मुंबई-राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.
राज्यात पूरस्थिती असल्याने कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली होती तसेच, सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ओबीसी आरक्षणाच्या बाजूनेच लागेल, असा दावाही त्यांनी केला आहे .
छगन भुजबळ म्हणाले, पूरस्थितीमुळे राज्यभरातील लोक सध्या अडचणीत आहेत. पावसामुळे शेतातील पिके, घरे वाहून जात आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचत आहेत. दरडी कोसळत आहेत. अशा स्थितीत लोकांना मदत करणे गरजेचे आहे. प्रथम लोकांमध्ये जाऊन त्यांना मदत करण्याच्या सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. अशा पूरस्थितीत निवडणुका घेणे योग्य ठरणार नाही. असे हि त्यांनी म्हटले होते .