ब्रिगेडियर (नि.) अभय भट यांचे मत; ‘एआयटी’मध्ये ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात
पुणे: “अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्य मिळवून दिले. या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे स्मरण होत आहे. आजच्या काळात राष्ट्र उभारणीत योगदान देणारा प्रत्येकजण देशभक्त आहे. ही पिढी भारताला सर्वोच्चस्थानी नेण्यात योगदान देईल,” असा विश्वास आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट यांनी व्यक्त केला.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. त्यावेळी ब्रिगेडियर भट बोलत होते. प्रसंगी सहसंचालक कर्नल (नि.) एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशाचा विकास, स्वच्छ पर्यावरण यात योगदान, अपघातमुक्तीसाठी वाहतुक नियमांचे पालन, भ्रष्टाचार रोखण्यात पुढाकार, महिलांचा सन्मान व त्यांना शिक्षण, डॉक्टर-लष्करी जवान यांचा सन्मान हीदेखील देशभक्तीच आहे.” स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या त्यागातून आपणही प्रेरणा घेत देशासाठी योगदान द्यायला हवे, असे कर्नल प्रसाद यांनी नमूद केले.
विद्यार्थी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ज्यामध्ये देशभक्तीपर गीतांचा, समूहनृत्याचा समावेश होता. ‘ये मेरे प्यारे वतन’, ‘आरंभ है प्रचंड’, ‘जय हो’ अशा गीतांनी परिसरात उत्साह संचारला. डॉ. उमेश अवसरमल यांचे बासरीवादन झाले. प्रा. पी. आर. सोनावणे यांनी ‘आझादी का अमृतमहोत्सव’ विषयावर व्याख्यान दिले. सर्वानी एकत्रितपणे प्रतिज्ञा घेतली.
राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रमुख प्रा. संजय गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी पंकज व सुस्मिता सिंग यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. प्रा. मनोज खळदकर यांनी सूत्रसंचालन केले.