सासवड-केंद्रातील नरेंद्र मोदींचे नवे सरकार हे गरीब, आदिवासी, शेतमजूर आणि कामगारांवर मोठे अन्याय करत असून उद्योगपती, कंत्राटदार आणि श्रीमंतांच्या भल्यासाठी वाटेल तसे निर्णय घेऊ लागले असल्याची टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सासवड येथे केली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “अच्छे दिन आनेवाले है‘ अशी घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मात्र “अब सब ठीक हो जायेगा‘ अशी उडवाउडवीची भाषा करू लागले आहेत. पुण्यात तयार होणाऱ्या गाडीत बसून आणि कानाला मोबाईल लावून बोलणारे मोदी गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसने काहीच काम केले नसल्याचा आरोप करत आहेत.
या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने गेल्या 60 वर्षांत “कॉंग्रेसने क्या किया,‘ असा प्रश्न विचारणाऱ्या मोदींना “कॉंग्रेसने क्या नही किया‘, असा प्रतिसवालही करीत ते म्हणाले .श्रीमंत व उद्योगपतीधार्जिण्या सरकारच्या अवाजवी घोषणांनी भुरळून न जाता, अशा सरकारला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत घरी पाठवावे आणि गरिबांसाठी काम करणाऱ्या कॉंग्रेसला स्वबळावर सत्ता द्यावी, असे आवाहन गांधी यांनी या वेळी उपस्थित मतदारांना केले.
पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सासवड येथे गांधी यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार चंदूकाका जगताप, कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पुरंदरचे उमेदवार संजय जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, कॉंग्रेसचे इतर उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रातील कॉंग्रेसच्या सरकारांनी गेल्या 60 वर्षात राबविलेल्या योजनांना उजाळा देत गांधी म्हणाले, “”शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या घामातून आपला देश उभा राहिला आहे. गेल्या 60 वर्षांत झाले नाही, ते एक व्यक्ती येऊन करणार असल्याची स्वप्ने विरोधकांनी दाखवली जात आहेत. देशात सध्या “गुजरात मॉडेल‘ची चर्चा होत आहे. पण सर्वच क्षेत्रात गुजरातच्या पुढे महाराष्ट्र आहे. दरडोई उत्पन्नात तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.‘‘ “”देशात सत्तेवर येताच पाकिस्तानला धडा शिकवीन, चीनला काबूत ठेवीन, असा दावा मोदी करत होते. परंतु त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. भारत-पाक सीमेवर गेल्या दहा वर्षांत झाले नसेल इतका गोळीबार गेल्या दहा दिवसांत झाला आहे. चीनचे अध्यक्ष भारतात आल्यानंतर अहमदाबादेत मोदी त्यांच्याबरोबर झोपाळ्यावर हवा खात होते. त्याच वेळी चीनचे हजारो सैनिक लडाखमध्ये घुसले होते. परंतु स्वतःच्या प्रतिमेची चिंता जास्त असलेल्या मोदींनी याबाबत चीनला खडसावून जाब विचारला नाही, अशीही टीका राहुल यांनी केली.
अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोदींनी उद्योगपतींना खूष करण्यासाठी दुर्धर आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या विविध 108 औषधांच्या किमतीवरील नियंत्रण उठविले आहे. त्यामुळे या औषधांच्या किमती भरमसाट वाढणार असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्तुती केली. साफ आदमी आणि बडे दिलसे काम करनेवाला, अशा शब्दांत चव्हाण यांचा गौरव केला. गेल्या दीड दशकात यंदा पहिल्यांदाच कॉंग्रेस स्वबळावर लढत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे, तेव्हा त्यांना साथ द्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.