पुणे- गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत भाजप १५८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं केवळ निश्चितच झालं आहे असे नाही तर नवा रेकोर्ड केल्याचे स्पष्ट दिसत आहे .
सर्व निर्णय गुजरातच्या हिताचे घेतले , देशाची सर्व शक्ती गुजरातच्या हितासाठी वापरली मग तिथे बहुमत मिळणार हे नक्की होतेच पण गुजरात म्हणजे देश नाही हे लक्षात घ्यावे अशी प्रतिक्रिया भाजपा विरोधी पक्षांकडून येत असताना आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हि गुजरातच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’ गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. देशातील सर्व शक्ती त्या निवडणुकीसाठी वापरली गेली. एका राज्याच्या सोईचे अनेक निर्णय घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यामध्येच कसे जातील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम हा निवडणूक निकालावर होणारच होता. गुजरातमध्ये तसाच निकाल लागला आहे. मात्र गुजरातचा निकाल भाजपाच्या बाजूने लागला म्हणाजे देशामध्ये लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातोय हे खरं नव्हे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची महापालिका निवडणूक,दिल्ली महापालिकेची सूत्रं अगोदर भाजपकडे होती. आता येथे आम आदमी पार्टीची सत्ता आली. हिमाचल प्रदेशमध्ये अगोदर भाजपाची सत्ता होती. आताच्या माहितीनुसार येथे भाजपाला २७ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. येथील भाजपाचे राज्य गेले. दिल्लीमध्येही भाजपाची सत्ता गेली. याचा अर्थ हळूहळू बदल होत आहे. राजकारणामध्ये पोकळी असते. गुजरातची पोकळी ही भाजपाने भरून काढली. तर दिल्लीची पोकळी केजरीवाल यांनी भरून काढली. आज लोकांना बदल हवा आहे. मात्र याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले