पुणे-एखादा चित्रपट चालला नाही तरी बच्चन हा बच्चनच असतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी भाजपला टोला दिला. राज्यसभा निवडणुकीच्या विजय – पराजयावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुकीत काही वेळ जिंकणे असते, तर काही वेळा हरणे असते. ज्या वेळेस एखादा उमेदवार विजयी होतो. त्यावेळेस तोच फॉर्म्युला योग्य असे सर्वांना वाटते आणि जेव्हा अपयश येते त्यावेळेस लोकांना यांचे काहीतरी नियोजन चुकले असे वाटते. मात्र, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचे चित्रपट ही कधी कधी अपयशी ठरतात. मात्र, त्यानंतरही ही अमिताभ बच्चन हा बच्चनच असतो असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
सुळे म्हणाल्या, आमच्या पक्षाचे नेते शरद पवार हे 55 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात काम करत आहेत. त्यातील 50 टक्के वर्ष ही विरोधात व 50 टक्के सत्तेत गेली. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार म्हणाले की ,राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार उभा करून आम्ही एक रिस्क घेतली होती, पण त्यात यशस्वी ठरलो नाही. महाविकास आघाडीचे सर्व आमदार हे एकत्रित असून त्यांनी जबाबदारीने या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामुळे त्यांचे एक ही मत कुठेही हलले नाही. आमच्या दोन मतदारांना मतदान करता आले नाही तर एक मत बाद ठरले. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीबाबत अधिक अभ्यास करू तसेच निवडणूक निकालाचे विश्लेषण करू, असे सूतोवाचही त्यांनी केले.