जिल्हा पातळीवर मानवी हक्क संरक्षणासाठी न्यायालय झाले पाहिजे-अॅड.असिम सरोदे
पुणे : आज समाजात ज्या घटनेवर राजकारण होईल, अशा गोष्टींची चर्चा होते. परंतु ज्या घटनेचे राजकाराण होऊ शकत नाही अशा गोष्टींचा कुठेही उल्लेख केला जात नाही, हे दुर्देव आहे. त्यामुळे मानवी हक्काचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर पोलीस स्टेशनमध्ये मानवी हक्क संरक्षणाचे सेल असायला हवे. तिथे मानवी हक्क उल्लंघनाच्या गुन्ह्यांची नोंद असली पाहिजे. दुर्देवाने असे सेल कुठेही नाहीत. जिल्हा पातळीवर मानवी हक्क संरक्षण न्यायालय झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन अॅड. असिम सरोदे यांनी केले.
मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्यावतीने मानव आधिकार पुरस्कार वितरण सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. डी सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र.चिं. शेजवलकर, संपादक उन्मेश गुजराथी, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष अॅड. अभिषेक हरिदास, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अॅड. शार्दुल जाधवर, श्रीकांत जोगदंड, अनिल कदम, सोमनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते करतार सिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत साबळे, पत्रकार सुनील सवाशे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण निकम, सौनम जांभुळकर, कृषीकांत आदिवासी शिक्षणसंस्था भीमाशंकर यांना मानव अधिकार पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष कार्य मानवधिकार पुरस्कार शिक्षण तज्ज्ञ डॉ. हरिदास, मानव अधिकार कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना देण्यात आला.
सुभाष वारे म्हणाले, भारताचे संविधान हे जगातील सर्वात उत्तम संविधान आहे हे आपल्यावर राज्य करणारे इंग्रज आज म्हणत आहेत. परंतु आपले संविधान तळागाळातील लोकापर्यंत नीट पोहचले नाही. त्याकरीता सर्वांनी संविधान वाचले पाहिजे. मानवी अधिकारांचा संकोच होत आहे तो थांबविला पाहिजे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, मानवी हक्क कायदा हा नक्की काय आहे हे अनेकांना माहिती नाही. परंतु मानवी हक्काची होणारी पायमल्ली थांबविण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज ही संस्था कार्य करीत आहे हे उल्लेखनीय आहे. यावेळी डॉ. प्र.चिं.शेजवलकर, संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर व डॉ. ए.डी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णा पठाडे यांनी सूत्रसंचालन केले. विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले. विकास कदम यांनी आभार मानले.