पुणे-चुकीच्या मार्गावर जावू न देता पुढची पिढी घडविण्यासाठी कार्य कराअसे आवाहन डॉ. विकास आबनावे यांनी येथे केले.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर बोलत असताना समाजाचा खरा शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका खूपच महत्त्वाची असल्यानेच शिक्षक संवेदनशील असायला हवेत. विद्यार्थ्यांच्या भावना सहजच त्याच्या लक्षात येणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन शिकविले पाहिजे चाकोरीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला पाहिजे. आजची परीक्षा पद्धती, मुल्याशिक्षणाचा अभाव, विद्यार्थ्यांचा बुध्यांक अशा विविध विषयावर भाष्य केले. प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा मागोवा घेऊन आपली ज्ञानमय परंपरा जपून विद्यार्थी हा ज्ञानार्थी बनविण्यासाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी आपल्या चुका सुधारून पुढची पिढी घडविण्याचे कार्य अविरतपणे करण्याचे आवाहन या शिक्षक दिनाच्या प्रसंगी उपस्थितांना केले. कार्यक्रमाची सुरवात डॉ. विकास आबनावे सचिव, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ पुणे व संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांचे हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या शिक्षण शाखातील शिक्षकांचा अध्यापनात विशेष नैपुण्य मिळविल्याबद्दल प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सत्कारमुर्तीना वृक्षारोपणाची प्रेरणा मिळावी म्हणून बिया, सेंद्रिय खत आणि कुंडी असणारे किट भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी शिक्षकांनी आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अवलंब करण्याचे अवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांनी केले तर सत्कारार्थीच्या वतीने प्रा.मनोज मुळीक व प्रा.रमा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. विकास आबनावे, संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड, खजिनदार श्री.विजयसिंह जेधे, धैर्यशील वंडेकर, कृष्णराव सोनावणे, श्रीराम गायकवाड, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश जाधव व प्रा.स्नेहल वीर यांनी केले.