नाशिक – एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे सगळ्यांचे मुखवटे आपोआप गळून पडले असा घणाघात करत शिवसेना सोडून गेलेल्यांना वचन मिळालंय की मागाल ते मिळेल, पण त्याबदल्यात केंद्राला हे काय देणार आहेत ? मुंबईचे तुकडे ? महाराष्ट्राचे तीन तुकडे ? मराठी माणसावर अन्यायाला परवानगी ?मुंबईतील प्रमुख उद्योग, प्रमुख कार्यालये मुंबईबाहेर नेण्यास परवानगी ? असा खणखणीत सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. महाराष्ट्रासमोर गंभीर चित्र उभं असून पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते जे आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या सगळ्याकडे गांभीर्याने पाहायला हवं असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून शनिवारी त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणाले की, मला बेळगांवचं शिष्टमंडळ भेटून गेलं, त्यांनी जी परिस्थिती सांगितली की महाराष्ट्रात ठाकरे सरकार गेल्यापासून कसा त्रास सुरू झाला आहे ते फार गंभीर आहे. राऊत पुढे म्हणाले की, सीमाभागातून सतत बातम्या येत आहेत की मराठी लोकांवर पुन्हा नव्याने अत्याचार सुरू झाले आहेत. आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत, कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रात भाजपचं राज्य आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमाभागाचा मुद्दा प्रलंबित आहे तोपर्यंत यामुळे बेळगावसह सीमाभागाचा संपूर्ण भाग केंद्रशासित करावा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे करायला हवी आणि तो निर्णय घेऊन त्यांनी महाराष्ट्रात यायला हवं.
राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की , शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईत आहे. मातोश्रीवर आहे, दिल्लीत नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीत जात नाही. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे सगळ्यांचे मुखवटे आपोआप गळून पडले आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढाई लावून रक्तपात करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.आम्हाला आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई स्वतंत्र करून महाराष्ट्राचे तीन तुकडे पाडण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाला शिवसेना फोडायचीच नाही तर संपवायची आहे. त्यासाठी शिवसैनिकांमध्ये फूट पाडायची, एकमेकांवर हल्ले करायला लावून रक्तपात घडवायचा, हे धोरण दिल्लीच्या पाठिंब्याने भाजपाचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष हे एकेकाळचे शिवसैनिकच होते. आम्हाला शिवसैनिकांचा रक्तपात होऊ द्यायचा नाही, आमच्या लोकांचं रक्त सांडवायचं नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मार्ग काढू, असेही संजय राऊत म्हणाले.
बहुमताचा ठराव बेकायदेशीर
आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असतानाही बहुमताचा ठराव घेतला हे बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी घटनेचे पालन केलेले नसल्याने हे राज्य सरकार बेकायदेशीर आहे, असेही ते म्हणाले. चाळीस नवे भोंगे मिळाल्याने भाजपाने माझ्याविरुद्ध बोलणं बंद केलं आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. राज्यात सध्या उडालेला धुरळा हा कृत्रिम वादळ असून, शिवसेना पुन्हा जोमाने भरारी घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.