भाजपा नेत्यांची बौद्धिक दिवाळखोरी झाली असून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्याने अजून माफी मागितली नाही.तोच भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करुन आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. पाटील यांना भीक, लोकवर्गणी व देणगी,कर यातील फरक तरी कळतो का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत केला आहे.
पटोले म्हणाले “, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोर-गरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरु करुन शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी या महापुरुषांनी आपल्याकडे जे होते ते सर्वस्व दिले. लोकांकडून वर्गणी, देणगीच्या स्वरुपात पैसे जमा केले व शाळा उघडल्या. लोकसहभागातून शैक्षणिक संस्थांचा विस्तार गावखेड्यात केला. ह्या महान कार्यासाठी त्यांनी भीक मागितली असे म्हणून चंद्रकात पाटील यांनी या महापुरुषांचा, त्यांनी केलेल्या महान कार्याचाच अपमान केला असे नाही तर बहुजन समाजाचाही अपमान केला असल्याची टीका देखील पटोले यांनी यावेळी केली आहे.
“समाजाच्या विकासासाठी सरकारने निधी खर्च करणं त्यांचं कर्तव्यच आहे. शिक्षणावर खर्च करायचा नाही तर मग काय सरकारच्या जाहिरातबाजींवर करोडो रुपयांची उधळपट्टी करायची काय? सरकार जनतेच्या आरोग्य, शिक्षणासह कल्याणकारी योजनांवर पैसा खर्च करणार नाही तर मग कशावर करणार? सरकार जनतेसाठी पैसे खर्च करते म्हणजे काय उपकार करत नाही, जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरायचा असतो हे चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मंत्र्याला माहित नसावे, कारण त्यांचा पक्ष दोन-चार उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला आहे आणि या उद्योगपतींच्या घरीच चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाचे सरकार पाणी भरते आणि जनतेच्या प्रश्नावर मात्र उलटे प्रश्न विचारतं .