पुणे-
आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. भाजपा पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज हंडेवाडी येथे संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. तसेच, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
यावेळी आ. भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळाभाऊ भेगडे, भाजपा कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांड्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष सागर भूमकर, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, भाजपा पश्चिम महाराष्ट्र किसान मोर्चा समन्वयक गणेश आखाडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे, ज्येष्ठ नेते रंजनकाका तावरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती वनवे, रोहिदास उंदरे पाटील, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, अविनाश मोठे, अविनाश बवरे, हवेली तालुका अध्यक्ष धनंजय कामठे आदी उपस्थित होते.
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेले. अन् महाविकास आघाडीचे खुनशी सरकार अस्तित्वात आले. त्यातच कोविडची साथ आली. या काळात महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार झाले. पण परमेश्वर कृपेने आता कोविडची साथही नियंत्रणात आली, आणि आपले सरकारही आलं आहे. त्यामुळे सर्वांनी कसून कामाला लागावे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावून, त्यांची मक्तेदारी मोडीत काढू, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी मला कोल्हापूर ऐवजी पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी विविध तर्कवितर्क देखील लढवले. पण पक्ष नेतृत्वाने मला जे मिशन दिलं, त्यानुसार मी कामाला लागलो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही संघटनेच्या आदेशानुसार बारामती आणि माढा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केलं. त्यामुळे पराभवाचा अंदाज आल्यानंतर माढा मतदारसंघातून माननीय शरद पवार साहेब यांना माघार घ्यावी लागली. अजूनही हे मिशन संपलेलं नाही. आगामी लोकसभापूर्वी ज्या-ज्या निवडणुका येतील, त्या भारतीय जनता पक्षाने ताकदीने लढवायच्या आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आ. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत निवडणुकीचे गण आणि गट जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार कामाला लागावे. या निवडणुकीत कुठेही कमी पडता कामा नये. यासाठी जिल्हा अध्यक्षांनी पक्ष संघटनेचा आढावा घेऊन, आवश्यक तिथे नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती कराव्यात. तसेच, संघटनेसाठी ज्यांना वेळ देणे शक्य नाही, त्यांच्याकडे दुसरी जबाबदारी द्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
या बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळाभाऊ भेगडे, आ. राहुल कुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले.