मुंबई- पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियुष गोयल यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजप कोणाची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 मे आहे. आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे.
राज्यसभेवर उमेदवारी दिल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि जे. पी. नड्डा यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांचे मनापासून आभार मी मानतो. ओबीसी समाजातील माझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास टाकला. सामान्य जनता, शेतकरी, मजूरांसाठी काम करणार आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीची कानउघडणी करणार आहे, मी बहुजन समाज आणि ओबीसी वर्गाची बाजू राज्यसभेत मांडणार आहे. अमरावती जिल्ह्याला कैक वर्षांनी उमेदवारी मिळाली हे संतूलन आमचे नेते देवेंद्र फडणवीसांनी साधल्याचेही ते म्हणाले.