पुणे: पुणे, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिल्या.
व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या कामकाजाची
व तयारीची आढावा बैठक आज श्री.सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचीव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ
राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, आयकर
विभागाचे अतिरिक्त संचालक के.के.ओझा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मो. सु. वर्धे तसेच पिंपरी
चिंचवड महानगरपालिका निवडणूक सहआयुक्त डॉ. यशवंत माने आदी उपस्थित होते.
श्री. सहारिया म्हणाले, निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांनी
करावी. निवडणूका शांततेत आणि निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष,
निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, चेकपोस्ट कक्षाने आपापल्या जबाबदाऱ्या चोख व प्रभावीपणे पार पाडाव्यात.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जागृती करावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान
केंद्रांबाबत पोलीस विभागाने दक्ष रहावे. जिल्हयात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यावर लक्ष
ठेवावे.
मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सर्व सुविधा देवून आदर्श मतदान केंद्रे स्थापन करावीत व
उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहितीचे फ्लेक्स् संबंधित मतदान केंद्रांवर लावावेत.
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्यावा. विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा
या कामी सहभाग घेण्यात यावा. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार जनजागृतीचे फ्लेक्स लावावेत, असे
सांगून श्री. सहारिया यांनी कायदा व सुव्यस्थेचाही आढावा घेतला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण
वाढविण्याबरोबरच वस्तु अथवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाटपावर नजर
ठेवा. मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा व त्यांच्यावर उमेदवारांकडून दबाव टाकला जाणार नाही, यासाठी
अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सूचनाही श्री.सहारिया यांनी केल्या.
श्री.दिनेश वाघमारे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसाठी 5 हजार 504
ऑनलाईन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर प्रत्यक्ष रित्या 2 हजार 304 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली
आहेत. वैध उमेदवारांची संख्या 1 हजार 253 आहे. आदर्श अचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 74
पथके स्थापन करण्यात आली आहेत. मतदान जनजागृतीवर भर देण्यात येत असून या बाबत एफ एम रेडिओ,
सिनेमागृहे, स्थानिक केबल चँनेलव्दारे जाहिरांती तसेच प्रसारमाध्यमे, सोशल मिडीयाच्या माध्यमातून
जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.