स्वर-ताल-पदन्यासातून रसिक मंत्रमुग्ध!
संवेदन मैफलीद्वारे पं. रोहिणी भाटे यांना आदरांजली
पुणे : जमिनीला स्पर्श करणाऱ्या लांबच लांब जटा, हार, रुद्राक्ष माळ अन् भगवी वस्त्रे परिधान केलेली… एका हाताने एकतारीवर छेडलेले सूर तर दुसऱ्या हाताने कमरेवर अडकवलेल्या छोट्या डग्ग्यावर धरलेला ताल, पायातील जाडसर पैजणांचा मधुर निनाद अन गोड चालीत, आशयघन पद्यात एकरूप झालेली सुमधुर गायकी रंगमंचावर अवतरली…सूर-ताल-लय अन् नृत्य म्हणजे परिपूर्ण संगीत…पार्वती बाऊल यांच्या गायन, वादन अन् पदन्यासातून ते जणू प्रत्यक्ष साकारलं
कथक सम्राज्ञी गुरू पं रोहिणी भाटे यांच्या स्मरणार्थ, नीलिमा अध्ये यांच्या संकल्पनेतून प्रकृति कथक नृत्यालयातर्फे ‘संवेदन’ मैफल भरविण्यात आली होती. जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना प्रेरणा श्रीमाळी यांचा नृत्याविष्कार आणि ‘बाऊल’लोकसंगीताची परंपरा उलगडणारा पार्वती बाऊल यांचा स्वर-पदन्यास दोन्ही एकाच स्वरमंचावर अनुभवता आल्याने रसिकांसाठी ही मैफल सांगीतिक मेजवानीच ठरली.
प्रकृतिच्या शिष्यांनी ‘गणनाथ गौरी सुत’ ही गणेशाचे वर्णन करणारी धृपद रचना सादर करत मैफलीस आरंभ केला. त्यानंतर रोहिणीताईंच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये आणि हसिता ओझा यांनी चार ताल आणि चार राग यांना एकत्रित बांधणारी ‘चतरंग’ ही नृत्यरचना पेश करून रसिकांची मने जिंकली. त्यांना अजय पराड (संवादिनी), आदित्य देशमुख(तबला), सुनील अवचट (बासरी), सुखन मुंडे (पखवाज), अर्पिता वैशंपायन (गायन) आणि आसावरी पाटणकर (पढंत) अशी समर्पक साथ दिली.
कथकच्या जयपूर घराण्यांच्या प्रेरणा श्रीमाळी यांनी पारंपरिक राजस्थानी धाटणीच्या शिवस्तुतीने आपल्या सादरीकरणाची सुरुवात केली. तीनतालातील विलंबित विस्तार, थाट, उठाण, परण प्रस्तुत करत जयपूर घराण्याच्या कथक अविष्काराचे विविध रंग उलगडले. त्यांनी साकारलेली ‘चतुरणी नायिका’ विशेष भावली. तालाची सूक्ष्म जाण आणि कथक साधनेची उंची याचे विलक्षण दर्शन त्यांच्या पदन्यासातून रसिकांना घडले. अभिनय आणि नृत्य यांच्या सुरेख मिलाफातून साकारलेल्या ‘कबीर पदाने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता केली. त्यांना फत्तेहसिंग गंगाणी(तबला) पूरक साथ दिली.
उत्तरार्धात पार्वती बाऊल यांचे सुमधुर गायन झाले. अध्यात्म, ज्ञान, योग, साधना आणि कलेवर असलेल्या प्रभुत्वातून बंगलाच्या ‘बाऊल’ संगीताचे विलोभनीय दर्शन त्यांनी घडविले. गुरू सनातनदास बाऊल यांच्याकडून त्यांनी आत्मसात केलेल्या ‘माया’रचनेची प्रस्तुती अंतर्मुख करणारी ठरली. नामस्मरण आणि ध्यान यांचं महत्व सांगणारे, कान्होपात्रा यांच्या १ हजार वर्षापूर्वीचे कथाकाव्यात रसिकांना तल्लीन केले. बंगाली, पाली आणि संस्कृत अशा तीन भाषांची सुरेख गुंफण असलेल्या गीताचं श्रवणीय सादरीकरण व इंग्रजी भाषेतून त्यांनी केलेले विस्तृत विवेचन रसिकांना विशेष भावले. ही अभिव्यक्ती ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचल्याचा प्रत्यय त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाविष्कारातून रसिकांना आला.