भारत सरकार आणि डिक्की तर्फे आयोजन; उद्योगमंत्री सुभा
पुणे : अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय(एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की)यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.या परिषदेचे उदघाटन येत्या ३ जानेवारीला उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक पी कृष्ण मोहन यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, महिला विंग प्रमुख स्नेहल लोंढे, डिक्कीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख देवानंद लोंढे, एनएसआयसीचे पुणे विभाग प्रमुख विकास कुमार नायक याप्रसंगी उपस्थित होते.
एनएसआयसीचे विभागीय सरव्यवस्थापक पी कृष्ण मोहन म्हणाले की,राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या नियोजन व विपणन विभागाचे संचालक पी. उदय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद घेण्यात येत असून औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरही या परिषदेस आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या एससी / एसटी आणि तळागाळातल्या उद्योजकांना एकत्र आणून यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हा या परिषदेमागील मुख्य उद्देश आहे. तसेच या उद्योजकांची क्षमता वाढवून त्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करून सक्षम उद्योजक घडविणे, हे ध्येय आम्ही समोर ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिषदेविषयी बोलताना ते म्हणाले की, उद्योग विश्वातील चालू घडामोडींविषयी उद्योजकांना जागृत करण्याबरोबरच भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची थोडक्यात माहिती त्यांना यामार्फत दिली जाईल. याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी उद्योजकांना याच परिषदेच्या माध्यमातून लाभेल. आचारविचारांची देवाणघेवाण होईल, चर्चेची संधी मिळेल आणि पर्यायाने याचा फायदा त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास होईल, असा विश्वास देखील पी कृष्ण मोहन यांनी यावेळी व्यक्त केला.
मिलिंद कांबळे यावेळी म्हणाले की, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातींच्या उद्योजकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत तसेच अनेक उपक्रमही राबविले जात आहेत. हे निश्चितपणेच कौतुकास्पद आहे. गेली काही वर्षे दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘डिक्की’ संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत पण आता केंद्र व राज्य सरकारनेही पुढाकार घेतल्याने आमच्या कार्यास पाठबळ मिळेल ,यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे स्वप्न प्रत्यक्षात येईल, असे ही त्यांनी सांगितले.