पुणे- शहरभर झालेल्या खोदाई चा विषय अत्यंत त्रासदायी ठरलेला असताना आता क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे . आणि अधिकाऱ्यांनी दुचाकीवर फिरून शहरातील खोदाई चे ऑडिट करून सेवा वाहिन्या खंडित करणाऱ्या व वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे .
या पत्रात खर्डेकर यांनी म्हटले आहे कि,’ कोरोनाची दुसरी लाट, लॉकडाउन, अवकाळी पाऊस व कामगारांची वाणवा या परिस्थितीत मनपाच्या अनेक विकास कामांना विलंब झाला हे मान्य केले तरी ही अनेक प्रशासकीय चुका देखील निदर्शनास येत आहेत.
प्रशासनाने तंबी दिल्यानंतर ही अनेक ठिकाणी कामे सुरूच असल्याचे किंवा अर्धवट अवस्थेत असल्याचे आज दुपारी पाहणी करता निदर्शनास आले. ( सोबत कर्वेनगर, K52,गिरीजाशंकर विहार येथील प्रतिनिधिक फोटो जोडत आहे ).ही दुरावस्था बघता आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता खालील मागण्या मांडत आहे…
1) सर्वप्रथम आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी दुचाकी वरून शहरभर फेरी मारावी व खोडाईच्या कामाची व रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करावी म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना येईल.
2) शहरातील एकूणच खोदाईच्या कामाचे ऑडिट करावे. याद्वारे एकूण खोदाई ला दिलेल्या परवानग्या, प्रत्यक्षात झालेली खोदाई व नियमांचे पालन झाले किंवा कसे हे ही प्रशासनाच्या लक्षात येईल. ( रस्ता किती मीटर खणून वाहिन्या टाकायच्या ह्याची नियमावली आहे त्याप्रमाणे खणले आहे किंवा नाही हे तपासावे )
3) खोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कुठे महावितरण ची तर कुठे बी एस एन एल ची तर कुठे पाण्याच्या लाईन तोडल्याचे निदर्शनास आले
मात्र अज्ञात कारणामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप ही ह्या वाहिन्या दुरुस्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाच्या प्रति प्रशासनाची असंवेदनशीलता निदर्शनास येते.
4) अनेक रस्ते केबल कंपनी, महावितरण, एल अँड टी यांनी खणून अनेक दिवस झाले ( महिने ) मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. त्याची कालमर्यादा काय ?
आयुक्तसाहेब, एक दुचाकीस्वार ह्या रस्त्यांवरून घसरून पडला त्यास इजा झाली, फ्रॅक्चर झाले तर त्या कुटुंबाच्या हाल अपेष्टांप्रती थोडे तरी संवेदनशील व्हा. सेवा वाहिन्या खंडित झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचा तळतळाट आपल्या पदरी आहेच / फक्त मान्सून पूर्वी रस्ते पूर्ववत करून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी करत आहे. असे खर्डेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.