पुणे-जी 20 परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या रस्त्यांच्या कामाचे श्रेय वडगावशेरीचे आमदार घेत असून, त्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नसून आयत्या पीठावर रेघोट्या ओढत असल्याची टीका भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
मुळीक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला यावर्षी जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यातील तीन परिषदा पुण्यात होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकसित आणि विकसनशील देशांचे उच्चस्तरीय प्रतिनिधी या परिषदेसाठी येणार आहेत. भारताची देशात प्रतिमा निर्माण करण्यासाठी ही एक संधी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू झाले आहेत. त्याच कामाचा भाग म्हणून विमानतळाकडे जाताना प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येत आहे. यात वडगाव शेरीच्या आमदारांचे कोणतेही योगदान नाही परंतु भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ते करत आहे.
मुळीक पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ता काळात पुणे शहरात कोणताही नवीन प्रकल्प आलेला नाही. वडगाव शेरीत आमदारांच्या निष्क्रियतेमुळे विकासकामे झाली नाहीत. परंतु भाजपच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचे श्रेय ते घेत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कामांची माहिती घ्यायची आणि त्याप्रमाणे पत्र द्यायचे याचा अर्थ त्यांनी काम केले असे होत नाही. वडगावशेरीतील नागरिकांची ते दिशाभूल करीत आहेत. भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत केंद्राच्या माध्यमातून सुरूअसलेल्या नगर रस्ता शिरूर उड्डाणपूल ही त्याची काही उदाहरणे आहेत.