मुंबई-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत आमच्याकडे 11 लाख 80 हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील वर्षीचे नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र यावर्षी मिळते. त्यामुळे मागील वर्षीचे त्यांनी यावर्षी घेतल्यावर ते ग्राह्य धरले जाणार आहे. भरतीसंदर्भातील ज्या काही मागण्या आहेत, त्या आम्ही मान्य केल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, एक फॉर्म भरण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत आहे. त्यामुळे आता 15 दिवसांची मुदत वाढवली असून त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.