पुणे : “कोणत्याही क्षेत्रात काम करताना आव्हाने येतात. उद्योग उभारताना तर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अपयशाला सामोरे जावे लागते. पण या परिस्थितीतून सकारात्मक मार्ग काढीत जिद्दीने उभे राहणारच यशस्वी उद्योजक बनतात. त्यामुळे मराठी माणसाने हिम्मतीने उद्योग उभारावेत,” असे मत युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित मोरे यांनी व्यक्त केले.
मराठी आंत्रप्रेन्युर्स नेटवर्क फोरमच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आदर्श उद्योजक-उद्योजिका पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरे बोलत होते. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी शारंगधर फार्माचे डॉ. जयंत अभ्यंकर, फोरमचे राजेश जोशी, सुरेंद्र कुलकर्णी, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सेवा क्षेत्रातील जीवन हेंद्रे, उत्पादन क्षेत्रातील प्रकाश दीक्षित, कृषी उद्योगातील उत्तम हुकरे यांना आदर्श उद्योजक, तर उत्पादन क्षेत्रातील उज्ज्वला गोसावी व खाद्य क्षेत्रातील प्राजक्ता पाठक यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रणजित मोरे म्हणाले, “मराठी माणूस प्रामाणिक असतो. तो ग्राहकाला कधी फसवण्याचा विचार करत नाहीत. जोखीम घेण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिजे. प्रत्येकवेळी यश मिळेल, असे नाही. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने उभा राहिले पाहिजे. महाराष्ट्रात उद्योगासाठी मोठा वाव आहे. आपण मार्केटचा अभ्यास करून त्यानुसार उद्योग विस्तार करायला हवा.”
डॉ. जयंत अभ्यंकर म्हणाले, “आपल्यातील क्षमता ओळखून त्यानुसार क्षेत्रनिवड केली पाहिजे. त्यात नाविन्यपूर्ण काम उभारता आले पाहिजे. उद्योगाच्या यशासाठी पैसे, विश्वास आणि कामावरची श्रद्धा या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. अपयशातून मार्ग काढत पुढे गेले पाहिजे.”
प्राजक्ता पाठक म्हणाल्या, आमच्यासारख्या उद्योगांना दाद दिली तर आमचाही काम करण्यासाठी उत्साह वाढतो. हे यश केवळ माझे नाही तर माझ्या कर्मचाऱ्यांचे आहे. उत्तम डुकरे म्हणाले, माझ्या उद्योगाची आईची साथ मोलाची आहे. उज्ज्वला गोसावी म्हणाल्या, हा पुरस्कार मी माझे वडील, आई आणि माझ्या जीवनसाथीला अर्पण करते. माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या साथ साठी धन्यवाद देते. प्रकाश दीक्षित म्हणाले, विविध उद्योजकांना एका छताखाली जमल्यामुळे एकमेकांना फायदा होईल. जीवन हेंद्रे म्हणाले, कुटुंबाची साथ मिळाली आणि सकारात्मक दृष्टीने काम करता आले, तर यश मिळते.
सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधवर, प्रास्ताविक वृषभनाथ कोंडेकर, मानपत्र वाचन जाई देशपांडे यांनी केले. आभार ऍड. राजश्री माने यांनी मानले.