बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने नकोत -डॉ. अश्विनी धोंगडे
पुणे : “अनुभवातून लिहिले साहित्य कसदार असते. स्त्रियांनी आपल्या अनुभवांवर आधारित साहित्य निर्माण केले पाहिजे. बाईचा माणूस म्हणून विचार होण्यासह त्यांना मुक्तपणे लिहिता आले पाहिजे. मात्र, आज बाईच्या भाषेवर पुरुषांची बंधने आहेत. स्त्रियांनी भाषेवरील ही पुरुषी बंधने झुगारून कसदार साहित्य निर्मिती केली पाहिजे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील प्रितम-प्रकाश महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन व प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत ‘स्त्रीवादी साहित्य : काल, आज उद्या’ या विषयावर डॉ. धोंगडे बोलत होत्या. यावेळी आकांक्षा प्रतिष्ठानच्या संचालिका राणीताई चौरे व पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर मोहिनीताई लांडे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’, तर शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बाजीराव गायकवाड व कलांगण कला संस्थेचे सचिन घटने यांना ‘राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रा. अशोककुमार पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रकाश जवळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, “समाजात स्त्री आणि पुरुषांच्या लेखनात फरक जाणवतो. पुरुषांनी स्त्रीयांच्या शरिराचे वर्णन केले, तर ते उत्तम साहित्य बनते. पण स्त्रीयांनी शरिराचे वर्णन केल्यास त्या लेखनाला आश्लिल समजले जाते, हे अयोग्य आहे. स्त्रीवाद हा स्वतःच्या जगण्यातून साहित्यात उतरला जातो. आत्ताच्या स्रीयांचा लेखनावर विश्वास राहिला नाही. मोकळे होणे ही साहित्याची गरज आहे. साहित्य दु:खातुन, नैराश्यातून निर्माण होते आणि ती आजच्या पिढीतील स्त्रीयांनी जपले पाहिजे.”
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या साहित्यिकाने आपल्या लेखणीतून सुधारणेचा विचार मांडला. आजच्या साहित्यात समाज सुधारणेचा विचार रुजला पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारची वैचारिक संमेलने उपयुक्त ठरतील. त्यामुळे बंधुतेचा विचार घेऊन साहित्यनिर्मिती झाली, तर समाजात बंधुभाव वाढेल. समाजाला जोडणारी माणसे आपल्यासमोर आणून त्यांचा सत्कार करण्याचे काम बंधुता परिवार करीत आहे, याचा आनंद वाटतो.”
तत्पूर्वी ‘काव्यपंढरी’ हे कविसंमेलन रंगले. प्रतिभावान कवींनी आपल्या कवितेतून समाजात बंधुभाव रुजविण्याचे विचार मांडले. यावेळी संतोष घुले यांना ‘लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार’, तर दीप पारधे यांना ‘लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता झिंझुरके यांनी केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले.