मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्याने, तसेच सरकारच्या आश्वासनानंतर खासदार संभाजीराजे यांनी अखेर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. खासदार संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली होती. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता , आज सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आपण उपोषण मागे घेत आहोत. असे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संयोगिता राजे या देखील उपोषणाला सोबत होत्या. त्यांनी देखील आपण उपोषण मागे घेत असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
राज्यसरकार आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. केवळ मागण्या मान्य केल्या नाही तर त्याचे मिनिट्स आणले. या मागण्या किती दिवसात आणि कसा पद्धतीने पूर्ण करणार याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे-जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत आहे. अशी ग्वाही संभाजीराजे यांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या खालील मागण्या झाल्या मान्य
- मराठा समाजातील उमेदवारांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार.
- सार्थीचं व्हीजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार.
- सार्थी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
- सार्थी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रीमंडळासमोर ठेवणार.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार.
- व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत, असं शिंदे यांनी सांगितलं.
…म्हणून राजे झाले भावूक
राज्यभरातून अनेक जण संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना पाहायला मिळाले. आज काही वारकरी देखील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी उपोषणात वारकऱ्यांनी अभंग सादर केला. त्यांचे कौतुक करताना संभाजीराजे भावूक झाले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.