दुपारी दीड वाजता मविआच्या 3 नेत्यांच्या मतांवर भाजपने घेतला आक्षेप, रात्री 1 च्या सुमारास आयोगाचा निर्णय जाहीर
महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप पोहोचले. यानंतर तब्बल ११ तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यावरही निवडणूक आयोग मतमोजणीचा निर्णय जाहीर करू शकला नाही. रात्री १ च्या सुमारास आयोगाने अखेर निर्णय जाहीर केला. त्यानुसार शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या दोघांची मते वैध ठरवली. याशिवाय विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवर व अपक्ष आमदार रवी राणा यांची मते वैध ठरवण्यात आली. कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने या वेळी दिले. अखेर रात्री १.४० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.
नाट्यमय वळणे घेत रंगलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत आपला तिसरा उमेदवार अर्थात धनंजय महाडिक निवडून आणला. महाआघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित शक्तीच्या जिवावर मैदानात उतरलेले शिवसेनेचे संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला.
शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी मतांच्या कोट्याचा विचार करता अपेक्षित विजय मिळवला. परंतु सहावा उमेदवार देऊन भाजपने निवडणुकीत वाढवलेली उत्सुकता शुक्रवारी पहाटे मतमोजणी संपेपर्यंत ताणलेली राहिली. या मतदानासाठी पोलिस कोठडीत असलेले आघाडी सरकारचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याने २८५ आमदारांनी मतदान केले. शिवाय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले.
विधान परिषद निवडणुकीवर परिणाम
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराचा झालेला विजय व शिवसेनेचा पराभव पाहता २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुहास कांदे यांचे काय आहे म्हणणे
मत बाद होण्याविषयी सुहास कांदे यांना विचारणा केली असता, कांदे असे म्हणाले की, माझे मत बाद झाले याविषयीचा आतापर्यंत तरी माझ्याकडे पुरावा आला नाही. परंतु हे जर खरे ठरले तर मी कोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत ग्राह्य न धरता बाकी मतांची मोजणी सुरु करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेजची पाहणी केल्यानंतर सुहास कांदे यांचे मत बाद ठरविले आहे. कांदे यांनी मतपत्रिकेची घडी केली नसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते. म्हणून आयोगाने कांदे यांचे मत ग्राह्य न धरता इतर मतांची मोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत.