पुणे : केंद्र सरकारला कोरोना लस १५० रुपयांना मिळते. मग राज्य सरकारला ती लस ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस दराने का दिली जाते? दुश्मन राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला कोरोनाची लस फुकट दिली जाते, मग राज्याला ४०० रुपये दराने का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्र सरकारने देशवासियांना कोरोना लस विनामूल्य ऊपलब्ध करून द्यावी अशी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन पटोले यांनी शनिवारी दुपारी विभागिय आयुक्त सौरभ राव यांना दिले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे,आबा बागुल,दीप्ती चवधरी ,अरविंद शिंदे, व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
केंद्र सरकारला कोरोना लसीचा एक डोस हा १५० रुपये दराने मिळतो. मात्र राज्य सरकारला कोरोना लसीच्या प्रति डोससाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये दर आकारला जातो. कोरोना काळात व्यापार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तसेच तुम्ही दुश्मन असलेल्या पाकिस्तानला फुकट लस दिल्या आहेत. मग राज्याला ४०० रुपयाने का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत कोरोनाची लस द्यावी, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली.
पत्रकारांबरोबर पुढे बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहिती नाही अशी खिल्ली उडवत पटोले म्हणाले, मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर केले होते. आता ते राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोनामुक्त केले. आपल्या प्रमुखाकडे नियोजन नाही. लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन त्यांनी केले नाही. राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही.
त्यांच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी राहूल गांधी, मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याची टिंगल केली, पण आता त्याप्रमाणेच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.