मुंबई-ओबीसी आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या दोन वर्षात सरकारने खरंच ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले असते, इम्पेरीकल डेटा तयार केला असता, तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायायलयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा केंद्राने उपलब्ध करून द्यावा, अशी राज्य सरकारची वारंवार मागणी होती. केंद्र सरकारकडून सुनावणीआधी सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून ते मान्य करण्यात आले होते. मात्र 2011 च्या डेटामध्ये काही सदोष गोष्टी घडून आल्या होत्या. या डेटामध्ये अनेक चुका देखील झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारने इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने गोळा करून द्यावा आणि माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारला केली होती. परंतु केंद्राने डेटा उपलब्ध करून देण्यासाठी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.