पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल होत आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि कला यावर आधारित अभ्यासक्रम देण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी युजीसी प्रयत्नशील आहे, असी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित तिसर्या नॅशनल टीचर्स काँग्रसचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), नॅक, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन, यूनेस्को , युनिसेफ , एआयसीटीई, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू), महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्राचार्य परिषद या भारतातील व महाराष्ट्रातील प्रमुख संस्था नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या सहयोगी आहेत. उद्घाटनप्रसंगी जगविख्यात संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सिल्वन्ट सल्लागार प्रा.लि. चे आनंद सुदर्शन, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टचे डॉ. सच्चिआनंद जोशी, नॅशनल टीचर्स काँग्रेसचे जागतिक समन्वयक डॉ. जय गोरे, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, महासचिव प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस व्युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड, कार्याध्यक्ष व टीचर्स काँग्रेसचे संस्थापक प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय. के. भट, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रो कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्रो. कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, एनटीसीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुधीर गव्हाणे हे उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व आयएमडीआरचे संस्थापक डॉ. पी.सी. शेजवलकर, एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल डी. सहस्त्रबुध्दे, युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीचे कुलपती डॉ.एस.जे. चोप्रा व ग्रेट लेक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. पराग दिवाण यांना जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानीत करण्यात आले.
प्रा. डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, युजीसीच्या माध्यमातून देशातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिक्षण देण्यात यावे. देशात चांगल्या शिक्षणासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत फेरबदल करने गरजेचे आहे. यासाठी युजीसीने आठ नियम बनविले आहे. यात ऑटोनॉमीमधील आवडीनुसार विद्यार्थ्यांना विषयाची निवड करता यावी. स्टेम या विषयासोबत कृषी या विषयाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यां-विद्यार्थ्यांमध्ये इंडक्शन प्रोग्राम, शिक्षकांसाठी इंडक्शन प्रोग्राम तयार करून त्यांना एका महिण्याचे प्रशिक्षण द्यावे. तसेच विद्यार्थ्यांची स्किल डेव्हल्प करून त्यांच्यातील संवाद कौशल्याची वाढ करणे आवश्यक आहे. नॅशनल क्रेडीट बँड तयार करण्याची ही आवश्यकता आहे. समाजातील आणि स्थानिक समस्या सोडविण्यासाठी संशोधनात्मक वृत्तीची जोपसना आणि दृष्टी तयार करावी लागणार आहे. युजीसीने शाश्वत विकासाबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत संवेदनशील बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे. देशातील गुणवंत आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या फेलोशीप युजीसीने सुरू केल्या आहेत. संशोधनावर आधारित शिक्षण देण्यात यावे. विद्यार्थी केंद्रीत शिक्षणासाठी पुढाकार घ्यावे. आर्टिफिशयल इंटेलिजेंटच्या साह्याने नवीन शिक्षण पद्धतीची उभारणी करावी लागणार आहे.
विजय भटकर म्हणाले, कोणत्याही देशाच्या सुजलाम भविष्यासाठी नॅशनल टीचर्स काँग्रेस सारखे व्यासपीठ गरजेचे आहे. देशाचे भविष्य शिक्षक घडवितात. अनेक तज्ज्ञ शिक्षक भारतात होऊन गेले. विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ युवक घडविण्याचे कार्य केले शिक्षकांच्या हातून होते. भविष्यात काय घडणार आहे, याची कल्पना आपण करू शकत नाही, मात्र एक तज्ज्ञ शिक्षक ती कल्पना करून त्याचा सामना कसा करावा याचा मार्ग ते दाखवतात. ज्ञान, तत्वज्ञान आणि माध्यमातून भारत विश्वगुरू बनेल, त्यासाठी नॅशनल टीचर्स काँग्रेससारखे व्यासपीठ नक्कीच मदतीचे ठरेल.
डॉ. सच्चिआनंद जोशी म्हणाले, देशातील शिक्षकांसाठी नॅशनल टीचर्स काँग्रेस महत्वाचे व्यासपीठ आहे. शिक्षक हा मुलांच्या आयुष्यातील पहिला रोल मॉडल असतो, मात्र पालकांकडून मुलांना यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. शिक्षकांकडून अनेक अपेक्षा केल्या जातात, मात्र समाज त्यांच्याकडे तुच्छतेच्या भावनेने पाहतो. सर्वांना मार्गदर्शन करणे आणि गुणवंत समाज घडविण्यासाठीची जबाबदारी शिक्षकांची असते. भारतात आणि भारतीय शिक्षकांमध्ये जगातिक महागुरू बनण्याची क्षमता आहे.
डॉ. आनंद सुदर्शन म्हणाले, आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहिल्यास तुम्ही सुंदर भविष्य घडवू शकता. जगातिक तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाप्रमाणे आपले ज्ञान अध्यावत करून विद्यार्थ्यांना प्रदान करावे. तंत्रज्ञानानुसार भारतीय शिक्षण पद्धतीत बदलाव आणण्याचे कार्य मानवसंसाधन विकास मंत्रालयातर्फे केले जात आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म्याची सांगड घालून विद्यार्थ्यांला शिक्षण देण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकात भारत हा ज्ञानाचं दालन म्हणून उद्यास येईल. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्वाची असणार आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला शिक्षणाची आवश्यकता असल्यामुळे सर्व विद्यापीठांनी यानुसार अभ्यासक्रमाची रचना करावी.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, शिक्षक, शिक्षणव्यवस्था यातील अडचणी समजून घेऊन त्यावर राज्य, केंद्र पातळीवर उपाय शोधण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुशाखीय शिक्षक देशाच्या विविध भागातून आले आहेत. प्रत्येक राज्याच्या शिक्षणातील पद्धती, त्यातील अडचणी यावर चर्चा होणार आहे. शिक्षकाचे समाज घडविण्यात महत्वाचे योगदान आहे. आई – वडीलानंतर शिक्षकच हा महत्वाचा गुरू आहे, म्हणून शिक्षकांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे, हाच या परिषदेचा उद्देश आहे.
डॉ. जय गोर, डॉ. नंदकुमार निकम, डॉ. आय के भट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. एम. चिटणिस यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. दीपक आपटे यांनी आभार मानले.