नवी मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी केलेल्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. “जुलमी सत्तेच्या विरोधात केलं जातं ते बंड असतं, पण सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते. स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थानं खालसा झाली असून आता कोणीही राजे नाही”, असे म्हणत कोल्हेंनी उदयनराजेंचा समाचार घेतला. “एकदा गणेशोत्सव संपला की विसर्जनानंतर त्यावर बोलायची गरज नाही”, असे म्हणत त्यांनी भाजपच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांनाही टोला लगावला. नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात कोल्हे बोलत होते.
“जनतेच्या विकासासाठी पक्षांतर करत आहे” असे जेव्हा एखादा नेता म्हणतो, तेव्हा जनता “स्वतःची कातडी बचावण्यासाठी” असंच वाचते, कारण जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. ज्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या सरकारमध्ये जाऊन कोणता विकास साधायचा आहे? असा घणाघात कोल्हेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केला. तसेच, पाच वर्षांत महाराष्ट्रावरचे कर्ज दुपटीने वाढवले, ते आता विकासाच्या बाता करत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांकडे गृह मंत्रालय आहे, त्यांच्या नागपूर जिल्ह्याची क्राईम कॅपिटल अशी ओळख असल्याचेही अमोल कोल्हे अधोरेखीत केले.