‘सर्व प्रकारच्या मुलांना मिसळू दिले तर ते भेदभाव करणार नाहीत’ – विलास वाघ
पुणे, ता : “सर्व पद्धतीचे विद्यार्थी, मुले एकत्र येउन खेळणे, बागडणे हे आजच्या समाजासाठी खूप महत्वाचे झाले आहे. लहानपणापासूनच त्यांना सगळ्यांमध्ये मिसळू दिले तर ते आयुष्यात कधीही भेदभाव करणार नाहीत. त्यासाठी ‘दिवाळी आनंदोत्सवा’सारखे उपक्रम घेत राहणे जरुरीचे झाले आहे. ” असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांनी सुर्यदत्ता नैशनल स्कूल आयोजित ‘दिवाळी आनंदोत्सव’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले.
सूर्यदत्ता नैशनल स्कूलतर्फे लहान मुलांसाठी ‘दिवाळी आनंदोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक प्रा. विलास वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ज्येष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडूलकर, अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख एम. एस. बिट्टा, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर व बाल कलाकार अथर्व कर्वे आदी मान्यवर या महोत्सवामध्ये सामील झाले होते.
“देशाच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी उत्कृष्ठ पद्धतीचे शिक्षण मुलांना दिले गेले पाहिजे. मुलांमध्ये भेदभावाची भावना नष्ट करण्यासाठी वेगवेळ्या स्थरातील मुलांना एकत्र आणून त्यांना बागडू दिले पाहिजे. यामध्ये वैयक्तिक प्रगती तसेच देशाची प्रगती राहिल्यावाचून राहणार नाही. तसेच भेदभाव करण्याची भावनाच नष्ट होईल.” अशी भावना विलास वाघ यांनी मुलांशी संवाद साधताना व्यक्त केली. अनाथ व मानसिक रित्या असक्षम असलेली मुले येथे एकत्रितपणे बागडताना बघून मनाला खूप बरे वाटले असेही त यावेळी म्हणाले.
३ ते १६ वयोगटातील ‘माहेर’ स्वयंसेवी संस्थेतील ५० मुले, ‘साई सेवा’ संस्थेमधील मानसिक रित्या असक्षम असलेली, काही रस्त्यावर काम करणारी व गरीब कुटुंबातली अशी १०० मुले तसेच इतर शाळांमधली अनेक मुलेही या महोत्सवात सामील झाली होती आणि या उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटत होती. या महोत्सवामध्ये मुलांसाठी काही मैदानी खेळ, साप सीडी, वॉटर बॉल, बंजी जम्पिंग, बुल राईड, बलून शुटींग, असे अनेक खेळ ठेवण्यात आले होते. काही जोकर आणि कार्टून केरेक्टर्स मुलांचे मनोरंजन करीत होते.
यावेळी एम. एस. बिट्टा म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे हि शिक्षण संस्था संस्कारक्षम पिढी घडवीत आहे जे राष्ट्र घडविण्यासाठी फार मोठे योगदान राहील. ” तसेच ज्येष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकरांनी, “मी देखील लहान अशावेळी मुलांसोबत लहान होतो व सतत नवीन काहीतरी शिकून जातो.” अशी भावना व्यक्त केली.
“आम्हाला आमच्या मुलांनी सकारात्मक दृष्टीने समाजाकडे बघणे महत्वाचे वाटते. जसे आपण आहोत तसेच इतर मुलेही आहेत, त्यांच्यामध्ये आपण मिळून मिसळून राहिले पाहिजे. एकत्र येउन कार्य केले पाहिजे. आपले त्यांच्याशी मने जुळली पाहिजे हा एकच हेतू या महोत्सावामागील आहे. समाजातील भेदभाव, उच्चनीच हि भावना समूळ नष्ट करण्यासाठी हा एक उपक्रम ठेवला आहे. यातुन आमच्या संस्थेतील मुले भावनिकरित्या सक्षम होतीलच तसेच त्यांना सर्व पद्धतीच्या लोकांमध्ये एकत्रित येउन आनंदी राहण्याची सवयदेखील लागेल. ” अशी भावना सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक डॉं. संजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
‘साई सेवा’ संस्थेतील मानसिकरित्या असक्षम मुलांनी यावेळी ‘थेंक यु’ असे गाणेही गाऊन सर्वांचे आभार मानले, तसेच सुर्यदत्ता हॉटेल मेनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सर्व चिमुकल्यांसाठी ४०० चिवडा लाडूचे पाकीटेदेखील यावेळी तयार केले होते.