पुणे: राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यभर नाला खोलीकरण, सरळीकरण, डीप सीसीटी आदी कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. या कामांच्या बाजूला फळझाडांचे रोपन केल्यास वृक्षचळवळीला गती मिळून तेथील शेतकऱ्यांना अर्थार्जनाची संधी प्राप्त होईल, असे मत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी आज व्यक्त केले.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातून पुण्यातील लोकांच्या सहभागातून मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी श्री आदीशक्ती फौंडेंशनच्यावतीने विविध फळझाडांच्या बिया ट्रकमधून पाठविण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन श्री. देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, शिक्षण संचालक नामदेव जरग, एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, श्री आदीशक्ती फौंडेंशनचे दत्ता पवार उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, चिंच, लिंब, सिताफळ, जांभूळ, आंबा ही फळ झाडे कमी पाण्यावर तग धरुन राहतात. यामुळे मराठवाड्या सारख्या कमी पावसाच्या या प्रदेशात या बियांपासून उगवून येणाऱ्या या फळझाडांच्या लागवडीमुळे वृक्षलागवाडीच्या मुख्य उद्देशाबरोबरच तेथील शेतकाऱ्यांना अर्थार्जनाचे साधनही उपलब्ध होईल. या उपक्रमाला कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिक्षण विभागांतर्गत मराठवाड्यातील सर्व शाळा तसेच उच्च शिक्षण विभागांतर्गत सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी बिया रोपनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील अशी माहिती डॉ. धनराज माने आणि नामदेव जरग यांनी यावेळी दिली.
यावेळी भानुप्रताप बर्गे, दत्ता पवार यांची भाषणे झाली.