पुणे : पर्यावरण बदलाचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. दुष्काळी भाग जिथे सलग तीन दिवस पाऊस पडत नसे. तिथे आता पूर येऊ लागला आहे. उस्मानाबादमधील दुष्काळी भाग भूम-परंडा-वाशी इथे गेल्या दोन वर्षांत पूर आला. त्यातून १,२०० लोकांना वाचविले. हा बदलाचा धोका आहे. पावसाने काळी माती वाहून जाते. मग त्या शेतकऱ्याने करायचे काय? काळी माती पुन्हा टाकण्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. मुलीचे लग्न करायचे की शेती पाहायची? या जगण्याच्या द्वंदात शेतकरी अडकला आहे, अशी खंत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामविकास प्रकल्पाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली. हे बदल थांबवायचे असतील, तर प्रत्येकात हरितदृष्टी असायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
वनराई व हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित हरितदॄष्टी जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजीव चांदोरकर, लेखक बसवंत विठाबाई बाबाराव, दीपक कसाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल जायभाये यांनी केले.
चांदोरकर म्हणाले, पर्यावरण बदलामुळे पाकिस्तानात पूर आला. परदेशात वणवे पेटत आहेत. शहरे पाण्याखाली येत आहेत. पर्यावरणाला आता गंभीरपणे घ्यायला हवे. न जन्मलेल्या भावी पिढीला आपण कोणती पृथ्वी देणार आहोत? पृथ्वी, पर्यावरण हे विकत घेता येत नाही. हा प्रश्न सामुदायिकपणे सोडविण्याचा
आहे. एकट्याने सुटणार नाही. त्यासाठी खरं म्हणजे, राजकीय सत्तेने पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी नागरिकांनी राजकीय सत्तेवर चर्चा करायला हवी. वंचितांचे प्रमाण जास्त आर्थिक विकास व पर्यावरण यात वाद आहे. पर्यावरणवाद्यांना विकास-विरोधी ठरवतात. एकच लेबल लावले जाते. जगातील ८०० कोटी लोकांपैकी ६०० कोटी अजूनही चांगल्या जगण्यापासून वंचित आहेत. पर्यावरणावरील समस्या सोडविण्यासाठी संशोधनच केले जात नाही. त्यावर खर्च होत नाही. कार्पोरेट हा मदमस्त बैल आहे. स्वतःच्या मनाने तो मदमस्त बैल पर्यावरण नष्ट करू पाहत आहे. कार्पोरेटच्या नाकात वेसण घालण्याचे काम राजकीय शक्ती करू शकते. राजकारण म्हणजे उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे नव्हे. राजकारण म्हणजे पॉलिसी बनविणं, कायदा बनविणं आहे. त्यासाठी आपण बोलले पाहिजे.
रवींद्र धारिया म्हणाले की, पर्यावरणीय प्रश्नांवर काम करणारे बसवंत सारखे तरुण, पुढच्या पिढ्यांसाठी पथदर्शी काम करत आहेत. हे खूप आश्वासक आहे. त्यांचे दैनंदिन जीवनतील अनुभव इतरांना पर्यावरणाच्या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्यासाठी उपयुक्त ठरतील.
पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे – बसवंत बाबाराव
आपल्या भोवती असलेल्या पर्यावरणाची माहिती करुन घेणे व त्याचा मानवाशी असलेला संबंध जाणून घेणे महत्वाचे आहे. आपले अस्तित्व आपल्या भोवती असलेल्या भौतिक व जिवित पर्यावरणाच्या प्रकृती व सुस्थितीवर अवलंबून आहे. आपली प्रत्येक कृती व्यक्तिगत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर काहीना काही परिणाम करत असते. त्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांकडे संवेदनशील पाहणे गरजेचे असल्याचे लेखक बसवंत बाबाराव म्हणाले.