प्रामुख्याने ग्रामीण भागात आणखी सुधारणा करा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार
पुणे, दि. २९ एप्रिल २०२४: गेल्या आर्थिक वर्षभरात द्वैमासिक आढावा व उपाययोजनांतील सातत्याने पुणे परिमंडलामध्ये अचूक वीजबिलांच्या प्रमाणात वाढ झाली असून सद्यस्थितीत ९५.४३ टक्के वीजग्राहकांना अचूक बिल देण्यात येत आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अचूक बिलिंगचे प्रमाण ९७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर अचूक बिलिंगमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये शाखा कार्यालयानिहाय कृती आराखडा तयार करून स्थानिक उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात मीटर रीडिंगचे बिलिंग व फोटो मीटर रीडिंगबाबत सोमवारी (दि. २९) द्वैमासिक आढावा बैठक झाली. तीत मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंताश्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत यांच्यासह सर्व ७७ मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापक तसेच सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता, वित्त व लेखा अधिकारी उपस्थित होते.
पुणे परिमंडलामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण मार्च २०२४ अखेर ९५.४३ टक्क्यांवर गेले आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी वीजबिलांमध्ये १.१६ टक्क्यांनी तर मीटर रीडिंगच्या अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. वीजमीटरच्या अचूक रीडिंगसाठी पुणे परिमंडलाकडून दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात येत आहे. तसेच उपविभाग कार्यालयांकडून दरमहा मीटर रीडिंगच्या फोटोची १०० टक्के तपासणी करण्यात येत आहे. सोबतच बिलिंगमध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी व विविध उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी परिमंडलस्तरावर द्वैमासिक आढावा घेण्यात येत आहे.
मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले की, अचूक मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. अचूक बिलिंगमध्ये सुधारणा होत आहे ही समाधानाची बाब असली तरी प्रामुख्याने ग्रामीण भागात स्थानिक उपाययोजनांना आणखी गती दिली पाहिजे. यासाठी संबंधित विभाग व उपविभाग कार्यालयांची जबाबदारी महत्वाची आहे. ग्रामीण भागात मागील वर्षाच्या तुलनेत २.७८ टक्क्यांनी अचूक बिलिंग वाढले आहे. तर सरासरी वीजबिलांचे प्रमाण देखील ३.२० टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र यापुढे आणखी सुधारणेसाठी शाखा कार्यालयस्तरावर कृती आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात. तसेच चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व महावितरणच्या महसूलाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही असे मुख्य अभियंता श्री. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.