पुणे :’सैनिकांच्या योगदानासाठी शासन त्यांच्या नियमानुसार सैनिकांना आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करतच असते. पण, ज्या जवानांच्या सीमेवरील उपस्थितीने, बहादुरिने आणि बलिदानाने देशाचे, देशातील बांधवांचे रक्षण होते.
अशा जवानांच्या प्रती समाजाचेही काही कर्तव्य आहे. या जवानांच्या प्रति आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी उपक्रमांची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
निमित्त होते ‘जय महाराष्ट्र तरुण मंडळ’ (भवानी पेठ) आणि भाजप नगरसेविका सुलोचना तेजेंद्र कोंढरे यांच्या संयुक्त विद्यमाने, सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करणार्या शहीद कुटुंबियांसाठी कृतज्ञता सोहळ्याचे.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ५१ शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. याप्रसंगी १२ कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये किशोर नारंग, संभाजी शिर्के, सुरेश भेंगडे यांचा समावेश होता.
१५ ज्येष्ठ समाजसेवकांचा देखील सन्मान करण्यात आला. युद्धात अपंगत्व आलेल्या जवानांना व्हीलचेअरचे वाटप गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
‘देशावर आक्रमण होऊ नये म्हणून छातीवर शत्रुची गोळी झेलणाऱ्या कुटुंबियांना सलाम करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते’, असे तेजेंद्र कोंढरे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजेंद्र कोंढरे आणि सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश गोगावले (भारतीय जनता पार्टी, पुणे शहर) होते. पोलीस अधिकारी स्वाती चितलकर, नगरसेवक राजेश येनपुरे, महेश लडकत तसेच ‘फाईट’ चित्रपट फेम सायली आणि जीत हे कलाकार उपस्थित होते.