेल्या’तथाकथित’ घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या बंददरम्यान नांदेड शहरासह मालेगावात तणाव निर्माण झाला होता. देगलूर नाका येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले, तर शिवाजीनगर भागात दुपारी अडीचच्या सुमारास 30 ते 40 जणांच्या जमावाने दुकानावर दगडफेक करत नासधूस केली. बाफना नाका रस्त्यावर देशी दारूच्या दुकानासमोरील रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडण्यात आल्या. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. काही काळ शहरात तणाव निर्माण झाला. प्रत्येक चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
नांदेडच्या देगलूर नाका भागात पोलिस अधिकाऱ्यासह निरीक्षक जखमी
नांदेडच्या देगलूर नाका येथे दगडफेकीत उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धार्थ भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले. चार पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवला.