पुणे—राजकीय विडंबनातून केलेल्या कोट्या त्यातून उडालेल्या हास्यफवाऱ्यांबरोबरच अंतर्मुख करायला
लावणारे राजकारणातील वास्तव, पाणी, जमिनीच्या प्रश्नावरून काव्याद्वारे मांडलेली वेदना, तंत्रयुगात संपत
चाललेले मानवी संबंध, बदललेली परिस्थिती, यांवर केलेल्या रचना, श्रोत्यांकडून प्रचंड टाळ्यांच्या
कडकडाटात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी प्रसंगानुरूप कोट्या करीत
केलेले सूत्रसंचालन यामुळे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी पुणे नवरात्रौ महोत्सवातील ‘हास्य धारा’
या मराठी कवी संमेलनाचा कार्यक्रम गाजला.
विद्रोही कवी संभाजी भगत यांच्या
बया पहाटेच्या ग बारी
कुणी नव्याने गाणी गातो…
नव्याने गाणे गातो अन,
धक्का चावडीला देतो ग माझे माई… या खेड्यातील आणि शहरातील काम करणाऱ्या
महिलांवरील रचनेला आणि
‘नाही हिंदू मारिला, नाही मुस्लीम मारिला
माणूस मारिला त्यांनी माणूस मारिला…
या धर्मद्वेषावर आधारीत रचनेला तसेच
सालो साल पेरलं आणि मातीतच जिरल
पाटीवर पेरलं तर त्याची फुलं होतात
पुस्तकं पैशांची झाडे होतात.
ही प्राचार्य सुरेश शिंदे यांनी शिक्षणामध्ये झालेले बदल व संगणीकरण यावर आधारित दोन पिढ्यांच्या
कवितेला तर
भारत दौंडकर यांच्या
गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आला गळ्यात
पण, एक प्लेट मातीचा वास हुंगण्यासाठी रक्त येईल डोळ्यात
या अंतर्मुख करायला लावलेल्या ‘गोफ’ या रचनेने प्रेक्षकांनी दाद दिली.
अशोक नायगावकर यांनी त्यांच्या नेहेमीच्या विनोदी शैलीत
सतत मुलांमध्ये वावरल्याने, शिक्षक बाल बुद्धीचेच राहतात
अशा प्रकारच्या रचना व किस्से सादर करून प्रेक्षकांची माने जिंकली.
साहेबराव ठाणगे यांनी जागतिकीकरनामुळे झालेल्या परिस्थितीच्या बदलावर रचलेल्या
हरवला माझा गवताचा गाव, साधा भोळा माणसांचा
कुलदेवतांचा आंधळा अंगारा, नात्यांचा निवारा देशोधडी
या अभंगाला
तर अरुण पवार यांच्या
पांढरं सोन पिकवलं ते मातीमोल विकू
आणि विकतं ते पिकवलं तर म्हणता तुम्ही अफू
मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू..
या मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर बदललेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचनांनी प्रेक्षकांना
अंतर्मुख केले.
प्रकाश बोडके यांच्या
गढूळल्या दाही दिशा, कडू झाली सारी बारी आणि
धुवून वापरा घरी पावसाचे पाणी …
या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या रचनेला आणि
नारायण सुमंत यांच्या
सावळ्या तनुवर, तुझ्या हिरवी पैठणी
सोनसळी बंद, वर गच्च टपोरे असे फुलांचे गेंद
ही काळ्या मातीला मातेची उपमा देवून केलेली लावणी तसेच
अरुण म्हात्रे यांच्या
कवीला कधीही आपले म्हणू नये
नात्यामध्ये ही त्सुनामी आणू नये
जातात पक्षी उडुनी पहा शेवटी
काळीज कातून घरटे विनू नये
या रचनेला प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
तुकाराम धांडे यांच्या भूगोल या जमिनीचे महत्व सांगणाऱ्या कवितेला व अस्मिता जोगदंड यांच्या स्रीचे महत्व
सांगणाऱ्या ‘बाई’ या कवितेलाही प्रेक्षकांनी दाद दिली.
शाहीर संभाजी भगत यांचा जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार व नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष
उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. इतर सर्व कवींचा सत्कार नरेंद्र व्यवहारे,
बंडू नलावडे, संजय निकम, मनोजशेठ कुदळे, वसंत दुर्गे, अॅड. चंद्र्शेखर पितळे, नामदेव बारापत्रे, रमेश भंडारी,
अमित बागुल, विकी खन्ना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन घन:श्याम सावंत
यांनी केले.