मुंबई, दि. 22 : शिक्षण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ घेऊन कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या ज्ञान वटवृक्षाच्या पारंब्या आज तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. यातूनच महाराष्ट्राच्या पुरोगामी शिक्षण परंपरेची पताका आणखी डौलाने फडकू लागली आहे. त्यांच्या या धडपडीमुळे अनेक पिढ्या शिक्षणातून पुढे येऊन राज्याच्या उभारणीत सहभागी होऊ शकल्या आहेत. कर्मवीरांचे शिक्षण क्षेत्रातील हे योगदान अमूल्य असेच आहे. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्रिवार मुजरा आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.