मुंबई-महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्या. के. यू. चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत.’फडणवीस पुढे म्हणतात की, ‘कमिशन्स ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही, ना त्यांना या कायद्यानुसार अधिकार प्रदान केले. आमच्या काळात न्या. झोटिंग समिती गठीत करताना त्यांना या कायद्यांतर्गत सर्व अधिकार प्रदान करण्यात आले होते,’अशी माहिती त्यांनी दिली.तसेच, ‘ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे आणि या प्रकरणातील आरोपांची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता,त्यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही’ असेही फडणवीस म्हणाले. याशिवाय, ‘आता प्रश्न निर्माण होतो,तो म्हणजे कोणतेही अधिकार नसताना उच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांविरोधात चौकशी कशी करणार ?, ‘असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.